मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
पाऊलवाटा कुशीत हिरवळ घेउ...

सुमन किराणे - पाऊलवाटा कुशीत हिरवळ घेउ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


पाऊलवाटा
कुशीत हिरवळ घेउन झाडा-झुडपांमधून
शेताकडं जाणार्‍या
काटेरी बोरी - बाभळीतून
आनावनात जाणार्‍या

डगर उतरत, गाळात रुतत
नदीकडं जाणार्‍या
वेडी - वाकडी वळणं घेत
डोंगरावर जाणार्‍या

ढोरा -गुरांना चरायला
कुरणात नेणार्‍या
दमल्या - भागल्या जिवांना
घराकडं घेऊन येणार्‍या

सरळ, वेड्या - वाकड्या, मऊ, खडकाळ
उन्हात तापलेल्या, सावलीतल्या थंडगार
काळ्या, भुर्‍या, लाल...

अशा कितीतरी पाऊलवाटांवरून
कधी चालायचं, कधी धावायचं
कधी नाचायचं, कधी बागडायचं
कधी धापा टाकायच्या, कधी हसायचं
कधी मध्येच कुठतरी
गप्पागोष्टी करत बसायचं...

कधी याच वाटांवर चिंचा - आवळे खायचे
कधी - करवंदं - बोरं चाखायची
पूर्वी या पाऊलवाटांशी
काही वेगळीच जिव्हाळ्याची नाती असायची

आज धकाधकीचे आणि पळापळीचे
दिवस आलेत
आणि या पाऊलवाटा, त्यांच्यावरचे ठसे
खडी - डांबर - सिमेंटखाली गडप झालेत

आता वेगाकडं जीव गहाण ठेवून
मोठमोठ्या रस्त्यांवरून धावताना
मन जातं नकळत गतकाळाच्या पाऊलवाटेवर...
आणि विचारतं :
‘ आज दिसेल का तेव्हासारखी
अशी मन जपून ठेवलेली
एखादी तरी पाऊलवाट ? ’

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP