मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
यशस्वी झाले श्रीमंत पहिले...

दुसर्‍या बाजीरावाचा - यशस्वी झाले श्रीमंत पहिले...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


यशस्वी झाले श्रीमंत पहिले सर्वे लढायाला । आतांच आलें अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥
दादासाहेब पुण्यप्रतापी निस्स्मि शिवभक्त । स्वारी करून दरसाल हालविलें दिल्लीलें दिल्लीचें तक्त ॥ आनंदीबाइ सुशील शिरोमणी सुगुणसंयुक्त । पतिभजनीं सादर घडोघडी अखंड आसक्त ॥ बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त । जन्मांतरीं तप केले निराहारी राहून एकभुक्त ॥ चाल ॥ शके सोळाशे शहाण्णवीं अति उत्तम जयसंवत्सरीं । पौषशुद्ध दशमीस भरणी नक्षत्र भौमवासरीं ॥ ठीक पहिल्या प्रहरांत जन्मले रात्रीच्या अवसरीं ॥(चाल)॥ पहा बाईसाहेब धारमुक्कामीं राहुनी । कंठिला काळ कांही दिवस दुःख साहुनी । केलें तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥(चाल)॥ गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला । कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वांस वाटलें कोपरगावास । स्वारी शिकारिस बरोबर जाती कथा उत्सवास जे करणें तें पुसून करिती अमृतरावास ॥ एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावांस । असें असुन नावांनीं मांडिला अति सासुरवास ॥ हळुच नेउन जुन्नरास ठेविलें श्रीमंतरावास ॥(चाल)॥ इतक्या संधींत सवाई माधवराव मरण पावले । तेव्हांपासून नानांनीं राक्षसी कपटा डौल दाविले ॥ परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥(चाल)॥ आले खडकीपुलावर श्रीमंतास घेउनी । दर्शनास नाना परिवारें घेउनी ॥ दाखविली याद रावास एकांतीं नेऊनी ॥(चाल पहिली)॥ भय मानून शिंद्यांचे निघाले वाईस जायला । सातार्‍यांत राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होऊन एक केली खचित मसलत । चिमाप्पास धनि करून राखिली जुनाट दौलत ॥ करारांत दोघांच्या झाली कांहीं किंचित गफलत । म्हणुनी फिरून नानांनीं उलटी मारुनी केली गल्लत । सूत्रधारी जो पुरुष जाच्या गुणास जग भुलत । हातांत सगळे दोर पतंगापरी फौजा हालत ॥(चाल)॥ परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण । राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ॥ कठीण गांठ नानाशीं न चाले तेथें जारण मारण ॥(चाल)॥ महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ॥ बाळोबास शिंद्यांकडून कैद करविलें ॥ शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥(चाल पहिली)॥ रास्ते झाले जामीन प्रसंगी अवगड समयाला ॥ असा गुजरला वक्त नेले मांहवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले । द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥ शिंदे भोसले होळकर मुश्रुल‍मुल्क एकवटले । दलबादल डेर्‍यांत श्रीमंतासन्निध संगटले ॥ बाजीराव राज्यावर बसतां आनंदें जन नटले ॥ तोफांचे भडिमार हजारों बार तेव्हां सुटले ॥(चाल)॥ नंतर नाना एक विसांमधीं समाधिस्त झाले । महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधिं आपले ॥ यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥(चाल)॥ शिंद्यांची करून माळव्यांत खातरजमा ॥ केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा । सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥(चाल पहिली)॥ कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला । घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास । जातिनें पुण्यास येऊनियां ॥ शहर सभोंते वेढुन बसले चौक्य ठेवुनियां ॥ खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनियां । सुखांत होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनियां ॥ इठग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनियां । सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनियां ॥(चाल)॥ अगोदर सोजर तुरुक धांवले मद्रासी दक्षिणी । त्या भयानें होळकर परतले नाहीं कोणी संरक्षणीं ॥ भरघोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं ॥(चाल)॥ झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ॥ परि घरांत शिरला शत्रु सबळ पारखा । लाल शिरां टोपी अंगीं आठ प्रहर अंगरखा ॥(चला पहिली)॥ धर्म कर्म ना जातपात स्थल नाहीं बसायाला । असें असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधिं जपत होते या इंग्रज राज्याला । अनायासें झालें निमित्त पंढरपुरास कज्जाला ॥ संकट पडलें कांहिं सुचेना प्रधानपूज्याला । रति फिरली सारांश, मिळाले लोक अपूज्याला ॥ भय चिंता रोगांनी ग्रासिलें काळीज मज्जांला । पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥(चाल)॥ परम कठिण वाटलें आठवलें त्रिभुवन राव बाजीला । थोर थोर मध्यस्त घातले साहेबांचे समजीला ॥ निरुपाय जाणुनी हवालीं केले मग त्रिंबकजीला ॥(चाल)॥ ठेविला बंदोबस्तींने नेउन साष्टीस । एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस । केलें गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥(चाल पहिली)॥ स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला । शोध लावून साहेबांनी तेथे पाठलिवें धरायला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची । म्हणून साहेब लोकांनी आरंभिली आगळिक दाव्याची ॥ वसई प्रांत कल्ल्याण गेली गुजराथ पुराव्याची । रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ॥ कर्नाटक दिलें लिहून ठाणीं बैसली पराव्यांची । कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥(चाल)॥ अश्चिनमासीं वद्य एकादशी दोन प्रहर लोटतां । श्रीमंत बापूसाहेब एकांतीं पर्वतीस भेटतां ॥ हुकूम होताक्षणीं रणांगणी मग फौजा लोटतां ॥(चाल)॥ बैसले राव दुर्बिणींत युद्ध लक्षित । भले भले उभे सरदारसैन्य रक्षित । लागून गोळी ठार झाले मोर दीक्षित ॥(चाल प०)॥ तसाच पांडोबांनी उशीर नाहीं केला उठायाला । उडीसरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटतें फार ह्यावरून लक्षुमिस । विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुंकडून खामीस । फसले शके सत्राशें एकुणचाळीसच्या रणभूमीस । ईश्वरसंवत्सरांत कार्तिक शुक्ल आष्टमीस । प्रहर दिसा रविवारीं सर्व आले आरब गुरमीस । खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्तामीस ॥(चाल)॥ दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्याशी लढूं । नर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणांत डोंगर चढूं । शिपाईगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढूं ॥(चाल)॥ लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी । दीड पहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी । गेली स्वारी मशाला हिलाला मग लावुनी ॥(चाल पहिली)॥ जलदी करुनी साहेबांनी लाविलें निशाण पुणियाला । खेंचुन वाडयाबाहेर काढलें कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारों हजार हळहळती । सौख्य स्मरून राज्याचें मीनापरी अखंड तळमळती ॥ रात्रंदिवस श्रीमंत न घेतां उसंत पुढें पळती । यमस्वरूप पलटणें मागें एकदांच खळभळती ॥ धडाक्यानें तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती । त्यांत संधी साधून एकाएकी दुरुन कोसळती ॥(चाल)॥ भणाण जालें सैन्य सोडिली कितिकांनी सोबत । कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनि चुंबत । कितीक मुकामीं अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥(चाल)॥ कोठें डेरे डांडे कोठें उंट तट्टें राहिली । कोठें सहज होऊन झटपट रक्तें वाहली । कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥(चाल पहिली)॥ बहुत कोमावली पहावेना दृष्टिनें उभयांला । हर हर नारायण असे कसे केलें सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणीं भिडले । जखम करून जर्नेलास फिरतां जन म्हणती पडले ॥ गोविंदराव घोरपडयाचे दोन हात भले झडले । आनंदराव बाबर ढिगांमधीं खुप जाऊन गढले । मानाजी शिंदे मागें फिरतना डोई देऊन अडले । छत्रपती महाराज तळावर समस्त सांपडले ॥(चाल)॥ घाबरले श्रीमंत सुचेना मन गेलें वेधुनी । बाईसाहेबांना तशिच घोडयावर पाठीस बांधुनी । नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधूनिं ॥(चाल)॥ दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले । नाहीं स्नान शयन नाहीं स्वस्थपणें जेवले । आले आले ऐकतां उठपळ राव धावले ॥(चाल)॥ गर्मगळित जाहले लागले शुष्क दिसायाला । बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन । रागरंग नाहीं आनंद ठाऊक रायालागुन ॥ सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन । कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ॥ धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन । कर्म पुढें प्रारब्ध धावतें लगबग मागुन ॥(चाल)॥ पांढरकवडयावर रचविल्या घनगारा अद्धुत । थंडीनें मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत । बेफाम होतें लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥(चाल)॥ ओढवले कसे सर्वांचे समयी संचित । कडकडून पडलें गगन जसें अवचित ॥ दुःखाचे झाले डोंगर नाहीं सुख किंचित ॥(चाल पहिली) अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला । कोणे ठिकाणी नदीत लागलें सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती । कळेल तिकडे भरदिसास प्रभु काटयांमधि शिरती ॥ आपला घोडा आपण स्वहस्तें चुचकारुन धरती । खाली पसरून उपवस्त्र दिलगिरींत वर निद्रा करती ॥ अस्तमानीं कधी रात्री भात भक्षिती पाटावरती । दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥(चाल)॥ पेशव्यांचे वंशांत नाहीं कोणी असा कहर पाहिला । हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ॥ बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥(चाल)॥ नर्मदेस शालिवाहन शक संपला । त्या ठायीं ठेविला शकपंती आपला ॥ भरचंद्रहूग्रहणांत जसा लोपला ॥(चाल पहिली)॥ सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला । सिद्ध झाले मालकमास राव राजेंद मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिरवले । सद्धद झाला कंठ नेत्र दोन्ही पाण्यानें भरले ॥ आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले । ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ॥ केवळ असा विश्वासघात केल्यानें कोण तरले । इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥(चाल)॥ तुमची आमची हीच भेट आतां राव सर्वांना सांगती ॥ कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ॥ ऐसें उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ॥(चाल)॥ महाराज ऐसें उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ॥(चाल)॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये । दूर ढकलुन शरणागतास लावूं नये ॥ पहा कसाबाचें घर गाईस दावू नये ॥(चाल पहिली)॥ हिंमत सोडूं नये सर्व पुढें येईल उदयाला । कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावें ह्र्दयाला ॥१३॥

प्राण असुन शरीरांत बुडालों वियोग लोटांत । बरोबर येतों म्हणुन घालिती किती डोयी पोटांत ॥ निराश जाणुन झाली रडारड मराठी मोटांत । निर्दयांनी लांबिवली पालखी पलटण कोटांत ॥ मातबर लोकांची ओझी चालतात मोटांत । गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटांत ॥(चाल)॥ कुंका वांचून कपाळ मंगळसूत्रावांचुन गळा । तसा सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ॥ धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥(चाल)॥ कसें प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविलें, अगदींच पुण्याच्या लोकांना फसविलें । हुर हुर करीत्त का उन्हांत बसविलें ॥(चाल पहिली)॥ काहीं तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला । कोणास जावें शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळलें मुंग्यांनी । पंडितास जिंकिलें सभेमध्ये मदांध भंग्यांनी । भीमास आणिलें हारीस रणांगणीं अशक्त लुंग्यांनी । कुबेरास पळविलें अकिंचन कसे तेलंग्यानी ॥ जळीं राघव माशास अडविलें असंख्य झिंग्यांनी । जर्जर जाहला विष्णवाहन बदकांचे दंग्यांनीं ॥(चाल)॥ ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडविले । हरिश्चंद आणि रामचंद्र नळ पांडवांस रडविलें । फितुर करून सर्वांनी असलें राज्य मात्र बुडविलें ॥(चाल)॥ म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर । तर दृष्टी पुढें पडतील राव लवकर ॥ महादेव गुणजिन श्रीमंतांचे चाकर ॥(चाल पहिली)॥ प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला । धुरु नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायांला ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP