मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ६१ वा

पांडवप्रताप - अध्याय ६१ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ संपलें बभ्रुवाहनाचें आख्यान ॥ पुढें चालिला श्यामकर्ण ॥ सारथी रथीं इंदिरारमण ॥ सच्चिदानंदतनु जो ॥१॥
संगें अपार सैन्य घेऊन ॥ निघता जाहला बभ्रुवाहन ॥ हंसध्वज नीलध्वज मदन ॥ स्वभारेंशीं चालती ॥२॥
अनुशाल्व यौवनाश्व सुवेग ॥ कर्णनंदन मेघवर्ण जाती सवेग ॥ तों दुसरा श्यामकर्ण सुरंग ॥ तिकडूनि येतां देखिला ॥३॥
मयूरध्वज राजा प्रसिद्ध ॥ जेणें केले सहा अश्वमेध ॥ सातवा याग आरंभिला सुबद्ध ॥ घोडा सोडिला पृथ्वावरी ॥४॥
ताम्रध्वज त्याचा सुत ॥ साठ अक्षौहिणी दळासहित ॥ पृथ्वीचे राजे जिंकीत ॥ त्याचे मार्गे पातला ॥५॥
दोन्ही घोडे मिळाले ॥ ताम्रध्वजें दृष्टीं देखिले ॥ पार्थाचा घोडा त्या वेळे ॥ धरिला मयूरध्वजसुतें ॥६॥
पत्र तत्काळ वाचिलें ॥ मग कुलध्वज प्रधान बोले ॥ ज्याणें पूर्वीं कौरव आटिले ॥ अकरा अक्षौहिणी दळासहित ॥७॥
तो आला आहे वीर पार्थ ॥ सवें रक्षी क्षीराब्धिजामात ॥ यावरी ताम्रध्वज बोलत ॥ उत्तम बहुत जाहलें ॥८॥
सहा अश्वमेध जाहले पूर्ण ॥ आतां हे दोन्ही नेऊं श्यामकर्ण ॥ एवं जाहले आठ यज्ञ ॥ त्यावरी श्रीकृष्ण भेटला ॥९॥
धन्य आमुचें भाग्य ॥ यागासी आला श्रीरंग ॥ इतुकेनि सर्व सांग ॥ जन्मसार्थक जाहलें ॥१०॥
पार्थासी म्हणे मनमोहन ॥ पुढें युद्ध दिसे बहु कठिण ॥ एवढा वीर दारुण बभ्रुवाहन ॥ करभार देत मयूरध्वजा ॥११॥
सत्त्वशील वीर अद्भुत ॥ मयूरध्वज परमभक्त ॥ नर्मदतटीं याग करीत ॥ रत्नपुरनगरीं जो ॥१२॥
तों युद्ध मांडिलें अद्भुत ॥ ताम्रध्वज श्रीहरीस बोलत ॥ मी तुज देखोनि निर्भयचित्त ॥ युद्ध अत्यंत करीन आतां ॥१३॥
ताम्रध्वजें चाप ओढून ॥ पार्थावरी टाकिले सत्तर बाण ॥ ऋषिसंख्या मार्गण ॥ सात्यकीवरी सोडिले ॥१४॥
कृतवर्म्यावरी आठ बाण ॥ शतबाणीं विंधिला मदन ॥ श्रीकृष्णावरी तीन बाण ॥ टाकिता जाहला ताम्रध्वज ॥१५॥
यावरी बाणजामात ॥ पुढें धांवला उखानाथ ॥ बाणजाळ घालीत ॥ ताम्रध्वजावरी ॥ तेधवां ॥१६॥
वीस बाणीं हृदय भेदीत ॥ दळ संहारीत मदनसुत ॥ पितामह वैकुंठनाथ ॥ विलोकी पार्थही कौतुकें ॥१७॥
रणभूमि माजली बहुत ॥ रक्तयुक्त निम्नगा जाती वाहात ॥ अनिरुद्ध वीर अद्भुत ॥ दळ पाडिलें तीन अक्षौहिणी ॥१८॥
बाणामागें बाण सोडीत ॥ ताम्रध्वज केला विरथ ॥ मग तो मयूरध्वजाचा सुत ॥ कृतान्तवत क्षोभला ॥१९॥
कालदंडाऐसे बाण ॥ सोडिता जाहला तीक्ष्ण ॥ मग तो मन्मथाचा नंदन ॥ मूर्च्छित पाडिला ताम्रध्वजें ॥२०॥
पांडवांसी प्रिय अत्यंत ॥ पुढें धांवला वीर वृषकेत ॥ ताम्रध्वजाचा रथ ॥ चूर्ण केला तीक्ष्ण शरीं ॥२१॥
दुजे रथीं तो बैसत ॥ तोही चूर्ण केला क्षणांत ॥ तिसरे रथीं आरुढत ॥ केला निःपात तयाचा ॥२२॥
एकामागें एक जाण ॥ तीनशें रथ केले चूर्ण ॥ ताम्रध्वज जर्जर करुन ॥ सेना अपार मारिली ॥२३॥
यावरी ताम्रध्वज अवीट वीर ॥ करीत उठिला संहार ॥ बाणघायें कर्णकुमार ॥ मूर्च्छित केला समरांगणीं ॥२४॥
सहस्त्रबाणीं ते वेळां ॥ सात्यकी मूर्च्छित पाडिला ॥ कृतवर्माही पहुडविला ॥ समरभूमीस ते काळीं ॥२५॥
यौवनाश्व सुवेग वीर ॥ मदन नीलध्वज प्रवीर ॥ ब्रभ्रुवाहनें युद्ध केलें थोर ॥ तोही ताम्रध्वजें ॥२६॥
सेना जाहली भयभीत ॥ म्हणतीं हा क्षोभला कृतान्त ॥ कित्येक लटकेचि भूमीं पहुडत ॥ मूर्च्चागतांसारिखें ॥२७॥
बाण तयाचे परम तीव्र ॥ चपलेऐसे अनिवार ॥ कोणी उभा न राहे समोर ॥ सेना सर्वत्र पडियेली ॥२८॥
एक उरले कृष्णार्जुन ॥ पार्थासी म्हणे इंदिरारमण ॥ महावीर पुण्यपरायण ॥ तुझी सेना संहारिली ॥२९॥
शूरत्वाचा अभिमान ॥ यापुढें सकळांचा क्षीण ॥ सर्वांचे गर्व हरुन ॥ समरीं शयन करविलें ॥३०॥
यावरी तो महावीर पार्थ ॥ बाणधारा त्यावरी वर्षत ॥ ताम्रध्वजाचा छेदूनि रथ ॥ सारथी मारिला तत्काळ ॥३१॥
ताम्रध्वजाचे सहस्त्र रथ ॥ चूर्ण करी सुभद्रानाथ ॥ मग ताम्रध्वजें पुरुषार्थ ॥ अत्यद्भुत प्रकटविला ॥३२॥
ताम्रध्वज म्हणे वैकुंठनाथा ॥ आतां तूं रक्षीं आपुल्या पार्था ॥ पहा माझिया पुरुषार्था ॥ धरुनि नेईन दोघांतें ॥३३॥
श्येनपक्षी जैसा धांवत ॥ तैसा उडाला अकस्मात ॥ ब्रह्मांडनायक द्वारकनाथ ॥ उचलूनि घेत खांद्यावरी ॥३४॥
अर्जुन धरिला चरणीं ॥ दोघे घेऊनि उडाला गगनीं ॥ अर्जुनासी म्हणे कैवल्यदानी ॥ पहा पुरुषार्थ ययाचा ॥३५॥
मग यावरी तो कमलावर ॥ ताम्रद्ज्वजाचे हृदयी सत्वर ॥ वज्रप्राय लत्ताप्रहार ॥ देत जाहला तेधवां ॥३६॥
ताम्रध्वजासी आली गिरगिरी ॥ तिघेही पडले पृथ्वीवरी ॥ पार्थ आणि कंसारी ॥ मूर्च्छा अत्यंत पावले ॥३७॥
गेलेचि काय नेणों प्राण ॥ तेवीं विकळ पडले दोघे जण ॥ ताम्रध्वजें मूर्च्छा सांवरुन ॥ आपुले रथीं आरुढला ॥३८॥
जयवाद्यें वाजवून ॥ घेऊनि चालिला दोन्ही श्यामकर्ण ॥ रत्नपुत्रासी जाऊन ॥ पितयालागीं भेटला ॥३९॥
सांगे समूळ वृत्तान्त ॥ जिंकिले पार्थ आणि वैकुंठनाथ ॥ पाडूनियां मूर्च्छागत ॥ सेना सर्व आटिली ॥४०॥
बभ्रुवाहन मदन अनिरुद्ध जाण ॥ मेघवर्ण घटोत्कचनंदन ॥ हंसध्वज नीलध्वज संपूर्ण ॥ सेनेसहित मारिले ॥४१॥
आणिले दोन्ही श्यामकर्ण ॥ अष्ट यज्ञ तुमचे जाहले संपूर्ण ॥ मयूरध्वज दीक्षित होऊन ॥ ब्राह्मणीं वेष्टित बैसलासे ॥४२॥
समस्त वृत्तान्त ऐकोन ॥ मयूरध्वज गहिंवरला पूर्ण ॥ ताम्रध्वजासी बोले वचन ॥ मज आतां वदन दावूं नको ॥४३॥
परब्रह्म केवळ वैकुंठनाथ ॥ जो कमलोद्भवजनक समर्थ ॥ सनकादिकांचें आराध्यदैवत ॥ सार निगमागमांचें ॥४४॥
महाराज कृष्णार्जुन ॥ प्रत्यक्ष ते नरनारायण ॥ त्यांवरी शस्त्र धरुन ॥ कां तूं युद्ध केलें रे ॥४५॥
घालूनिया लोटांगण ॥ आणितासी येथें प्रार्थून ॥ तरी मी होतों सुखसंपन्न ॥ म्हणतों धन्य तुजलागीं ॥४६॥
अरे तूं हिंसक प्रसिद्ध ॥ अरे कैसा केला लिंगभेद ॥ श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मानंद ॥ त्यावरी शस्त्र टाकिलें तुवां ॥४७॥
घरासी येतां चिंतामणी ॥ अभाग्यें दिधला भिरकावूनी ॥ कल्पवृक्ष उपडोनी ॥ आंगणी जैसा टाकिला ॥४८॥
कामधेनु येतां सत्वर ॥ अभाग्यें मारिले काष्ठप्रहार ॥ तैसा तुवां केला प्रकार ॥ हरीवरी शर घातले ॥४९॥
अमृत भाग्यें प्राप्त जाहलें ॥ तेणें कैसें संमार्जन केलें ॥ तैसें परब्रह्म घरा आलें ॥ अपमानिलें कैसें तुवां ॥५०॥
अरे तूं विष्णुद्रोही घातक ॥ जाईं रे परता न दाखवीं मुख ॥ सहा अश्वमेध केले देख ॥ द्वारकानायक आला पैं ॥५१॥
सातवा यज्ञ करावयास ॥ येत होता जगन्निवास ॥ द्यावया मज निर्दोष यश ॥ स्वामी माझा दयाळु ॥५२॥
कंठ दाटला सद्बदित ॥ विमलांबुधारा नेत्रीं वाहत ॥ मयूरध्वज चिंताक्रांत ॥ अशनप्राशन न घेचि ॥५३॥
ऐसा राव आरंबळत ॥ इकडे काय जाहलें सेनेंत ॥ उठोनियां वैकुंठनाथ ॥ सावध करीत पार्थासी ॥५४॥
उभा रे ताम्रध्वजा म्हणून ॥ हांक देत उठिला अर्जुन ॥ हांसोनि बोले जनार्दन ॥ गेला घेऊन अश्व दोन्ही ॥५५॥
सैन्य तुझें मारिलें समस्त ॥ उरलों आम्ही दोघे जीवंत ॥ एवढा तुझा बलपुरुषार्थ ॥ क्षीण केला तेणें पहा ॥५६॥
तुजहूनि शतगुणें देख थोर ॥ बळकट ताम्रध्वज राजेंद्र ॥ मग बोले पार्थ वीर ॥ आतां यज्ञ राहिला कीं ॥५७॥
सर्वकर्ता तूं नारायण ॥ आमुचा कायसा अभिमान ॥ तुवांचि मांडिला यज्ञ ॥ कर्ता पूर्ण तुझा तूं ॥५८॥
पांडवांचा पूर्ण कैवारी ॥ हें ब्रीद गाजे त्रिभुवनभरी ॥ तें तूं सांभाळीं कैटभारी ॥ पूतनारे कंसांतका ॥५९॥
यावरी बोले मदनतात ॥ मयूरध्वजाची भक्ति अद्बुत ॥ सत्त्वशील सदा शांत ॥ तुज दावितों चाल आतां ॥६०॥
हरि जाहला वृद्ध ब्राह्मण ॥ शिष्य सहजचि अर्जुन ॥ पूर्वस्वरुपें पालटून ॥ रत्नपुरासमीप आले ॥६१॥
त्या नगरींची पाहतां रचना ॥ विस्मय वाटे अर्जुना ॥ म्हणे हस्तिनापुर नारायणा ॥ ओंवाळावें यावरुनि ॥६२॥
आधि व्याधि दुःख दरिद्र अवर्षण ॥ वृद्धत्व दुष्काळ दुर्मरण ॥ नगरीं नाहीं अणुप्रमाण ॥ प्रजाजन सुखरुप ॥६३॥
नगरांत प्रवेशले दोघे जण ॥ लोकीं देखोनि दिव्य ब्राह्मण ॥ समस्त करिती साष्टांग नमन ॥ नाहीं अभिमान कोणासी ॥६४॥
कृतांतासी शिक्षा लाविती ॥ ऐसे वीर नगरीं हिंडती ॥ पार्थासी म्हणे श्रीपती ॥ पाहें वीर समर्थ हे ॥६५॥
आधींच परब्रह्म साक्षात ॥ त्याहीवरी द्विजरुप शोभत ॥ द्वादशटिळे विराजित ॥ यज्ञोपवीत झळकतसे ॥६६॥
नेसला क्षीरोदक सुढाळ ॥ शाटी पांघुरला शुभ्र निर्मळ ॥ कणी कुंडलांचा झळाल ॥ गंडस्थळीं बिंबलासे ॥६७॥
केश सांवरुनि दिधली ग्रंथी ॥ पायीं पादुका विराजती ॥ पुढें शिष्य सुभद्रापती ॥ काठी धरुनि जातसे ॥६८॥
यज्ञमंडपांत आले दोघे जण ॥ तों चार लक्ष बैसले ब्राह्मण ॥ एकदांचि अवघे उठोन ॥ सामोरे येती विप्रांते ॥६९॥
कुंडांतूनि तिन्ही वन्ही ॥ मूर्तिमंत उभे ठाकोनी ॥ आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी ॥ सामोरे जाती विप्रांते ॥७०॥
मयूरध्वज धांवोन ॥ घालिता जाहला लोटांगण ॥ परमसन्मानें प्रीतीकरुन ॥ सिंहासनीं बैसविले ॥७१॥
रत्नाभिषेकेंकरुन ॥ केलें षोडशोपचारें पूजन ॥ मयूरध्वज कर जोडून ॥ उभा पुढें राहातसे ॥७२॥
ब्राह्मण धाकती समस्त ॥ वृद्ध वेदोनारायण साक्षात ॥ जरी आम्हांसी कांहीं पुसेल येथ ॥ तरी प्रत्युत्तर न देववे ॥७३॥
मयूरध्वज मुख विलोकीत ॥ तों ब्राह्मण जाहला सद्नदित ॥ स्फुंदस्फुंदोनि तेव्हां रडत ॥ नयनीं वाहत अश्रुधारा ॥७४॥
सभा गजबजली समस्त ॥ हा ब्राह्मण सत्त्वशील बहुत ॥ कोण्या पतितें दुःख प्राप्त ॥ केलें यासी कळेना ॥७५॥
मयूरध्वज तेव्हां बोलत ॥ स्वामी काय सांगावा वृत्तान्त ॥ तुज दुःख दिलें त्यासी बहुत ॥ दंड आतां करीन मी ॥७६॥
तुजवरुनि प्राण ॥ मी आपुला ओंवाळून ॥ तूं सांगासी तें करीन ॥ आतांचि देईन मागसी तें ॥७७॥
विप्र स्फुंद ते अवसरीं ॥ बोलतां शब्द न फुट बाहेरी ॥ म्हणे राजेंद्रा अवधारीं ॥ वृत्तान्त आतां जाहला तो ॥७८॥
मी द्वारकेचा ब्राह्मण ॥ सांगातें पुत्र शिष्य घेऊन ॥ तुवां केले सहा यज्ञ ॥ म्हणोनि कीर्ति ऐकिली ॥७९॥
सातव्या यज्ञालागून ॥ येत होतों त्वरेंकरुन ॥ तुझ्या नगरासमीप जाण ॥ दाट उद्यानें लागलीं ॥८०॥
त्यांतूनि अकस्मात पंचानन ॥ आला आम्हांवरी धांवोन ॥ एकुलता एक जाण ॥ पुत्र माझा धरियेला ॥८१॥
वेदशास्त्रीं परम निपुण ॥ वेदविधि नाम त्यालागून ॥ ऐसा पुत्र प्रवीण ॥ भूमंडळीं नसे कोणातें ॥८२॥
कोमल बाळ धरुन ॥ गेला झाडांमाजी घेऊन ॥ ऐसें बोलतां ब्राह्मण ॥ पुढती कंठ दाटला ॥८३॥
कोणासी दुःख सांगों आतां ॥ मग राजेंद्र जाहला बोलता ॥ सेना सिद्ध करा रे तत्त्वतां ॥ त्वरें चला वना जाऊं ॥८४॥
पृथ्वीवरील पंचानन ॥ धरुनि आतां जिवें मारीन ॥ राव सिद्ध जाहला जाणोन ॥ म्हणे ब्राह्मण ऐकें राया ॥८५॥
मी त्यासी बोलिलों वचन ॥ भक्षीं मज सोडीं नंदन ॥ मग तो बोलिला पंचानन ॥ तुझें कठिण शरीर नलगे ॥८६॥
तुवां व्रतें तपें केलीं फार ॥ न भक्षीं तुझें जरठ शरीर ॥ आतां काकुळती येसी थोर ॥ तरी विचार ऐकें एक ॥८७॥
तुझा पुत्र मी रक्षितों क्षणभरी ॥ तूं मयूरध्वजापाशीं जा झडकारी ॥ त्याचा देह दर्वतूनि ये अवसरीं ॥ उजवें अंग आणीं कां ॥८८॥
त्याचें सुकुमार शरीर गौरवर्ण ॥ भक्षितां मी तृप्त होईन ॥ मग तुझा पुत्र सोडीन ॥ हा निश्चय जाण पां ॥८९॥
मज एवढाचि राया सुत ॥ वेदशास्त्रीं पारंगत ॥ त्याचें लग्न मांडिलें निश्चित ॥ वैशाखशुद्ध द्वादशीसी ॥९०॥
देसील कांहीं आम्हांसी धन ॥ म्हणोनि येत होतों धांवोन ॥ ऐसें मयूरध्वज ऐकोन ॥ काय वचन बोलत ॥९१॥
आयुष्य धन यौवन ॥ हें मरीचिजलवत क्षणिक जाण ॥ राज्यांतीं नरक पूर्ण ॥ भोगावे कीं न सुटती ॥९२॥
क्षणिक शरीर हें अशाश्वत ॥ आयुष्याचें न कळे गणित ॥ ब्राह्मणकाजीं वेंचितां यथार्थ ॥ सार्थक याचें जाहलें ॥९३॥
सिद्ध जाहला राजेंद्र ॥ कर्वत आणविला सत्वर ॥ मग बोलत काय विप्र ॥ ऐकें एक सांगतों ॥९४॥
तुझी स्त्री आणि सुत ॥ यांजवळी देईं कर्वत ॥ तुझ्या डोळां आले अश्रुपात ॥ किंवा रडत देखिला कोणी ॥९५॥
नगरांतील मनुष्यमात्र ॥ कोणीं न करावा हाहाकार ॥ कर्वतितां रायाचें शरीर ॥ गीत गावें स्त्रीपुत्रांनी ॥९६॥
यांत कांहीं पडतां जाण ॥ मी जाईन तत्काळ उठोन ॥ मग रायें स्त्री आणि नंदन ॥ बरव्यापरी बोधिलीं ॥९७॥
तुम्हांसी पाळिलें आजिवरी देख ॥ आतां माझें करा सार्थक ॥ कदा न करावा कोणीं शोक ॥ सर्व लोकां विनविलें ॥९८॥
स्त्रान सत्त्वधीर ॥ नित्यकर्म सारुनि परिकर ॥ दानें देऊनि अपार ॥ उभा ठाकला तेधवां ॥९९॥
शिरीं घातला कर्वत ॥ हरिनामावली मुखीं उच्चारीत ॥ कृष्ण गोविंद अच्युत ॥ नामप्रबंध उच्चारी ॥१००॥
स्त्रीपुत्रीं धरिला कर्वत ॥ राव समस्तांसी कर जोडीत ॥ म्हणे ब्राह्मणांसी विपरीत ॥ सहसा कोणी बोलूं नका ॥१०१॥
खणखणां कर्वत वाजत ॥ राव नामावली मुखीं उच्चारीत ॥ हे द्वारकनाथ मदनतात ॥ द्रौपदीलज्जारक्षका ॥१०२॥
गजेंद्राद्धारका जगज्जीवना ॥ पांडवपालका जगन्मोहना ॥ तुझें अक्षय्यपद जनार्दना ॥ मज नेई तेथें आतां ॥१०३॥
ब्राह्मण म्हणे मूकवत ॥ कां कर्वतितां तुम्ही येथ ॥ राव स्त्रीपुत्रां खुणावीत ॥ गा कांहीं येईल तैसें ॥१०४॥
मग म्हणती राजेंद्रा ॥ मयूरध्वजा अत्युदारा ॥ शरीरसंपत्ति देऊनि विप्रा ॥ कीर्ति केली अद्भुत ॥१०५॥
सकल पृथ्वीचे भूपाल येऊनी ॥ राजेंद्रा लागती तुझे चरणीं ॥ तुजऐसा उदार त्रिभुवनीं ॥ दुजा नाहीं भूभुज ॥१०६॥
ब्राह्मणांच्या पंक्ती बैसवून ॥ कोण देईल इच्छाभोजन ॥ सकल धरामरां सतेज पूर्ण ॥ कर्ता तुजविण नसेचि ॥१०७॥
नगरांत आकांत होत थोर ॥ कैंचा आला रे येथें विप्र ॥ न मागे संपत्ति राज्य साचार ॥ राजशरीर छेदवितो ॥१०८॥
सकल देव विमानीं ॥ सिद्ध जाहले पुष्पें घेऊनी ॥ म्हणती धन्य उपमा त्रिभुवनी ॥ मयूरध्वजा तुज नसे ॥१०९॥
एक म्हणती देवपदें सकळी ॥ यासी आतां देईल वनमाळी ॥ तों आश्चर्य वर्तलें ते काळीं ॥ तेंचि सकळीं परिसिजे ॥११०॥
रायाचा जो वामनेत्र ॥ तेथूनि चालिली अश्रुधार ॥ ब्राह्मण चालिला सत्वर ॥ म्हणे रडतो नेघें मी आतां ॥१११॥
ब्राह्मण जातां देखोनी ॥ स्त्रीपुत्र विनविती रायालागूनी ॥ विप्र जातो तुज टाकूनी ॥ काय आम्हीं करावें ॥११२॥
राव ब्राह्मणासी ते वेळीं ॥ करें खूनावूनि बोलावी जवळी ॥ येरु पातला तत्काळीं ॥ म्हणे सांग कां अश्रु आले ॥११३॥
मयूरध्वज बोले वचन ॥ माझें सव्यांग आनंदघन ॥ तुम्ही जाल तें घेऊन ॥ सार्थक जाहलें तयाचें ॥११४॥
वामनेत्रीं अश्रु आले ॥ कीं आपुलें सार्थक नाहीं जाहलें ॥ तें दुःख आठवतें ये वेळे ॥ खेदें रडतों याकरितां ॥११५॥
ऐसें ऐकतां जगज्जीवन ॥ दिव्य चतुर्भुज रुप प्रकटवून ॥ किरीटकुंडलें मंडित वदन ॥ आकर्णनयन विराजती ॥११६॥
कर्वत काढूनि ते समयीं ॥ मयूरध्वज धरिला हृदयीं ॥ क्षत न दिसे सहसाही ॥ दिव्यरुप जाहलें ॥११७॥
जाहला एकचि जयजयकार ॥ पुष्पें वर्षती सुरवर ॥ लागले वाद्यांचे गजर ॥ लोक धांवती पहावया ॥११८॥
अर्जुनें स्वरुप प्रकट केलें ॥ मयूरध्वजें आलिंगिलें ॥ ते काळीं जें सुख जाहलें ॥ त्यासी दृष्टांत नसेचि ॥११९॥
कृष्णार्जुनांचें पूजन ॥ रायें केलें प्रीतीकरुन ॥ करुनियां अपार स्तवन ॥ धरी चरण वारंवार ॥१२०॥
मग मयूरध्वजसहित श्रीकृष्ण ॥ संगें सप्त अक्षौहिणी दळ घेऊन ॥ जेथें पडलें घोर रण ॥ तेथें आले तेधवां ॥१२१॥
अद्भुत केलें गोपाळें ॥ दृष्टीनें विलोकितां सर्व दळें ॥ प्राणिमात्र जीवविले ॥ गर्जो लागले सकळ वीर ॥१२२॥
ताम्रध्वजाचें दळ ॥ जीवविलें श्रीरंगे तत्काळ ॥ गर्जत वाद्यांचा कल्लोळ ॥ रत्नपुरा प्रवेशले ॥१२३॥
राहवूनि सप्त दिवस ॥ रायें पूजिला जगन्निवास ॥ अपार संपत्ति रत्नें विशेष ॥ भगवंतास समर्पिलीं ॥१२४॥
मयूरध्वजासी म्हणे जगज्जीवन ॥ तुम्ही आम्ही साह्य होऊन ॥ धर्मयाग संपादून ॥ सिद्धीस नेऊं तत्त्वतां ॥१२५॥
मयूरध्वज म्हणे कृपानिधी ॥ सातवा याग न पावता सिद्धी ॥ अंतर पडेल वेदविधी ॥ कैसा येऊं सांगातें ॥१२६॥
हरि म्हणे सहा याग केले ॥ तेणें तुवां कोणासी तोषविलें ॥ आतां सप्त यागांचें श्रेय सगळें ॥ मदर्पण करीं कां ॥१२७॥
अनंत यागांचें फळ ॥ तुझ्या हातासी आलें निर्मळ ॥ तुष्टलों मी घननीळ ॥ चाल धर्मासी भेटावया ॥१२८॥
मयूरध्वज बोले वचन ॥ तुझें वाक्य मज प्रमाण ॥ सोडिले दोन्ही श्यामकर्ण ॥ साह्य आपण चालिला ॥१२९॥
पूर्ण ब्रह्मानंद अभंग ॥ सर्वस्वें साह्य श्रीरंग ॥ श्रीधरवरद निःसंग ॥ न पडे व्यंग कोठेंही ॥१३०॥
दोन्ही श्यामकर्ण पुढें जात ॥ सकलरायांसहित पार्थ ॥ पाठीसी जातसे रक्षीत ॥ नृप समस्त समागमें ॥१३१॥
यावरी सारस्वतपुरीं ॥ वीरवर्मा राज्य करी ॥ त्याच्या सेवकीं झडकरी ॥ वारु धरुनि नेले तेव्हां ॥१३२॥
ज्याच्या राज्यांत बहुत नीती ॥ जांवई ज्याचा संयमिनीपती ॥ पुण्यपरायण नृपती ॥ नाहीं वस्ती पापाची ॥१३३॥
परस्त्री देखतां निर्बळ ॥ परधन पाहतां अंध केवळ ॥ परनिंदेविषयीं सकळ ॥ मुके होती जाण पां ॥१३४॥
आधि व्याधि दरिद्र कांहीं ॥ ज्याचे ग्रामी नसे कालत्रयीं ॥ संयमिनी ज्याची कन्या पाहीं ॥ ते दिधली यमातें ॥१३५॥
सर्वही वीर मरती ॥ शेवटीं यमालयाप्रति जाती ॥ म्हणोनि ते यमस्त्री निश्चितीं ॥ जाहली ऐसें विचारुनि ॥१३६॥
सर्व पतिव्रता म्हणविती ॥ अग्नीस शेवटीं शरीर देती ॥ तरी ते नव्हे पतिव्रता सती ॥ वैश्वानरासी मिळता पैं ॥१३७॥
ऐसें जाणोनि संयमिनी ॥ जाहली वैवस्वताची पत्नी ॥ ते पतिवतांमाजी शिरोमणी ॥ भ्रतारसेवे सादर ॥१३८॥
वीरवर्म्याची नगरी शुद्ध ॥ धर्म नांदत चतुष्पाद ॥ घरोघरीं ब्रह्मानंद ॥ नाहीं विषम कोठेंही ॥१३९॥
असो पंचपुत्रांसहित ॥ वीरवर्मा बाहेर निघत ॥ ज्याच्या दळासी नाहीं अंत ॥ युद्ध अद्भुत मांडलें ॥१४०॥
श्वशुराचें संकट जाणोन ॥ यम पातला स्वर्गाहून ॥ नाना व्याधि रोग घेऊन ॥ साह्यतेस पातला ॥१४१॥
तीन शत शूळ मूर्तिमंत ॥ ऐशीं वातरोग आले धांवत ॥ पातले चौदा सन्निपात ॥ अष्टादश कुष्ठ वेगळाले ॥१४२॥
अष्टोत्तरशत गुल्मरोग ॥ चौर्‍यायशीं धनुर्वात आले सवेग ॥ क्षयरोग सेनापति अभंग ॥ सर्वांमाजी श्रेष्ठ तो ॥१४३॥
अष्टोत्तरशत रोग मुख्य सप्त ॥ त्यांचे भेद मग आहेत बहुत ॥ वर्णितां न लगेचि अंत ॥ कासया ग्रंथ वाढवूं ॥१४४॥
वीरवर्म्याचें अद्भुत बळ ॥ साह्यतेसी पातलें यमाचें दळ ॥ युद्ध मांडिलें तुंबळ ॥ पांडवदळ संहारिलें ॥१४५॥
पार्थरथीं कमलाकांत ॥ वीरवर्मा त्याप्रति बोलत ॥ श्रीकृष्णा तूं रक्षीं पार्थ ॥ पाहें प्रताप माझा आतां ॥१४६॥
साठ बाण घालून ॥ विकळ केला वीर अर्जुन ॥ पांच बाणीं संपूर्ण ॥ पंचशरजनक विंधिला ॥१४७॥
सावध होऊनि पार्थ ॥ त्यावरी बाणजाळ घालीत ॥ मग म्हणे रमानाथ ॥ पार्था वीर नाटोपे हा ॥१४८॥
तुवां मारिले कर्ण जयद्रथ ॥ तैसें नव्हे हें येथ ॥ राजे सर्व केले मूर्च्छित ॥ साह्य तुज आले जे ॥१४९॥
तरी हनुमंता याचा रथ बांधावा ॥ नेऊनि समुद्रांत टाकावा ॥ वायुसुत म्हणे केशवा ॥ अशोकवन नव्हे हें ॥१५०॥
महाराज हा विष्णुभक्त ॥ तव सामर्थ्ये बलवंत ॥ मग वीरवर्म्याचा रथ ॥ अंजनीपुत्रें उचलिला ॥१५१॥
वीरवर्म्यानें पार्थस्यंदन ॥ एका हस्तें घेतला उचलून ॥ अलातचक्राऐसा भोंवंडून ॥ समुद्रावरी पातले ॥१५२॥
वीरवर्मा म्हणे हनुमंता ॥ तूं मज टाकिसी जेथें आतां ॥ पार्थ आणि कृष्णनाथा ॥ यांसही तेथेंचि बुडवीन मी ॥१५३॥
एका हातें धरिला रथ ॥ एका हस्तें ताडिला हनुमंत ॥ वायुसुत लत्ताप्रहार देत ॥ परी तो कदा न सोडी ॥१५४॥
वीरवर्म्याचे हृदयीं ॥ कृष्णें लाथ दिधली ते समयीं ॥ मग अवघेचि पडले महीं ॥ युद्ध तेथेंही करी तो ॥१५५॥
श्रीरंग म्हणे अर्जुना ॥ हा वीर कदा आटोपेना ॥ येथें कोणाचें बळ चालेना ॥ सहस्त्र वर्षे भिडतां पैं ॥१५६॥
कृष्ण म्हणे रे वीरवर्म्या ॥ तुवां केली आजियुद्धाची सीमा ॥ तुज देखोनी मज प्रेमा ॥ उचंबळत भेटाक्या ॥१५७॥
ऐसें ऐकतां वचन ॥ वीरवर्मा घाली लोटांगण ॥ कृष्णार्जुनां प्रीतीकरुन ॥ भेटला तो रणपंडित ॥१५८॥
आपुलें सर्व राज्य धन ॥ तत्काळ केलें कृष्णार्पण ॥ शास्त्रसंख्या दिवस राहवून ॥ आदर केला बहुतचि ॥१५९॥
भांदारें समर्पिलीं सर्व ॥ एकवीस सहस्त्र दिधले अश्व ॥ यमें येऊनि वंदिला माधव ॥ गेला स्वस्थाना त्यावरी ॥१६०॥
श्रीकृष्णवचनेंकरुन ॥ वीरवर्मा दळ घेऊन ॥ साह्य चालिला संपूर्ण ॥ तनु मन धन घेऊनियां ॥१६१॥
पुढें नंदडोहो गहन ॥ दोन्ही घोडे गेले त्यावरुन ॥ भिजों दिला नाहीं चरण ॥ पवनासमान गमन त्यांचें ॥१६२॥
मग नौका आणूनि बहुत ॥ पार्थ दळ उतरीत ॥ पुढें कुंतलपुर देखत ॥ नगर चंद्रहास्याचें ॥१६३॥
नगराजवळीं येतां जाण ॥ अदृश्य जाहले श्यामकर्ण ॥ दळभार तेथें थोकोन ॥ तटस्वरुप पाहातसे ॥१६४॥
म्हणती वारु नेले कोणीं येथ ॥ हा न कळेचि काय वृत्तान्त ॥ वेडावला वीर पार्थ ॥ बुद्धि कांहीं सुचेना ॥१६५॥
तों अकस्मात नारद मुनी ॥ उभा ठाकला येथें येऊनी ॥ जो दिव्यगंधीं दिव्यसुमनीं ॥ सुरगणीं अर्चिला ॥१६६॥
देखोनि विष्णुनाभनंदन ॥ नमिती स्तविती कृष्णार्जुन ॥ सकळ राजे येऊन ॥ मस्तक ठेविती पायांवरी ॥१६७॥
अर्जुन बोले वचन ॥ येथें गुप्त जाहले श्यामकर्ण ॥ हांसला तेव्हां ब्रह्मनंदन ॥ म्हणे वर्तमान ऐकें आतां ॥१६८॥
चंद्रहास्यें श्यामकर्ण नेले ॥ तें तुम्हांसी कांहींच नाहीं कळलें ॥ यावरी सुभद्रावरें पुशिलें ॥ चंद्रहास्य हा कोण असे ॥१६९॥
नारद म्हणे ऐकें इतिहास ॥ चंद्रहास्य महाराज पुण्यपुरुष ॥ ज्याचें चरित्र ऐकतां निर्दोष ॥ प्रप्त यश होय पै ॥१७०॥
अवघे राजे आणि कृष्णार्जुन ॥ कथा ऐकती सावधान ॥ चंद्रहास्याचें चरित्र गहन ॥ विधिपुत्र वर्णील तें ॥१७१॥
ती सुरस कथा से फार ॥ ब्रह्मानंदे होऊनि निर्भर ॥ ऐका तेचि हो सादर ॥ प्रेमभरेंकरुनियां ॥१७२॥
श्रीपांडुरंगपुरविहारा ॥ श्रीधरवरदा जगदुद्धारा ॥ ब्रह्मानंदा अत्युदारा ॥ बोलवीं सार कथा ते ॥१७३॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जमिनिकृत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकसष्टाव्यांत कथियेला ॥१७४॥
इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि मयूरध्वजाख्यानं वीरवर्मयुधकथनं नाम एकषष्टितमाध्यायः ॥६१॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥ ॥ऽ॥
॥ श्रीपाडवप्रताप-अश्वमेधपर्व-एकषष्टितमाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP