अप्रसिद्ध अभंग - अभंग ९५१ ते ९६०
श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.
९५१
अज्ञाना स्वरूप निज विचारितां ।
संदेह तत्वता घालिताती ॥१॥
कैंचि गा विश्रांति दुर्जनाच्या संगी ।
दाटोनियां भोगी नरकदुःख ॥२॥
विषयाकारणे जाहले गुरू शिष्य ।
अनुभव अभ्यास स्वप्नीं नाहीं ॥३॥
शब्दची करूनी बोलताती ब्रह्म ।
अंतरीचें वर्म नेणतीच ॥४॥
तयाची संगती त्यजी ज्ञानेश्वर ।
जाहला निर्विकार संतसंगें ॥५॥
अर्थ:-
अज्ञानी गुरूला शिष्याने आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचारले असता तो त्याला घोटाळ्यांतच घालतो. दुर्जनाच्या संगतीने सुख होणार कोठे? अशा संगत धरून शिष्य नरकादि अनेक दुःखे मात्र भोगतो. त्यांचा तो गुरूशिष्यपणा विषयोपभोगाकरिता असतो.त्यांच्या जवळ ब्रह्मचिंतनादि अभ्यास स्वप्नातही नसतो. केवळ शब्दाने ब्रह्माचा उच्चार करितात. पण तात्त्विक ब्रह्मज्ञानाचे वर्म माहित नसते.अशा भोंदूची संगती सोडून केवळ सत्संगतीने आम्ही निर्विकार बनलो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५२
सेवितां वारूणी देहभास लपे ।
बडबडची लपे शब्द नाना ॥१॥
ब्रह्मरस सुख जें कांहीं प्राशिती ।
तैसेची हे होती अनुभवें ॥२॥
धाल्याचे ढेकर निघती होतां सुख ।
तेवींची आत्मिक जाणिजेसु ॥३॥
सूक्ष्मी भासे जे कां तेंचि स्थूळी घडे ।
पाहतां निवाडे भेद नाहीं ॥४॥
गुरूकृपायोगें ज्ञानेश्वर चूळ ।
भरियेली समूळ न त्यागितां ॥५॥
अर्थ:-
दारु प्यायलेला देहभान विसरुन जाऊन त्यांची अर्थहिन बडबड थांबते. त्याप्रमाणे ब्रह्मरस प्यायलेले लोकही देहभान विसरुन त्यांच्या वृत्तित सहज मौन दिसते. जेवण झालेल्या मनुष्याला तृप्तीचा ढेकर येऊन जसा तो सुखी होतो. त्या प्रमाणे आत्मानुभवी पुरूष सुखी होतो. ब्रह्मस्वरूपाचा विचार केला तर जसे सुक्ष्मात सूक्ष्म असून, स्थूळातही स्थूळ आहे. स्थूळ सूक्ष्म हा उपाधीचा भेद ब्रह्मस्वरूपाचा नाही. मी गुरूकृपेच्या योगाने ब्रह्मरसाची चूळ न टाकता सर्व गिळली. असे निवृत्तीदास माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५३
विक्षेपतां नाना उठती कल्पना ।
पासूनियां जाणा शूद्ध जावें ॥१॥
तरीच तें ज्ञान हृदयीं ठसावें ।
नातरी आघवें व्यर्थ होय ॥२॥
अमृताचें कुंभ सायासें जोडलें ।
त्यामाजी घातले विष जैसें ॥३॥
मन हे विटाळ अखंड चंचळ ।
न राहे चपळ एके ठायीं ॥४॥
ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा होतां ।
लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥५॥
अर्थ:-
चित्तांत अनेक प्रकारचे विक्षेप कल्पना उत्पन्न होत असतात ते सर्व टाकून देऊन चित्त शुद्ध करून घेतले पाहिजे. तरच जीवब्रह्मैक्यज्ञान अंतःकरणांत ठसावेल, नाही तर सर्व फुकट आहे. जसे कष्ट करून मिळविलेल्या अमृताने भरलेल्या घागरीत विषमिश्रण केले असता ते अमृत निरुपयोगी होते. एके ठिकाणी न राहणारे अत्यंत चपळ, चंचल असलेले अशुद्ध मन त्याचा शुद्ध परमात्म पाशा सबंध होणे विटाळ आहे. ते ब्रह्मसुख गुरूकृपा झाली म्हणजे सहज प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९५४
कर्मत्याग करितां पावे अधोगति ।
भोगितां ही मुक्ति पाविजेना ॥१॥ सांडणे मांडणे दोन्हीही त्यागणे ।
प्राचिनी वर्तणें निर्विकल्पें ॥२॥ सुख दुःख भोग या दोन्ही भोगितां ।
न धरिजे अहंता सर्वथैव ॥३॥ देह जीव शीव सर्वांसही साक्षी ।
ज्ञानदेव लक्षी परब्रह्म ॥४॥
अर्थ:-
आपल्या विहीत कर्माचा त्याग केला तर अधोगती प्राप्त होते. फलाशा धरून जर विहीत कर्माचरण केले तर स्वर्गादिकांची प्राप्ती होते. पण त्यापासून मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून मी कर्म करीन किंवा कर्माचा त्याग करीन अशा दोन्ही तऱ्हेचा अभिमान टाकून प्रारब्धाने प्राप्त होणारे सुख दुःख भोग मुकाट्याने भोगावेत त्यांत अहंता मात्र मुळीच ठेऊ नये. कारणदेह जीव किंवा शीव या सर्वांचे साक्षीरूप जे ब्रह्म त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९५५
सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित ।
माया ते कल्पित तद्विवर्त ॥१॥
शीव पूर्ण जीव भक्त अविद्यक ।
होय पूर्ण चोख आत्मज्ञानें ॥२॥
प्रपंच कल्पिक प्रकृति उपाधि ।
ईश्वरतत्त्व बुद्धि पारमार्था ॥३॥
ब्रह्म अगोचर म्हणे ज्ञानेश्वर ।
नाथिला संसार मूळी नाही ॥४॥
अर्थ:-
वेदांत सिद्धांताचे हे सार आहे की आत्मा नित्य असून, माया कल्पित आहे. व जगत त्याचा विवर्त म्हणजे मिथ्या आहे. शिव म्हणजे परिपूर्ण ईश्वर व त्याचा भक्त जीव हे दोन्ही अविद्या कार्य आहेत म्हणजे तिच्या स्थिती आधीन यांची स्थिती आहे. हे शुद्ध आत्मज्ञानाने स्पष्ट समजते. या कल्पित प्रपंचाची उपाधि प्रकृति होय व याच उपाधिमुळे परमात्म्याला ईश्वरत्व येते. व त्याच्याच प्रसादाने बुद्धि परमार्थाला योग्य होते. ब्रह्म हे ज्ञानाचा विषय नसून हे भासमान पण नष्ट होणारे जगत कधी झालेच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५६
सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख ।
एकी ते अनेक अनेकीं एक ॥१॥
देव तेथें भक्त भक्तापाशीं देव ।
जाणा एकमेव भेद नाहीं ॥२॥
तरूतळीं छाया छाया तेथें तरू ।
शिष्याठायीं गुरू गुरू शिष्य ॥३॥
कण तेचि भूमि भूमिरूपी कण ।
भासा ठायीं गुण गुणी भास ॥४॥
गुरूकृपे खूण वस्तु साक्षात्कार ।
भेदला ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अर्थ:-
एक परमात्माच विवर्त रूपाने जगत झाल्यामुळे एकात अनेक म्हणणे योग्य होय त्याप्रमाणे अनेक रूपाने भासणारे जगत् परमात्मरूप असल्यामुळे अनेकांत एक हे ही म्हणणे योग्य होईल जेथे सुख आहे तेथे दुःख आहेच. तसेच दुःख आहे तेथे सुख ही आहे. अविज्ञेने द्वैत मानल्यामुळे देव वेगळा मानला तर त्याचे उपासक भक्त तेथे असणारच.त्यांच्यात भेद मुळीच नसतो. झाडामुळे सावली पडत असल्यामुळे झाडा पाशी सावली व सावली पाशी झाड असणारच.शिष्यामुळे गुरुला गुरुपणा येत असल्यामुळे जिथे गुरु तेथे शिष्य असणारच.कण म्हणजे लक्षणेने पृथ्वीचे परमाणु, कणाचीच भूमी बनते. त्रिगुणात्मक माये मुळेच जगउध्दार होत असल्याने भासाचे ठिकाणी गुण व तसेच उलटे असते. अशारितीने संपुर्ण जगत व्यापून असणारी वस्तु मी आहे असे वर्म मला गुरुंच्या कृपेने अनुभवता आले. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५७
ब्रह्मा विष्णु रूद्र सुजन स्थिति अंत ।
करिती महत जगीं तिन्हीं ॥१॥
सत्त्व रज तम गुण धरूनियां ।
उपाधि आपुलिया करिताती ॥२॥
सर्वही मायिक दिसते रचना ।
आशा कल्पना इयेपरी ॥३॥
दृश्यातीत परब्रह्म परात्पर ।
ओळखी ज्ञानेश्वर गुरूकृपा ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मा, विष्णु, शंकर या तीन देवता अनुक्रमे सत्त्व, रज, व तम या त्रिगुण प्रधान उपाधि घेऊन जगत उत्पत्ति, पालन व संहार ही आपआपली महतकार्ये करतात. तरी त्याच्या स्थितीला अंत आहेच. ज्याप्रमाणे आशेच्या निरनिराळ्या कल्पना मिथ्या ठरतात. त्या प्रमाणे ब्रह्मांडाचीच रचना जर माया निर्मित आहे. तर ब्रह्मा, विष्णु, याच्या स्थितीला अंत आहे. यांत नवल काय. श्रीगुरूच्या कृपेने दृश्य जगताला अधिष्ठान असणारे जे परात्पर परब्रह्म ते मी जाणले. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५८
कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली ।
तेचि सामावली दृष्टी ब्रह्मीं ॥१॥
सिंधुमाजी जैसें सैंधव मिळाले ।
तेवी मन झालें ब्रह्मींलीन ॥२॥
वृक्ष बीजामाजीं जैसा सामावला ।
बिंदु कां आटला महींत जेवीं ॥३॥
जीव तोच शीव होऊनियां ठेला ।
शब्द तो मुराला निशब्दांमाजीं ॥४॥
आतां मी तूं कैंचा सर्व एकाकार ।
जाहला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥५॥
अर्थ:-
अंतःकरणरूपी कळीमध्ये प्रकाशमान होणारी शुद्ध ज्योती विचार दृष्टीने ब्रह्मस्वरूपांत सामावली. म्हणजे जीवात्मा व ब्रह्म दोन्ही एक रूप झाले. ज्याप्रमाणे पाण्यांत मीठ एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे मन ब्रह्मस्वरूपांत लीन झाले. ज्या प्रमाणे वृक्ष त्याच्या बीजांत लोपतो अथवा पाण्याचा थेंब जमीनीत आटून जाते त्याप्रमाणे जीवपणा शीवा मध्ये त्यांत, मिळुन गेल्यामुळे निःशब्द परमात्याच्या ठिकाणी शब्द जिरुन जातो. अशी स्थिती झाल्यानंतर मी व तूं हा भेद राहात नाही. त्यामुळे ब्रह्मच मी झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९५९
पुण्याशी जोडितां पापचि जोडिजे ।
तेंणेंचि पाविजे अधोगती ॥१॥
सोमयाग श्रेष्ठ करितां पावन ।
करावें हनन पशु तेथें ॥२॥
तेचि ते या दोष तयालागी जन्म ।
भोगिजेती कर्म पशु योनी ॥३॥
पुण्य तेथें पाप समचि वर्तती ।
रात्रंदिन आथी जियेपरी ॥४॥
पापपुण्य दोन्ही त्यागुनी निराळा ।
जाहला स्वलीला ज्ञानदेव ॥५॥
अर्थ:-
पुण्य संपादन करण्याकरिता यज्ञादिक करून तेथे पशु बळी दिल्यामुळे पाप होते. व त्या पापामुळे अधोगतीला जावे लागते. सर्वश्रेष्ठ सोमयाग करून मनुष्य पावन होतो. पण तो करण्याकरिता पशु मारावा लागतो. व त्यामुळे कर्त्याला दोष लागून त्या पापांच्या भोगा करिता पुढे पशुजन्म घ्यावा लागतो. म्हणून जसी रात्र आणि दिवस ही एकामागून एक सारखी आहेत. त्याप्रमाणे पुण्याबरोबर पापही असतेच. आम्ही पुण्य व पाप सोडून सहज स्वस्वरूपी मौजेने राहिलो आहोत.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९६०
केवळ निराभास या जगीं जाहला ।
नाहीं आन उरला भास कांहीं ॥१॥
संकल्प विकल्प असती मनाचे ।
छेदियले साचे भवभ्रम ॥२॥
वासनेचे मूळ टाकिलें खणोनी ।
जिवित्व गिळूनी शिवरूप ॥३॥
काम क्रोध लोभ दडले ते सहज ।
केले अति चोज सांगवेना ॥४॥
ज्ञानेश्वर नाम हेही गिळूनियां ।
मूळ अंती मायातीत शुद्ध ॥५॥
अर्थ:-
आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याचा प्रकाशक दुसरा कोणीही नाही. म्हणून त्याला निराभास म्हणतात. हे जगत, निराभास आत्मरूपच झाले त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही भासण्याला राहिले नाही. जगत म्हणजे काय विचाराल तर ते मनकल्पित आहे. ते आत्मज्ञानाने जर दूर केल्यास संसार भ्रमाचा निरास होईल. मग जीवाचा जीवपणा जाऊन तो जीव शिवरूप होतो. असे झाल्यामुळे काम क्रोध, लोभ यांचा निरास होऊन जातो. माझी कायारूप भ्रांती नाहीसी झाल्यामुळे माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वर हे नांव देखील उरले नाही म्हणजे मी शुद्ध स्वरूप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
N/A
References : N/A
Last Updated : September 09, 2026

TOP