मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ६ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ६ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ६ वा Translation - भाषांतर श्रीदत्तात्रेयाय नम: ॥गुरु म्हणे शिष्याप्रती । त्वां ऐकावें एकचित्तीं ।पुत्र सांगे पित्याप्रती । तेची उक्ती सांगतों ॥१॥सह्याद्रीवरी अर्जुन । जातां देखे पदचिन्ह ।वज्रांकुश ध्वज नलिन । शोभायमान उमटलें ॥२॥पाहतां सचिन्ह पाउलें । अर्जुनाचें मन दाटलें ।अंगीं रोमांच उठले । नेत्रीं सुटले प्रेमाश्रु ॥३॥मन झालें निश्चळ । इंद्रियें न करिती खेळ ।बुद्धी झाली विमळ । राहिली केवळ चेष्टाहीन ॥४॥अंतर्बाह्य नेणें कांहीं । मीतूंपण ठावें नाहीं ।पददर्शनाची गती ही । योग्यां नाहीं ठावी जी ॥५॥दैवयोगें ये देहावर । करीं तया नमस्कार ।तेथें लोळे सादर । टाकी अंगावर ती माती ॥६॥म्हणे अहो धन्य हे मही । जें पद अलभ्य देवांलाही ।तें अश्रांत सेवी ही । ऐसी नाहीं दुजी धन्या ॥७॥रोमांचसे तृणांकुर । उभारून पाठीवर ।सुचवी हर्ष निर्भर । कृपापात्र हे भूमी ॥८॥तंव देखिले वृक्ष फलित । शाखाग्रें नम्र होत ।म्हणे अर्जुन हे निश्चित । केवळ भागवत वाटती ॥९॥पूर्वीं केला अपराध । ताठा धरोनी मदांध ।म्हणोनी हा तमोंध । वृक्षजन्म दधिला ॥१०॥असें मनीं आणून । फळें पुढें करून ।शाखामस्तकें नमून । करिती वंदन भक्तीनें ॥११॥हा पर्वत मनोरम । वाटे हा भागवतोत्तम ।नित्य सेवी हा सत्तम । पुरुषोत्तमचरणरजा ॥१२॥नित्य कंदमूल फळ । भगवंता दे स्वादुजळ ।हा भाविक प्रेमळ । भक्त केवळ वाटे हा ॥१३॥असें म अनीं चिंतून । चाले पुढें अर्जुन ।चकोर चांदणें पाहून । आनंदघन होय जेवी ॥१४॥तेवी आश्रम पाहोनी । वेदध्वनी ऐकूनी ।पुढें अर्जुन येऊन । पाहे नयनीं भगवंता ॥१५॥कोटी कंदर्प गाळूनी । मूर्ती ओतिली वाटे मनीं ।मंद हास्य दिसे वदनीं । पाहतां मनीं हर्ष होय ॥१६॥आजानुबाहु सुरेख । पहातां डोळां होय सुख ।दृष्टी चिकटे सविवेक । सेवी चोख रूपामृत ॥१७॥प्रफुल्ल कमलवदन । वाटे घ्यावें चुंबन ।शरीर परम शोभन । वाटे आलिंगन दृढ घ्यावें ॥१८॥दिसे दिगंबर मूर्ती । परम गोजिरी आकृती ।तेथोनि न फिरे मागें वृत्ती । जेवी गती योगियाची ॥१९॥मायेची करोनियां नारी । प्रेमें तिशीं क्रीडा करी ।तें देखोनी पळती दुरी । अविचारी मुनी जे ॥२०॥गर्गवचन स्मरून । हा खेळ जाणून ।केवळ प्रेमळ अर्जुन । भाव धरोनी राहिला ॥२१॥दत्त म्हणे जा निघोन । नातरी करीन ताडन ।येरू तथास्तु म्हणून । श्रीचरण चुरूं लागे ॥२२॥अंकीं ठेवून चरण । भावें करी संवाहन ।जरी दत्त करी निर्भर्त्सन । तिकडे मन न देई ॥२३॥जसी कां सती नारी । कोपें पती मारी तरी ।सेवेसी न अंतरीं । न अंतरीं धरी तें ॥२४॥प्रभूचे पाय चुरतां । नखमाणिकें चमकतां ।हार्दतम जाय अस्ता । स्वरूपीं लीनता सहज हो ॥२५॥सहज होतां सेवन । समूळ नासे अज्ञान ।ज्ञानें भगवत्प्रेमबंधन । हो तें तोडून कोण टाकी ॥२६॥ट अकी पदीं लोटूनि दत्त । तरी शिष्य न सोडित ।जेवी लोहचुंबका धरित । तसा संसक्त होई राजा ॥२७॥करी पादसंवाहन । मद्य मांस दे आणून ।दे सुगंधस्रक् चंदन । फळें आणून देतसे ॥२८॥निद्रा आळस सोडून । चरणीं मन लावून ।न सांगतां अक्री सेवन । उच्छिष्ट पानप्रसाद घे ॥२९॥त्याचें जाणाया अंतर । कौतुक करी ईश्वर ।बाहु पाडी धरेवर । ईक्षणमात्रेंकरून ॥३०॥हांसोनि बोले आपण । भूपा अरिष्ट हें दारुण ।पळत जा येथून । येईल मरण वाटतें ॥३१॥अशुद्ध संगाचें हें फळ । मी असें अमंगळ ।कर्म बहिष्कृत केवळ । भक्ष्याभक्ष्यवर्जित ॥३२॥मी उन्मत्त नग्म । नग्न स्त्रिये घेऊन ।क्रीडा तिसीं करून । राहें अनुदिनीं भूपाला ॥३३॥माझा संसर्गदोष । तुज लागला विशेष ।तोचि करील प्राणशोष । नि:शेष तुला झळकोन ॥३४॥ऐसें ऐकोनि वचन । गर्गोपदेश स्मरून ।बोले नमस्कार करून । तो अर्जुन दत्तातें ॥३५॥देवा व्यर्थ कां मोहविशी । समजलों मी मानसीं ।लोकानुसारें वदसी । लीला दाविसी तसाच ॥३६॥तूं सर्वात्मा पुरुष । घेशी मायेनें हा वेश ।असोनियां निर्विशेष । सविशेष भाससी ॥३७॥तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।आपुल्यावरी घेसी आळ । जगज्जाळ आधाराची ॥३८॥हें जग उपजेल जरी । जगीं असशील तूं तरी ।हें तो मृगजळापरी । हें विकारी दृष्ट नष्ट ॥३९॥तूं आणि विश्व चराचर । जो उभयांचें नेणे अंतर ।तो भेददर्शी पामर । तो शास्त्रें बद्ध होतो ॥४०॥नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध ।एवं यथार्थ जाणें जो बुद्ध । तो हो अशुद्ध त्वत्सम ॥४१॥अज्ञां दिसे हा भेद । त्यां बांधी धर्मे वेद ।त्यांचे शिरीं विधिनिषेध । तूं तो निर्बाध सर्वथा ॥४२॥देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो ।विपरीत भावना न राहो । हा निश्चय भगवंता ॥४३॥ऐकूनी अर्जुनाचें वचन । श्रीदत्त प्रसन्न होऊन ।धन्य रे तूं भूपनंदन । देतों वरदान माग आतां ॥४४॥तूं भक्तीतत्व जाणसी । ह्मणोनि मज न सोडिसी ।जिवलग तूं आवडसी । भक्त होसी निश्चळ ॥४५॥जे माझे अनन्य भक्त । त्यांपाशीं राहें मी सतत ।जे असती अभक्त । दु:खयुक्त ते होती ॥४६॥तूं न धरितां देहस्वार्थ । सोडोनियां भोग्यार्थ ।मत्सेवा केली यथार्थ । केलें सार्थक जन्माचें ॥४७॥ऐसें बोलतां दत्त । राजा झाला पुलकांकित ।निरिच्छ असून निश्चिंत । प्रारब्धप्रेरित वदे तो ॥४८॥देवा जरी प्रसन्न होसी । देईं सर्व समृद्धीसी ।यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ॥४९॥अविरोधें धर्मार्थकाम । असावें यश नि:सीम ।म्या व्हावें बलधाम । देवो मन्नाम नष्टलाभ ॥५०॥धर्में प्रजापालन । व्हावें परचित्तज्ञान ।स्मरती त्याला घडावें दर्शन । सर्वसिद्ध्यागमन असावें ॥५१॥सहस्त्र बाहू असावें इच्छितां । जय मिळावा सर्वथा ।इच्छित स्थानीं जाण्याकरितां । अकुंठित गती असावी ॥५२॥सदा सर्वज्ञता असावी । स्वर्गीं पाताळीं गती व्हावी ।कुमार्गीं प्रवृत्ती न व्हावी । सदा असावी सत्संगती ॥५३॥अतिथी पूज्य यावें घरीं । अक्षय द्रव्य असावें भांडारीं ।अरी नर रहावा भूमीवरी । व्हावें महीवरी साम्राज्य ॥५४॥आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें ।भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ॥५५॥भक्ती असावी भवच्चरणीं । सदोदित अव्यभिचारिणी ।हेचि आवडी माझे मनीं । असें म्हणोनी नमस्कारी ॥५६॥प्रभु ह्मणे हे दिले वर । तूं होसी सप्तद्वीपेश्वर ।ऐसें बोलतां योगेश्वर । फुटले सुंदर दोन भुज ॥५७॥मग प्रेमें दाटून । दृढ घेई देवाचें आलिंगन ।आलिंगितां द्वैतभान । जाऊनी निश्चळ राहिला ॥५८॥ओळखोनी अंत:स्थिती । वरदान आणूनी चित्तीं ।त्यावरी माया सोडिती । पुन: उठविती तयातें ॥५९॥श्रीदत्त म्हणे तयासी । त्वां जावोनि माहिष्मतीसी ।राज्याभिषेक आपणासी । करवी विधिसी मदाज्ञेनें ॥६०॥तथास्तु म्हणोन अर्जुन । भावें गमन करून ।म्हणे शिरसा मान्य वचन । विस्मरण न व्हावें तुमचें ॥६१॥माझें असावें स्मरण । आपले हे चरण ।हेंचि माझें जीवन । येथें प्रमाण मन तुमचें ॥६२॥जेवी बाळा सोडून । दुरावे जरी कुर्मीण ।त्याचें करितां स्मरण । तया जीवन येतसे ॥६३॥जीवन येतसे भक्तां । तुम्हीं मनीं आठवितां ।जेवीं कुर्मिणीनें विसरतां । बाळें पंचता पावती ॥६४॥कूर्मिणीला येवो भ्रमप्रमाद । तुम्ही ईश्वर स्वच्छंद ।तुह्मां न ठावा भ्रमप्रमाद । साक्षी वेद देतसे ॥६५॥तुमचे आज्ञेकरून । जीवावरी आवरण ।घाली माया दारुण । ह्मणोनी भ्रमण पावती ॥६६॥तीच माया तुम्हांपासीं । तिचें आवरण नये तुह्मांसी ।लौकिक मायेसी । उपमेय जी ॥६७॥स्वाधीन स्वाश्रय माया । अन्या ठेवी मोहुनियां ।ती नावरी स्वाश्रया । लोकत्रया ठावें हें ॥६८॥जैसा पाळला कुतरा । छु म्हणतां धरी परा । धन्यावरी नये त्याच्या घरा । सेवी त्यावरी न भोके ॥६९॥जो होई तुझा भक्त । त्यापुढें माया हो अशक्त ।मी तुझा भक्त व्यक्त । अव्यक्त माया काय करील ॥७०॥माह्मां मायेचें नाहीं भय । आह्मां पुढें काळ काय ।दैवरेषेवरी पाय । देवूं हे पाय आठवितां ॥७१॥देवा योगक्षेमाची वार्ता । सोडूनि देवूं सर्वथा ।जेथें तेथें तुझ्या कथा । गाऊं माथा नम्र करूनी ॥७२॥असो आतां हें मागणें । सर्वथा आह्मां न विसरणें ।आह्मां वांचवावें स्मरणें । हें गार्हाणें पुन: पुन: ॥७३॥असें म्हणोनी अर्जुन । चाले मागें पाहून । जेवीं सासुर्या जातां सून । पुन:पुन: फिरोनि मागें पाहे ॥७४॥स्मरण ठेवूनी अंतरीं । राजा आला रेवातीरीं ।प्रवेशला माहिष्मतीपुरीं । येती सामोरी पौरमंत्री ॥७५॥देव ऋषी आणि महर्षी । त्यांतें आणीलें संतोषीं ।त्यांहीं मंत्रवद्यघोषीं । अभिषेक केला विधीनें ॥७६॥स्वर्णपवित्रयुक्त स्रेखा । औदुंबराची ओली शाखा ।तिणें अभिषेकिती तीर्थोदका । नाना शाखामंत्रेंसी ॥७७॥त्यांसी अभिषिक्त अर्जुन । देई क्षेत्र - गो - स्वर्ण ।दीनांघकृपणा धन । देई अन्न यथेच्छ ॥७८॥वसुरुद्रादित्य देव । आले मरुद्गण विश्वेदेव ।त्यांहीं अभिषेकिला राव । महोत्सव तेव्हां झाला ॥७९॥महाराज अर्जुन । सर्वांचें करी पूजन ।ते देती आशीर्वचन । सुखी आयुष्यमान् हो ह्मणुनी ॥८०॥नाना राजे करभार । घेऊनि आले समोर ।डांगोरा पिटे नृपवर । ते सर्व पौर ऐकतां ॥८१॥माझ्या वांचोनी जो करीं । जरी कां शत्र धरी ।किंवा जो हिंसा चौर्य करी । त्याला मारीन ठार मी ॥८२॥ऐसें ऐकोनी वचन । शस्त्रें देती टाकून ।भयें पाळिती वचन । लीन होवोन सर्वदा ॥८३॥तोचि झाला क्षेत्रपाळ । ग्रामपाळ पशुपाळ ।सेना धान्य धनपाळ । विप्रपाळ तोचि झाला ॥८४॥अग्नि चोर रिपु व्याळ । यांहीं प्रजा होता व्याकुळ ।नाना रूपें धरोनी संभाळ । करी भूपाळ विपद्धर्ता ॥८५॥नष्ट लाभे नाम घेतां । दर्शन दे ध्यान करितां ।सर्वां झाली अरोगता । वृष्टी पडे यथाकाळीं ॥८६॥सुफळा झाली धरा । भूपें यज्ञें भूसुरामरां ।तृप्त केलें न्यायें नरा । पाळी फिरे जो त्रिलोकीं ॥८७॥माघ कृष्ण अष्टमीदिनीं । अनघाष्टमी व्रत करूनी ।ब्राह्मणां भोजन दे दुसरे दिनीं । प्रतिवर्षीं नियमानें ॥८८॥जो हें अष्टमीव्रत करील । तो नर सुखी होईल ।सकलाभिष्ट लाभेल । हे बोल मानील जो ॥८९॥यद्दिनीं मिळाला वर । तद्दिनीं उत्सव करी थोर । श्रीदत्तदर्शन वारंवार । करी प्रेमभर होवोनी ॥९०॥जो परम दुर्धर्ष तेजस्वी । बळी सहस्त्रकर कीं रवी ।विजयी सुकीर्ति मिरवी । नुरवी जो दु:खवार्ता ॥९१॥ज्याला नसे विस्मरण । करे शरणागतरक्षण ।सर्वैश्वर्य भोगून । गाथा वदवीं जगीं हे ॥९२॥( श्लोक ) न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: ।यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥९३॥एके दिवशीं सहस्त्र नारी घेवोनियां रेवातीरीं ।स्वच्छंदें अर्जुन क्रीडा करी । तंव देवारी रावण आला ॥९४॥अर्जुन हा महाशूर । नारदवाक्यें जाणूनी निशाचर ।आला करावया समर । तया देखती त्या नारी ॥९५॥अर्जुनें नेत्रसंकेत करून । स्त्रियांकरवीं करविलें बंधन ।बाळा खेळावया लागून । ठेविला नेऊन सदनांत ॥९६॥पोर धरिती त्याच्या करा । भोवंडिती त्या निशाचरा ।हें कळलें कुबेरा । प्रार्थुनी नृपवरा सोडविला ॥९७॥असा बळी तो अर्जुन । नगरींही नित्य राहून ।नानारूपीं सप्तद्वीप धुंडोन । राज्यपालन करी धर्में ॥९८॥नसते कार्तवीर्याय । हा तयाचा मंत्र होय ।येणें सर्वारिष्टक्षय । होय हा निश्चय जाणावा ॥९९॥प्रणवबीज लावून । जपतां होय भवबंधमोचन ।र्हींबीज लावून । जपतां सर्वैश्वर्य मिळेल ॥१००॥ऐंबीज लावितां वाक्सिद्धी होई । सर्वविद्यापारंगत होई ।लक्ष जपतां कार्यसिद्धी होई । मंत्रशक्तिप्रभावें ॥१०१॥श्रींबीजें लक्ष्मी मिळे । द्रांबीजें अपमृत्यु टळे ।रोगपीडा पळे । आरोग्य मिळे निश्चयें ॥१०२॥वषट्बीजें वशीकरण । वौषट्बीजें होई आकर्षण ।हुंबीजें होई विद्वेषण । फट्बीजें उच्चाटाण होतसे ॥१०३॥ठ: ठ: बीजें होय स्तंभन । खें खेंबीजें होय मारण ।नम:बीजें होय स्तंभन । होय पोषण स्वाहाबीजें ॥१०४॥सौ:बीजें होय क्षोभन । क्लींबीजें वशीकरण ।ग्रहभूतादि निवारण । हुंफट्बीजें होईल ॥१०५॥अक्षिरोग मेह सन्निपात । श्लेष्मज्वर क्षय कुष्ठ ।गुल्म पैत्तिक वात । देश कालोत्थ संगज ॥१०६॥हे रोग समस्त । किंवा त्रिविध उत्पात ।प्रणवबीजें होती शांत । परप्रयोगाचा अंत होईल ॥१०७॥दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त । तें सहस्त्र जपें मिळे वित्त ।घनदीप लावून एकांत । जपतां साधे प्रयोग ॥१०८॥( श्लोक ) । कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् ।तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥१०९॥इति श्रीदत्तमाहात्म्ये श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृते षष्ठोध्याय: ॥६॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP