मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १२ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १२ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १२ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥गुरु म्हणे दीपकाप्रती । अर्जुनाची परिसोनी विनंती ।श्रीदत्त तयाप्रती । विस्तरें सांगती उत्तर ॥१॥संसारी हे मूढ जीव । शास्त्रावरी न ठेविती भाव ।त्यावरी अवकृपा करी देव । तेणें भवभ्रमण हो ॥२॥स्वयें चिद्धन साक्षी असून । तीनी अवस्थेहूनि भिन्न ।स्वयें अनुभव येत असून । जाती विसरून स्वरूपा ॥३॥मी कर्ता मी दाता । म्हणती मी सुखदु:खभोक्ता ।असी घेवूनी मूढता । जगीं भिन्नता पाहती ॥४॥ही केवळ होय भ्रांती । ही जातां दूर नाहीं मुक्ती ।हाही आत्म्यावर उपचार म्हणती । जे वेदांती निष्णात ॥५॥मुळीं बंध नाहीं जाण । मग मुक्ती खरी म्हणे कोण ।अज्ञबोधार्थ हें निरूपण । शास्त्रपुराण करीतसे ॥६॥जें सत्य ज्ञान अनंत । ब्रम्ह एक सदोदित ।भ्रमें नामरूपें निश्चित । असती कल्पीत ब्रम्हावरी ॥७॥दिसे जो हा सर्व लोक । तें पूर्वीं ब्रम्ह होतें एक ।भेदरहित देख । सच्चित्सुखस्वरूप ॥८॥न दुजें तत्समान । त्याला सजातीय भेद कोठून ।दुसरें नाहींच म्हणोन । विजातीय भेद नसे तया ॥९॥सच्चिदानंद ब्रम्ह खास । तें असे अखंडैकरस ।स्वगतभेद तयास । नाहींत खास वृक्षापरी ॥१०॥वृक्षा पत्र एकदेशीं । फळ पुष्प एकदेशीं ।ब्रम्ह सच्चिदानंद सर्वांशीं । दृष्टांत तयासी रक्तोष्ण प्रकाशदीप ॥११॥निर्विकारा नये विकार । म्हणोनी करितां मायेचा अंगिकार ।ती आत्मशक्ती निराकार । तिणें नये द्वैतपणा ॥१२॥शक्ती शक्ताहूनी भिन्न नसे । लोकीं ठावें असे ।तिणें द्वितीयत्व येतसे । असें कसें म्हणावें ॥१३॥कोणी म्हणती पहातां माती । ईचे पुढें घडे होती ।तेव्हां नाम आकृती । पूर्वीं चित्तीं येतसे ॥१४॥तसें येथें मानितां । पूर्वीं कांहीं नव्हतां ।जिव्हा मन नसतां । नामआकारता कोण करी ॥१५॥तें अद्वितीय ब्रम्ह एक । संकल्पानें झालें स्वयें अनेक ।म्हणोनी एकाच्या ज्ञानें सकळीक । कळे विवेक होतांची ॥१६॥घेवूनियां माती । कुंभार घडा करी हातीं ।हा आरंभवाद म्हणती । उपादान माती निमित्त कुलाल ॥१७॥ईश्वर निमित्त उपादान । उभयरूप होवून ।करी जग निर्माण । निर्विकारपण न जातां ॥१८॥ईश्वर कोळ्याचे परी । विश्वोत्पत्ती संहार करी ।याला कुंभारापरी । आरंभवाद न घडे ॥१९॥आम्लानें होतें दुधाचें दहीं । हा परिणामवाद तोही ।ह्या निर्विकार आत्म्याला नाहीं । म्हणूनी विवर्तवाद बोलती ॥२०॥रूपें भासे शिंपीवर । किंवा सर्प दोरीवर ।तसा हा जगदुत्पत्तिप्रकार । निर्विकार अधिष्ठान तें ॥२१॥जीव आणि ईश्वर । यांचा भेद परस्पर ।चितीं अविद्या तद्भेद परस्पर । हे सहा प्रकार अनादी मानिले ॥२२॥कल्पित जाण भेद हाही । मुळीं अविद्याच नाहीं ।मग कैंची भेदवार्ता ही । कांहींच नाहीं स्वरूपीं भेद ॥२३॥तूं ह्मणशी कीं मिथ्या भ्रम । मग किमर्थ हा श्रवणादि श्रम ।जरी होय मिथ्या भ्रम । महा अनर्थ घडवी हा ॥२४॥ह्मणूनी योगादिकें करून । करावें याचें निरसन ।जसा अग्नी मलिन सुवर्ण । मळ जाळून स्वच्छ करी ॥२५॥तसा भ्रम मळ योगें जातां । स्वयें प्रकाशे स्वयंप्रकाशता ।तेथें कैंची द्वैतवार्ता । आभासमात्रता जयाची ॥२६॥गारुड्यानें दाविलें जळ । त्याणें न भिजे भूमंडळ ।परि भुलती लोक सकळ । हें जळ म्हणोनी ॥२७॥तेवीं जाण हें जगद्वैत । भ्रमची असे समस्त ।संसारही भ्रमभूत । भ्रमजात सुख दु:ख ॥२८॥हा भ्रम नष्ट होतां । मग कैंची द्वैतवार्ता ।प्रारब्धाची काय कथा । भ्रम नासतां अर्जुना ॥२९॥कर्मादिकें व्यर्थ श्रम । त्याणें न निरसे भ्रम ।वस्तुज्ञानाचा क्रम । धरितां भ्रम दुरावे ॥३०॥जो ज्ञानयोग पर । तो करी भ्रम दूर ।तोचि आनंद निर्भर । तोचि नर कृतकृत्य ॥३१॥असें ऐकुनी वचन । वंदूनी बोले अर्जुन ।कसें साधावें योगज्ञान । कृपा करोन सांगावें ॥३२॥ब्रह्म असोनी एक । कसें झालें अनेक ।केवी आलें हें दु:ख । हा विवेक मज व्हावा ॥३३॥श्रीदत्त म्हणे अर्जुना । स्वरूपीं नाहीं कल्पना ।नित्यमुक्त निर्विकारपणा । तो कोणा न मोडवे ॥३४॥शुद्धसत्व प्रकृतींत । तेंची ब्रम्ह प्रतिबिंबित ।तोची जगाचा तात । श्रुतिसंमत ईश्वर ॥३५॥ब्रम्हाविष्णुरुद्ररूपें धरी । तोचि सृष्टी स्थिती संहार करी ।तोची राहे सर्वांतरीं । तोचि तारी भक्तजनां ॥३६॥शुद्धसत्वगुणी त्याची शक्ती । तिला विद्यामाया म्हणती ।ही उपाधिभूत प्रकृती । सर्वज्ञता येती इच्या योगें ॥३७॥मलिनसत्व जी प्रकृती । त्यांत ब्रम्हप्रतिबिंबें पडती ।त्यांना जीव असें म्हणती । ते असती पराधीन ॥३८॥ते व्यष्टीभूत किंचिज्ज्ञ । समष्ट्यभिमानी जो सर्वज्ञ ।तो स्वतंत्र ईश्वर प्राज्ञ । वागवी अज्ञ जीववर्गा ॥३९॥मायेच्या शक्ती दोन । आवरण विक्षेप म्हणोन ।स्वरूपा ठेवी आच्छादून । म्हणूनी आवरण ह्मणती तया ॥४०॥ईश्वर आणि मुक्त यांसी । सोडून इतर जीवांसी ।आवरण पडे निश्चयेंसी । मग मी अज्ञ असी प्रतीत ये ॥४१॥ असें होतां अज्ञान । कर्तृत्व भोक्तृत्व ये लागून ।हें विक्षेपाचें कार्य जाण । नामायोनी भ्रमणरूप ॥४२॥विक्षेप हें सुख दु:ख । विक्षेपची भूतभौतिक ।कार्य जें सकळीक । विक्षेप एक पसरला ॥४३॥जैसी मंदाधकारीं । पडली असतां दोरी ।तें नेणतां अंतरीं । वाटे खरोखरी हा सर्प ॥४४॥जो हा विकल्प घे मन । हेंची होय आवरण ।मग धडकी कंप होय दारुण । तो विक्षेप जाण अर्जुना ॥४५॥दोरीचें होतां ज्ञान । होय सर्पभ्रमनिरसन ।मग विक्षेस्प राहिला म्हणून । तया कोण गडबडे ॥४६॥जें असे जीवा अज्ञान । त्याचें होतां निरसन ।जीवा न होय भ्रमण । विक्षेपानें सर्वथा ॥४७॥ब्रह्मापासुनी प्रकृती । ती पासूनी महत्तत्वोत्पत्ती ।महत्तत्वापासूनी अहंकारोत्पत्ती । त्यापासुनी होती पंचभूतें ॥४८॥आकाश हो शब्दगुण । वायु शब्दस्पर्शगुण ।तेज शद्बस्पर्शरूपगुण । जलाचे गुण शब्दस्पर्शरूपरस ॥४९॥शब्दस्पर्शरूपरसगंधांनीं । युक्त असे मेदिनीं ।भूतांच्या सत्वगुणांशांनीं । ज्ञानेंद्रियें पांच होती ॥५०॥श्रोत्र त्वचा आणि नयन । रसना आणि घ्राण ।ही ज्ञानेंद्रियें जाण । आतां अंत:करण ऐक ॥५१॥भूतसत्वांश एकत्र होवून । होतसे अंत:करण ।वृत्तिभेदें पंचधा जाण । अंत:करण निर्विकल्प ॥५२॥संकल्पात्मक तें मन । निश्चयात्मक बुद्धि जाण ।चित्त करी अनुसंधान । करी मीपण अहंकार तो ॥५३॥याचा अंतर्भाव करून । कोणी म्हणती हीं दोन ।आतां रजोगुणें जाण । कर्मेंद्रिय प्राण झाले ॥५४॥वाचा हस्तपाद । लिंग आणि गुद ।हीं कर्मेंद्रियें निर्वाद । प्राणाचे भेद पांच हे ॥५५॥प्राण अपान व्यान । उदान आणि समान ।हें पांच वायू जाण । क्रियात्मक असती हे ॥५६॥ज्ञानकर्मेंद्रिय प्राण । मिळोनी लिंगदेह जाण ।हाचि ब्रह्मांडीं करी भ्रमण । जोंवरी ज्ञान न होय ॥५७॥अज्ञान हें कारण शरीर । आनंदमय कोशाचें हें घर ।लिंगाख्य सूक्ष्म शरीर । हेंही घर तीन कोशांचें ॥५८॥कर्मेंद्रिय पांच । रजोगुणी प्राणही पांच ।हा प्राणमय कोश साच । करवी हाच कर्मातें ॥५९॥ज्ञानेंद्रिय मनासहित । मनोमय कोश ख्यात ।बुद्धि ज्ञानेंद्रियांशीं सहिताकोश हा प्रथित विज्ञानमय ॥६०॥आकाशादि भूतांचे । दोन दोन भाग करुनी साचे ।पुन: चार चार अर्ध्याचे । भाग करोनी ते एक ॥६१॥आपुल्या भागीं न मिळवितां । प्रत्येकाच्या अर्ध्यभागीं योजितां ।पंचीकरण होई तत्वतां । त्यापासूनीच सर्व शरीरें ॥६२॥रोम त्वचा मांस नाडी अस्थी । हे पृथ्वीचे अंशें होती ।उदकाचे पांच असती । लाळ रक्त स्वेद शुक्र मूत्र ॥६३॥क्षुधा तृषा आणि कांती । निद्रा आळस हे होती ।तेजाचे अंश निगुती । ऐक आतां वायूचे ॥६४॥गमन आणि धावन । लंघन आकुंचन प्रसारण ।हे वायूचे अंश जाण । चपळपणा असे हा ॥६५॥काम क्रोध लोभ मोह भय । हे आकाशांश यांहीं होय ।चतुर्विध स्थूल काय । अन्नमय कोश हा ॥६६॥जसे खालीं वर प्रासाद । करूनी राजा करी विनोद ।तसे जीवात्म्याचे हे प्रासाद । तीन देह जाणावे ॥६७॥स्थूल देहाचा करूनी संग । संद्रियांनीं घेई जागृद्विषयभोग ।विश्वनायक होई मग । धे प्रविविक्त भोग सूक्ष देहीं ॥६८॥जागृद्वासना घेऊनी । तैजस नामक होवूनी ।स्वप्नावस्था कल्पूनी । एक असुनी अनेकत्व पाहे ॥६९॥कारणदेहीं जाउनी । प्राज्ञ नामक होवूनी ।निद्रावस्था अनुभवुनी । जागृत होउनी पुन: भ्रमे ॥७०॥देह हें अधिष्ठान । अहंकार कर्ता जाण ।इंद्रियसमूह हें कारण । चवथी जाण वायुचेष्टा ॥७१॥इंद्रियादिकांच्या देवता । हें पांच एकत्र होतां ।शुभाशुभ कर्मचेष्टा । कायावाचामनें घडे ॥७२॥इष्ट पुण्य स्वर्गादि सुख दे । अनिष्ट पाप नरकादि दु:ख दे ।मिश्र पापपुण्य मनुष्यजन्म दे । त्रिविधकर्म दे असी गती ॥७३॥अंडज आणि स्वेदज । उद्भिज आणि जारज ।पांचवी योनी दिविज । कर्मभोगार्थ ह्या योनी ॥७४॥कर्मयोगें ह्या योनी फिरे । जरी कल्पकोटी होती फेरे ।तरी भोगिल्याविना कर्म न सरे । जंववरी बरें ज्ञान न ठसे ॥७५॥असा सृष्टिक्रम । दावीतसे वेदागम ।हा सत्य म्हणोनी भ्रम । घेई अधम मानव जो ॥७६॥अमानित्वादि गुण । अंगीं घ्यावे बाणून ।गुरुला शरण जाऊन । आत्मज्ञान जोडावें ॥७७॥फलाभिमान त्यागून । करितां स्वधर्मानुष्ठान ।ईश्वरप्रीती होवून । सद्गुरुचें दर्शन होईल ॥७८॥गुरु देवासमान । श्रद्धेनें मानून ।त्याची सेवा करूनी श्रवण । करावें निर्वाणला भार्थ ॥७९॥गुरुच्या अनुग्रहें करून । विचार ठसेल सत्य जाण।अन्यथा व्यर्थ ये शीण । अंतरीं ज्ञान न ठसेल ॥८०॥राजा त्वां आश्रमोक्त । कर्म केलें अनासक्त ।म्हणूनी झालासी माझा भक्त । आतां व्यक्त सांगतों ॥८१॥भ्रम मोह मलहर । वैराग्य झालें जें पर ।आतां तुजवरी सत्वर । विद्या प्रसाद करील ॥८२॥विद्या म्हणजे ज्ञान । तें दोन प्रकारचे जाण ।परोक्ष अपरोक्ष म्हणून । श्रुतिप्रवीण बोलती ॥८३॥गुरुमुखें श्रवण करणें । उपक्रमादि सहालिंगानें ।वेदांताचें तात्पर्य घेणें । हें जाणणें परोक्ष ज्ञान ॥८४॥ब्रह्म एक कीं अनेक असे । असा संशय जो होतसे ।ती संशयभावना तीही नासे । श्रवण असें करितां हें ॥८५॥ब्रह्म नाहीं हेही मती । असत्वावरण तें म्हणती ।तेंही नष्ट होई निश्चिती । वस्तु आहे म्हणती मग तेची ॥८६॥श्रवणानुसारें मनना । करितां हरे असंभावना ।स्थिर करूनियां मना । सावधाना पावूनी ॥८७॥मी किंचिज्ज्ञ अपरोक्ष असें । ईश सर्वज्ञ परोक्ष असे ।मग ऐक्य व्हावें कसें । वाटे ती संशयभावना ॥८८॥तीनी अवस्थेंत ज्ञान एक । तें सदा सच्चिदानंद रूपक ।तें प्रत्यक् उपाधीनें अज्ञत्वादिक । त्याचा विवेक नसतां दिसे ॥८९॥आत्मा एक सदोदित । जग हें मिथ्या स्वप्नवत ।उपक्रमोपसंहारें पहात । उपाधीमुळें द्वैतता ॥९०॥अध्यारोपा सोडूनी । अपवादा विचारूनी । पाहातां एकत्व ये मननीं । चिंतितां मनीं श्रवणानुसारें ॥९१॥वस्तु न भासे ही मती । तें अभानावरण म्हणती ।जे हें मनन करिती । जाई अभानावरण त्यांचे ॥९२॥असें निदिध्यासन होतां । आवरण दूर जातां ।ध्यानें अद्वितीयता । अभ्यास करितां स्थिरावें ॥९३॥सर्व संकल्प सोडून । एकांतीं बैसून । ध्यान करितां अनुदिन । स्वयें आपण ब्रह्म होय ॥९४॥भ्रमराचें ध्यान करितां । कीटां ये भ्रमरता ।हा ध्यानाचा प्रभाव तत्वतां । लोकीं प्रसिद्धता असे ही ॥९५॥जीव तरी ब्रह्म असून । करितां स्वरूपाचें ध्यान ।ब्रह्मस्वरूपा पावतां कोण । मानील निपुण आश्चर्य हें ॥९६॥ध्यान तरी किमर्थ । म्हणसी तरी यथार्थ ।ऐक राया कृतार्थ । होसील स्वार्थ जोडूनी ॥९७॥जी अनिर्वचनीय ख्याती । तीणें स्वरूपीं ये भ्रांती ।रज्जुसर्पापरी ती । मिथ्या असूनी अनर्थ करी ॥९८॥अविद्या काम कर्मेंसी । युक्त होई दिननिशीं ।होऊनी रागादिकां वशी । अविनाशित्व हरपवी ॥९९॥रागद्वेषवशेंकरून । करितां त्रिविध कर्माचरण ।त्याणें ये सदा भ्रमण । जन्ममरण पुन: पुन: ॥१००॥राहुग्रस्त झाला रवी । म्हणती अज्ञ जेंवी ।जिवावरी आवरण तेंवी । भास मात्र असे तें ॥१०१॥ज्ञानावांचूनी तन्निवृत्ती । कोण करील कवण्या रितीं ।श्रवणादिकर्में जे ज्ञानी होती । तेचि मिळती स्वरूपीं ॥१०२॥शाब्दज्ञान परोक्ष । आत्मा तरी अप्रत्यक्ष ।ध्यानें होई अपरोक्ष । म्हणोनी ध्यान करावें ॥१०३॥राजा तूं सभाग्य । तुला झालें वैराग्य ।तूं होसी उपदेशयोग्य । मोक्षभागी तूं खास ॥१०४॥कर्म केलें मदर्पण । झालें शुद्ध अंत:करण ।तुझी मजविषयीं जाण । दृढ भक्ती जाहली ॥१०५॥आतां तुला निर्विघ्न । घडेल महावाक्यचिंतन ।अपरोक्षानुभव घेऊन । समाधीमध्यें लीन हो ॥१०६॥स्थिरऊनी तत्वज्ञान । मनाचा भंग करून ।टाकी वासनावन । समूळ जाळून सर्वथा ॥१०७॥मग होसी जीवन्मुक्त । प्रारब्ध भोगूनी पूर्ववत ।विदेह कैवल्यें मद्रूपांत । मिळसील निश्चित हें मानीं ॥१०८॥नृपा आतां तूं सादर । करी महावाक्यविचार ।तेणें अपरोक्ष साक्षात्कार । होईल सत्वर निर्धारें ॥१०९॥इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये द्वादशोsध्याय: ॥॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP