मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|
दक्खनचा दिवा मालवला हिरा ...

नारायणरावाचा वध - दक्खनचा दिवा मालवला हिरा ...

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


दक्खनचा दिवा मालवला हिरा हरपला । काय गुपीत घाला केला नारायणरावाला ॥ध्रुपद॥
एकछत्र करुनि गेले राव माधवराव । थरथरां कांपत होते अष्ट उमराव ॥ वसविले हस्तिनापुर राज्य पाच्छाव । दादासि मोकळें केलें राज्य करावं कांपत होते अष्ट उमराव ॥ वसविले हस्तिनापुर राज्य पाच्छाव । दादासि मोकळें केलें राज्य करावं ॥ तुटली आयुष्याची दोरी नाहीं उपाव । त्यांनी मरते समयी बोलविले नारायणराव ॥(चाल)॥ “ दादसि मिळोन असावें । रयतेला दुःख न द्यावें ॥ द्वैत केवळ न करावें । प्रीतीनें राज्य करावें । पुणे गादी सांभाळुनि रहावे ॥ माझ्या मोक्षपदाचे वचन सांभाळावे” ॥(चाल)॥ आनंदीबाईला जवळ बोलाविलें । “बया आम्ही जातो मोक्षपदाला तुम्हा कळविले ॥ ओटयांत नारायणराव तुमच्या घातला” । बहु प्रकारें विनविलें आनंदीबाईला ॥ मग माधवरायाने प्राण सोडिल । कशी करुणा नव्हाती भगवाना तुला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥१॥

श्रीमंती राज्यामधिं पुण्याची महिमा कशी होती । जागजागी अनुष्ठाने ब्राह्मणभोजने होती ॥ तुपपोळी खायाला नव्हती ब्राह्मणांस निवंती । कशा नालख्या पालख्या घरोघर फिरती ॥ स्वारी श्रीमंतांची नित्य पर्वतीला जाती । काय आरसेमहाल मजा दिस वाडयाची ॥ सोन्याचा गणपती पूजा श्रीमंताची । बुधवारचा वाडा मसलत पंचाइतीची ॥ कारंजेवाडा सदर नाना भाऊची ॥(चाल)॥
काय बैठक रावसाहेबाची । पानविडे मजा खायाची ॥ लोक येतात । मुजर्‍याशी ॥ कारंजे लाविली वाडयांत पाण्याची ॥ जुना वाडा बांधला बुरूज लढायाशी ॥(चाल)॥ नळाला काम लाविले, हुकूम झाला । पुढे कोट बांधणार होते शहर पुण्याला ॥ पण करुणा नाही आली भगवाना तुला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥२॥

माधवराव मोक्षपदाशी गेला ॥ चिंता पडली नाना फडनविसाला ॥ नारायण महाराज नेले सातार्‍याशी । शाहूरायाच्या तक्तापाशी ॥ शिक्के कटयार वस्त्रे दिली नारायणाशी । पुण्याची गादी मिळाली नारायणाशी ॥ आला वाजवीत चौघडा शहर पुण्याशी । कूच करुनि लौकर नेलें नाशकाशी ॥ दुसर्‍याचि बुद्ध ऐकत निमित्याशी । मग येऊन जप्ती केली नारायणाशी ॥(चाल)॥ फार झाली बंदोबस्ती । घोडयाची गस्त हिंडती ॥ चौक्याची बंदोबस्ती । नारायण धरायासाठी ॥ आनंदीबाईने मांडली हिकमती ॥ माझ्या राज्यपदाची माळ गंगाबाईला दिली कशी ॥(चाल)॥ पुढले होणार जाणार ठाऊक कोणाला । होयाचे होऊन जाईल शब्द देवाला ॥ नाराय़णराव मुकले बाई प्राणाला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥३॥

भाद्रपद तेरशी दिवस सोमवार त्या दिवशी, दिवस चढला दोन प्रहर सुमेरशिंग गारदी, होऊन तयार ॥ त्या आनंदीबाईने बोलाविला कचेरीवर । आनंदीबाई बोले सुमेरसिंगाला । “तुला भाऊ म्हणोन माझा मी मानिला ॥ जर खरे सांगशील मला आनंदीबाईला । हे पुणें शहर अर्धे देईन तुला ॥ बेल भंडार तुळशीपत्र इमान तुला न मला” ॥ दोघांची क्रिया झाली बेलबागाला ॥ “राजपद कोणाला दिले सांग आम्हांला” । मग सुमेरशिंग गारदी बोले बाईला ॥ “राजपद दिलें आई दादांनीं नारायणाला” ॥(चाल)॥ आंग टाकि ति धरणीला ॥ तोडी कुरळ्या केंसाला ॥ राज्याचा नाश माझ्या केला ॥ शिव्या देती राघोबादादाला ॥(चाल)॥ “माझा हुकूस जाउनि सांग माझ्या नवर्‍याला । नारायण धरुनि आण माझ्या कचेरीला ॥ नाही तर कुंकूं पुशितें मी आपल्या सदरेला” ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥४॥

सुमेरशिंग गारदी होऊनि तयार । “मला हजरी दे” आनंदीबाई म्हणुनि लावी कटयार ॥ मग शिरला आरसेमहालांत उपसुनि तलवार । हजार गारदी शिपायी बरोबर ॥ हाती नागव्या तलवारी हातांमधी भाले । त्यांनी आरसेमहाल वेढीला चौफेर ॥ केसरीभात जेवले होते नारायण । ह्या राजवाडयामधिं झालें निद्राशयन ॥(चाल)॥ झाली गर्दी एकच हल्ला । पर्वती आई गेली स्वप्नाला ॥ उठ नारायण आतां तुझा घात आला । राव स्वप्नीं जागा झाला ॥ उठोनि उभा राहिला । राजपुत्र थरथरां कांपला ॥ पाणी आलें त्याच्या नेत्रांला । “ राजपद भोंवलें मला ॥ नऊ महिने नाहीं भोगलें पुरते राज्याला । डोळाभर नाहीं पाहिलें अस्तुरीला ॥ आनंदीबाईनें आतांच घात मांडिला । आईबाप नाहीं जवळ सोडवायाला ॥ नाना फडनवीस नाहीं पुण्याचे सदरेला” । नारायण पळों लागला, आसरा नाहीं लपायला ॥ गाय होती देवपूजेला । गाईच्या आड लपला मिठी गाईच्या गळ्याला ॥ “गाईबाई प्राण वांचवा आपुला” । गाय हंबरती खाशाला ॥ पाणी गाईच्या डोळ्याला । सुमेरशिंग उभा राहिला तोडायला ॥ गाईला वार लागला, आसरा गायीचा सोडिवला । नारायण पळों लागला ॥ हिंडोन सारा वाडा भयाभीत झाला । थरथरांच कांपत राघोबादादापाशीं गेला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥ दक्ख०॥५॥
जिथून पळाले राव सुमेरशिंग माग । बरोबर घेऊन गारदी केला लाग ॥ शोध करित पुढें चाले लावला थांग । म्हणे इथून पळाले राव, आनंदीबाई सुमेरशिंगाला सांगे ॥ मग गेले दादापाशीं सोडा राग । मला द्यावें जीवदान टाकावें मागें ॥(चाल)॥ डोकी घातली पोटांत ॥ मिठी मारितो गळ्यांत ॥ राजपद नको मला इथें माझ्या प्राणाचा होईल घात ॥ आनंदीबाईचें चुलतीचें ऐकूं नको ॥ भट ब्राह्यण मला म्हणतात ॥ मी कोरण भिक्षा मागत जातों काशी तीर्थांत ॥ माझी गंगगातिरीं अस्तुरी द्या माझ्या संगत । दादासाहेब पुरवा माझ्या मनोरथ ॥ आली माया हदयांत ॥ दादासाहेब बोले सुमेरशिंगास नको करुं मुलाचा घात ॥(चाल)॥ माझ्या वडील भावाचा लेक ॥ राज्याला एकुलता एक ॥ शिर ठेविलें रायाचे हातीं वांचवा याला ॥ पुढें सुमेरशिंग गारदी दादासाहेबास बोलता झाला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥६॥

अन्न पाणी लागेना गोड चैन पडेना आनंदीबाईला ॥ बारावर एक वाजला बाई घंटा झाला ॥ कां अजून सुमेरशिंग येईना सांगावयाला ॥ मग सुमेरशिंग गारदी जवळ बोलविला ॥ काय हुकूम दिला दादांनीं सांग मेल्या मला ॥ म्ग सुमेरशिंग गारदी बोले बाईला ॥ दादासाहेब हुकूम देईनात माला नारायण । काय पुढलें होणार ठाऊक नाहीं ह्याला ॥ राजपद दिलें दादांनीं नारायणाला ॥ सर्पाच्या पाठीवर मेल्या तूं पाय दिला ॥ पुढें विकील ढाणकाला ॥(चाल)॥ होयाचें होऊं दे जीवें मार दोघांल । अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥७॥

सुमेरशिंग गारदी बोले दादाशीं ॥ यामुळें आपला प्राण तुम्ही त्यजितां ॥ पुढें आमचीं मनुष्यें कशीं घाण्यामधें गाळवितां ॥ दादांनी हात काढिला मग झाला परता ॥ तुळाराम परदेशी नारायणाला कशीं घाण्यामधें गाळवितां ॥ दादांनी हात काढिला मग झाला परता ॥ तुळाराम परदेशी नारायणाला झाला ओढिता ॥ वैर्‍यानें हात टाकिला खांद्यावरता ॥(चाल)॥ झाली मुक्त एकच घाई । रक्त वस्त्रें भिजली बाही । रक्तचे पुर वाही ॥ एक शकल झालं दुठायीं । मधें जानव्याचे हाल झाले कांही ॥ कढी भात पडला ठायीं । चकचकती सगळी शाही हाणून घेती उरावरी ॥ नारोबा नाईक पुरा झाला । जखमा लागल्या विश्वराम ढेर्‍याला । पर करुणा नाही आलीं भगवाना तुला । अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥८॥

नारायणमहाराज मोक्षपदाशीं गेला । काय अंधार पडला पुणेंशहराला ॥ वाणीणी ब्राह्मणी शिंपिणी सोनारणी एकच कहर झाला । काय राजपुत्र बाई गेला आईबाप नव्हते त्याला ॥ विधवापण आलं गंगाबाईला । ब्राह्मण करिती हाय हाय, मोकली धाय, काय पंढरीराया विष्णुभक्त नेला ॥ मग आनंद आनंदीबाईला झाला । सखा पुतण्या तिनें मारिला ॥ नाना फडनवीस नव्हते त्या वक्तीं पुण्याचे सदरेला । ते गेले मेणवलीला आपुले गांवाला ॥ आबासाहेब पुरंदरकिल्लेवाला । नित्य मेजवानी करी नानासाहेबाला ॥ तुम्हीं यावें सास्वडाला राव भोजनाला ॥ पटवर्धनमहाराज सांगलीवाला श्रीमंताचा सोयरा भला, काय बाजू श्रीमंताला । मानकरी लोक जमले सास्वडीं भोजनाला ॥ सोन्यावीं केळीपत्रें आणिलीं भोजनाला । बहु नाजुक स्वैपाक ब्राह्मणी विचार झाला ॥ रांगोळ्या टाका आतां बसा भोजनाला । सोन्याची पात्रें मांडलीं भोजनाला ॥ पांच शाखा वाढल्या आतां तुपपोळीचा वखत आला । जसा पिंगळा गिजबिजला नाना शब्द बोले लोकांला ॥ “तुम्ही मेजवानी केली आम्हाला । पर करमत नाही आमच्या दिलाला ॥ हुरहुर वारा सुटला नानाफडनविसाला । कांही तरी दगा असेल पुण्यांत श्रीमंतांला” ॥ तीन शब्द बोलला नाना उगीच बसला । पुण्याचे पत्र आले सास्वडाला ॥ सोवळे ब्राह्मण. “उठा नाना भोजनाला” । नानाफडनवीस बोले सर्व ब्राह्मणला ॥ “श्रीमंतांचे पत्र आले कंकण माणिक मोती नारायण गेला ॥ मी गेलो ॥ मी गेलो मेणवलीला आपुले गांवाला । म्हणूनि नारायण मोक्षपदाला गेला” ॥ जिथली पात्रे तिथल्या ठिकाण्याला । सोवळे ब्राह्मण ओवळे मिळाले त्याला ॥ दोरोजांचा उपवास नानाफडनवीसाला । नाही मिळालं फराळाला शूर मर्दाला ॥ अबलक पंचकल्याणी घोडा नानाला बसायला । घोडचवडीखाली नाना पुण्याला आला ॥ “तुम्ही उघडा दरवाजे पाहूंद्या राजश्रीला” । दोन शकले दोन बाजुला विश्वराम ढेरे पडले उजव्या बाजूला ॥“येथे उपाय चालेना आपला” । राजा मोक्षपदाला गेला ॥ आनंदीबाईने बरा घात केला । अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥९॥

पदवर्धन महाराज बोले नानाफडनवीसाला “ होयाचे होऊन गेले शब्द देवाला ॥ याची नाशवंत काया येईना कामाला । धनी जाऊंद्या मोक्षपदाला ओंकारेश्वराला” ॥ नानाफडनवीस बोले पटवर्धनराजाला । “‘कसे जाळूं मी एकल्या नारायणाला ॥ वाघाचे संगतीने कसे मारावे परदेशाला” । पटवर्धनमहाराज बोले नानाफडनवीसाला ॥ “ ठक कोल्हा परदेशी येईना आपुल्या हाताला । वाघनख ह्याच्या बोटाला पांच हत्यारें डाभाला ॥ हजार माणूस दिमतीला । सात माणसें मारली खून चढला परदेशाला ॥ तो अधिक जखमी करील कईकांला । अफीणीचा खाणेवाला ॥ जरा ब्राह्मणी कावा हिकमत करतों मी ह्याला” । नानाफडनवीस जाऊन बसले तिसर्‍या मजल्याला ॥ मग कचेरी शोभे पटवर्धन राजाला । त्याने सुमेरशिंग परदेशी जवळ बोलाविला ॥ त्याचे शिरी हात ठेविला । “भले मारले नारायणाला ॥ राजपद मिळते तुला ॥ दोघे मिळून चल जाऊं आनंदीचे भेटीला । वाघनख ठेव धरणीला ॥ हत्यारें लाव जा आपुल्या ढेलजाला । माझा अबलक घोडा तुला बसायाला” । दोघे तिसर्‍या मजल्याला । त्यांनी चालला”॥ एक म्हणतां हजार गर्दी त्याला । नानाफडनवीस बोले सरदार लोकांला ॥ एके घायें मारूं नका परदेशाला । हातापाया पलिते लावा जरा जाळा त्याला ॥ एक म्हणतां हजार गर्दी त्याला । बोटीं बोटीं पाडले तुकडे परदेशी नाही आला वांटयाला ॥ आपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥१०॥

पटवर्धनमहाराज बोले नानाफडणवीसाला । “तीन रोज मुर्दा राहिला अझुनि कांही हेतू नाहीं पुरला” ॥ नानाफडनवीस बोले राघोबा दादाला । “आनंदीबाईंनें राज्याचा चाश केला ॥ सख्या पुतण्याचा वध केला । किल्ल्यावर चढवा आनंदीबाईला ॥ तिन वर्षाची जुन्या नाचणीची; भाकर हिला खायाला । पावशेर मीठ दळायाला ॥ पावशेर पाणी द्यावें तोलून प्यायाला । अनवाणी पाथीं धाडावी गडकिल्ल्याला” ॥ सुकुमार बाईंची काया फोड पायाला । त्या अर्ध्या किल्ल्याच्या वाटेनें बाईचा प्राण गेला ॥ घारी गिधाडाला सुकाळ झाला । नाहीं मोक्षपद मिळालें आनंदीबाईला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दक्ख०॥ ॥११॥

नानासाहेब बोले सर्वत्र लोकांला । “ हुकूस मागा गंगाबाईला ॥ धनी येऊंद्या मोक्षपदाला आंघोळीला” । गंगाबाई करी रोदन “हरपलें रत्न ॥ गाईनें वत्स गिळलं देवा धन्या । टाकोनि हत्ती घोडे गोधन ॥ नाहीं हौस पुरली गेले नारायण ॥(चाल)॥ मनीं हौस होती फार । पुणें शहर करीन गुलजार ॥ वाणी उदमी दुकानदार । नारायणपेठ तयार ॥ कोठे ऐकत होता फार । पुणें शहर करीन गुलजार ॥ वाणी उदमी दुकानदार । नारायणपेठ तयार ॥ कोठे ऐकत होता ईश्वर । काय राजवाडयामधिं पडला अंधार” ॥ आंग धरणीला टाकीती कुरळे केंसाला तोडिती “तुमचे संग निघतें सती ॥ दोघे मिळोन चला जाऊं ओंकारेश्वरापाशी” । आया मावल्या समजावती गंगुबाईंशी ॥ “नको रडूं बाई दुःख आहे सर्वत्रांशी” । नानाफडनवीस बोले गंगाबाईंशीं ॥ “सती निघायाचा हुकूम मिळेना बाई तुशीं । तुझ्या देहाची झडती दे मला नानाशीं” ॥ गंगाबाई बोले आयाबायांशी । “कशी मी निघों बाई सती पांचा महिन्यांची मी
गर्भवती” ॥ नानाफडनवीस समजावितो गंगूबाईंशीं ॥ नको रडूं बाई धोका बसेला तुझ्या गर्भाशीं ॥ कन्या का पुत्र होईल बाई तुशीं ॥ मी गुप्तराज्य चालवीन अक्कल आहे मज नानाशीं ॥ अशी समजाविली बहुत नानापरी । पत्रास बायका दिल्या संग गर्व्हारीणी ॥ काही वाणिणी ब्राह्मणी शिंपिणी सोनारणी ॥(चाल)॥ तुम्हीं राहावें पुरंदराला ॥ बाइ;चा गर्भ वाढवायाला सगळ्यामधिं एकच दाई त्यांना । गंगाबाई म्हणे नानाला ॥ धनी जाऊंद्या मोक्षपदाला । मग जाईन मी पुरंदराला वनवासाला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥दख्ख०॥ ॥१२॥

नानफडणवीसानें हुकूम केला धनी माडींतला काढिला । माणीकचौकांत आंघोळीला आटोकाट ब्राह्मण तिथें जमा झाला ॥ ते आले होते पर्वतीच्या दक्षणेला । मग मिळाले ब्राह्मण गणीत नाहीं त्याला ॥ नानाफडनवीस बोले उपाध्ये भटाला । दोन शकलें दोन बाजूला ॥ तुम्हीं काढा सोवळं बांधा राजश्रीला । पाणी ठेवलें आंघोळीला ॥ सगळा अलंकार चढविला । मोत्याचा तुरा लाविला ॥ दोन हुजरे दोन बाजूला । खासा मिरवायाला लागला ॥ मग गंगाबाई हांक मारी राजश्रीला । काय द्वारका सोडूनी कृष्ण निघाला । नळाने टाकिलं दमयंतीला । भोळा शंकर होता पार्वतीला ॥ हरिश्चंद्र होता तारामतीला । रामचंद्रानें मोकलीलें सीताबाईला ॥ असा वनवास श्रीभगवंतानें आमच्या शिरी दिला । मग पुकार कळली पुणेंशहराला । गर्भार बाया चालल्या पाहायाला । लेंकुरवाळ्या बाळें घेतलीं कडेला । जागा मिळेना उभें राहायाला ॥ महाराज ओंकारेश्वरावर नेला ॥(चाल)॥ राव काढले मध्यन्हरात्रीं दिधला अग्र । खंडीभर लांकडें आठ मण चंदन ॥ सरण दिलं चेतवून । चार वेढे हिंडली गाय पांचव्या वेढयानें गाईनें प्राण दिला सरणावर ॥ आले तुळाजी खितमतगार । चापाजी टिळेकर ॥ त्यांचे हुजरे मंडळी चाकर । चालूनि आले सरणावर ॥ आले तुळाजी खितमतगार । चापाजी टिळेकर ॥ त्यांचे हुजरे मंडळी चाकर । चालूनि आले सरणावर ॥ आम्ही सरकारचे चाकर । यांचे निमक खाल्लें फार । पुढें वांचूं नये (हाच) विचार । उडया टाकिती सरणावर ॥ जळून गेले चौघेजण । गाय गेली जळून खाशावर ॥ हीं ऋणानुबंधाचीं कामें । चौघें गेलीं वैकुंठीं चालून ॥ तेथून त्याचा न्याय केला कोणी ?। येथूनि वर्तमान सर्व झाले ॥ लहिरी मुकुंदा कवी बोले । झाला दादाचा बोलबाला नारायण मोक्षपदाला गेला ॥ अपघात करुनि मारला सख्या पुतण्याला ॥द्क्ख०॥ ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP