मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ४१

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


श्रीगणेशाय नमः ।

बहुत साधनें ऐकीलीं श्रवणीं । परी तीं न होती मजलागुनी ।

मग संतांचिये निजस्तवनीं । रंगली वाणी सद्भावें ॥१॥

एक योगयाग करिती पाठ । व्रतें आचरती कोणी श्रेष्ठ ।

मी विष्णुभक्तांचा होऊनि भाट । सत्कीर्ति उत्कृष्ट गातसें ॥२॥

ते आपुले कृपेनें निश्चित । चरित्रें लिहविती मज हातीं ।

येर्‍हवीं मी अज्ञान मंदमती । हें लोक जाणती सर्वत्र ॥३॥

जो देवाधिदेव रुक्मिणीवर । त्याचें हातीं असे सूत्र ।

तो आपुल्या दासांचीं चरित्रें । राजीवनेत्र वदवीतसे ॥४॥

कळा हीन चातुर्य हीन । अक्षर वटिका मेळवूंच नेणें ।

बुद्धीचा चालक जगज्जीवन । त्याचें कारण तोचि जाणें ॥५॥

मागिलें अध्यायीं कथा सुंदर । श्रीतुकाराम वैष्णव वीर ।

त्याचें चरित्र सविस्तर । ऐकिलें साचार सज्जनीं ॥६॥

आतां विजापूरामाजी साचार । केशव स्वामी भक्त थोर ।

जो भक्तिज्ञानांसि आगर । वैराग्य भरतो अंगीं ॥७॥

श्रीपांडुरंगाचें उपासन । यथाविधि करिती अर्चन ।

आणि सर्वकाळ नामस्मरण । सगुण ध्यान अहर्निशी ॥८॥

आत्मज्ञान असोनि अंतरीं । जो साकार मूर्तीसी प्रेम धरी ।

ऐसें दुर्लभ चराचरीं । धुंडितां धरिगीं नाढळती ॥९॥

स्वरुपें सुंदर लावण्यासरिता । त्याहीवरी पतिव्रता ।

विरळा दृष्टींसी धूंडोनि पाहतां । नसती बहुता या रीती ॥१०॥

भक्तिज्ञान वैराग्यपूर्ण । हें केशव स्वमीचे अंगीं भूषण ।

कवित्व बोलती प्रसाद वचन । ऐकतांचि श्रवण सुखावती ॥११॥

दया परिपूर्ण सर्वांभूतीं । आत्मवत् विश्व आली प्रचीती ।

त्या अनुभवाचे उद्गार येती । कीर्तनीं बोलती तेंचि वचन ॥१२॥

आषाढी आणि कार्तिकमासीं । येत असती पंढरीसी ।

नेमें वारी चालविती ऐसी । सप्रेम मानसीं सर्वदा ॥१३॥

कीर्तन करिता वैष्णव वीर । तेथें रंग येतसे फार ।

जनांत प्रतिष्ठा वाढली थोर । मानिती सर्वत्र तयासी ॥१४॥

कृपेनें पाहतां जगज्जीवन । तयासि मानिती सर्वत्र जन ।

विश्वोद्धार करावया पूर्ण । अवतार सगुण धरियेला ॥१५॥

जनांत प्रशंसा वाढली बहुत । तेणेंचि कंटाळलें चित्त ।

मग कोणासि पुसतां निश्चित । अर्ध रात्रीं निघत तेथोनियां ॥१६॥

चित्तीं हेत धरिला पूर्ण । आतां श्रीकृष्णातीरीं करावें स्नान ।

ऐसें म्हणवोनि वैष्णव जन । करितसे गमन तेधवां ॥१७॥

मार्गीं चालतां अति त्वरित । भजन करित प्रेमयुक्त ।

तों बाळकरुपें पंढरीनाथ । खांद्यावर बैसत तयाच्या ॥१८॥

नानापरीचीं पदांतरें । विष्णुभक्त गातसे चरित्रें ।

देव बैसोनि खांद्यावर । सप्रेमभरें ऐकती ॥१९॥

मार्गीं चालतां साचार । तों शेतकरी बैसला माळ्यावर ।

त्याणें देखिलें बाळक सुंदर । खांद्यावर बैसलें ॥२०॥

सगुण रुप पाहतांचि जाण । त्याचें तत्काळ वेधलें मन ।

रुपीं गुंतले असती लोचन । ते स्वामी निघोन दूर गेले ॥२१॥

जीवीं चटपट लागली पाहीं । म्हणे ऐसें बाळक देखिलें नाहीं ।

उचलोनि धरीलें असतें हृदयीं । तरी संतोष जीवीं वाटता ॥२२॥

कुणबियासी दर्शन झालें रोकडें । तें रुप आठवी दृष्टीपुढें ।

अन्न उदक न लगेचि गोड । निज निवाडें लक्षीतसे ॥२३॥

इकडे केशवभक्त ते अवसरीं । सत्वर गेले कृष्णातीरीं ।

अनुताप धरोनि निजांतरीं । स्नान करीतसे ते ठायीं ॥२४॥

तीन रात्री क्रमोनि तेथ । परतोनि येतसे विष्णुभक्त ।

तों कुणबी मार्गीं वाट पाहत । वेधलें चित्त तयाचें ॥२५॥

केशवभक्तासि देखोनि नयनीं । नमस्कार केला जोडोनि पाणी ।

मग हात जोडोनि तये क्षणी । अमृतवचनीं बोलत ॥२६॥

म्हणे स्वामी गेलेति याचि पंथे । तेव्हां खांद्यावर बाळक होतें ।

तें स्वरुपें सुंदर असे बहुत । वेधलें चित्त देखता ॥२७॥

तें कोठें टाकूनि आलेति आतां । नेत्र शीणले वाट पाहतां ।

ऐकोनि कुणबियाची वार्ता । विस्मित चित्तांत मग होती ॥२८॥

म्हणती आम्हीं खांदीं बाळक पाहीं । कोणाचें कधीं घेतलें नाहीं ।

कृषीवळ सांगतसे कायी । विस्मित जीवीं जाहले ॥२९॥

पुढें अरण्यांत जाऊनि सत्वर । एकांतीबैसे वैष्णववीर ।

मग एकाग्र मन करोनि स्थिर । झांकिले नेत्र तयानें ॥३०॥

म्हणे पंढरीनाथा देवाधिदेवा । मी निरंतर करितों तुझी सेवा ।

ऐसें असतां कमळाधवा । दर्शन केव्हां न देसी ॥३१॥

आणि बाळक रुप धरुनि साकार । बैसलासि माझ्या खांद्यावर ।

रानवट कुणबी माळ्यावर । भेटलासि साचार त्यालागीं ॥३२॥

तुजसी भाव धरितां श्रीहरी । तया पासोनि पळतोसि दुरी ।

आणि अभक्‍त द्वेषी जे अंतरीं । तयां समोरी तिष्ठसी तूं ॥३३॥

रांगतां काच बद्धभूमीवर । यशोदेसि न दिससी राजीव नेत्र ।

आणि कंस द्वेषी दुराचार । तयाच्या समोर सर्वदा ॥३४॥

ऐसा तुझा स्वाभाविक गुण । आर्तवंताच्या पुढें लपणें ।

आता टाकोनि निर्गुणपण । देयीं दर्शन मज देखा ॥३५॥

जरी तूं न येशील आतां । तरी मी प्राण त्यागीन सर्वथा ।

ऐसा सप्रेम धांवा करितां । हें रुक्मिणीकांता जाणवलें ॥३६॥

मग सगुणरुपें साक्षात श्रीहरी । प्रगट झाले ते अवसरीं ।

केशव पाहे उघडोनि नेत्रीं । तों वैकुंठ विहारी देखिला ॥३७॥

सांवळा सुकुमार रुक्मिणीरमण । कानीं कुंडलें दैदीप्यमान ।

दिव्य पीतांबर झळके पूर्ण । त्या तेजें नयन झांकती ॥३८॥

जें योगियाचें निज ध्यान । नीलग्रीवाचें देवतार्चन ।

तो केशव स्वामिसि हृदयीं धरोन । अमृत वचन बोलतसे ॥३९॥

म्हणे तूं कृष्णातीरासि जात असतां सत्वरी । तेव्हां मीच बैसलों खांद्यावरी ।

परी तुज देहभान नाहीं अंतरीं । यास्तव नेत्रीं न पाहिलें ॥४०॥

आतां विजापुरासि येऊन सत्वर । कीर्तन करावें निरंतर ।

तीच माझी पूजा साचार । आन विचार करुं नको ॥४१॥

इतुकें तयासि बोलोनि वचन । देव पावलें अंतर्धान ।

कीं निजभक्‍ताचें हृदयभुवन । वस्तिस्थान तें केलें ॥४२॥

श्रीहरीच्या वचनानि देऊनि मान । विजापुरासि आले परतोन ।

भाविक प्रेमळ तेथीचे जन । संतोष मनें त्यांसि झाला ॥४३॥

तों चरित्र वर्तलें एक अघटित । तें श्रवण करावें देऊनि चित्त ।

एक सावकार होतां नगरांत । तो असे धनवंत सदा सुखी ॥४४॥

रौप्य मुद्रा पन्नास सहस्त्र । खर्चोनि त्याणें बांधिलें मंदिर ।

ग्रह शांति करोनि सत्वर । दानें द्विजवर तोषविले ॥४५॥

परी त्या हवेलीमाजी जाण । ब्रह्मराक्षस शिरले दोन ।

घरधनी निद्रित होतांचि पूर्ण । त्यासि बाहेर उचलोन टाकिती ॥४६॥

पिशाचाचें भय फार । सावकारें त्यजिलें तें घर ।

पूर्वस्थळीं राहिला सत्वर । मुलें लेंकरें घेऊनी ॥४७॥

ब्रह्मराक्षस निघावया कारणे । करविलीं तीव्र अनुष्ठानें ।

परी कांहींच उपाय न चले जाण । मंत्रज्ञ ब्राह्मण पीडिती ॥४८॥

पंचाक्षरी घेऊनि विभूती । द्वारा बाहेरुनि फुंकिती ।

सदनीं प्रवशतां तयांप्रती । बांधोनि टाकिती राक्षस ॥४९॥

ऐसे उपाय केले फार । परी अवघ्यांचे बौद्ध जाहले मंत्र ।

तंव कोणी जाऊनि भाविक नर । सांगती विचार सावकारा ॥५०॥

म्हणती केशवस्वामी वैष्णव पूर्ण । त्यासि विनवावें कर जोडून ।

हवेलींत करावे कीर्तन । तेणें पिशाच पळोनि जातील ॥५१॥

ऐसी सांगतां विवेक नीती । सावकारासि मानली वचनोक्‍ती ।

मग केशवस्वामीसि करोनि विनंती । कीर्तनासि आणिती ते ठायीं ॥५२॥

समुदायेंसी वैष्णव वीर । ते स्थळीं चालिले सत्वर ।

टाळ मृदंग वाजती सुस्वर । नादें अंबर कोंदलें ॥५३॥

दिंडया पताका बहुवस । करील चालिले कीर्तन घोष ।

नादब्रह्मचि आलें मुसें । नामघोषें गर्जती ॥५४॥

रामकृष्ण हरी गोविंदा । अच्युता अनंता आनंदकंदा ।

परमपुरुषा सच्चिदानंदा । श्रीमुकुंदा जगद्‌गुरु ॥५५॥

ऐसीं नामें बहुवस । प्रेमें गातसे केशवदास ।

मंदिरीं प्रवेशतांचि त्यास । तों ब्रह्मराक्षस पुढें आले ॥५६॥

हात जोडोनि मधुरोत्तर । बोलते जाहले पिशाचनर ।

तुझ्या दर्शनमात्रें साचार । जाहला उद्धार आमुचा ॥५७॥

ऐशा रीतीं बोलोनि वचन । मग पावते झाले अंतर्धान ।

आश्चर्य करिती सकळ जन । कौतुक दृष्टींसीं देखोनी ॥५८॥

हें सकळ क्षेत्रांत जाहलें श्रुत । कीर्तनासि आले लोक बहुत ।

मनुष्य न माय वाडियांत । दाटी बहुत जाहली ॥५९॥

केशव स्वामीचीं प्रसाद वचनें । श्रवण करिती सभाग्य जन ।

नाम रुपीं जडलें मन । तन्मय होऊन राहिले ॥६०॥

श्रीरामकृष्ण चरित्र जाण । हेंचि लाविलें अनुसंधान ।

श्रोतयांसि नाहीं देहभान । तटस्थ मन सकळांचें ॥६१॥

कीर्तन झालें चारी प्रहर । तों उदयासि पातला दिनकर ।

मग पंचारती उचळोनि सत्वर । श्रीरुक्मिणीवर ओवाळिला ॥६२॥

सावकारें निपजवोनि मिष्टान्नें । मंदिरीं घातलीं सहस्त्र भोजनें ।

मग मुलांलेंकरासहित जाण । त्या घरीं येवोन राहिला ॥६३॥

आणिक चरित्र ऐका भाविक । बाजीद पठाण होता एक ।

तो पादशाई सुभा असे देख । सेनानायक रायाचा ॥६४॥

पंचवीस सहस्त्र सैन्य निश्चिती । त्याच्या स्वाधीन होती संपत्ती ।

सदा यशस्वी पूण्यमुर्ती । समोर न ठाकती शत्रु त्याच्या ॥६५॥

हिंदुस्थान देशांत जाऊनि त्याणें । बहुत मेळविले संपत्तिधन ।

सवें पंचवीस सहस्त्र सैन्य । आला परतोन स्वदेशा ॥६६॥

विजापुरासि येतां साचार तों । मार्गी वर्तलें एक चरित्र ।

खजिना घातला उंटावर । झालासे भार बहु त्यासी ॥६७॥

उरी फुटोनियां जाण । उंट जाहला गतप्राण ।

त्याजवरील द्रव्य काढोन । रक्षीत सारवान बैसला ॥६८॥

तों खाशी स्वारी मागून येत । हत्ती घोडे शिबिका रथ ।

बाजीद पठाण देखोनि त्यातें । सारवानातें काय म्हणे ॥६९॥

मार्गावर कां तुम्ही बैसलां । मग ते म्हणती उंट मेला ।

सरदार म्हणे आहे बैसला । उठवा त्याजला सत्वर ॥७०॥

सकळ गात्रें दिसती पाहे । यांत मरोनि गेलें काय ।

स्वामीचें चित्तीं वागवोनि भय । मग त्यांणीं उपाय केला ॥७१॥

चार मेडी रोऊनि तेथें । आडोळ्यावरी बैसविलें प्रेत ।

द्रव्य उचलोनि तया वरुतें । सारवान ठेवित ते समया ॥७२॥

मनुष्य मृत्यु पावते कैसें । हें बाजीदास विदित नसे ।

घरचें कुटुंब सर्व असे । कानीं म्रुत्यूस न ऐकिले ॥७३॥

आजा आजी माता पिता । बंधु पुत्र आणि कांता ।

अवघींच होतीं तयादेखतां । मरणाचीं वार्ता तो नेणें ॥७४॥

आणिकांचे दुःख ऐकोनि कानीं । हेंही नावडे त्याचें मनीं ।

यास्तव दैन्य दुःख स्वप्नीं । नाहींच त्याणी देखिलें ॥७५॥

मृत्युलोकीं जीवासि मरण असे । हे तों तयासि विदित नसे ।

पूर्व पुण्याचेनि लेशें । विषयींच असे निमग्न तो ॥७६॥

यास्तव सारवानासि म्हणे । उंट हाक चला त्वरेनें ।

ते म्हणती चालवितें चैतन्य। तें गेलें निघोन सत्वर ॥७७॥

तुमचें भय वागवोनि फार । खजिना घातला प्रेतावर ।

परी निघोनि गेला चालविणार । यासि विचार कोणता ॥७८॥

चौर्‍याशीं लक्ष देह निश्चिती । तितुक्यांचीही ऐशीच गती ।

बाजीद ऐकोनि वचनोक्ती । अनुताप चित्तीं जाहला ॥७९॥

म्हणे नाशवंत हा देह निश्चिती । शेवटीं आपुल्यासही ऐसीच गती ।

सात्विक वैराग्य ठसलें चित्तीं । मग काय युक्ती करितसे ॥८०॥

स्वार शिपायी होते जवळ । त्यांची तलब वारिली सकळ ।

उरलें धन तें तत्काळ । वांटीत ते वेळ याचकां ॥८१॥

वस्त्रें अळंकार भूषणें । तींहीं दीधलीं द्विजांकारणें ।

शुद्ध सात्विक वैराग्य लक्षण । निस्पृह होऊन राहिला ॥८२॥

मग यवन भाषेनें निश्चित । साक्या बोलिले पंचाशत ।

त्यांतील दोन साक्या लिहितों येथ । पाहिजे संमत सज्जनीं ॥८३॥

साकी ॥ भज मन तों रामकें बैठता कामो । दिनो चारका रंग मिलेगा खाकमो ॥१॥

गले तुलसीकी माल सुमरन शामको । एकहि बरे भोजन आपके हातकों ॥२॥

ओव्या । ऐसा विवेक करोनि मनीं । निस्पृह झाला तये क्षणीं ।

षड्‌वैरियांसि जिंतोनि । शुद्ध सत्वगुणी तो झाला ॥८४॥

मग विजापुरांत जावोनि आपण । केशव स्वामीसि गेला शरन ।

त्याचा अनुग्रह संपादून । श्रीराम भजन करीतसे ॥८५॥

सद्‌गुरु कृपा होतांचि निश्चिती । तत्काळ जाहली कवित्व स्फूर्ती ।

कीर्तन करीत सप्रेम युक्‍ती । ऐकतां विश्रांती श्रोतयां ॥८६॥

पद पदांतरें रचिलीं फार । परी स्वामीचा अभंग घातला वर ।

जनांत प्रशंसा वाढली फार । साक्षात्कार जाहला ॥८७॥

आणिक संतचरित्रें अद्भुत । सादर ऐका भाविक भक्त ।

संतोबा पवार जगविख्यात । रांजणगांवांत राहतसे ॥८८॥

त्याजसारिखी आणिकांसी पाहीं । सद्गुरु सेवा घडली नाहीं ।

कैशा रीतीं वाटेल जीवीं । चरित्र तेंही ऐकावें ॥८९॥

शिवाजी पुण्यवंत नृपवर । जयापासील हा सरदार ।

दोन शतें वागवित स्वार । वेतन जाहगीर गांव असती ॥९०॥

सांडसाचें रांजण गांव । तेथें मुलें माणसें असती सर्व ।

मान मान्यता वैभव । परी संतती नसे पोटीं ॥९१॥

त्याची पत्‍नी सुलक्षण । येसूबायी नामाभिधान ।

स्त्रीपुरुष दोघेजण । निजप्रतीनें ते असती ॥९२॥

मग कांता म्हणे त्या अवसरा । दुसरें लग्न आपुलें करा ।

तेणें वंश वाढेल बरा । माझिया अंतरा हें आलें ॥९३॥

ऐसें सांगतां येसूबायी । संतोबा उत्तर देतसे कायी ।

आतां तुझी प्रीति जीवीं । मग विक्षेप दोहींत होईल ॥९४॥

बंधूसि दोन असती कुमर । परी ते जाणावे आपुलेच पुत्र ।

वस्त्रें अलंकार मुलांवर । लोभ अपार करीतसे ॥९५॥

साता पांचा वर्षांत जाण । बंधुचे पुत्र जाहले दोन ।

संतोबा पंतोजीसि बोले वचन । लिहूं शिकवणें कुमारांसी ॥९६॥

रौप्यमुद्रा एक शत । वेतन नेमोनि दीधलें त्यातें ।

मग पंत राहवोनि वाडियांत । लिहूं शिकवित त्या दोघां ॥९७॥

तों मुलांचा समाचार घ्यावयासी । संतोबा येत पंतोजीपासीं ।

तों स्नान करोनि त्या समयासी । मानस पूजेसी बैसला ॥९८॥

धाबळीचा घुंगुट घेऊन । जप करीत निजप्रीतीनें ।

संतोबा तयासि बोलती वचन । काय गुणगुण करितसां ॥९९॥

तो म्हणे सद्‌गुरुनें सांगितलें कांहीं । तें जपत बैसलों ये समयीं ।

संतोबा त्याच्या लागतसे पायीं । म्हणे तो मंत्र लवलाहीं मज द्यावा ॥१००॥

तो म्हणे आपणा योग्य पाहोनि समर्थ । त्याचा अनुग्रह घ्यावा निश्चित ।

मी तरी तुमचा चाकर सत्य । उदर निमित्तार्थे राहिलों ॥१॥

ऐकोनि म्हणे सद्गुरुभक्त । माझा आतांचि उपजला हेत ।

क्षणक्षणां पालटेल चित्त । आणि अशाश्वत शरीर हें ॥२॥

ऐसें म्हणवोनि ते समयीं । पूजेचें साहित्य आणविलें पाहीं ।

सद्‌गुरुचे लागूनि पायीं । अनुग्रह तिहीं संपादिला ॥३॥

मुलांसि लिहूं सांगावया देख । दुसरा पंतोजी ठेविला आणिक ।

सद्‌गुरु सेवा करितसे हरिखें । साहित्य आणिक कांहीं दिलें ॥४॥

वस्त्रें भूषणें अलंकार । पूजा केली सर्वोपचारें ।

ब्राह्मण जेवूं घातले सहस्त्र । कीर्तन गजर करविला ॥५॥

मग नूतन मंदिर बांधोन । ते स्थळीं राहविलें स्वामीकारणें ।

पाक निष्पत्तीसि ब्राह्मण । तोही नेमून ठेविला ॥६॥

सद्‌गुरुचे खिजमतीसी । दीधले दास आणि दासी ।

सहस्त्र मुद्रा खर्चावयासी । दिवाणासी सांगीतलें ॥७॥

मग कांतेप्रती बोलती उत्तर । आम्हीं सैन्यांत जातों दूर ।

स्वामिसेवेसी पडेल अंतर । समाचार घेत जावा ॥८॥

ऐसें सांगतां ते समयीं । अवश्य म्हणे येसूबायी ।

मस्तक ठेवूनि सद्‌गुरुपायीं । सैन्यांत लवलाही मग गेले ॥९॥

सेना संपत्ती घेऊनि समग्र । संतोबा पवार गेले दूर ।

त्याच्या आज्ञेनें साचार । होती उपचार सद्‌गुरुचे ॥११०॥

वस्त्रें अलंकार भूषणें । भोजन मिळतसे मिष्टान्न ।

कुटुंब नसे त्याजकारणें । उद्विग्न मन सर्वदा ॥११॥

आधींच तरुण होतें शरीर । आणि होऊं लागले उपचार ।

तेणें विकारें साचार । विषयांवर मन धांवे ॥१२॥

सेवेसी दीधली होती दासी । संभोग करुं लागले तिसीं ।

कानोकानीं गोष्ट ऐसी । कारभारियासी श्रुत झाली ॥१३॥

ते आधींच कुटिळ होते जाण । याहीवरी क्षुद्र सांपडलें उणें ।

जैसें मर्कटासि मदिरापान । तैसेंचि दिसोन आलें कीं ॥१४॥

मागें पुढें बोलती एक । संतोबा केवळ भोळा भाविक ।

सद्‌गुरु पाहिला असता आणिक । तेणें लौकिक थोर होता ॥१५॥

पंतोजीचें लागत होतें ऋण । तें या जन्मीं फेडित उसणें ।

आतां रक्षा राखिली त्याणें । विषयीं निमग्न जाहला ॥१६॥

संतोबाची निज कांता । येसूबायी पतिव्रता ।

तिजपासी सांगती वार्ता । धीर सर्वथा त्यांसि नाहीं ॥१७॥

म्हणती सैन्यांत गेलिया सुभेदार । गुरुनें मांडिला अनाचार ।

दासीचे मस्तकीं ठेवूनि कर । निरंतर भोगित ॥१८॥

येसूबाई उत्तर देत । त्याची निंदा करितां व्यर्थ ।

घरधणी गांवास आलिया निश्चित । मग व्हाल फजीत यायोगें ॥१९॥

गोष्टी ऐकोनि ते वेळे । उगेचि राहिले निंदक खळ ।

आपुल्या चित्तीं करिती तळमळ । परी कांहींच बळ चालेना ॥१२०॥

येसूबाई वारंवार । घेत सद्‌गुरुचा समाचार ।

सेवेंत कांहीं न पडे अंतर । सद्भावें नमस्कार करी तया ॥२१॥

ऐसें एक वर्ष लोटलियावरी । संतोबा परतोनि आले घरीं ।

सामोरे जाऊनि कारभारी । निज मंदिरीं आणिताती ॥२२॥

आधीं सद्‌गुरुचे जावोनि सदनीं । साष्टांग नमस्कार घातला धरणीं ।

आलिंगन देतां प्रीती करोनि । विश्रांति मनीं पावले ॥२३॥

दुसरे दिवसीं सद्‌गुरुभक्‍त । महापूजेचें साहित्य करीत ।

तों कुटिळ येऊनियां दुर्मत । कानीं सांगत तयाच्या ॥२४॥

म्हणती तुम्हीं करुं इच्छितां पूजन । परी दासीसी रतलें त्याचें मन ।

संतोबा करोनि हास्यवदन । अमृत वचन बोलत ॥१५॥

म्हणे संसारीं आलिया तत्त्वतां । आम्हीं सद्‌गुरु जोडला पिता ।

परी पूजावयासि नव्हती माता । तरी उत्तम आतां घडलें कीं ॥२६॥

ऐसा सद्भाव धरोनि अंतरीं । आनंदें उत्सव मांडिला घरीं ।

मंगळ तुरे लावोनि गजरीं । पूजन करी तयांचें ॥२७॥

वस्त्रें अलंकार भूषणें । सद्‌गुरुसि अर्पीत निजप्रीतीनें ।

धूप दीप निरांजनें । यथाविधीनें करीतसे ॥२८॥

आपुले कांतेचे अलंकार जैसे । गुरुपत्‍नीसि दीधले तैसे ।

नमस्कार घालोनि उभयतांस । म्हणे धन्य सुदिन हा ॥२९॥

यापरी जाहलें सद्‌गुरु पूजन । मग केलें ब्राह्मण संतर्पण ।

कोणी क्षुद्र न बोलती वचन । भयें करुन तयाच्या ॥१३०॥

निंदा करीत होते दुर्मत । ते लज्जित झाले आंताच्या आंत ।

जैसा दिनकर उदयासि येत । मग तमाचाच होत प्रकाश पैं ॥३१॥

आपुलें चित्त शुद्ध होतां जाण । शत्रु ते होती मित्रासमान ।

तेवीं सद्भाव धरितां संतोबानें । दुरिताचें पुण्य थोर झालें ॥३२॥

ऐसी त्याची निःसीम भक्‍ती । सद्‌गुरुसेवेसी पूर्ण आर्ती ।

देखोनि विश्वात्मा वैकुंठपती । संतोष चित्तीं मानीतसे ॥३३॥

म्हणोनि संतोबा भक्‍त थोर । सद्‌गुरु सेवेसि न पडे अंतर ।

दिवसें दिवस अधिकोत्तर । सद्भाव थोर वाढला ॥३४॥

म्हणे सद्गुरु रुप हें मीच निश्चिती । याणें पूजिलें यथस्थिती ।

तरी वैराग्ययुक्‍त निःसीम भक्‍ती । उचित याप्रती अर्पावी ॥३५॥

ऐसें इच्छितां जगज्जीवन । तों झालें निमित्तासि कारण ।

तुकोबाचे अभंग ऐकिले दोन । हरिकीर्तन होतांची ॥३६॥

तेणेंचि अनुताप जाहला चित्ता । म्हणे संसारत्याग करावा आतां ।

सांडूनि देह गेह ममता । पंढरीनाथा भजावें ॥३७॥

मग वस्त्रें भूषणें अलंकार । वांटोनि तोषविले द्विजवर ।

फाटकें नेसोनि अंगवस्त्र । बेटावर बैसले ॥३८॥

कांताही परम पतिव्रता । धुंडित गेली प्राणनाथा ।

म्हणे कासया येथें आली आतां । प्रपंच ममता टाकोनी ॥३९॥

ते म्हणे जैसी शरीरच्छाया । कां ब्रह्मीं संलग्न असे माया ।

तेवीं मी जडलें तुमच्या पायां । ठाव जावया नसेची ॥१४०॥

अंतरसाक्ष संतोबा पूर्ण । जाणे भक्‍ति वैराग्य लक्षण ।

म्हणे झाड पाला खावोनि राहणें । आम्ही न सेवूं अन्न सर्वथा ॥४१॥

ऐसें ऐकोनि ती सुजाण । त्यागिलीं वस्त्रें आणि भूषणें ।

तीन दिवस करितां उपोषण । मग दर्शन सगुण त्यांसि जाहलें ॥४२॥

साक्षात येऊनि पांडुरंग मूर्ती । क्षेम आलिंग्न देतसे प्रीतीं ।

म्हणे मी तुमच्या हृदयीं असें श्रीपती । वियोगें खंती न करावी ॥४३॥

आतां भिक्षा मागोनि सेविजे अन्न । प्रेमें करावें माझें भजन ।

ऐसें सांगोनि रुक्मिणीरमण । अंतर्धान पावले ॥४४॥

संतोबाची अनुपम स्थिती । देहींच जाहली विदेह स्थिती ।

सद्‌गुरुची निःसीम भक्‍ती । यास्तव श्रीपतीं तुष्टले ॥४५॥

आणिक ही चरित्रें नाना रीतीं । चमत्कार दाविले लोकांप्रती ।

बहुतां जनांसि लाविली भक्‍ती । निष्काम स्थिती धरोनियां ॥४६॥

आतां मालोपंत प्रेमळ भक्‍त । तयासि पावले पंढरीनाथ ।

त्याचें चरित्र अति अद्भुत । तें ऐका निजभक्‍त भाविक हो ॥४७॥

वराड देशामाजी निश्चिती । तयासि होती पूर्व वस्ती ।

परम सुशीळ पुण्यमूर्ती । करीतसे भक्‍ती विठोबाची ॥४८॥

गृहस्थ व्यापारी नामांकित भला । कर्नाटकांत रोजगार केला ।

कुटुंबासहित तेथें राहिला । चित्तीं विठ्ठला आठवोनी ॥४९॥

तयासि पुत्र सुलक्षणिक । नरहरी नाम तयासि देख ।

पुत्र पिता बहु सात्विक । चित्तीं विवेक सर्वदा ॥१५०॥

आत्मवत मानी विश्वजन । सर्वभूतीं दया पूर्ण ।

दीन अतिथी यांजकारणें । अन्न दान करीतसे ॥५१॥

विष्णु अर्चन निरंतर । श्रीहरि कीर्तनीं प्रीति फार ।

संत सेवेसि असे सादर । असत्य उत्तर न बोले ॥५२॥

कांहीं एक दिवस लोटतां । तों निवर्तली तयाची कांता ।

तेणेंचि दुःख झालें चित्ता । म्हणती कैसे आतां करावें ॥५३॥

पुढती विवेक करोनि अंतरा । म्हणती भव पाश तुटला बरा ।

चित्तीं आठवोनि रुक्मिणीवरा । तोडिला थारा अविद्येचा ॥५४॥

परी लोकीं आग्रह करोनि देख । हेडीची नोवरी पाहिली एक ।

लग्न लाविलें तत्काळिक । पुढें दुःखदायक तें झालें ॥५५॥

कांहीं दिवस लोटतां । तों पातला नोवरीचा पिता ।

तो तरी जातीचा अनामिक होता । त्याणें दुहिता ओळखिली ॥५६॥

मग मालोपंतापासीं जावोनि त्याणें । सांगीतलें आद्यंत वर्तमान ।

गांव नांव ठावठिकाण । अंत्यज म्हणे यातीचा मी ॥५७॥

माझी कन्या तस्करीं । उचलोनि आणिली अर्धरात्रीं ।

तीच तुम्हीं केली नोवरी । अनाचार निर्धारीं हा दिसे ॥५८॥

ऐसी ऐकोनि वचनोक्ती । परम अनुताप जाहला चित्तीं ।

म्हणे त्राहे त्राहे वैकुंठपती । पतित त्रिजगतीं मी एक ॥५९॥

सकळ दुरितें करोनि गोळा । त्याचा मी निर्माण जाहलों पुतळा ।

पतितपावना दीनदयाळा । निवेदन तुला असों दे ॥१६०॥

मग कांतेसि बोलावूनि तत्त्वतां । म्हणे तुवां ओळखिला आपुला पिता ।

तीही समजोनि आपुल्या चित्ता । न बोले वार्ता तयासी ॥६१॥

अनामिकासि मालोपंत म्हणे । आपुले कन्येसि घेऊनि जाणें ।

मग आम्हांसि जैसें सांगती ब्राह्मण । तें कारण विचारुं ॥६२॥

अनामिक तयासि म्हणताहे । विटाळलें भांडें नेऊनि काय ।

स्वयात ठेवील प्रत्यवाय । मग म्यां काय करावें ॥६३॥

ऐसें तयासि वदोनि पाही । अनामिका गेला आपुले गांवीं ।

जघन्य जाहलें सर्वाठायीं । भ्रष्टविलें इहीं लोक म्हणती ॥६४॥

हेडीची नोवरी दीधली ज्याणें। तो तरी रात्रीं गेला पळोन ।

मुलांलेंकरासमवेत जाण । केला दुर्जनें देशत्याग ॥६५॥

मालोपंत संसारीं होते सधन । यास्तव घरीं मिळाले पिशुन ।

अरिष्ट येतांचि महादारुण । देही टाकोन पळाले ॥६६॥

नरहरि पुत्र सुलक्षणिक । तो एक जवळ राहिला देख ।

भोजनभाऊ सकळिक । तात्काळिक ते गेले ॥६७॥

द्विजीं वाळीत घातलें जाण । आप्तवर्ग गेले टाकोन ।

आणि पश्चात्तापें करुन । दुरित संपूर्ण नासलें ॥६८॥

मग विप्र बोलावूनि ते वेळे । धन संपत्ति लुटविली सकळ ।

श्रीहरि भजन सर्वकाळ । भक्त प्रेमळ करीतसे ॥६९॥

मग ब्रह्मसभा करोनि थोर । घातले साष्टांग नमस्कार ।

मालोपंतीं जोडोनि कर । म्हणे प्रायश्चित सत्वर मज सांगा ॥१७०॥

ग्रंथ भाष्य पाहती ब्राह्मण । वैदिक पंडित शास्त्री निपुण ।

तों देहांत प्रायश्चित्त निघालें जाण । उपाय आण असेना ॥७१॥

ऐकोनि द्विजांची वचनोक्ती । मालोपंत उत्तर देती ।

हेंचि वाटतें माझे चित्तीं । तरी कोणती युक्ती ते सांगा ॥७२॥

यावरी सांगती धरामर । चिंचेचें ढोल पहावें थोर ।

त्यामाजी घालोनि आपुलें शरीर । आंत गोवर भरावा ॥७३॥

आपुल्या हातें घेऊनि अग्नें । तयासि द्यावें चेतवून ।

हें देहांत प्रायश्चित्त घेतां जाण । दुरित नासोन जाईल ॥७४॥

ऐसें ऐकोनि विप्रवचन । मालोपंत अवश्य म्हणे ।

जें जें कर्तृत्व तैसें भोगणें । न चुकेचि जाण सर्वथा ॥७५॥

आपण ढोलांत बैसोनि प्रीतीं । गोंवर घालोनि अग्नि लाविती।

हृदयीं चित्तीं पांडुरंग मूर्ती । धांवा करी अट्टहास्यें ॥७६॥

म्हणे पंढरपुरनिवासिनी । विठाबायी कुळस्वामिणी ।

आतां सत्वर तुवां येउनी । कर्मापासोनी सोडवावें ॥७७॥

संपत्तीचे सखे निश्चित । तें म्यां मानिले जिवलग आप्त ।

अंतःकाळ येतांचि त्वरित । टाकोनि समस्त ते गेले ॥७८॥

लोक प्रतिष्ठा मानापमान । पुत्र कांता संपत्ति धन ।

निर्धूत झालों सर्वापासून । आतां देहाचें बंधन तूं तोडीं ॥७९॥

याहूनि संकट नानापरी । आकाश तुटोनि पडो देहावरी ।

परी तुझा आठव असोंदे अंतरीं । हेंचि श्रीहरी मागतसें ॥१८०॥

ऐसा निश्चय करोनि चित्तीं । लाविलीं दोन्ही नेत्रपातीं ।

हृदयीं चिंतिली विठ्ठलमूर्ती । जे सुख विश्रांती योगियां ॥८१॥

हृदयीं एकाग्र करोनि ध्यान । मुखें करीत नामस्मरण ।

केशव नारायण मधुसूदन । पतितपावन करुणाब्धीं ॥८२॥

अच्युतानंद गोविंदा । परमपुरुषा सच्चिदानंदा ।

जगदुद्धारा आनंदकंदा । श्रीमुकुंदा जगद्‌गुरु ॥८३॥

श्रीराम रघुपति रावणांतका । निशाचरमर्दना धर्मस्थापका ।

महा प्रतापें जगन्नायका । वृंदारकां सोडविलें ॥८४॥

कृष्ण विष्णु मेघश्यामा । भक्तरक्षका पुरुषोत्तमा ।

तुच हेंचि मागतो आत्मारामा । भजनीं प्रेमा असों दे ॥८५॥

मालोपंत ऐशा रीती । भजन करीत सप्रेम युक्ती ।

प्रेमे नेत्रीं अश्रु वाहती । तों वैकुंठपती पावला ॥८६॥

अग्निप्रदीप्त तये वेळे । जाहला असे प्रभंजन प्रबल ।

परी कृशानु शरीरासि लागे शीतळ । आंग न पोळे सर्वथा ॥८७॥

एकमेकासी बोलती ब्राह्मण । नामप्रताप अद्भुत गहन ।

त्यासि जाळूं न शकेचि अग्न । जगज्जीवन रक्षिता ॥८८॥

मागें हिरण्यकशिपें प्रल्हादभक्त । अग्नीत जाळितां न जळेचि सत्य ।

तैसेंचि जाहलें यातें । विप्र बोलती एकमेकां ॥८९॥

ढोल जळोनि तये वेळे । खालीं पडिले विझोनि विंगळ ।

दिव्य उतरोनि भक्त प्रेमळ । बाहेर तात्काळ ये तेव्हां ॥१९०॥

सकळ लोक आश्चर्य करिती । म्हणती धन्य याची सप्रेम भक्ती ।

संकटीं पावला लक्ष्मीपती । अघटित ख्याती हे झाली ॥९१॥

मालोपंतासि ब्राह्मण म्हणत । तूंचि पवित्र पुण्यवंत ।

संकटीं पावला पंढरीनाथ । दोष किंचित तुज नाहीं ॥९२॥

रोजगार धंदा सर्व टाकून । मालोपंत करीत हरिकीर्तन ।

करुणारसें त्याचें बोलणें । प्रासादिक वचनें संतांचीं ॥९३॥

अनामिकाची कन्या निश्चिती । न कळत तयानें पर्णिली होती ।

तिसी लाधली सत्संगती । अनुताप चित्तीं जाहला ॥९४॥

मालोपंतासि म्हणे ते समयीं । मज तरणोपाय सांगा कांहीं ।

जैसें जन्मांतर होतें पाहीं । तरी घडोनि सर्वही तें आलें ॥९५॥

ऐकोनि म्हणे वैष्णवभक्त । तुझा अन्याय नसे किंचित ।

पिता टाकोनि गेला सत्य । आतां अन्नवस्त्र तूतें आम्हीं देऊं ॥९६॥

तरणोपाय पुसतेस जरी । तरी सांगीतली गोष्टीं जिवीं धरीं ।

सर्वदा श्रीहरीचें स्मरण करीं । गोष्ट दुसरी बोलों नये ॥९७॥

अवश्य म्हणवोनि ते भामिनी । नमस्कार करीतसे दुरुनी ।

दूर कोपट दीधलें बांधोनी । राहे जाउनी ते स्थळीं ॥९८॥

वस्त्रें पात्रें शुचिर्भूत । स्नान करीतसे नित्य नित्य ।

नामस्मरणीं लागली प्रीत । सर्वदा चित्त फांकेना ॥९९॥

पात्रीं अन्न वाढोनि निश्चिती । मनुष्या हातीं तिसीं पाठविती ।

तितुकें मात्र भक्षूनि सती । स्मरणीं निजप्रीती लावितसे ॥२००॥

सत्समागमाचेनि गुणें । तिसीं आलें सात्विक लक्षणे ।

साक्षात्कार देतसे नारायण । निज कृपादानें आपुल्या ॥१॥

कांहीं दिवस लोटतां निश्चित । तिचें आयुष्य सरलें समस्त ।

विष्णुदूत प्राण आकर्षित । वैकुंठाप्रत ते नेली ॥२॥

मालोपंतासि कळलें वर्तमान । ती तों देहांत पावली मरण ।

प्रेतासि सद्गतीस लावील कोण । ऐसें वचन बोलती ॥३॥

अंत्यज अथवा शूद्र याती । हे कोणीच स्पर्श न करिती ।

मालोपंत विचार करिती । तरी आपण सद्गती तिची करुं ॥४॥

आम्हांनिमित्त साचार । तिची दुर्दशा जाहली फार ।

आतां ती तों पावली परत्र । तरी प्रेत संस्कार करावा ॥५॥

ऐसा चित्तीं विचार करुन । कोपटांत प्रवेशती आपण ।

प्रेत पाहतां उघडोन । तों झालीं सुमनें तयाचीं ॥६॥

म्हणे विष्णुभजनाचा महिमा थोर । जनासि दाविला साक्षात्कार ।

आपुल्या दासाची सारंगधर । सत्कीर्ति साचार वाढवी ॥७॥

मालोपंतासि तै पासून । मानूं लागले सर्वत्र जन ।

म्हणती यासि साह्य रुक्मिणीरमण । महाविघ्नांतें निरसिती ॥८॥

मालोपंत तै पासुनी । करुणारसें गाय कीर्तनीं ।

भाविक श्रोते ऐकोनि श्रवणीं । सद्गदित मनीं ते होती ॥९॥

कीर्तनामाजी नवरस । गाती ऐकती विष्णुदास ।

परी भगवत्प्रातीचें कारण असे । करुणारस श्रेष्ठ तो ॥२१०॥

भवसिंधु पैलपार व्हावा । ऐसा चित्तीं उपजला हेवा ।

तरी करुणारसें आळवावें देवा । होईल जीवा सोडवण ॥११॥

देव भेटवा आपणास । ऐसें वाटलें निज भक्तास ।

परी जावोनियां वनास । करुणा देवास भाकावी ॥१२॥

धांवा ऐकोनि वैकुंठपती । तेथें येतसे सत्वरगती ।

ऐसें त्याचे स्वभाव असती । वर्णिली सत्कीर्ती श्रीव्यासे ॥१३॥

एकांतींही न बैसवेल जर । तरी सुखें करावा संसार ।

मग स्वस्थ बैसोनि एक प्रहर । संत चरित्रें ऐकावीं ॥१४॥

नवविध श्रीहरीची भक्ति होय । त्यामाजी श्रवण वरिष्ठ आहे ।

येणें तरला परीक्षिती राय । आला प्रत्यय बहुतांसी ॥१५॥

पुढिले अध्यायीं कथा सुंदर । वदविता श्रीरुक्मिणीवर ।

महीपति त्याच्या अभयवरें । प्रसाद उत्तरें बोलतसे ॥१६॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

परिसोत प्रेमळ संतभक्त । एकेचाळिसावा अध्याय रसाळ हा ॥२१७॥अध्याय ४१॥ओव्या २१७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP