९२१
स्वप्नींचे सुख मी पहावया गेलें ।
तंव स्वप्नी स्वप्न ठेलें येरा विस्मो गे माये ॥
काय सांगो निदसुरी कवळले संसारी ।
करिता येरझारी येणेंचि छंदे ॥
षुप्तींचे सुखजागृती जाणती ।
तरी परतोनी मागुती कासया येती ॥
परखुमादेविवरु विठ्ठलु राणे रावो ।
ऐसा जाणोनी तयाचा भावो ठाकियेला ॥
अर्थ:-
स्वप्नाचे सुख मी पाहावयास गेले तेंव्हा ते मलाच कळले. व इतरांना ते न समजल्यामुळे विस्मय वाटला. त्या स्वप्न संसारात मी गाढ निजले व जन्ममृत्युच्या येरझाऱ्यात अडकले. सुषुप्ती अवस्थेत त्या परमात्म सुखाचे भोगणे होताना ते जागृत अवस्थेत भौतिकात मिळणार नाही मग तिकडे परत कोण जाईल? माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हेच त्या नित्यसुखाचे उदार राजे आहेत अशा भावाने त्यांना मी जाणुन घेतले असे माऊली सांगतात.
९२२
वोल्हावले मन परतोनो पाही ।
तंव प्रपंच दिसे आया गेले ।
पिटुनी बाह्या वैराग्याची गुढी ।
उभऊनी म्हणे म्यां जिंकिलें ॥
पपर न दिसे शेखी ।
चरणी स्थिरावलें ।
जळतरंग लहरी ।
सरिता संगम जीवनीं ।
जीवन ऐक्य ठेलें रया ॥
तेंचि ब्रह्मज्ञान बोधिता पाहातां ।
सगुण निर्गुण आता भेदु नाहीं ।
वाउगाचि शिणसी विचारी मानसीं ।
वायां कल्पना करूनि दाही दिशी रया ॥
हणोनि तंतु ओतप्रोत होतु ।
तैसे विश्वजात ब्रह्मी असे ॥
तीं कल्पिसी भेद सगुण निर्गुण ।
तेणे कल्पने प्रत्यया नये ।
सर्वस्वे उदासीन होई तुं निश्चय ।
जाण एक सगुणींचि काय न लभे रया ॥
म्हां सगुण निर्गुण समान ।
नेणो जन्म जातक भान ।
दृश्य द्रष्टा दर्शन ।
त्रिपुटी नलगे ।
महावाक्यादि शब्द ।
तत्त्वमस्यादि बोध ।
हेही आम्हा सकळ वाउगें रया ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतितां ।
सुख सगुणींच जोड़े येणें अंगे रया ॥
अर्थ:-
समाधी ठिकाणी असलेले मन परत मागे पाहते तर तो प्रपंच दिसत नाही.मग तो दोन्ही बाह्या उभारुन वैराग्याची गुढी उभी करुन मी जिंकलो असे म्हणतो. मग सर्व प्रपंचच त्याला एकमय दिसतो त्याचे आपपरभाव निघुन जातात तो त्या सगुण चरणांवर मन स्थिर करतो जशा लहरी सागरात व नद्या संगमात एकत्व पावतात. मग तोच ब्रह्म ज्ञानाने बोधित झालेला असतो. सगुण निर्गुणाचे भेद मावळतात वेगळा विचार करुन शिणत नाही व वेगळी कल्पना त्याला दशदिशेला हिंडवत नाही.जसा कापडात तंतु ओतप्रोत असतो तसे ह्या विश्वात ब्रह्म आहे हे समजतो कल्पित भेद, सगुण निर्गुणात अडकत नाही. कल्पनेचा ही प्रत्यय करत नाही. तो प्रपंचाविषयी उदासिन होतो. हेच त्याला सगुण भक्तीत प्राप्ता का नाही होणार? दृष्य द्रष्टा द्रर्शत्व ही त्रिपुटी तेथे लोप पावते सगुण निर्गुण हे समान होतात. तत्वमस्यादी महावाक्याचा बोध उरत नाही. त्याची तिथे आम्हाला गरजच उरत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चिंतन केले तर सगुण निर्गुण तेच आहेत हे कळते व महासुख तेंव्हा प्राप्त होते असे माऊली सांगतात
९२३
आजी संसार सुफळ जाला गे माये ।
देखियले पाय विठोबाचे ॥
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळों वेळां व्हावा पांडुरंग ॥
बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा ।
निवृत्तीने तत्त्वतां सांगितले ॥
अर्थ:-
हे जीवरुप सखे त्या श्री विठ्ठलाचे चरण दिसले व माझा संसार सुफल झाला. तो पांडुरंग मला सतत व वेळोवेळा प्राप्त व्हावा असे वाटते. त्या माझ्या पित्याला व रखुमाईच्या पतीला कधी विसरु नकोस असे निवृत्तीनाथानी मला निक्षुन सांगितले आहे असे माऊली सांगतात.
९२४
गुणे सकुमार सावळे ।
दोंदील पहाती पां निराळें ।
केवीं वोलळे गे माये ।
सुख चैतन्याची उंथी ओतली ।
ब्रह्मांदिका न कळे ज्याची थोरवी ।
तो हा गोवळीयाच्या छंदे क्रीडतु ।
साजणी नवल विंदान न कळे माव रया ॥
डोळां बैसले हृदयीं स्थिरावले ।
मन नुठी तेथून कांही केल्या ॥धृ॥
सच्चिदापदीं ।
पदाते निर्भेदी ।
निजसुखाचे आनंदी ।
माये क्रीडतुसे ॥
तो हा डोळीया भीतरी ।
बाहिजु अभ्यंतरी ।
जोडे हा उपावो किजो रया ॥
गुणाचे पैं निर्गुण ।
गंभीर सदसुखाचे उदार ।
जे प्रकाशक थोर ।
सकळ योगाचे ॥
आनंदोनी पाहें पां साचे ।
मनी मनचि मुरोनी राहे तैसें ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलें ।
की मुसेमाजी अलंकार मुराले ।
श्रीगुरु निवृत्तीने दाविलें सुख रया ॥
अर्थ:-
तो सर्वगुण संपन्न, सावळा,पुष्ट सुकुमार गोकुळात कसा आला ते कळत नाही. ज्याची थोरवी ब्रह्मादिकांना कळत नाही जो सुख व चैतन्याचा ओढणी अंगावर घेऊन आला आहे. तो त्या गोवळ्यांबरोबर खेळत आहे हे नवल मला कळत नाही. ते रुप डोळियानी पाहिले व मनात घट्ट बसले त्या रुपावरुन मन परतत नाही. तो सच्चिदानंद स्वरुप असुन त्या पदाला छेद न देता. निजसुखाचा आनंद देत त्या गौळ्यांबरोबर तो खेळत आहे. तो डोळ्यात भरणारा व अंतर्मन व्यापणारा, त्याच्याशी अनुसंधान कसे करायचे हा विचार करावा. तो निर्गुण गंभीर असणारा सर्वसुखाचे आगर असणारा सर्वांना ज्ञानप्रकाश देणारा, योग्यांच्या मनात असतो. हे सर्व आनंदाने पहा तो मनात मुरोन गेला आहे जसे सोने अलंकारात मुरलेले असते. असे माझे पिता व रखुमाईचे पती यांचे सुख मला निवृत्तीनाथांनी दाखवले.असे माऊली सांगतात.
९२५
अरे मना तुं वाजंटा ।
सदा हिंडसी कर्मठा ।
वाया शिणसील रे फुकटा ।
विठ्ठल विनटा होय वेगी ॥
तुझेनि संगे नाडले बहु ।
जन्म भोगितां नित्य कोहुं ।
पूर्व विसरले ॐ हुं सोहुं ।
येणे जन्म बहुतांसी जाले ॥
सांडी सांडी हा खोटा चाळा ।
नित्य स्मरे रे गोपाळा ।
अढळ राहा रे तु जवळा ।
मेघशाम सावळ तुष्टेल ॥
न्याहाळितां परस्त्री अधिक पडसी असिपत्री ।
पाप वाढिन्नलें शास्त्री ।
जप वक्त्री रामकृष्ण ॥
बापरखमादेविवर ।
चिंती पां तुटे येरझार ।
स्थिर करीं वेगीं बिढार ।
चरणी थार विठ्ठलाचे ॥
अर्थ:-
अरे पोकळ कल्पना करणाच्या मना तुं नेहेमी कर्माच्या नादी लागत फुकट श्रम घेतोस त्यापेक्षा श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी रममाण हो. तुझ्या संगतीमुळे अनेक जीव संकटात पडून कोहं उच्चारण करून अनेक जन्म भोगीत बसले. कारण पूर्व म्हणजे गर्भावस्थेमध्ये‘ ‘ॐ हुं सोऽहं तो परमात्मा मी आहे याची विस्मृति झाल्यामुळे अनेकांना जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात. म्हणून कोऽहंतेचा चाळ सोडून दे. आणि गोपाळाचे नित्य स्मरण करून निश्चित हो. म्हणजे तुझ्या हदयां असलेला भगवान तुझ्यावर संतुष्ट होईल. शास्त्रामध्ये परस्त्रीला दुष्ट बुद्धीने पाहिले तर असीपत्रावर(नरक) पडण्यासारखे पाप घडते. म्हणून ते सर्व टाकून देऊन मुखाने रामकृष्ण नामाचा जप कर. व असा जप केला तर जन्म मृत्युच्या येरझारा चुकुन तुला माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चरणी नित्य वास मिळेलअसे माऊली म्हणतात.
९२६
चहुं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं ।
ब्रह्मरंध्री नि:संदेहीं निजवस्तू ॥
सांवळे सकुमार बिंदुचे अंतरी ।
अर्धमात्रे वरी विस्तारलें ॥
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट तिसरें ।
औठपीठादि सारे ब्रह्मांडासी ॥
स्थूल सूक्ष्म कारणी माया ।
महाकारणाच्या ठायां रीघ करा ॥
निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल ।
आकाश बुबुळीं पाहा असे ॥
अर्थ:-
या देहातच असून चारी अवस्थांचा खोटेपणा कसा ओळखावा? ब्रह्मरंधात ती ब्रह्मवस्तु कशी पाहावी. ब्रह्मरंधातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्थमात्रेत ती सांवळी सुकुमार मूर्ति आहे त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट व औटपीठ ही महाकारणातील स्थाने आहेत योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण या मायिक देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करता येतो. माझे व निवृत्तिरायांचे शब्दही वरिल अर्थाचेच आहेत. हे विचार करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९२७
औटपीठीं तेज गुजगुजीत ।
चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥
अवस्था हे चारी संयोगचि एक ।
शुन्य जें निःशंक आत्मज्योती ॥२॥
ज्ञानदेवा बाई निवृत्ति वदवितां ।
त्याचे चरणी हिताहित झालें ॥३॥
अर्थ:-
औटपीठाच्या ठिकाणी मोहक असे तेज असते. स्थूल,सूक्ष्म, कारण व महाकारण हे चारी देह त्याठिकाणी केवळ ज्ञेयरूप आहेत. त्याठिकाणी जागृती स्वप्न, सुषुप्ती व तूर्या या चार अवस्थांचा जणू काय संयोग होतो.त्या प्रमाणे चार देहाच्या पलीकड़े निःसंशय आत्मज्योतीच आहे. ज्ञानोबाराय हे स्त्री भूमिका पत्करून जे निवृत्तीराय मजकडून हे बोलवितात. त्याचे चरणीच अहिताचे हित झाले ग बाई. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९२८
नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी ।
शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥
जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण ।
तयावरी अज्ञान प्रवर्तते ॥२॥
चैतन्याची मुस त्यामाजी ओतली ।
अव्यक्त देखिली वस्तु तेथें ॥३॥
व तें मसुरे प्रमाण तया नांव महाकारण ।
गुरूमुखे खूण जाण बापा ॥४॥
ज्ञानदेव म्हण यापरतें जाण ।
नाहीं नाहीं आण निवृत्तीची ॥५॥
अर्थ:-
नवद्वारे असलेल्या या शरीरातच महाकारण स्थानातील औटपीठा शेजारी योग्यांना जेथे निलज्योती दिसते. अशी वोवरी म्हणजे महाकारण देह आहे. तसेच दुसरा अंगुष्ठमात्र आकाराचा जीवदशायुक्त लिंग देह आहे. त्याच शरीरात अज्ञानाची पुढिल कार्योत्पत्ति होते. वरिल वर्णन केलेल्या दोन्ही देहाच्याही आंत केवळ चैतन्याची बनलेली अशी जेथे ती वस्तु आहे. तिचा आकार मसुरे प्रमाणे असून त्यालाच पहिल्या चरणांत सांगीतल्याप्रमाणे महाकारण हे नाव आहे. त्याची ओळख गुरुमुखाने करुन घे. या परते जाणावयाचे असे काही नाही. असे निवृत्तीरायांची शपथ घेऊन मी सांगतो. असे माऊली सांगतात.
९२९
बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें ।
बोलती लक्षण त्रिविधमुक्तीं ॥१॥
नानामतें उत्छुंखळे म्हणोनी जासी विकळें ययापरी ॥२॥
म्हणोनी तया वाटा जाऊं नको अव्हाटा ।
या संकल्पा फुकटा येवों नेदी ॥३॥
परतोनियां पाहीं करी आठवण ।
तूं आहेसी कोण विचारी पां ॥४॥
विचारूनी निरूते संतसंगे पंथें ।
जन्ममृत्यू तूंतें न बाधी कांहीं ॥५॥
म्हणोनी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आटणी ।
वाउगाचि बांधोनि सिणसी का पां ॥६॥
ऐसें गंधधर्वपर की मृगजळाचें नीर ।
येथींचा विचार क्लेशी क्षीदक्षीण न करीं बापा ॥७॥
मतें या भ्रामकें वेश्याचेनी सुखें ।
पालट एके सोंगें जाली ॥८॥
क्षीरनिरा निवाड याचेनि नव्हे काही ।
निजगुरू पाही तो विरळा असे ॥९॥
म्हणोनी याच्या चरणी घालोनियां मिठी ।
निजपदी बैसवी शेवटीं तुज ॥१०॥
आता सांडी मांडी न करी निश्चय एक धरी ।
तूं आत्मा निर्विकारी सदोदित ॥११॥
म्हणोनि तूं सर्वगत सर्वसाक्षी सुखरूप ।
तेथें पंचभूती नातळेचि ॥१२॥
आतां न करी तूं अनुमान ज्ञान ना विज्ञान ।
स्वयें सिद्धी आपण होऊनी राहे ॥१३॥
हेचि पुढता पुढती सांगों तुज किती ।
श्रुती नेती नेती मौनावल्या ॥१४॥
निवत्तीदास म्हणे अनुभवी तो जाणे ।
येरां लाजिरवाणे टकमक ॥१५॥
अर्थ:-
कर्म,उपासना व ज्ञान यांचे प्रतिपादन करणारा जो वेद व शास्त्रे यांनी मोठ्या अट्टहासाने मुक्ती तीन प्रकारची आहे. असे सांगितले आहे. असे कोणी बरळतात. म्हणून उत्च्छंखल होऊन त्या नाना मतांच्या मागनि वेड्यासारखा जाशील या आडमागनि जाण्याचा तुमच्या मनांत संकल्प सुद्धा येऊ देऊ नको.जर अंतर्मुख दृष्टी करून तुझे स्वरूप काय, तूं कोण आहेस, याचा विचार कर.असा नीट विचार करून संतांच्या संगतीने जर वागशील तर जन्ममृत्यूची बाधा तुला होणार नाही. म्हणून यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अष्टांग योगाची साधने करून, प्राणाला कोडून धरून, तूं आपणाला का शीण करून घेतोस. हे जगत गंधर्वनगर अथवा मृगजळाच्या पाण्याप्रमाणे मानून, या लोकांच्या दुःखाने विनाकारण क्षीण होऊ नको. वेश्येच्या सुखाप्रमाणे भ्रामक सुख उत्पत्र करणाऱ्या या मतांनी पुष्कळाची फसगत झाली. याच्या योगाने दुधपाण्याचा म्हणजे चांगल्या वाईटाचा निवाडा होणार नाही. आत्मसुखाचा बोध करणारा गुरू विरळाच असतो. म्हणून अशा गुरूच्या पायी मिठी मार म्हणजे ते तला निजस्वरूपांवर बसवतील. विधि निषेधाचा विचार न करता तूं एक निश्चय कर तूं निर्विकार नित्य आत्मरूप आहेस. आत्मरूप तूं असल्यामुळे तूंच सर्वव्यापी, सर्वसाक्षी व सुखरूप असून पंचमहाभूताहून वेगळा आहेस.अशी तुझी खात्री होईल. आता तूं ज्ञानरूपी किंवा नाहीस याबद्दल अनुमान करीत बसू नकोस. तू स्वयंसिद्ध आत्माच अशा जाणीवेने राहा. या गोष्टी पुन्हा पुन्हा किती सांगाव्या या ब्रह्माचे वर्णन श्रुतींनाही करता आले नाही.त्यानीही ‘नेति नेति’ असे म्हणून मौन धारण केले, या गोष्टी अनुभवी पुरूषालाच कळतील लज्जायमान होऊन आश्चर्यान टकमक पाहातच राहातील. असे निवृत्तिदास माऊली सांगतात.
९३०
तैचि ज्ञानियासी होईजेल मोक्ष ।
ज्ञानेश्वर लक्ष लक्षितसे ॥१॥
पहाण्याशी मूळ विचारुनि पहा ।
मग सुखी रहा निरंजनीं ॥२॥
इवलुसा प्रपंच परी तो बद्ध कीं ।
सज्ञानी विवेकी न शिवती ॥३॥
पयाचिये कुंभीं पडे बिंदुविष ।
चतुर तयास न घेपती ॥४॥
षड्रस पक्वानें वाढिली खापरी ।
श्वान शिवे श्रोत्री स्पर्शीतीना ॥५॥
घालुनियां कडें शून्याशी बांधितां ।
त्याचिया गणिता न करवे ॥६॥
सर्वही उपाधि त्यागुनि आकार ।
राहे ज्ञानेश्वर निजरूपीं ॥७॥
अर्थ:-
जेव्हां लक्षावर लक्ष असेल तेव्हांच ज्ञानाने ज्ञानीपुरुषास मोक्षप्राप्ती होईल, तद्वत माऊलीचे लक्ष ध्येयापाशी आहे. ज्या मूळ गोष्टीकडे पहावयाचे त्याच गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष द्या. म्हणजे निर्लेप जे ब्रह्मस्वरुप त्याचे सुख अनुभवाल. प्रपंच अल्पसा वाटतो, पण तोच बंधाला कारण आहे. म्हणून जाणते व विचारी पुरुष त्यापासून दूर राहातात.दूधांत विषाचा थेंब पडला तर चतुर पुरुष ते दुध घेत नाही. तसेच षड्रस पक्वात्र खापरांत वाढले व त्याला कुत्र्याने स्पर्श केला तर याज्ञिक त्याला स्पर्श करीत नाही.शून्याची कल्पना यावी म्हणून ‘O’आकार दाखवितात म्हणून तेवढ्यावरुन शून्याचे माप करता येईल काय? सर्व आकार व उपाधिचा बाध करुन आम्ही आत्मस्वरुपच झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.