मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌कलम

सूरह - अल्‌कलम

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५२)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

नूऽऽन. शपथ आहे लेखणीची आणि त्याची ज्याला लिहिणारे लिहीत आहेत, तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने वेडे नाहीत. आणि खचितच तुमच्यासाठी असा मोबदला आहे जो कदापि संपणार नाही. आणि नि:संशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात. लवकरच तुम्हीही पाहाल आणि तेही पाहतील, की तुमच्यापैकी कोण वेडेपणात गुरफटलेला आहे. तुमचा पालनकर्ता त्या लोकांनासुद्धा चांगलेच जाणतो जे त्याच्या मार्गापासून भटकलेले आहेत, आणि तोच त्यांनाही चांगल्या प्रकारे जाणतो जे सरळ मार्गावर आहेत. म्हणून तुम्ही या खोटे ठरविणार्‍यांच्या दबावात मुळीच येऊ नका. हे तर इच्छितात की थोडे तुम्ही नमते घेतले तर यांनीसुद्धा नमते घ्यावे. मुळीच दबू नका, एखाद्या अशा इसमाशी जो पुष्कळ शपथा घेणारा तुच्छ मनुष्य आहे, टोमणे मारतो, चहाडया लावीत फिरतो, भल्या गोष्टीपासून रोखतो, अत्याचार आणि आगळिकीत मर्यादेपलीकडे जाणारा आहे, अत्यंत दुष्कर्मी आहे, छळवादी आहे आणि या सर्व दोषांसह कमअस्सल आहे, यामुळे की तो खूप संपत्ती व संतती बाळगतो. जेव्हा आमचे संकेत त्याला ऐकविले जातात तेव्हा तो म्हणतो, या तर पूर्वकालीन कथा आहेत. लवकरच आम्ही याच्या नाकावर डाग देऊ. (१-१६)

आम्ही या (मक्कावासी) ना त्याचप्रकारे कसोटीत घातले आहे ज्याप्रकारे एका बागेल्या मालकांना कसोटीत घातले होते, जेव्हा त्यांनी शपथ घेतली की सकाळी सकाळी निश्चितच आपल्या बागेची फळे तोडू आणि ते कोणताही अपवाद ठेवीत नव्हेत. रात्री ते निद्राधीन पडले होते की तुमच्या पालनकर्त्याकडून एक अरिष्ट त्या बागेवर फेकले गेले आणि त्याची दशा अशीझाली जणू कापलेले पीक असावे. सकाळी त्या लोकांनी एकमेकांना हाक दिली की जर फळे तोडावयाची असतील तर सकाळीसकाळीच आपल्याशेताकडे निघा. त्याप्रमाणे ते निघाले आणि आपापसात हळूहळू बोलत होते, की आज कोणीही गरीब तुमच्याकडे बागेत येता कामा नये. ते काहीही न देण्याचा निर्णय घेऊन सकाळीसकाळी अशा प्रकारे तेथे गेले जणू ते (फले तोडण्यास) समर्थ आहेत. परंतु जेव्हा बाग पाहिली तेव्हा सांगू लागले, “आम्ही वाट चुकलो आहोत, नव्हे, तर आम्ही पारखे झालो.” त्यांच्यातील जो सर्वात चांगला मनुष्य होता, तो म्हणाला, “मी तुम्हाला सांगितले नव्हेत की तुम्ही पावित्र्यगान का करीत नाही?” ते उद्‌गारले, “पवित्र आहे आमचा पालनकर्ता, खरोखरच आम्ही अपराधी होतो.” मग त्यांच्यापैकी प्रत्येकजण दुसर्‍याची निर्भर्त्सना करू लागला. शेवटी ते म्हणाले. “खेद वाटतो आमच्या दशेवर, नि:संशय आम्ही शिरजोर बनलो होतो. दूर नव्हे की आमच्या पालनकर्त्याने आम्हाला बदल्यात याच्यापेक्षा उत्तम बाग प्रदान करील. आम्ही आमच्या पालनकत्याकडे रुजू होतो.” असा असतो प्रकोप आणि परलोकाचा प्रकोप यापेक्षाही मोठा आहे, या लोकांनी हे जाणले असते. (१७-३३)

निश्चितच ईशपरायण लोकांसाठी त्यांच्या पालनकर्त्यापाशी ऐश्वर्यसंपन्न स्वर्ग आहेत, काय आम्ही आज्ञाधारकांची दशा अपराध्यांसारखी करावी? तुम्हा लोकांना काय झाले आहे, तुम्ही कसे हुकूम लावता? काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे ज्यात तुम्ही असे वाचता की तुमच्यासाठी निश्चितच तेथे तेच तेच काही आहे जे तुम्ही आपल्यासाठी पसंत करता? अथवा मग काय तुमच्यासाठी पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत आमच्यावर करार-वचन सिद्ध आहे की तुम्हाला तेच काही मिळेल ज्याचा हुकूम तुम्ही लावला?
यांना विचारा, तुमच्यापैकी कोण याबद्दल जामीन आहे? अथवा मग त्यांनी ठरविलेले काही भागीदार आहेत (ज्यांनी याची हमी घेतली असेल)? अशी गोष्ट असेल तर अणावे यांनी आपल्या त्या भागीदारांना जर हे खरे आहेत. (३४-४१)

ज्या दिवशी कठीण वेळ येऊन ठेपेल आणि लोकांना नतमस्तक होण्यास बोलविले जाईल तर हे लोक नतमस्तक होऊ शकणार नाहीत, यांच्या नजरा खाली असतील, मानहानी यांच्यावर पसरलेली असेल. हे जेव्हा सुदृढ अवस्थेत होते त्यावेळी यांना नतमस्तक होण्यस बोलविले जात असे (आणि हे इन्कार करीत असत.) (४२-४३)

म्हणून हे पैगंबर (स.), तुम्ही या वाणीला खोटे ठरविणार्‍यांचा मामला माझ्यावर सोडून द्या. आम्ही अशा पद्धतीने यांना क्रमाक्रमाने विनाशाकडे नेऊ की यांना कळणारसुद्धा नाही. मी यांची दोरी लांबवीत आहे. माझी चाल मोठी जबरदस्त आहे. (४४-४५)

काय तुम्ही यांच्याकडून काही मोबदला मागत आहात की हे या भूर्दंडाच्या ओझ्याखाली दबून जात आहेत? काय यांच्याजवळ परोक्षाचे ज्ञान आहे ज्याला हे लिहीत आहेत? बरे, आपल्या पालनकर्त्याचा निर्णय सादर होईपर्यंत धैर्य राखा आणि मासेवाल्या (यूनुस (अ.)) सारखे बनू नका. जेव्हा त्याने हाक दिली होती आणि तो दु:खाने भरलेला होता. जर त्याच्या पालनकर्त्याची मेहरबानी त्याला लाभली नसती तरतो वाळीतावस्थेत खडकाळ मैदानात टाकला गेला असता. सरतेशेवटी त्याच्या पालनकर्त्याने त्याला निवडून घेतले आणि त्याला सदाचारी दासांमध्ये सामील केले. (४६-५०)

जेव्हा हे अश्रद्धावंत लोक उपदेशवाणी (पवित्र कुरआन) ऐकतात तेव्हा तुम्हाला अशा दृष्टीने पाहतात जणू काय ते तुमचे पाय उखडून टाकतील. आणि म्हणतात की हा निश्चितच वेडा आहे, वास्तविकत: हा तर सर्व जगवासियांसाठी एक उपदेश आहे. (५१-५२)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP