मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २९

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ॥

जय जय सच्चिदानंदा करुणामूर्ती । ब्रह्मांडीं तूझी न समाये किर्ती ।

तो तूं प्रेमळाची धरितोसी आर्ती । रुक्मिणीपती विठ्ठला ॥१॥

हटयोगी ब्रह्मज्ञान्यांसी । अवघड योग सांगितला त्यांसी ।

भाळ्या भोळ्या निज भक्तासी । धर्म सांगसी भागवत ॥२॥

सनकादिकांचा प्रश्न अपूर्व । ऎकोनि कूंठित कमळोद्भव ।

मग त्याणें केला तूझा स्तव । सप्रेम भाव धरोनियां ॥३॥

ऎकोनि विधात्याची स्तूत । मग हंसरूपें आलासी तेथ ।

तेव्हां चतूःश्लोकी भागवत । सांगसी त्यातें निजकृपें ॥४॥

तूझीं ऎकोनि वचनामृतें । ब्रह्मा झाला स्वानंदभरित ।

मग त्याणें दशलक्षण भागवत । नारदातें सांगीतलें ॥५॥

तो प्रेमभरित होऊनि मानसीं । कीर्तनीं नाचे अहर्निशीं ।

तेव्हां द्वैपायन भेटोनि नारदासी । सद्भावेंसी पूसत ॥६॥

म्हणे स्वामी ऎका वचन । म्यां केलीं अठरा पुराणें ।

आणिक शास्त्रें इतिहास गहन । वदलों संपूर्ण हे कथा ॥७॥

परी मन स्थिर होवोनि पाहीं । चित्त संतोष होत नाहीं ।

यासि उपाय सांगावा कांहीं । व्यास पायीं लागला ॥८॥

ऎकोनि सच्छिष्याचा प्रश्न । चित्तीं संतोषे ब्रह्मानंदन ।

मग शत श्लोक भागवत करून । व्यासासि तेणें सांगितलें ॥९॥

सद्गुरु म्हणती पराशर सुता । हेंचि विस्तारूनि वदें आतां ।

तेणें चित्ताची होईल स्थिरता । आत्म-स्वहिता पावसी ॥१०॥

मग द्वैपायन प्रेमभरित । विस्तारें वदे श्रीभागवत ।

आठरा सहस्त्र जाहला ग्रंथ । उपनिषदर्थ केवळ जो ॥११॥

मग शुकयोगींद्रें पाहोनि प्रीती । त्याणें बोधिला परीक्षिती ।

आणिकही साधक तरले किती । त्यांची गणती नोहे कोणा ॥१२॥

ऎशापरी वैकुंठनायका । तूं प्रेमळाचा प्रियोत्तम सखा ।

भागवत धर्म निर्मूनि नौका । भवपार लोकां करिसी तूं ॥१३॥

त्या भागवताचा अर्थ निश्चिती । कलियुगीं न कळे सर्वांप्रती ।

यास्तव अवतार घेतला संतीं । प्राकृत मती वदावया ॥१४॥

त्या संतांचीं नाना चरित्रें । तूंचि वदसी राजीवनेत्र ।

तरी पुढें निमित्तमात्र । बुध्दि स्वतंत्र असेना ॥१५॥

शिकविले बोल रांवा बोलतां । त्याचा नवलाव तो कोणता ।

तेवीं मंदबुध्दीचा प्रकाशिता । नसे अनंता तूजविण ॥१६॥

मागिले अध्यायाचे शेवटीं कथा । भांबनाथ पर्वती तुका असतां ।

कान्हया बंधु तेथें येतां । रुक्मिणीकांता देखिलें ॥१७॥

निजभक्तासि देखोनि जाण । देव पावले अंतर्धान ।

जेथें लागलें देवाचें चरण । अद्यापि ते स्थान असेकीं ॥१८॥

ते स्थळीं खिळा रचोनि देखा । कान्हयानें मांडिल्या पादुका ।

मन नमस्कारोनि बंधु तुका । सप्रेम सुखी पावला तो ॥१९॥

उभयतां भाऊ ते समयी । सत्वर चालिले देहू गांवी ।

मग येऊनि इंद्रायणीच्या डोही । तुका ते ठायीं बैसला ॥२०॥

साता दिसाचे निर्वाण । उभयतांसि होते जाण ।

सूर्योदयीं करूनि स्नान । सोडिले पारण ते स्थलीं ॥२१॥

मग कान्हयापासोनि वैष्णव भक्ते । मंदिरींहूनि आणाविलीं खतें ।

लोकांवरी वडिलांचें द्रव्य होतें । तेव्हां बोलत कान्हयासी ॥२२॥

अनुभव नसतांचि जाण । व्यर्थचि पुस्तकींचें ज्ञान ।

तैसेंचि परहस्तींचें धन । दुश्चित मन सर्वदा ॥२३॥

आमुचें देईल किंवा नाहीं । ऎसी दुराशा आठवे जीवी ।

यास्तव इंद्रयणीच्या डोहीं । खतें ये समयीं बुडवितों ॥२४॥

ऎसें पुसतां भक्त प्रेमळे । कान्हया बोले ते वेळ ।

तुम्हीं ते विरक्त जाहलां केवळ । प्रपंच सकळ मजमागें ॥२५॥

आम्हींही वडिलांसि सांगू नये । पुढें लेंकरें करितील काय ।

जाणोनि कान्हयाचा मनोदय । योजिली सोय तुकयाने ॥२६॥

दोन विभाग करूनि निश्चित । कागद बुडविलें उदकांत ।

अर्ध विभाग कान्हयातें । देऊनि बोलत काय तया ॥२७॥

आजपासोनि आम्हांकारणें । कंथा शीत निवारणे ।

भिक्षा मागोनि सेविजे अन्न । निर्विघ्न येणें योग चाले ॥२८॥

आणि तुम्हांसि उदमी हातवटी । कारणें लागेल प्रपंच राहटी ।

दोंहींची कैसी पडेल गांठी । ऎका ते गोष्टी सांगतों ॥२९॥

भिक्षा आणि व्यवसाय । याचा काला करूं नये ।

ऎसा ऋषी मुखें पाहें । झाला आहे निवाडा ॥३०॥

ऎसें ऎकोनि ते अवसरी । कान्हया वेगळा संसार धरी ।

आतां निर्वाणत्याग तुकया करी । कैशा परी तें ऎका ॥३१॥

लज्जा लौकिक टाकोनि मानसी । चित्त लाविलें चिंतनासी ।

विरक्तीचेनि बळे फांसीं । इंद्रियें नेमेंसी आकळिली ॥३२॥

अल्प आहार सेविता जाण । तेणें इंद्रियें जाहली क्षीण ।

निद्रा आळस नयेचि त्यानें । अनुतापें भजन करीतसे ॥३३॥

स्नान करूनि प्रातःकाळीं । जाय पांडुरंगाचें देवळी ।

पूजाअर्चन करूनि सकळी । मग वनस्थळीं जातसे ॥३४॥

देहूपासूनि पश्चिमेस । भांडार-पर्वत तीन कोस ।

तुका जाऊनि त्या स्थळास । एकांत बैसे निश्चिती ॥३५॥

तंव श्रोते आशंकित होऊनि चित्तीं । वक्त्या प्रश्न करिती ।

कीं तुकयासि भेटला रुक्मिणीपती । सगुणमूर्ती साक्षात ॥३६॥

देवाची भेट जाहली असतां । तरी इंद्रियांसि नेम कासया वृथा ।

ऎसा सज्जनीं प्रश्न करितां । तरी तेंचि आतां परिसिजे ॥३७॥

वासरमणी उगवतां पाहे । सकळ जीवांसि दर्शन होय ।

परी तो कोणाच्या स्वाधीन नोहे । उभा न राहे क्षणभरी ॥३८॥

तेवीं दैवयोगें करूनि साचार । एकदां भेटला इंदिरावर ।

तो जवळीं असावा निरंतर । ऎसें अंतर तुकयाचें ॥३९॥

भक्तांसि जाहलिया भगवत्प्राप्ती । तरी ते सप्रेम भजन करिती ।

गंगेसि भेटला अपांपती । परी मागुती धांवे चपळत्वें ॥४०॥

प्रभंजन ब्रह्मांडीं भेदला पाहे । सर्वाठायीं व्यापक आहे ।

परी तो चंचळपण सांडितो काय । निश्चळ न राहे क्षणभरी ॥४१॥

तैशाच रीतीं भगवज्जन । स्वरूपीं मिळाले अभिन्नपणें ।

परी एकाचे विभाग दोन करून । करिती भजन अहर्निशीं ॥४२॥

चक्षुःश्रव्याच्या आंगावरी जाण । पहुडला लक्ष्मीनारायण ।

उभयतांचा एकांतपूर्ण । त्याजकारणें विदित ॥४३॥

शेजारती झालिया निश्चित । आपापुल्या स्थानीं जातीं भक्त ।

परी शेषासीं वियोग नाही किंचित । परी सप्रेम भजत श्रीहरीतें ॥४४॥

तैसाच तुका वैष्णववीर । अविट आवडी त्याची थोर ।

एकांत जावोनि पर्वतावर । भजन साचार करीतसे ॥४५॥

अहंता टाकोनि सर्वस्वें । जनविजन समान भासे ।

मीपणाचें नांव कैसें । तेही स्वप्नास न ये कीं ॥४६॥

मुळींहूनि अहंता त्यागितां पाहे । तरी सहजचि निरसलें संसारभय ।

तैसा निमोनि गेला देह । मग रोग होय कोणासी ॥४७॥

तैशाच रीतीं तुकयानें तत्वतां । संसार मूळ त्यजिली अहंता ।

मग नित्य जावोनि एकांतां । रुक्मिणीकांता आठवी ॥४८॥

नामस्मरणावीण जाण । आणिक सर्वथा नाहीं साधन ।

ऎसा निश्चिय केला पूर्ण । करीत भजन अहर्निशीं ॥४९॥

ध्यानासि आणोनि पांडुरंगमूर्ती । लाविलीं दोन्हीं नेत्रपातीं ।

म्हणे तुझ्या नामावीण श्रीपती । आणिक विश्रांती मज नाहीं ॥५०॥

नाम हेंचि माझे उग्रतप । नाम हेंचि माझा मंत्र-जप ।

नाम हेंचि माझें व्रत अमुप । नामेंचि निष्पाप होईन मी ॥५१॥

नाम हेंचि माझा कुळाचार । नाम हेंचि कुळधर्म थोर ।

नामावीण नाहीं आधार । हाचि निर्धार श्रीहरी ॥५२॥

नामावीण धनवित्त कांहीं । आणिक सांगावयासि येत नाहीं ।

आतां भवसागर विठोबायी । उतरोनि नेयी पैलतीरा ॥५३॥

ऎशाच रीतीं नित्य नित्य । एकांतीं तुका करुणा भाकित ।

सायंकाळीं गावांत येत । आनंदें नाचर देउळीं ॥५४॥

देखोनि लोक म्हणती त्यास । तुकयासि लागलें असे पिसें ।

नाम गातसे रात्रंदिवस । संसार आस सांडिली ॥५५॥

एक म्हणती व्यापार खोटा । उदीम करितां आला तोटा ।

म्हणवूनि मुखीं भरला फांटा । बडबडी चोहटा भलतेंची ॥५६॥

एक म्हणती इंद्रायणींत । तुकयानें अवघीं बुडविलीं खतें ।

प्रपंच टाकोनि निश्चित । धरिला परमार्थ तैंहुनी ॥५७॥

एक म्हणती विशेष पाहे । प्रपंच टाकितां लाभ काय ।

पोट कोणासि सुटले आहे । न चलेचि देह अन्नाविण ॥५८॥

टाकूनियां मुलें लेंकुरें । जाऊनि बैसतो पर्वतावर ।

परी भिक्षा मागें घरोघर । क्षुधातुर होतांची ॥५९॥

एक म्हणती टाकोनि आपला धंदा । व्यर्थ कां करितां त्याची निंदा ।

संसारीं बहुतांची झाली आपदा । काय गोविंदा भजताती ॥६०॥

ऎशाच रीती त्रिविध जन । नानापरीचीं बोलती वचनें ।

परी तुका आनंदयुक्त मनें । नाहीं देहभान सर्वथा ॥६१॥

राजबिदीं तूं निवारण । चालतां उदंड भुंकती श्वानें ।

परी त्यांचें भय न धरोनि मनें । स्थिर गमनें चालत असे ॥६२॥

ऎकोनि सागराची गर्जना । अगस्त्य भय न धरीच मना ।

तेवीं लोक दुरुक्ति बोलती नाना । परी विक्षेप मना न वाटे ॥६३॥

जन निंदेचे येतां लोट । शांति उदरीं भरितसे घोंट ।

काम-क्रोधांची मोडली वाट । करणी आचाट निरुपम ॥६४॥

आशा-तृष्णा मोह-माया । काम-क्रोधांच्या मोडिलें ठाया ।

पुढें ब्रह्मचि करील काया । वैष्णव तुकया हेंचि साचा ॥६५॥

सप्रेम भाव धरोनि चित्तीं । नित्य पूजित पांडुरंग मूर्ती ।

दिवसां अरण्यांत एकांतीं । भजन प्रीतीं करितसे ॥६६॥

एक इंद्रायणीच्या तीरीं निश्चित । करंजाया मावल्या असती तेथ ।

तये स्थळीं वैष्णवभक्त । भजन करीत बैसला ॥६७॥

तया समीप कृषियानें । शेत पेरिलें होतें जाण ।

तें पिकासि आलें असे सघन । उमटले कण तयावरी ॥६८॥

शेत पाहुनि चहूंफेर । कृषीवळ निघाला सत्वर ।

येऊनि तुकया समोर । काय उत्तर बोलिला ॥६९॥

म्हणे तुकाशेट ऎका वचन । माझ्या शेतीं बैसा राखण ।

आदमण दाणे तुम्हांसि देईन । कुटुंब रक्षण करावया ॥७०॥

सहज रिकामें बैसला घरीं । संसार चालेल कैशापरी ।

तरी शेतीं बैसोनि निरंतरीं । येथेंचि हरि हरि भजावा ॥७१॥

ऎकोनो तयाचें उत्तर । अवश्य म्हणे वैष्णव वीर ।

तेथूनि उठिला सत्वर । जात बरोबर तयाच्या ॥७२॥

तुकयाची ऎशी स्थित । जों जें म्हणे ते ऎके मात ।

आग्रह न करीच किंचित । परोपकारार्थ जाणोनी ॥७३॥

तान्ह्या बाळाची जैसी स्थिती । बरें वाईट देतांचि हातीं ।

मुखीं घालीत सत्वर गती । अनमान चित्तीं न करितां ॥७४॥

नातरीं कां जैसें तोय । साकर घालितां गुळचट होय ।

नातरी लवण मेळवितां पाहे । क्षारत्व लाहे तत्काळ ॥७५॥

तैशी तुकयाची स्थिती पाही । कवणें विशीं आग्रह नाहीं ।

जो जें म्हणेल जे समयीं । तेंचि सर्वही करितसे ॥७६॥

मग कृषियानें ते अवसरी । तुकयास नेले बरोबरी ।

गोफण दिधली त्याचे करीं । म्हणे माळ्यावरी बैसे आतां ॥७७॥

तुझ्या स्वाधीन केले क्षेत्र । राखीत जाय दिवस रात्र ।

सवंगणीस येईल जोंवर । तोंवर करार असावा ॥७८॥

आदमण दाणे केले करार । ते मी देईन राशीवर ।

ऎसें बोलूनियां उत्तर । कुणबी सत्वर तो गेला ॥७९॥

स्वहस्त धारण जये देशीं । गेला खेप आणावयासी ।

शेतीं बैसविलें तुकयासी । घरीं मनुष्यांसी सांगितलें ॥८०॥

इकडे तुका वैष्णव भक्त । माळ्यावरी जावोनि त्वरित ।

भोंवतें विलोकूनि पाहत । तों पक्षी बैसत शेतावरी ॥८१॥

म्हणे हे ईश्वराचे जीव । क्षुधातुर असती सर्व ।

आपण म्हणवितों भक्त वैष्णव । तरी न उडवावे सर्वथा ॥८२॥

मागें दुष्काळ बहुत होता । विश्वभाग्यें पिकलें आतां ।

आपण यासि उडवितां । तरी व्हावें दुरिता अधिकारी ॥८३॥

ऎसें म्हणोनि प्रेमळ भक्त । माळ्यावरी उगाचि बैसत ।

जैसें बुजावणें मनुष्य दिसत । परी जीव किंचित त्या नाहीं ॥८४॥

दोन प्रहर येतांचि दिनकर । पक्षियांसी बोले मधुरोत्तरें ।

आतां पोट भरले असेल जर । तरी जावें सत्वर उदकासी ॥८५॥

ऎसें बोलोनि त्यांजकारणें । निवांत बैसे करीत भजन ।

हरीनामाची उमटे धुन । ऎकती दुरोन गांवकरी ॥८६॥

घरीं वाट पहातसे राणी । म्हणे घरासि नये आझुनी ।

कोठें बैसलासे जावोनी । कोणतें वनीं पहावें ॥८७॥

लज्जा अहंकार टाकोनी । उगाचि फिरतो जनीं वनीं ।

सोडिलें संसारासि पाणी । काय साजणी करूं आतां ॥८८॥

कन्येसि म्हणे बाहेर जाय । पिसा कोठें बैसला पाहे ।

मजला क्षुधा लागली आहे । जेविता न ये त्याजविण ॥८९॥

वडील कन्या काशीबाई । धांवत गेली लवलाही ।

तुकयास म्हणे ते समयीं । चाल गृहीं जेवावया ॥९०॥

तिजला देतसे प्रति वचन । आम्हीं शेतीं बैसलों राखण ।

त्याणें देऊं केलें धान्य । घरीं जाऊन सांग आतां ॥९१॥

कन्या परतोनि आली त्वरित । मातेसि सांगितला वृत्तांत ।

अवली अन्न पाठवी तेथ । मग आपण जेवित तेधवां ॥९२॥

तुका भाकर खावोनि तेथ । विचार करितसे मनांत ।

म्हणे रात्रंदिवस रहावें येथ । वेर झार व्यर्थ कासया ॥९३॥

प्रातःस्नान करोनि निश्चिती । देउळीं पूजीत पांडुरंग मूर्ती ।

मग सत्वर येऊनियां शेती । भजन एकांतीं करितसे ॥९४॥

सायंकाळ होता एक वेळ । पक्षियांसि म्हणे उठा सकळ ।

बहुत पडतां अंधकार सबळ । मार्ग साचार न दिसे तुम्हां ॥९५॥

ऎसें म्हणवोनी वैष्णवभक्त । एकदा पक्षियांसि उडवित ।

म्हणे प्रातःकाळ होतांचि समस्त । यावें त्वरित या ठायां ॥९६॥

देखोनि पक्षियांची रीती । तुका विस्मित होय चित्तीं ।

म्हणे चार दाणे येथेंचि खाती । घरासि न नेती कांहींच ॥९७॥

यांज सारिखे माझिया जीवा । कधीं करिशील देवाधिदेवा ।

तुज वांचूनी आमुचा हेवा । कोण केशवा पुरवील ॥९८॥

माझें लपो असतेंपण । नामरूपासि पडो खंडण ।

आत्मवत देख अवघे जन । नसो देहभान किंचित ॥९९॥

सोइरे सज्जन संबंधी पाहे । यांणीं न धरावी माझी सोय ।

जीत कां मेला माझा देह । प्रत्यया नये तें करीं ॥१००॥

प्रभंजने उडे गळित पान । तैसें व्हावें माझें चालणें ।

स्वमुखें तुझें वर्णीन गुण । तें उचित दान मज देयीं ॥१०१॥

पक्षी श्वापदें तरुवर जाण । ब्रह्मादि पिपीलिका आदिकरून ।

सर्वत्र व्यापक एक चैतन्य । लेखीं समान तें करीं ॥२॥

सोनें आणि दगड माती । माझ्या दृष्टीं सारखीं दिसती ।

दुराशा कदा नुपजो चित्तीं । ऎसें श्रीपती करावें ॥३॥

अपशब्द बोल कानीं पडती । अथवा केली कोणी स्तुती ।

तें समान वाटे मजप्रती । ऎसी स्थिती करी माझी ॥४॥

ऎशाच रीतीं तुका नित्य । चित्तीं कल्पीत मनोरथ ।

हृदयीं भरला पंढरीनाथ । स्वानंद भरित सर्वदा ॥५॥

गोवर घालोनि तये ठायीं । हुताशन चेतवीत पाहीं ।

किंचित निद्रा येताचि देहीं । जागृत लवलाहीं होतसे ॥६॥

सकळ गांवींचे पक्षी निश्चित । तेथेंचि येत नित्य नित्य ।

कण खातांचि वैष्णव भक्त । संतोष पावत कैशा रीती ॥७॥

जैसा कनवाळु दाता निश्चिती । स्वग्रहीं जेववीत द्विजपंक्ती ।

तुकयासि संतोष तैशाच रीतीं । पुरवीत आर्ती क्षुधितांची ॥८॥

एक मास लोटतां ऎशापरी । तों खेप करोनि आला शेतकरी ।

म्हणे धान्य पिकलें कैसें तरी । ये अवसरीं पाहावें ॥९॥

ऎसें म्हणोनि लवलाहीं । शेतासि आला ते समयीं ।

तों काळीं कणसें पिशा सर्वही । कण एकही दिसेना ॥११०॥

परम संताप वाटला तेव्हां । अधर खावोनि चावितसे जिव्हा ।

म्हणे तुकयानें साधिला दावा । न्याय सांगावा कवणासी ॥११॥

ऎसें म्हणवोनि चित्तांत । चार्‍ही कोपर हिंडोनि पाहात ।

त्याच्या भयें करोनि निश्चित । पक्षी समस्त उडाले ॥१२॥

जैसें भोजन होतांचि पाहें । तयामाजी अंत्यज जाय ।

मग ब्राह्मण उठती लवलाहें । जेवितां ठाय टाकोनी ॥१३॥

असो आतां शेतकरियानें । दशदिशा पाहिल्या हिंडोन ।

तों शेत भक्षीलें पक्षीयानें । एकही कण दिसेना ॥१४॥

तों माळ्यावर बैसोनि । निश्चित प्रेमळ तुका भजन करित ।

नाना अपशब्द बोलत बोलत । कुणबी येत लवलाहीं ॥१५॥

सक्रोध तुकयासि बोलत उत्तर । कैसें बुडविलें माझें घर ।

तूं सा पायल्यांचा चाकर । एक मासभर ठेविला म्यां ॥१६॥

तुजवरी विश्वास ठेवुनियां । मी गेलों खेप आणावया ।

तुवां शेत चारिलें पक्षीयां । द्वंद्व तुकया साधिलें ॥१७॥

ऎसें म्हणवोनि क्रोधदृष्टी । धरोनि वोढिला मणगटीं ।

म्हणे खपाट्यासी पडली गांठी । आतां नव्हेचि सुटी सर्वथा ॥१८॥

एक दुर्जन एक संत । एक विषकंद एक अमृत ।

दैवयोगें गांठी पडत । तैसेंचि निश्चित हें झालें ॥१९॥

कीं एक समुद्र एक अगस्ती । एक रहु एक निशापती ।

मिळणी होय प्रारब्धगती । तैसीच गती हे झालें ॥१२०॥

की राजहंस आणि ससाणा एक । कीं एक श्रोत्रिय एक हिंसक ।

कीं जारिणी आणि पतिव्रतेसि देखा । गांठी नावेक पडियेली ॥२१॥

कीं एक निंदक खळ कुटिलं । एक वैष्णवभक्त प्रेमळ ।

एक शुचिर्भुत एक अमंगळ । मिळणी मिळे अवचिता ॥२२॥

तैशाच रीतीं तुकयाकारणें । वाढोनि चालविलें कुणबियानें ।

पाटील कुळकर्णी बैसले जाण । आला घेऊनि त्या ठायां ॥२३॥

पिटीत तोंड वक्षस्थळ । आबावें मांडिलें तये वेळ ।

देवदत्त कुणबी मत न कळे । अहाणा सकळ बोलती ॥२४॥

ऎसें देखुनि लवलाहें । ग्रामस्थ पुसती झाले काय ।

मग आद्यंत वृत्तांत सांगताहे । करावें काय म्यां आतां ॥२५॥

तुकयासि पुसती ते वेळे । मग सत्य सांगे भक्त प्रेमळ ।

ज्याच्या वाचेसि असत्य मळ । अनुमात्र विटाळ स्पर्शेना ॥२६॥

म्हणे हा मज बोलिला वचन । धान्य देईन आदमण ।

माझ्या शेतीं राखण । तें म्यां मान्य केलें ॥२७॥

मजसीं इतुकें बोलिला उत्तर । माळ्यावर बैसोनि राखीं पांखरें ।

तीं म्यां उडविलीं असतीं जर । तरी मरतीं साचार अवचितां ॥२८॥

पक्षी मिळोनियां समस्त । चार चार दाणे खाती नित्य ।

घरासि नव्हते कांहीं नेत । मग म्यां निश्चित कां वर्जावें ॥२९॥

पक्षी रक्षावें हें वचन । म्हणोनि केलें त्याचें पाळण ।

ऎकोनि तुकयाचें बोलणें । सकळ जन हांसती ॥१३०॥

ऎसी ऎकोनियां वार्ता । संताप शेतकरियाच्या चित्ता ।

म्हणे पाटी बांधोनि जातो आतां । आपुल्या शेता सांभाळा ॥३१॥

ग्रामस्थ म्हणती त्या अवसरा । देणें लागतो दिवाण सारा ।

कुणबी पळोनि गेलिया खरा । विचार बरा मग नाहीं ॥३२॥

शेतकरियासि पुसती सहज । धान्य कितीक होतसे तुज ।

तें यथार्थचि सांग आज । सत्य उमज धरोनियां ॥३३॥

कुणबी सांगे तये दिवसीं । दोन खंड्या धान्य होतसे मजसीं ।

सत्य सांगतों तुम्हांपासीं । साक्षी गोष्टीसी उदंड ॥३४॥

ग्रामस्थ तुकयासि बोलत । तुम्हीं स्वमुखें सांगतां खादलें शेत ।

घरीं तों ऎवज नाहीं दिसत । तरी द्यावे खत लेहुनियां ॥३५॥

नायकाल जरी आमुचें वचन । तरी आतांचि जाईल पळोन ।

असामी याची भरील कोण । मग दंडील दिवाण आम्हांसि ॥३६॥

या लागीं सांगतों तूम्हांसी । रोखा लेहून द्यावा यासी ।

शेती पिशा राहिल्या त्यांसी । आपुल्या घरासी तुम्हीं न्या ॥३७॥

अवश्य म्हणतां वैष्णवभक्त । गाहीसुध्दां लिहिलें खत ।

कुणबियाच्या हातीं देत । संतोषयुक्त तो झाला ॥३८॥

पाहोनि कागदींचें धन । मूर्खासि जाहलें समाधान ।

निजस्वहितासि नाडला तेणें । विष्णु महिमा न कळेना ॥३९॥

ग्रामस्थीं करोनि पंचाइती । कब्जा तोडिला ऎशा रीतीं ।

म्हणती शेत खादलें तें सत्वरगती । पाहावें निश्चित जावोनियां ॥१४०॥

गांवाच्या पांड्या समवेत । पाहावया चालिले शेत ।

तों कौतुक करी पंढरीनाथ । तें ऎका निजभक्त भाविकहो ॥४१॥

पहिल्या परीस दशगुणें विशेष । कण दाटोनि भरलीं कणसें ।

आणिक कथा बहुत असे । ग्रामस्थ दृष्टीस पाहती ॥४२॥

पक्षीयांचा दंश पाही । कोठे न दिसें एके ठायी ।

देखोनि विस्मित जाहले ते सवेही । म्हणती नवायी अगाध हे ॥४३॥

मागें सांगत होता कजिया । तो शेतकरी म्हणतसे तया ।

खत फिरोनि द्यावें तुकया । शेत माझिया स्वाधीन करावें ॥४४॥

ग्रामस्थ म्हणती तये क्षणीं । पंचाईत फिरेल कैसेनी ।

आम्हांसी शब्द ठेवील कोणी । ऎसी करणी न करावी ॥४५॥

पिशाच कणसें जाहली साचीं । हे तो करणी विठोबाची ।

देवासि चिंता तुकयाची । प्रचीत त्याची आली कीं ॥४६॥

तूजला लेहोनि दीधलें याणें । तोचि सकरार न टळे जाण ।

राशीवर देईल तूझें धान्य । उरेल तें घेऊन जाईल ॥४७॥

ग्रामस्थ म्हणती तुकयाकारणें । आपल्या शेतीं बै राखण ।

ऎकोनि म्हणे वैष्णव जन । हें नये होऊन सर्वथा ॥४८॥

आम्हीं कांहीं घेतलें नसतां । तों येव्हडा अभिशाप आला होता ।

म्यां सगळें शेत अंगीकरितां । पुढें दंड कोणता कळेना ॥४९॥

ऎसे म्हणवोनि वैष्णवभक्त । सप्रेमभावें भजन करित ।

मग एक मोलकरी करोनि ग्रामस्थ । राखण तेथें बैसविती ॥१५०॥

मजूर लावोनि वेटाळिलें शेत । रास झालिया मोजूनि पहात ।

तों सतरा खंड्यांची आली गणित । विस्मित चित्त सकळांचें ॥५१॥

म्हणती इतकें पीक जाणा । गावांत जाहलें नाहीं कवणा ।

अघटित ईश्वराची रचना । कौतुकें नाना दाखवी ॥५२॥

एक म्हणती तुकयाचें घरीं । दुष्काळ उपवास पडले भारी ।

ते पारणें व्हावयासि सत्वरी । त्यासि श्रीहरी पावला ॥५३॥

एक म्हणती असत्य उत्तर । त्या कुणबियाचें दैव थोर ।

तुकशेट वाणी दिवाळखोर । दाणे जन्मवर न देता ॥५४॥

एक म्हणती पक्षियांनी खादले कण । त्याचें बहुत जाहलें पुण्य ।

त्याचें फळ देखिलें पूर्ण । पीक सधन आलें कीं ॥५५॥

असो त्रिविध जन नानारीतीं । आपुल्या कल्पना बोलती ।

वैष्णवी मायेची अनिवार भ्रांती । सर्वा मतीं अनावर ॥५६॥

मग दोन खंड्या धान्य । त्यातूनि पहिल्या शेतकरियासि दीधलें मण ।

खत दिधले होतें लेहून । तेंही मागून घेतलें ॥५७॥

तुकयासी म्हणती गांवकरी । हें धान्य नेऊनि सांठवी घरीं ।

तूं तरी उदास अंतरीं । यास्तव श्रीहरी पावला ॥५८॥

ऎसी ग्रामस्थ सांगती मात । परी ते न ऎकेचि प्रेमळभक्त ।

दुराशा नयेचि मनांत । औदास्ययुक्त सर्वदा ॥५९॥

निरपेक्ष मुख्य वैराग्यलक्षण । निरपेक्षासीच म्हणावे सज्ञान ।

निरपेक्ष साधक त्यासींच पूर्ण । भक्ति सगुण ठसावें ॥१६०॥

निरपेक्ष तेथें वसे शांती । निरपेक्ष त्यासीच बाणे विरक्ती ।

निरपेक्षापासीच उपरती । संतोष चित्तीं सर्वदा ॥६१॥

निरपेक्षाचा साचा विवेक । निरपेक्ष त्यासीचा मानिती लोक ।

निरपेक्षापासी सकळिक । सिध्दि अनेक तिष्ठती ॥६२॥

इतर स्थितीची कायसी गोष्टी । निरपेक्ष भक्ति निवडे शेवटीं ।

तयासीच पावे जगजेठी । इतर गोष्टी दांभिक ॥६३॥

ऎशा स्थितीचीं सकळ लक्षणें । तुकयाचे आंगीं बाणलीं चिन्हें ।

यास्तव नाना चमत्कारपूर्ण । रुक्मिणीरमण दाखवी ॥६४॥

असो मागील गोष्ट ऎका । धान्य देतांचि न घे तुका ।

संकट पडलें गांवींच्या लोकां । विचार निका सुचेना ॥६५॥

तेथील पांड्या भाविक पूर्ण । महादाजीपंत नामाभिधान ।

त्यांणें आपलें घरीं जाण । धान्य नेऊन सांठविलें ॥६६॥

म्हणे देवाच्या इच्छेनें पिकलें जाण । तें सत्कर्मी चालावें पूर्ण ।

पुढिले अध्यायी निरूपण । ऎकतां सज्जन संतोषती ॥६७॥

अहो भक्तलीलामृत ग्रंथ । निश्चित हेचि जाणावें परमामृत ।

वैष्णवजन जे भाग्यवंत । तेचि सेविती निजप्रीती ॥६८॥

जे षडवैरी जिंतोनि निश्चित । जनीं वर्तती द्वेषरहित ।

त्यांसीच आवडी लागेल येथ । अधिकार इतरातें असेना ॥६९॥

ज्यासि भगवत्प्राप्तीची चाड । श्रवणी भक्ति लागे गोड ।

त्यांसिच हें चरित्र आवडे । इतरांसि गोड लागेना ॥१७०॥

यास्तव तुम्हां संतांसी जाण । सलगीं करूनि धीटपणें ।

आर्ष नम्र बोलें वचन । नेणतपणे उध्दट ॥७१॥

श्रीमंताने आपुले बोटी । घातली पितळेचि आंगोंठी ।

तयासि लोक देखोनि दृष्टीं । कांचन दृष्टीं भावितील ॥७२॥

तैशाच परी तुम्ही संतीं । अवधान देतां मजप्रती ।

तरी महीपतीचा विशामती । प्रख्यात म्हणती जनलोक ॥७३॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । एकुणतिसावा अध्याय रसाळ हा ॥१७४॥ अध्याय ॥२९॥ ओव्या ॥१७४॥ ६ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP