मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
व्रतदिननिर्णय (स्मार्तांचा)

धर्मसिंधु - व्रतदिननिर्णय (स्मार्तांचा)

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


सूर्योदयी वेध असेल ती विद्धा आणि तशी नसेल ती शुद्धा. या प्रत्येकीचे आणखी जे भेद आहेत, ते येणेप्रमाणे

१. एकादशि मात्राधिक्यवती.

२. उभयाधिक्यवती

३. द्वादशी मात्राधिक्यवती आणि

४. अनुबयाधिक्यवती. असे एकंदर मिळून जे आठ प्रकार झाले. त्यांची उदाहरणे पुढीलप्रमाणे-

१. दशमी ५८ घ., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशीचा क्षय; अशा एकादशीला मात्राधिक्यवती शुद्धा म्हणतात.

२. दशमी ४ घ., एकादशी २ घ. आणि द्वादशीचा क्षय अशी जी असते तिला मात्राधिक्यवती विद्धा एकादशी असे म्हणतात. या दोन्ही उदाहरणात, जे गृहस्थ स्मार्त असतील त्यांनी उपासाला पहिली घ्यावी आणि यति, निष्काम, गृहस्थ, वानप्रस्थाश्रमी, विधवा आणि वैष्णव यांनी उपासाला दुसरी घ्यावी. विष्णुच्या कृपेची इच्छा करणार्‍या स्मार्तांनी दोन्ही दिवशी उपास करावे असे काहींचे सांगणे आहे.

३. दशमी ५८ घ., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशी ४ घ. ही जी, ती उभयाधिक्यवती होय.

४. दशमी २ घ., एकादशी ३ घ. आणि द्वादशी ६० घ. १ प. असल्यास ही द्वादशी मात्राधिक्यवती विद्धा असे समजावे. या दोन्ही उदाहरणात सर्व वैष्णव आणि स्मार्त यांनी शिल्लक असलेली दुसरीच एकादशी पाळावी.

५. दशमी ५८ घ. एकादशी ५९ घ. आणि द्वादशी ६० घ. १ पळ; ही द्वादशी मात्राधिक्यवती शुद्धा होय. ही शुद्धा असल्याने, स्मार्तांनी एकादशीलाच उपास करावा, द्वादशीला करू नये, असे माधवाचे मत आहे. या बाबतीत हेमाद्रि म्हणतो की, सर्वांनी दुसर्‍या दिवशी द्वादशीलाच उपास करावा. मोक्षाची इच्छा असलेल्या स्मार्तांनी दुसर्‍या दिवशी उपास करावा. असेही काहींचे मत आहे.

६. दशमी १ घ. एकादशी क्षयाला गेलेली ५८ घ. आणि द्वादशीची वृद्धि ५०घ. १प. ही एकादशी विद्धा झाली असल्यामुळे, स्मार्तांनी द्वादशीलाच उपास करावा. त्याप्रमाणेच उभयाधिक्य आणि द्वादशीमात्राधिक्य अशी जी विद्धा एकादशी, ती स्मार्तांनी पाळू नये व इतर सोडू नये. वैष्णवांनी सहाही प्रकारची आधिक्यवती सोडून द्वादशीलाच उपास करावा.

७. दशमी ५७ घ. एकादशी ५८ घ. आणि द्वादशी ५९ घ. ही अनुभयाधिक्यवती शुद्धा होय. या प्रसंगी सर्वांनी एकादशीलाच उपास करावा. द्वादशीला करू नये. ही विद्धा असल्याने वैष्णवांनी द्वादशीलाच उपास करावा.

८. दशमी २ घ. एकादशीचा क्षय ५६ घ. आणि द्वादशी ५५ घ. असा जेव्हा प्रसंग असेल, तेव्हा देखील स्मार्तांनी एकादशीलाच उपास करावा आणि वैष्णवांनी द्वादशीला करावा. येथे उभयानाधिक्यवती विद्धा एकादशीच्या शेवटच्या भेदात पहिल्या दोन भेदाप्रमाणे-संन्यासी, मोक्षेच्छु आणि विधवा यांनी उपासाला दुसरीच घ्यावी. विष्णूची कृमा इच्छिणार्‍यांनी दोन्ही दिवशी उपास करावे असे योग्य युक्तिवादाने मला वाटते. सध्या सर्वत्र शिष्ट लोक हेमाद्रीचे मत आणि निष्कामत्वादिक यांचा अनादर करून, माधवाच्या मताप्रमाणेच त्यात तिळमात्रहि फरक न करता- स्मार्त निर्णय सांगतात. दोन उपास करावे. अथवा शुद्धाधिका द्वादशिकेला पुढल्या दिवशी उपास करावा असे कोणीही सांगत नाहीत. याप्रमाणे बहुतेक सर्वत्र माधवाचेच मत प्रचारात आहे असे समजावे. यावरून, वैष्णवांचे जे अठरा भेद आणि स्मार्तांचे जे अठरा भेद, त्यांचा निर्णय या उदाहरणांनी अर्थहीन ठरतो हे स्पष्टच झाले. या बाबतीत जास्त माहिती पाहिजे असल्यास मोठाले ग्रंथ पाहावेत. अज्ञानांची भ्रांति दूर व्हावी म्हणून, या पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी जो अठरा भेदांच्या उदाहरणांसह एक पट जोडला आहे व त्याचा जो निर्णयही तेथेच सांगितला आहे, तो पाहावा.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP