मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय ३०

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

आजि अनंत जन्मींचें दैव साचें । उदयासि आलें श्रोतयांचें ।

म्हणोनि उद्गार येती वाचे । चरित्र संतांचें वर्णावया ॥१॥

प्रजेच्या भाग्यें करोनि निश्चिती । अंबुधर अपार वर्षे क्षिती ।

विबुधांच्या दैवयोग रीतीं । रत्‍नें निघती सागरांत ॥२॥

की राजहंसाचें थोर कपाळ । यास्तव निपजती मुक्ताफळें ।

कीं सुंदरासि व्हावया अलंकार तत्काळ । निपजे सोज्जळ कांचन ॥३॥

कीं प्रकाशमान व्हावया क्षिती । नभमंडळीं प्रगटे गभस्ती ।

कीं शोभयमान दिसावया राती । रोहिणीपती अवतरला ॥४॥

नातरी सगुण मूर्तीचें व्हावया पूजन । विधींनें निर्मिली दिव्य सुमनें ।

तैसीं संतचरित्रें जाहलीं निर्माण । श्रवणासि भूषणें श्रोत्यांच्या ॥५॥

श्रवण झालिया मनन होय । पुढें निदिध्यास लागता हे ।

मग साधकासि साक्षात्कार होय । अनुभवें प्रत्यय पाहावा ॥६॥

मागिलें अध्यायीं कथा निश्चित । पक्षियां खादलें शेत ।

कौतुक केलें पंढरीनाथें । पीक अद्भुत आलें कीं ॥७॥

ते तुकयानें धान्य टाकूनि सकळ । भजन करी सर्वकाळ ।

सांडूनि प्रपंच तळमळ । करि निश्चळ हरिभजन ॥८॥

घरीं कांता हळहळ करीत । म्हणे आलें धान्य न घेचि सत्य ।

संसार घातला पाण्यांत । खतेंही समस्त बुडविलीं ॥९॥

लोक म्हणती पीक आलें । घरीं तों उपवासी मरती मुलें ।

दैवें दीधलें कर्मे नेलें । तैसेंचि झालें आम्हांसी ॥१०॥

असो कांता ऐशापरी । नित्य हळहळ करीतसे घरीं ।

तुका आनंदयुक्‍त अंतरीं । विचार करीत तेधवां ॥११॥

पांडुरंगाचें देवालय जाण । भंगले होतें पुरातन ।

तें नीट करावें उकलोन । होईल जागरण हरिकथा ॥१२॥

श्रवण झालिया होय मनन । मननपाठीं निदिध्यासन ।

मग साक्षात्कारासि येऊनि आपण । होय विज्ञान साधका ॥१३॥

ऐसा संकल्प करोनि मनीं । देवालय उकलिलें तये क्षणीं ।

आपुल्या हातीं कुदळीं घेउनी । चिखलपाणी करीतसे ॥१४॥

एकला एकटा करील काय । कैसें होईल देवालय ।

ऐसें जाणूनि पंढरीराय । होतसे साह्य कवणें रीतीं ॥१५॥

महादाजी पंतासि दाखविलें स्वप्न । धान्य ठेविलें त्वां सांठवून ।

तें देवालयाच्या कामासि लावणें । अवंचकपणें सर्वथा ॥१६॥

तेचि आज्ञा वंदोनि शिरीं । मग ग्रामस्थांसी विचार करी ।

म्यां स्वप्न देखिलें ऐशापरी। समाचार सत्वरी घेऊ आतां ॥१७॥

आश्चर्य करोनि आपुलें चित्तीं । देवालयासि पाहावया येती ।

तों तुका उकरीतसे भिंती । कुदळी हातीं घेऊनियां ॥१८॥

म्हणती दृष्टांत जाहला साच । आतां साह्य करावें याचें ।

मग मजूर माणसें ठेविलीं पांच । कारेगर त्याचे आणविले ॥१९॥

विटी दुदांडया घेऊनि विकत । विष्णु आलियासि काम लावित ।

देऊळ सिद्ध जाहलें त्वरित । धान्य समस्त वेचलें ॥२०॥

पुढें उद्यापन राहिलें पाहीं । ब्राह्मण भोजनासि धान्य नाहीं ।

यासि उपाय करावा कायी । तुका देहीं चिंतातुर ॥२१॥

ऐसें जाणूनी रुक्मिणीपती । कौतुक केलें कैशा रीतीं ।

महादाजीपंतासि एकांतीं । दृष्टांत रात्रीं दाखविला ॥२२॥

म्हणे तुम्ही ग्रामवासी समस्त । पंच महापातकी दिसत ।

कैसी केली पंचाईत । न्याय ध्यानांत न आणितां ॥२३॥

शेतकरीयासी पीक भरुन । तुकयापासूनि देवविलें जाण ।

आणि राखणावळीचा आदमण । तो का ठेवोन घेतला ॥२४॥

आतां तरी सावधपणें । तयासि चावडीये बोलावणें ।

वाढीसुद्धां धान्य घेणें । तरीच कल्याण सर्वांसी ॥२५॥

ऐसा दृष्टांत होतांचि पाहे । महादाजीपंत विस्मित होय ।

सकाळी चावडीस जाऊनि पाहे । स्वप्न लवलाहें सांगितले ॥२६॥

ग्रामस्थ आश्चर्य करिती थोर । म्हणती यथार्थचि पडिलें अंतर ।

वेहरण आलें आम्हांवर । रुक्मिणीवर क्षोभविला ॥२७॥

मग त्या कुणब्यासि बोलावून । ग्रामस्थ बोलती अवघे जण ।

पीक घेतलें त्वां भरोन । दाणे आदमण ठेविले कां ॥२८॥

मग तो बोले तयांप्रती। म्यां दृष्टांत देखिला रातीं ।

नेदींच तरी पांडुरंगमूर्ती । क्षोभेल मजप्रती निश्चित ॥२९॥

वाढीसुद्धां धान्य ते अवसरीं । त्याणें आणूनि दीधलें सत्वरी ।

आणिकही साहित्य जाहलें बहुतापरी । चमत्कार भारी देखोनियां ॥३०॥

कोणी कणीक कोणी तांदुळ । कोणी घृत कोणी गूळ ।

कोणी शाखा आणि डाळ । साहित्य सकळ हें झालें ॥३१॥

सुदिन पाहोनि एके दिनीं । मूर्ति स्थापिली सिंहासनीं ।

मंत्रोक्‍त पंचामृतें करोनि । चक्रपाणी न्हाणिला ॥३२॥

ब्राह्मण वैदिक स्वहस्तें देख । देवासि करिती अभिषेक ।

वस्त्रें लेववोनियां सुरेख । उपचार अनेक ते केले ॥३३॥

गंधाक्षता सुमनमाळा । तुळसी बुका त्यावरी शोभला ।

धूपदीप नैवेद्य अर्पिला । नमस्कार घातला साष्टांग ॥३४॥

प्रेम भरित होऊनि साचें । तुका सभामंडपीं नाचे ।

अद्भुत प्रेम त्या समयींचें । नये वाचे वर्णितां ॥३५॥

ऐशा रीतीं उपचार जाणा । देवासि केल्या प्रदक्षिणा ।

मग ब्राह्मण बैसले भोजना । विडे दक्षिणा त्यासि दिलीं ॥३६॥

देऊळ उद्यापन ऐशा रीतीं । होतां तुकयासि संतोष चित्तीं ।

नित्य पूजितो सगुण-मूर्ती । आवडी चित्तीं नित्य नवी ॥३७॥

निजांगें करावें कीर्तन । ऐसी इच्छा धरिली मनें ।

संत बोलिले पुरातन । त्यांचीं वचनें पाठ केली ॥३८॥

पहिला अभ्यास कांहीं नव्हता । आवडी आतां उपजली चित्तां ।

प्राकृत अभंग शतकोटि कर्ता । नामदेव वार्ता बोलिले कीं ॥३९॥

त्या नामयाचे अबंग निश्चित । पाठ करोनि गात नाचत ।

हरिदिनीसी उपास करित । संतां समवेत जागरण ॥४०॥

द्वादशी साधूनि करी पारणें । यथाशक्‍ति ब्राह्मणांसि देत अन्न ।

दिंडी पताका मिरवणें । वैष्णव चिन्हें बाणलीं ॥४१॥

आणिक संतांचे पाहिले ग्रंथ । कबीर भक्‍त यवन विख्यात ।

तयांचीं जीं वचनामृतें । तीं पाठ करित प्रीतीनें ॥४२॥

आणिक अध्यात्म ग्रंथ थोर । स्वमुखें वदले ज्ञानेश्वर ।

त्यांचीं शुद्ध प्रती साचार । वैष्णव वीरें मिळविली ॥४३॥

श्री विष्णु अवतार एकनाथ देखा । त्यांणीं भागवतावरी केली टिका ।

त्याचा प्रयत्‍न करोनि निका । ग्रंथ नेटका मिळविला ॥४४॥

त्या ग्रंथांचें करावया मनन । एकांत स्थळ योजिलें कोण ।

रमणीय भांडार पर्वत जाण । ते स्थळीं जाऊन बैसतसे ॥४५॥

ग्रंथांचें पारायण करोनि । अर्थ अन्वय ध्यानासि आणी ।

पूर्वाभ्यासी जो शिरोमणी । कैवल्यदानीं साह्य जया ॥४६॥

ग्रंथ व्हावया पाठांतर । तुकयासि श्रम न लागती फार ।

मनन करितां अहोरात्र । मुखीं अक्षरें बैसती ॥४७॥

प्रासादिक एकनाथाचीं वचनें । जें कां भावार्थ रामायण ।

त्याचेंही पाठांतर पूर्ण । निजप्रीतीनें करितसे ॥४८॥

श्री भागवतीच्या कथा सुरस । स्वमुखें वदले महापुरुष ।

त्याही पाहिल्या सायासें । लीला विशेष श्रीहरीची ॥४९॥

योगवसिष्ठ अमृतानुभव पूर्ण । श्रीज्ञानेश्वर बोलिले वचन ।

त्याही ग्रंथाचें करोनि मनन । अर्थ शोधून ठेविला ॥५०॥

आणिक पुराणें ऐकती फार । परी मनन करिती साचार ।

तेणेंचि त्यांचा पडे विसर । संसार घोर वागविती ॥५१॥

चित्त शुद्धि नसली जाणा । आणि एकांतीं बैसला देवार्चना ।

तरी पुढें आठवे मनकामना । ते रानोराना हिंडवी ॥५२॥

तैसी तुकयाची नव्हे बुध्दी । आधीं करोनि चित्त शुद्धी ।

मग जाऊनि एकांत संधी । अर्थ शोधी ग्रंथाचा ॥५३॥

भांडार पर्वतीं बैसे जाऊन । परी तेथें सर्वथा नसे जीवन ।

हेंही जाहलें असे निर्माण । निमित्त कारण तें ऐका ॥५४॥

तुकयाची कांता होती कठीण । ऐसें बोलती सर्वत्र जन ।

परी तिचें स्वामीकाजीं मन । त्याजविण अन्न न सेवी ॥५५॥

भाकर पाणी घेऊनि नित्य । पर्वतावरी नेऊनि देत ।

दीड योजन वेरझार नित्य । करितां बहुत निर्बुजली ॥५६॥

पंच प्राण भ्रतारापासी । परी विरोध चालवी देवासी ।

दर्शना न जाय देउळासी । म्हणे काळा दृष्टींसी न पडावा ॥५७॥

म्हणे आमुचा पूर्वज विश्वंभर । त्यानेंच आणिला दावेदार ।

कुळीं संबंध लागला थोर । माझा भ्रतार वेडा केला ॥५८॥

मुलें लेंकुरें कुटुंब फार । यांसि मिळेना अन्न वस्त्र ।

मजवरी टाकूनि संसार । पर्वतावर बैसला ॥५९॥

चार घटिका लोटतां रात । हाळूच येतो देउळांत ।

काळ्या पुढें नृत्य करीत । आगड धुत मेळवूनियां ॥६०॥

प्रातःकाळीं करोनि स्नान । त्या मेल्याचें करितो पूजन ।

कोणते जन्मीं घेतलें ऋण । तेंचि उसनें फेडितो ॥६१॥

जवळ गावांत राहतां जरी । वोली कोरडीं देतें भाकरी ।

वेरझारा करुं कितीतरी । हें निर्धारीं उमजेना ॥६२॥

ऐसी तुकयाची कांता । आपुल्या घरीं करीतसे चिंता ।

मग करुणा आली पंढरीनाथा । अनाथनाथा विठोबासी ॥६३॥

म्हणे तुका जावोनि बैसे डोंगरीं । हे मज गांजिती नानापरी ।

आतां इची वेरझार होईल दूरी । तें चरित्र निर्धारीं दाखवूं ॥६४॥

ऐसें म्हणवोनि चक्रपाणी । कौतुक केलें तये दिनीं ।

एक भाकर भोंपळाभर पाणी । अवली घेऊनी जात होती ॥६५॥

उष्ण तीव्र जाहलें थोर । दिवस आला दोन प्रहर ।

तों कौतुक केलें सारंगधरें । तें ऐका सादर भाविक हो ॥६६॥

पंथ क्रमितां साचार । अवलीची दृष्टीं डोंगरावर ।

म्हणे आतां कितीक उरलें दूर । उष्ण तीव्र लागतसे ॥६७॥

पायी पायतन नसेचि पाहीं । खडे रुतती ते समयीं ।

तेणें कासावीस होतसे जीवीं । तो विघ्न आणिकही ओडवले ॥६८॥

करवंदीचा कांटा थोर । मध्येंच होता वाटेवर ।

पाय पडतांचि तयावर । फुटोनि साचार वर आला ॥६९॥

तेणें कासावीस होवोनि मनीं । मूर्छा येऊनि पडली धरणीं ।

भोंपळाभर होतें पाणी । तें उलंडोनी सांडलें ॥७०॥

नेत्र उघडोनि पाहातसे पाय । तों त्यांतूनि रुधिर वाहत आहे ।

म्हणे म्यां आतां करावें काय । म्हणोनि धाय मोकलित ॥७१॥

जन्मांतरीचें होते वैर । तेंचि साधिलें साचार ।

पाठीं बैसला दावेदार । जाहलीं मरमर संसारी ॥७२॥

माझ्या कंठीं बांधूनि मणी । फुकटची झाला असे धनी ।

दूर बैसतो जाऊनी । एकांत स्थानीं पर्वतीं ॥७३॥

ऐशा रीतीं करुनि रुदन । कांटा पाहातसे उपटोन ।

परी तो सर्वथा न निघेची जाण । म्हणे उपाय कोण करुं आतां ॥७४॥

माझ्या प्राक्‍तनाची विचित्र गती । विधिनें लिहिलें संचिती ।

तें न चुकेचि कल्पांतीं । म्हणोनि विपत्ती भोगीतसे ॥७५॥

बहुत खर्चोनियां धन । पितयानें केलें थोर लग्न ।

पिशाचे पदरीं बांधिले जाण । शेवटीं प्राक्‍तन निवडलें ॥७६॥

आणि कोणेरी बंधूनें सहज । महायात्रेसी नेलें मज ।

तें पुण्य उभे न ठाके आज । गेली लाज संसारी ॥७७॥

बहुत द्रव्य खर्चोनि जाण । माझीही तुळा केली त्याणें ।

तेथें पोटभरी न मिळेची अन्न । गेलें पुण्य ते वायां ॥७८॥

ऐशा रीतीं ते राणीं । अवली शोक करीतसे मनीं ।

परी देवा म्हणवोनि न बोले वदनीं । म्हणे वैरी धांवोनि येईल तो ॥७९॥

माझा द्वंद्वी रुक्मिणीवर । त्यासि न कळो हा समाचार ।

येथें अकस्मात आला जर । तरी हांसेल साचार मजलागीं ॥८०॥

म्हणे शिव्या देत रात्रंदिवस । म्हणवोनि कांटा मोडला असे ।

मग संतोष वाटेल तयास । तरीन हो ऐसें ये काळी ॥८१॥

विषम काळें घेतली धांव । तें दुःख सोसि जे आपुल्या जीवें ।

परी वैरिवासि तें न सांगावें । तरीच जन्मावें संसारीं ॥८२॥

जीवीं विषय वाटे गोमटा । परी निंदा करिती लोक चोहटा ।

तरी मायबापांचिया पोटा । व्यर्थ करंटा तो आला ॥८३॥

वर्म सांपडलें वैरिया हातीं । तयासि न यावें काकुळती ।

प्राणांत वोढवल्या निश्चिती । शरण त्या प्रती न जावें ॥८४॥

ऐसा निश्चय करोनि मनें । अवली हळूच करी रुदन ।

कांटा न निवेचि प्रयत्‍नें । उपाय कोण करावा ॥८५॥

हें जाणोनि वैकुंठविहारी । म्हणे तुका बैसला उपवासी डोंगरीं ।

इची तों ऐशी जाहली परी । यास्तव श्रीहरी पावला ॥८६॥

सांवळा सुकुमार राजीवनयन । दिव्य पीतांबर नेसला जाण ।

मुगुटीं झळकती नाना रत्‍नें । भास्करासि उणें आणिती ॥८७॥

दिव्य कुंडलें कानीं तळपती। गळा कौस्तुभ वैजयंती ।

पायीं नेपुरें वांक्या वाजती । दृष्टीं अवचितीं देखिला ॥८८॥

अवली म्हणतसे ते वेळा । हा कां येथें पातला मेला ।

भ्रतार माझा वेडा केला । संसारीं अवकळा याचेनी ॥८९॥

माझी अवस्था विपरीत । देखोनि हांसें येईल यातें ।

म्हणवोनि मुखचंद्र पश्चिमेस । केला त्वरित ते समयीं ॥९०॥

तों लीलानाटकी जगदीश । तिकडेही तैसाचि सन्मुख दिसे ।

अष्टदिशा भोंवतें चुकवीतसे । परी न्यून नसे कोठेंही ॥९१॥

तों श्रोते आशंकित होऊनि चित्तीं । वक्‍त्यालागीं प्रश्न करिती ।

अवलीची नसतां सप्रेम भक्‍ती । द्वेषें निंदिती सर्वदा ॥९२॥

ऐसें असतां तिजकारणें । देव कां देतो बळेंच दर्शन ।

हाचि संशय वाटतो पूर्ण । तरी तो निरसन करीं कां ॥९३॥

ऐसा सज्जनीं प्रश्न करितां । उल्हासें उत्तर देतसे वक्‍ता ।

द्वेषें करुनि देव भेटला बहुतां । हें तो वार्ता पुराणीं ॥९४॥

भक्‍तिभावें पाहतां साचार । ध्यानासि नयेचि रामचंद्र ।

द्वेष भावें लंका नगर । रावणासि सर्वत्र राम भासे ॥९५॥

तैसाचि कंस द्वेष करी । म्हणे कृष्ण केवळ माझा वैरी ।

याच्या दृष्टीपासूनि दुरी । न होय श्रीहरी सर्वथा ॥९६॥

तैसीच तुकयाची कांता । म्हणे दृष्टीसि काळा न पाहे आतां ।

म्हणोनि आयास न करितां । तिच्या भोंवता फिरतसे ॥९७॥

जैसीं भिंगाचिया सदनीं । विष्णुमूर्ति स्थापिली कोणी ।

जिकडे पाहे तिकडे नयनीं । चक्रपाणी दिसतसे ॥९८॥

हाही दृष्टांत न सरेचि येथ । अवलीचें कंटाळलें चित ।

मग नेत्र झांकोनि निवांत राहात । तों आंतही दिसे जगदात्मा ॥९९॥

म्हणे कांहीं इच्छा न धरितां पोटीं । वैरी कां उगाच पडतो दृष्टीं ।

कशास्तव घेतली माझी पाठी । यास्तव पोटीं जल्पतसे ॥१००॥

ऐसी देखोनि तिची स्थिती । काय म्हणतसे वैकुंठपतीं ।

जेणें आम्हांसि लावीली प्रीती । तेचि युक्‍ति करुं आतां ॥१॥

मग प्रगट होऊनि पंढरीनाथ । अवलीस निजकरें आश्वासित ।

म्हणे कन्या माझी तूं निश्चित । चित्तीं द्वैत न धरावें ॥२॥

तूं मज म्हणसीं दावेदार । तरी म्यां कोणते साधिलें वैर ।

विदेही केला माझा भ्रतार । हे व्यर्थचि उत्तर बोलसी ॥३॥

मुळींच फळ देठीं सुटलें । मग वारा लागतां खालीं पडलें ।

तेवी तुकयाचें निमित्त भलें । तैसें आले मजवरी ॥४॥

नामरुपी लावूनि चित्त । जाऊनि बैसती अरण्यांत ।

तुजचि ऐसें जाहलें मातें । हिंडततें नित्य त्या मागें ॥५॥

तुम्हांसि खावया नाहीं अन्न । यास्तव पीक आणिलें सधन ।

परी तुका सर्वथ न घेचि धान्य । अन्याय यात कोण माझा ॥६॥

ऐसें म्हणोनि पंढरीरायें । मांडीवर घेतला तिचा पाय ।

कांटा काढोनि टाकिला पाहे । दुःख नोहे अणुमात्र ॥७॥

कृपादृष्टीं पाहतांचि देव । मागीला क्लेश विसरली सर्व ।

तो माया लाघवी देवाधिदेव । न कळे भाव ब्रह्मांदिकां ॥८॥

अवली म्हणत ते अवसरी । मजला उशीर लागला भारी ।

पिसा बैसला असे डोंगरीं । जावें सत्वरी त्या ठायीं ॥९॥

ऐसें बोलोनियां उत्तर । कुरकुली घातली डोईवर ।

जिजाई चालिलीं सत्वर । सारंगधर तिज मागें ॥१०॥

पर्वतीं येतांचि लवलाहें । तुका नेत्र उघडोनि पाहे ।

परमचित्तीं विस्मित होय । म्हणे अपूर्व आहे हे गोष्टीं ॥११॥

आणि रजनी आणि गभस्ती । एके ठायी धरिली वस्ती ।

कीं समुद्र आणि आगस्ती । ऐक्यसि येती नवल हें ॥१२॥

पंडित आणि अजापाळक । सख्यपणें जाहले एक ।

विष अमृत मिळाले देख । हेंचि कौतुक वाटतें ॥१३॥

कां ससाणा आणि राजहंस पाहीं । सख्यत्त्वे मिळाले एकेठायीं ।

तेवीं अवली सहित शेषशायी । हेचि नवाई अगाध ॥१४॥

ऐसें म्हणवोनि वैष्णव । वीर चित्तीं संतोष मानिला थोर ।

म्हणे उभयताचें होते वैर तें । झालें दूर ये समयीं ॥१५॥

घरकलह वाईट जाणा । विक्षेप वाटे क्षण क्षणा ।

अवलीस भेटे वैकुंठराणा । तरी आमुचा मना संतोष ॥१६॥

ऐशा रीती भक्त प्रेमळ । हर्षे वोसंडे तये वेळ ।

तों अवली आणि घननीळ । आली जवळ उभयतां ॥१७॥

तुका उठोनि लवलाहें । श्रीहरीचे धरिले पाय ।

मग अष्टमायें धरुनि पाहे । सद्गदित होय तेधवां ॥१८॥

तुका अवली जगज्जीवन । स्वस्थ बैसलीं तिघेजण ।

मग प्रेमळ भक्त कांतेसि म्हणे । विठोबासि भोजन घालीं कां ॥१९॥

ऐसि ऐकतांची मात । अवली लज्जीत चित्तांत ।

म्हणे एक भाकर आहे आंत । कैसी दोघांतें पुरेल हे ॥१२०॥

मनांत परम होतसे कष्टी । म्हणे येथेंही काळ्यानें घेतली पाठी ।

धष्टपुष्ट दिसतो माझें दृष्टी । कैसी गोष्टीं करुं आतां ॥२१॥

ऐसें मनांत बोलोनि उत्तर । देवाच्या पात्रीं वाढिली भाकर ।

वंचिलें नाहीं अणुमात्र । मग सारंगधर तुष्टला ॥२२॥

अवंचक भक्ति देखोनि हरी । अन्नें निर्मिली नानापरी ।

कुरकुलें भरोनि आलेंवरी । वस्त्र त्यावरी झांकिलें ॥२३॥

मागें क्षुधित होतां श्रीकृष्ण । मग द्रौपदीनें दीधलें भाजीपान ।

कांहींच वंचिलें नसतां जाण । मग निर्मिलीं अन्नें नानापरी ॥२४॥

तैसा अवलीचा भक्तिभाव नाहीं । परी विरोधेंचि तुष्टले शेषशायी ।

मग अवलीसी म्हणे ते समयीं । तुकयासि लवलाहीं वाढीं कां ॥२५॥

ऐसें बोलत रुक्मिणीकांत । जिजाई लज्जित मनांत ।

वस्त्र काढोनि जंव पाहत । तों भरलीं तयांत पक्वानें ॥२६॥

परम विस्मित जाहली मनीं । म्हणे मज पावली कुळस्वामिणी ।

भैरव खंडेराव कीं भवानी । त्याही येऊनि रक्षिलें ॥२७॥

कोणाचें कर्तृत्व हे नेणावे जाण । ज्याणें रक्षिला माझा मान ।

तयासि मी सर्वभावें शरण । जीवें प्राणें असें कीं ॥२८॥

जाणोनि अवलीचें मनोगत । काय बोलत रुक्मिणीकांत ।

तूं जयासि शरण निश्चित । तोचि मी अनंत नोळखसी ॥२९॥

अन्नें निर्मिलीं देखत देखत । हें माझेंचि कर्तृत्व जाण सत्य ।

ऐसें सांगतां वैकुंठनाथ । परी असत्य वाटत तिजलागीं ॥३०॥

म्हणे इतुकें सामर्थ्य असतें तयां । तरी विदुराच्या कण्या खाता कासया ।

द्रौपदीस हात वोडवोनियां । देंठ लवलाह्या भक्षीतसे ॥३१॥

बहुत वराडियाचें लक्षण । कीर्तनीं लोक ऐकती गाणें ।

भिल्लनीचीं खाय उच्छिष्ट बोरें जाण । चित्तीं अनमान न करितां ॥३२॥

इतुकें सामर्थ्य असतें यया । तरी महाराचें घर निघता कासया ।

चोख्याचीं ढोरें वोढोनियां । तयासि खावया मागतसे ॥३३॥

ऐशा कल्पना नानारीती । अवली आणितसे चित्तीं ।

अन्न घेउनि आपुल्या हातीं । दोघांप्रती वाढिलें ॥३४॥

जेव्हां कांटा मोडला पायीं । भोंपळा लवंडला तये ठायीं ।

पर्वतावरी जीवन पाही । जवळ नाहीं सर्वथा ॥३५॥

अवलीस संकट जाहलें फार । म्हणे कैसा करावा विचार ।

जाणूनि तिचें निज अंतर । सारंगधर काय म्हणे ॥३६॥

पैलते खोंगळी माजीं साचा । जिव्हाळा दिसतसे पाणियाचा ।

तेथें झरा लागेल उदकाचा । सत्य त्रिवाचा हे माझी ॥३७॥

अवलीस सत्य वाटेचि मात । मग चीप उचलोनि पाहे हातें ।

तों निर्मळ झरा आंतूनि येत । आश्चर्य वाटत तिजलागीं ॥३८॥

म्हणे निर्जळ वनीं लाविलें पाणी । हे तों अघटित याची करणी ।

अन्नें निर्मिता ये ठिकाणीं । याजवीण कोणीं असेना ॥३९॥

नाना साबरी मंत्र शिकोन । कपटविद्येंत जाहला निपुण ।

माझ्या भ्रतारासि घालोनि मोहन । वेडा करोन बैसविला ॥१४०॥

ऐशा कल्पना आणूनि फार । भोंपळा भरोनि घेतलें नीर ।

आपुल्या हातें वाढीत पात्रें । मग रुक्मिणीवर जेवितसे ॥४१॥

विबुध बैसोनि विमानांत । कौतुक पहावयासि आले तेथ ।

म्हणती धन्य भक्‍तमहिमा अद्भुत । पुष्पें वर्षत ते वेळीं ॥४२॥

तुकयासि म्हणे जगज्जीवन । माझा प्रसाद जेवी प्रीतीनें ।

कांहीं उद्वेग न करीं मनें । मी सिद्धी नेईन योग तुझा ॥४३॥

ऐसें म्हणवोनि भगवंतें । ग्रास घालीत आपुल्या हातें ।

अवली सहित जेविले तेथें । न धरीत द्वैत जगदात्मा ॥४४॥

तो ब्रह्मरस सेवितां प्रीतीं । तुकयासि जाहली सुखप्राप्ती ।

मग करशुद्धि देऊनि प्रीतीं । बोले श्रीपती काय तेव्हां ॥४५॥

म्हणे रे तुकया ऐक वचन । मी जनीं जनार्दन भरलों जाण ।

चराचर मद्रुप पाहणें । जैसें सुवर्ण अलंकारीं ॥४६॥

कीं पट पाहतां विचारुन । तरी काय त्यांत तंतुवाचोन ।

तेवीं विश्व नाहीं मजवीण । अनुभवें करुन तूं पाहे ॥४७॥

तरी आजपासोनि या पर्वतीं । नित्य न यावें एकांतीं ।

अवलीसि कष्ट बहु होती । ऐक वचनोक्‍ती हे माझी ॥४८॥

ऐसें सांगतां दीनदयाळ । तुका तत्काळ चरणीं लोळे ।

म्हणे मी तुमचा लडिवाळ । यास्तव कळवळ करितसां ॥४९॥

नेणें जपतप शास्त्र पठण । नेणें अष्टांग योगसाधन ।

न कळे अध्यात्म ब्रह्मज्ञान । पतित संपूर्ण सर्वांगीं ॥१५०॥

तुम्ही दीनबंधु अनाथनाथ । हे बिरुदावळी जगविख्यात ।

कीर्तनीं गाती प्रेमळभक्त । ते केली सत्य पांडुरंगा ॥५१॥

ऐकोनि तुकयाचें सप्रेम वचन । राहे म्हणतसे करुणाघन ।

माता बाळकाचें करि रक्षण । हा स्वाभाविक गुण तिचा कीं ॥५२॥

तेंवीं तूं माझें निपटणें । वृद्धपणींचें आहेसि तान्हे ।

ऐसेम बोलोनि मधुसूदनें । दीधलें आलिंगन तुकयासी ॥५३॥

आपुल्या हृदयींची सुखविश्रांती । ज्ञानियांसि न सांगतां गुप्त होती ।

ते तुकयासि देतसे श्रीपती । सप्रेम भक्ती देखोनियां ॥५४॥

तये अवस्थे माजी देख । देवभक्‍त जाहले एक ।

कोण कोणासि नाहीं आर्तिक । मग वैकुंठनायक उमजले ॥५५॥

म्हणे तुका मिळाला ऐक्यासनीं । द्वैतभावासि घातलें पाणी ।

जैसें दुग्धांत मिळे धारवणी । तें न दिसे परतोनी सर्वथा ॥५६॥

शरीरांत सुरवाडला प्राण । कीं आकाशीं संचला पव्न ।

कीं सुवर्ण कळिकेंत मकरंद पूर्ण । राहे लपोन ज्या रीतीं ॥५७॥

घंटेमाजी लोपला नाद । कीं शर्करेमाजी जैसा स्वाद ।

तैसा तुकया जाहलिया अभेद । मग सप्रेम बोध खुंटला ॥५८॥

आश्चर्य कांहीं वाटलें पोटीं । ते कोणासीं बोलूं गुजगोष्टी ।

कोणासि आलिंगूनि धरुं कंठीं । म्हणोनि जगजेठी चिंतावला ॥५९॥

तुका ऐक्यासि आला जाण । तरी माझा धांवा करील कोण ।

मग मी कोणाचें करुं धावणें । वर्णील कोण गुण माझे ॥१६०॥

ऐसें जाणुनि दीनदयाळ । तुकयासि म्हणे तये वेळ ।

तूं कीर्तनीं नाचतोसि जे वेळ । तेथें मी घननीळ तिष्ठतसे ॥६१॥

ऐसें बोलतसे भक्‍त सखा । नेत्र उघडोनि पाहे तुका ।

प्रश्नांचें मीस करोनि देखा । देवभक्‍ति सुखा प्रतिपादी ॥६२॥

ऐसीं देवभक्‍तांचीं उत्तरें । विमानीं बैसूनि ऐकसी सुर ।

म्हणती तुका वैष्णववीर । करी उद्धार बहुतांचा ॥६३॥

इंद्रपद घेऊं निश्चिती । आम्हीं ठकलों बहुतारीतीं ।

प्रेमसुख लुटोनि भक्‍तीं । केला श्रीपती स्वाधीन ॥६४॥

धन्य धन्य हा मृत्युलोक । याचा महीमा दिसतो अधिक ।

येथेंचि सामग्री असतां देख । स्वर्गपदीं सुख भोगिती ॥६५॥

धन्य धन्य हा भांडार पर्वतजाण । यासि पांडुरंगाचे लागले चरण ।

धन्य देहू पुण्यक्षेत्र पूर्ण । जेथें वैष्णवजन अवतरला ॥६६॥

धन्य पंचक्रोशी साचार । धन्य हे पाषाण मृतिकासार ।

या स्थळीं हिंडला इंदिरावर । महिमा अपार न वदवे ॥६७॥

वासवें करोनि ऐशी स्तुति । स्वर्गासि तेव्हां विबुध जाती ।

मग तुकयासि पुसोनि निजप्रीतीं । अंतर्धान श्रीपती पावले ॥६८॥

मजला ऐसें भासतसें जाण । तुकयाचें हृदयकमळ पूर्ण ।

त्यांत श्रीहरी मिलिंद होऊन । निजप्रीतींनें राहिला ॥६९॥

कीं भक्‍तांचें हृदयसागर । त्यांत मत्स्य तळपे इंदिरावर ।

अहंभाव हाचि शंखासुर । निवटिला साचार निजहस्तें ॥१७०॥

प्रसादिक वाक्य निश्चिती । तुका बोलिला सप्रेम भक्‍ती ।

त्याच जाणाव्या निघाल्या श्रुती । अन्यथा मती हे नव्हे ॥७१॥

तेंचि विश्वासें गाति आदरें । हेच महर्षि जाणावे थोर ।

त्या वचनाचा धरोनि आधार । संप्रदाय थोर वाढविती ॥७२॥

असो तयाचा अपार महिमा । निरुपमासि नसेचि उपमा ।

अद्भुत घालोनि भक्तिप्रेम । पुरुषोत्तमा वश्य केलें ॥७३॥

कलियुगीं बौद्ध अवतार जाण । हें तों पुराणप्रसिद्ध वचन ।

परी तुकयाचा मनोरथ व्हावया पूर्ण । देव सगुण होतसे ॥७४॥

जैसें कामधेनूचें तान्हें जाण । सांज वेळ न होतां चोंखीं स्तन ।

ते पान्हा घालीत निजप्रीतीनें । काळ वेळ न म्हणे सर्वथा ॥७५॥

का कल्पतरुखालीं साचार । अघटित कामना धरिली थोर ।

तो न विचारतांचि जन्मांतर । मनोरथ साचार पुरवीतसे ॥७६॥

तैशाच रीतीं दिनदयाळ । अवतार घ्यावयाची नसतां वेळ ।

सगुणरुप धरोनि निर्मळ । भक्तासी तत्काळ भेटत ॥७७॥

असो हे दृष्टांत जाहले फार । उबग मानितील श्रोते चतुर ।

तुकयासि भेटोनि सारंगधर । वैकुंठपुर पावले ॥७८॥

मग अवलीच्या समागमें देखा । गांवांत आला वैष्णव तुका ।

पुढिले अध्यायीं रसाळ ऐका । वदवील सखा प्रेमळाचा ॥७९॥

प्रभंजनाच्या योगें करुन । डोले तृणाचे बुजावणें ।

परी लोकांसि भासतसे जाण । बैसला राखण शेतकरी ॥८०॥

तेंवीं ह्याच दृष्टीनें पाहतां सर्व । तयासि भासे कवीचें लाघव ।

सुज्ञान म्हणती तैसें नव्हें । पंढरीराव वदविता ॥८१॥

किंगरी वाजे नाना लीळा । ऐकूं येतसे लोकां सकळां ।

परी वाजविणारा असे वेगळा । सज्ञान त्याजला पाहती ॥८२॥

तैसा पांडुरंग मायालाघवी । तों भक्त चरित्रें स्वयें वदवी ।

महीपती हें निमित्त दावी । पोसणा कवी संतांचा ॥८३॥

स्वस्ति श्रीभक्तिलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविकभक्त । तिसावा अध्याय गोड हा ॥१८४॥ ॥अ० ३०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP