अप्रसिद्ध अभंग - अभंग ९८१ ते ९९०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
९८१
ईश्वर तो देव छाया ते शीव ।
प्रती छाया जीव तिन्ही भेद ॥१॥
एक तेंचि सूत्र तिन्हीसी मिळुनी ।
जाणती ते ज्ञानी आत्मविद ॥२॥
जें अनिर्वचनीय तें मूळ प्रकृति ।
ब्रह्मा ऐशी शक्ति तियेचि पैं ॥३॥
ब्रह्मा विष्णु रुद्र तियेचें पैं अंग ।
मुळी सृष्टि जग गोसाविणी ॥४॥
ब्रह्म तेंचि भास आभास जाहलें ।
ज्ञानदेव बोले निवृत्तिदास ॥५॥
अर्थ:-
सर्वाधिष्ठान परमात्मा जो मुख्य देव त्याची मायेत जी छाया म्हणजे तो शीव आणि अंतःकरणांत त्या शीवाचे जे प्रतिबिंब तो जीव अस हे तीन प्रकार आहेत? आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत. ते या तीन्ही वस्तु ब्रह्मरुपच शुद्ध परमात्म्याच्या आश्रित जी अनिर्वचनीय माया तीच मूळ प्रकृति असुन तिला ब्रह्माची शक्ती असेही म्हणतात. तिच्यापासून ब्रह्म, विष्णु शंकर अशी ईश्वरास नांवे आली. म्हणजे सृष्टीची मुख्य मालकीणही ब्रह्माश्रित माया आहे. ती माया आपल्यामध्ये प्रतिबिंब घेऊन जीव व शीव दाखविते. असे निवृतीदास ज्ञानदेव सांगतात.
९८२
जळवायुवेगें हालत सविता ।
मुळी तो तत्त्वता स्थिर असे ॥१॥
माया अविद्याभास शीव तो बिंबला ।
जीवरुप ठेला होऊनियां ॥२॥
सुख दुःख भोगी जिवाचिये सत्ते ।
देहीं क्रिया वर्ते स्वाभाविक ॥३॥
अज्ञानें करुनी भुलणे जिवाशी ।
मुळीं शद्ध अंशी शीव चोख ॥४॥
जिवाशी उद्धार करावया कीर ।
म्हणे ज्ञानेश्वर जाणिजे कीं ॥५॥
अर्थ:-
वायुच्या वेगाने पाणी हलल्यामुळे त्यातील सूर्य प्रतिबिंब हलल्यासारखे वाटते. पण आकाशस्थ सूर्य स्थीरच असतो. त्याप्रमाणे माया व अविद्या यांत आत्मा प्रतिबिंबित होऊन मायेत शीव व अविद्येत तो जीव होतो. व जीवाच्या सत्तेतून नाना प्रकारची सुखदुःखे भोगीत असतो. देहाच्या स्वाभाविक क्रियेतून शीव शुद्ध असतो.अज्ञानाने जीव भ्रमिष्ट होतो. आणि शीव शुद्ध असतो.जीवाला आपला खरा उद्धार करुन घ्यावयाचा असेल तर जीवांनी जीवेश्वर स्वरुप जाणून घेतले पाहिजे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८३
शून्य निरसुनी दोन्ही निरखिलें ।
तेथुनी देखिलें निजवस्तु ॥१॥
स्वप्रकाशमय आत्मा सदोदित ।
सर्वत्र भरीत एकमेव ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसुनी ।
झालो निरंजनी लीन आथी ॥३॥
अहं हे स्वरुप गिळूनियां पाहीं ।
देहींच ही स्वसंवेद्य ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठलाचा दास ।
झाला समरस परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
सत्ता स्फूरतिशून्य असलेले अहम्’आणि ‘मम’ यांचा निरास करुन निरखून पाहिले तेव्हा निजवस्तूला पाहिले. पुढे त्यांचा निरास झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप कळले, तेच तेजोमय ब्रह्म आत्मा’ या संज्ञेने प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भरलेले आहे. असे ज्ञान झाले. नंतर ध्याता ध्यान व ध्येयही त्रिपुटी निरसून मी आत्मरुप बनलो. अहंकार टाकून या देहातच मी विदेह स्वरुपाने स्वसंवेद्य आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचा दास जो मी, तो ब्रह्मस्वरुपासी समरस झालो. असे माऊली सांगतात.
९८४
वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती ।
येऊनी मिळती सिंधुमाजीं ॥१॥
ऊष्ण काळी न्यून आटोनियां गेली ।
नाहीं खंती केली सिंधु त्यांतें ॥२॥
सुखदुःखभोग भोगितां प्राचिनी ।
अखंड सज्जनीं शांती असे ॥३॥
नाहीं तया भूती सर्व ब्रह्मएक ।
अनुभऊनी सुख भोगिताती ॥४॥
तत्त्वमसी बोध आत्मानात्म भेदले ।
दृश्य विसरले भास आधीं ॥५॥
सज्ञान चेईलें अज्ञान निदेलें ।
विपरीत केलें सुपरीत ॥६॥
द्रव आणि स्थिर मुळीं एक नीर ।
झाला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥७॥
अर्थ:-
पावसाळ्यामध्ये नद्यां आपल्या बरोबर पुष्कळ पाणी घेऊन समद्राला मिळतात. उन्हाळयांत त्या आटून गेल्यामुळे पाणी थोडे आणतात म्हणून ज्या प्रमाणे समुद्राने त्याबद्धल कधी खेद केला नाही.त्याप्रमाणे सज्जनही अखंड शांती असल्यामुळे पूर्वकर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भोगाबद्दल सुखदुःख मानीत नाहीत त्याना त्याची खंती वाटत नाही. कारण आपण ब्रह्मरुप आहोत व तेच ब्रह्म सर्व भूतमात्रात भरलेले आहे. असा त्यांचा अनुभव असतो.तूं ब्रह्म आहेस या उपदेशाने झालेला बोध त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आत्मानात्मविचाराने अनात्म्याचा नाश होऊन गेलेला असतो. म्हणजे दृश्य पदार्थ सत्यत्वाने भासतच नाहीत. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची झोप जाऊन त्यांना ज्ञानाची जागृती आलेली असते. व बुध्दीचा विपरीतपणा जाऊन ते योग्य काम करु लागते.पाणी पातळ असो किंवा गारेप्रमाणे घट्ट असो. ते पाणीच असते. त्याप्रमाणे ब्रह्म कोणत्याही स्थितीत भासले तरी ते ब्रह्मच आहे. व तेच स्वयंब्रह्म मी झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८५
सर्वत्र परिपूर्ण सर्वांघटीं वसे ।
अभाग्यासी कैसें पडल आलें ॥१॥
मायेच्या भुलारें भुलले विश्वजन ।
जनी जनार्दन न देखती ॥२॥
आत्मा, आत्मीं भाविता देहीं ।
मायेच्या डोही बुडाले कैसें ॥३॥
बापरखुमादेविवर सगुणी न समाये ।
निर्गुणी दिसताहे जनवन ॥४॥
अर्थ:-
परमात्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला असून दुर्दैवी लोकांच्या दृष्टिवर पडळ आल्यामुळे त्यांना दिसत नाही. सर्व जग मायेच्या भुरळाने भुलून गेले आहे. कारण जगांत अधिष्ठानरुपाने परमात्माच आहे. हे त्यांना कळत नाही. या देहाच्या ठिकाणी कोणी आपला आत्मा म्हणजे पुरुष व आत्मी म्हणजे स्त्री समजतात आहेत. लोक मायारुप डोहांत कसे बुडाले पहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंग केवळ सगुण मूर्तिच नसून जन वन वगैरे सर्व जगांत अधिष्ठानरुपाने भरलेला प्रत्यक्ष निर्गुण परमात्मा दिसत आहे.
९८६
चोहटा मिष्टान्न जे काही सांडलें ।
सुनियासी झालें सुकाळ पैं ॥१॥
तैसा तो अभक्त वाढिन्नला जगीं ।
काळ तयालागीं ग्रासितसे ॥२॥
जे कां पारंगत श्रेष्ठ भागवत ।
चळचळां कापंत काळ तया ॥३॥
तयाचिया दृष्टी मोहरा न राहे ।
धाऊनियां जाय अज्ञान तीं ॥४॥
निवृत्तीदासाचा झालों निजदास ।
वंदिती तयास ब्रह्मादिक ॥५॥
अर्थ:-
चव्हाट्यावर टाकलेल्या मिष्टानाचा कुत्र्यांना सुकाळ होतो. त्याप्रमाणे जगामध्ये भगवद्भक्ती न करता वाढलेल्या पुरुषाचा ग्रास काळ करित असतो. भगवद्भक्ती पारंगत भगवद्भक्तांच्या पुढे काळ चळचळा कापत असतो. त्याच्या दृष्टीपुढे अज्ञान येऊच शकत नाही. ब्रह्मदेवादिक ज्या श्री गुरु निवृतीरायांना वंदन करतात. त्यांचा मी दास झालो असे माऊली सांगतात.
९८७
उत्तम ने परी उभविलें मनोहर ।
दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१ ॥
धृतेंवीण भोजन तांबूळेंवीण वदन ।
कंठेवीण गायन शोभा न पवे बापा ॥२॥
सुंदर आणि रमण जरी होय तरुणी ।
पुरुषावीण कामिनी शोभा न पवे बापा ॥३॥
दिधल्यावीण दाता श्रोत्यावीण वक्ता ।
वेदावीण पंडित शोभा न पवे बापा ॥४॥
ज्ञानेश्वर सांगे अनुभवीया अंगें ।
नुसता बोलें वागे शोभा न पवे बापा ॥५॥
अर्थ:-
उत्तम घरांत रात्री दिवा, जेवणांत तूप, तोंडात विडा गाणाऱ्याला आवाजाची सहाय्यता, तरुण स्त्रीला पति, दात्यास दान, वक्त्यास श्रोते, पंडितास वेदाध्ययन वगैरे गोष्टी नसतील तर त्या जशा शोभा देत नाही. निरूपयोगी ठरतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणाराही अनुभव नसल्यास व्यर्थ ठरतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८८
वांझेचिये पोरा तिघे झाले लेक ।
पारधीसी देख निघाले ते ॥१॥
उर्ण तंतु दोरा जाळे केले त्याचें ।
डोहीं मृगजळाचे धरिले मच्छ ॥२॥
नेले अंधापासीं मुके बोले त्याशी ।
दिले थोट्यापाशी ठेवणे तें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे केले अविद्येचें ।
संतासी तयाचे भय नाहीं ॥४॥
अर्थ:-
संसाराची भीती अज्ञानी लोकांना असते. संसार म्हणजे वांझेच्य परिवाराप्रमाणे आहे. याबद्दल माऊली एक मजेदार दृष्टांत देतात. एक वांझेला तीन नातू होते. ते माशांची शिकार करण्याकरिता निघाले. त्यांनी कोळयांच्या तोडांतून निघालेल्या दोऱ्याचे जाळे तयार केले.व ते घेऊन मृगजळाच्या डोहांतले मासे मारुन आंधळ्याच्या पुढे नेऊन ठेवले.त्या आंधळ्याशी एक मुका बोलत होता. ते मांसे थोट्या हाताच्या मनुष्याजवळ ठेवण्याकरिता म्हणून त्याने दिले. वरील दृष्टांता प्रमाणे. अविद्याकार्य संसाराची भीती अज्ञानी लोकांनाच असते. त्याची साधु संतांना भिती मुळीच नसते.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९८९
शत अश्वमेध घडले जयाला ।
तरी ब्रह्म त्याला अगम्य हें ॥१॥
सोमयागाची हे नाहीं ज्या गणना ।
तरी आत्मखुणा अलभ्य तें ॥२॥
लक्ष अनुष्ठान त्रिभुवनीं अन्नदान ।
तरी ब्रह्मज्ञान अतर्क् हें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान ।
पावले हे खुण संतसंगे ॥४॥
अर्थ:-
एखाद्याने अश्वमेध यज्ञासारखे शेकडों जरी यज्ञ केले. तरी त्याला ब्रह्म अगम्यच राहील. दुसऱ्या एखांद्याकडून अगणित सोमयाग झाले असले की त्याला आत्मप्राप्ती दुर्लभच असणार. लाखों अनुष्ठाने केली त्रिभुवनाला अन्नदान केले तरी ब्रह्मज्ञान होणे कठीण. यथार्थ ब्रह्मज्ञान होण्याला एक संताची संगतीच घडली पाहिजे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९०
पूर्वेचा हा भानु उगवेल पश्चिमे ।
परी भूमि जन्म नसे आम्हां ॥१॥
वांझेचा कुमर दिसेल प्रगट ।
न दिसे जरठ जड दष्टी ॥२॥
सिंधु येऊनियां मिळे सरितेमाजीं ।
परी आत्मकाजी क्रिया नको ॥३॥
पूर्ण ज्ञानदेवा प्राप्त आत्मरूप ।
त्रिविध हे ताप निरसती ॥४॥
अर्थ:-
पूर्वेचा सूर्य एखाद्यावेळेस पश्चिमेला उगवेल परंतु या कर्मभूमीत आम्हाला जन्म येणार नाही. कदाचित वाझेचा पुत्र प्रत्यक्ष दिसु शकेल पण वार्धक्य अथवा मंददृष्टी आम्हाला येणार नाही. कारण आम्हाला जन्म नसल्या मुळे आम्ही षड्भावविकाररहित आहोत. समुद्र गंगेस मिळणे ही अशक्य गोष्ट एखाद्या वेळेस शक्य होईल पण आत्म्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होऊ शकणार नाही.आम्हाला ब्रह्मस्वरूप पूर्ण प्राप्त झाल्यामुळे आमचे त्रिविध ताप नाहीसे झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP