मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ११ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ११ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ११ वा Translation - भाषांतर श्रीदत्त समर्थ ॥गुरु म्हणे इंद्रासी । शास्त्रें न घालवी जो भ्रमासी ।मुक्ती न मिळे तयासी । गर्भवासीं पडे तो ॥१॥भूलोकांतूनी पर्जन्यांत । पर्जन्यांतूनी अन्नांत ।अन्नद्वारा पितृशरीरांत । येऊनी राहे तीन मास ॥२॥राही रेत होऊन । कामाग्नीनें तापून ।ऋतुकाळीं होतां मैथुन । स्त्रीयोनींत प्रविष्ट होई ॥३॥योनिरक्त विमिश्रित । राही गर्भाशयांत ।दैवे वाडे वारेनें वेष्टित । न मरे कष्ट होतांही ॥४॥अस्थि - स्नायु मज्जारेतानें । होती त्वचा मांस रक्त रक्तानें ।मोदका उकडती त्या तर्हेनें । हा देह बने अमंगळ ॥५॥मूत्राचें आधण विष्ठेचा दाथर । रेत रक्ताची उकड थोर ।मातेची कूस हेंच पात्र । तयामाजी जथराग्नी उकडी ॥६॥शुक्र अधिक असे जर । तरी उपजे खास नर ।रक्त अधिक असे जर । नारीशरीर उपजेल ॥७॥रक्त रेत समान होतां । खास ये नपुंसकता ।शुक्र वायूनें भिन्न होतां । आवळे जुळे देह होती ॥८॥अमंगळाहूनी अमंगळ । रजस्वलेचा विटाळ ।तेथेंच उपजे बाळ । तो निर्मळ धुवूनी होय कीं ॥९॥रेत रक्त जें एकत्र मिळतें । पांच रात्रीनें बुद्बुद होतें ।सात दिवसांनीं पिशवी होते । पक्षानें फुगते तीच पैं ॥१०॥महिन्यानें होई कठीण । दों मासांनीं मस्तक निर्माण ।तिसरे मासीं पोट होवून । हस्तपादांकुर फुटती ॥११॥चौथे मासीं त्वचा । पांचवे मासीं उद्गम नखांचा ।साहावे मासीं नवछिद्रांचा । उद्भव होय अनुक्रमें ॥१२॥वायू पायापासून । अंतरीं राहे प्राण होऊन ।सातवे मासीं ताळू फोडुनी । अंतरीं चेतन प्रवेश करी ॥१३॥मातेनें खातां अन्न । त्याचा रस नाभिछिद्रांतून ।पोंचें पोटांत जाऊन । तेंचि जीवन गर्भासी ॥१४॥दोन्हीं हृदयें एक होती । तेव्हां डोहाळे उठती ।अजीर्ण कृशता वांती । मातेला सुस्ती येतसे ॥१५॥निजकर्में भोगी हा नरक । परी तेथेंही ईश्वर संरक्षक ।स्तन होती पुष्ट कृष्ण मुख । ही पूर्वें योजना दुग्धाची ॥१६॥दक्षिण कूस होतां थोर । समजावा जन्मेल पुत्र ।वामकुक्षी होतां थोर । कन्या निर्धार जाणावी ॥१७॥लोटतां नवमास । पूर्णत्व ये गर्भास ।स्मरोनी पूर्वं कर्मास । प्रार्थी ईश्वरास पीडूनी ॥१८॥सातवे मासापासून । होवूनियां चलायमान ।अवाड्मुख पीडून । वंदून बोले परमेश्वरा ॥१९॥देवा कर्म केलें गहन । त्याचें हें दु:ख दारुण ।भोगविलें त्वां मजलागून । पुरे शिक्षण आतां हें ॥२०॥दुर्गंधीनें कंटाळलों । जठराग्नीनें पोळलों ।ह्या नरकांत लोळलों । शिणलों आतां सोडवी मज ॥२१॥निजकर्में नानायोनी । येथें आलों भोगूनी ।वाटे मला नारकाहूनी । गर्भवास हा महा कष्ट दे ॥२२॥आतां सोडवी येथून । यावरी पाप न करीन ।देवा तुझें भजन करीन । तुला विसरें न कधींही ॥२३॥असी स्तुति करितां । दशम मास प्राप्त होतां ।सूतीदायूची लहरी उठतां । पडे योनिद्वारें किडा जसा ॥२४॥उपजतां स्पर्शे वात । ती स्मृती जाई अकस्मात ।सोहं विसरूनियां पोत । राहे रडत कोहं कोहं ॥२५॥बोलो नये पराधीना । न जाणती त्याच्या मना ।विपरीत होती सर्व योजना । शयन पानादिकांच्या ॥२६॥बाल्यावस्था खेळांत जाय । विषयभोगीं तारुण्य जाय ।तेव्हां धर्माधर्म दिसेल काय । संतांचे पाय न धरवती ॥२७॥स्त्री सांगेल तें प्रमाण । माता वाटे कीं वैरिण ।ऐकाया शास्त्रपुराण । मनीं शीण येतसे ॥२८॥जसें मोगरीचें फूल । मावळे न लागतां वेळ ।मनीं विषयांचा मांडितां खेळ । तारुण्य तत्काळ मावळे ॥२९॥ईश्वरभजनीं उतावेळ । न केली त्यांचें हें फळ ।जरेस पाठवी काळ । काना जवळ ये ती टवळी ॥३०॥जरा हळू कानीं सांगत । मान हालउनी हातें नाहीं म्हणत ।मग ती पाडूनियां दांत । कान डोळे आंत ओढीतसे ॥३१॥तसें पाहुनी तें बेरूप । पोरें जवळ घालिती दूप ।त्याच्या मनीं ये कोप । आपोआप अपमान होतां ॥३२॥मग म्हणूं जाई राम राम । तों होई लाम लाम ।जवळी ज्याला न पडे दाम । तो निकाम दुरावे ॥३३॥पुन्हा काळचक्रीं पडे । परिभ्रमण पूर्ववत घडे ।जेव्हां मनींचा भ्रम उडे । तेव्हां सांकडे कडे पडाती ॥३४॥पूर्व संस्कारें जी प्रकृती । तदनुसार कर्में घडती ।शास्त्राविनें न पालटे ती । म्हणूनी शास्त्रयुक्ती आदरावी ॥३५॥शास्त्रें होतां भ्रमनिरसन । जरी हातीं येईल ज्ञान ।स्थिरबोध न हो तंव जाण । भय दारुण वाटे कीं ॥३६॥ऐक इंद्रा तूं आतां । सांगतों सातवी गाथा ।प्रतिष्ठानीं विप्र होता । झाला सूत तयासी ॥३७॥योगभ्रष्ट तो पूर्वींचा भय मानूनी द्वैताचा ।उन्मत्त झाला असोन साचा । व्यर्थ वाचाळपण करी ॥३८॥लोकसंगा डरे तो । विषयां विष मानी तो ।मान न व्हावा म्हणूनी तो । राहे जडमूढ होवूनी ॥३९॥माता म्हणे नायके सुत । विष्टामूत्रीं लोळत ।पिता म्हणे खचित । ग्रहग्रस्त हा होय ॥४०॥मग व्रतें करिती । नियमें देवा पूजिती ।हातीं रक्षा बांधिती । दानें देती विप्रांला ॥४१॥वैद्यही औषध देती । तीर्थयात्रा जप शांति ।करिती आंगारे लाविती । भूतभीती मानूनी ॥४२॥कांही नोहे उपयुक्त । लागलें महाभूत ।जें जगा चेष्टवित । तें बंधांत केंवी ये ॥४३॥अहं ब्रह्मास्मि उच्चारी । स्वयें झाला पंचाक्षरी ।यापुढें बापुडा मंत्रीं । भागवतावांचुनी ॥४४॥करितां उपाय फार । तो नये प्रकृतीवर ।तो लोळे भूमीवर । मळमूत्र नेणे तो ॥४५॥हगे मुते उभ्यानें । काय खाणें काय पिणें ।हेंही तो मुळींच नेणे । त्याचें बोलणें न समजे ॥४६॥न जाणे हिताहित । असीं जातां वर्षें आठ ।मौजीबंध करी तात । सांगे कानांत गायत्री ॥४७॥संध्यावंदन न करी । जरी तया पिता मारी ।तरी न जपे गायत्री । मैत्री न ठेवी कोणासी ॥४८॥विष्णुदत्ता ऐकून । तया पुत्रा घेऊन ।त्याचे घरीं जाऊन । बोलती वंदून मायबाप ॥४९॥हा जन्मापासून । पडें जडसा होवून ।यासी उपाय योजून । पुत्रदान द्या आम्हां ॥५०॥आम्हा एकचि सूत । झाला कीं रोगग्रस्त ।भूतत्रस्त कीं उन्मत्त । ग्रहग्रस्त कीं न कळे हा ॥५१॥विष्णुदत्त तें ऐकून । तया पुत्रा पाहून ।ब्रम्हनिष्ठ ओळखून । म्हणे पुत्रा ठेऊनी चला ॥५२॥पिता म्हणे हा सुत । मुतेल ह्या यज्ञशाळेंत ।तया म्हणे विष्णुदत्त । चला निश्चिंत आपुले घरी ॥५३॥बरें म्हणूनी ते जाती । विष्णुदत्त तयाप्रती ।म्हणे कां घेसी ही भीति । काय चिंती चित्त तुझें ॥५४॥तूं कोणाचा कोण । येथें येण्याचें काय कारण ।कां दाविसी हे दुर्गुण । तुज कोण मोहवील ॥५५॥त्वां घरीं जावें आनंदें । मायबापा सुख दे ।लोकसंग्रह सोडून न दे । या स्वच्छंदें काय लाभ ॥५६॥सोडूनी दे ह्या चेष्टा । तुझें काय करूं आतां ।हें सांग तूं तत्वता । म्हणूनी माथा हात ठेवी ॥५७॥हंसुनिया पुत्र बोले । विप्रा काय हें ऐकविलें ।निजरूप माझें भलें । तें एकलें तूं जाणसी ॥५८॥मूळीं न माझी उत्पत्ती । मायबाप कसे असती ।कर्में ही अक्रिया हातीं । केवी केवी घडती बोल बापा ॥५९॥मी सच्चिदानंद व्यापक । प्रळयजळापरी एक ।मी कोणाचा होवूं लेक । जावूं कुठें कसा ॥६०॥मी अन्न आणि अन्नाद । नाहीं भोग्य भोगस्वाद ।मुळींच नाहीं भेद । परि छेद केवीं घडे ॥६१॥जरी असतों परिच्छिन्न । तरी हा तुझा प्रश्न ।मानितों मी समीचीन । सर्वंथा न घडे असें ॥६२॥देशकाल वस्तु व्यापून । मी असे संपूर्ण ।मला परिच्छेद न । भेद न सर्वथा ॥६३॥ऐकून हें वचन । विष्णुदत्त हर्षून ।प्रेमें तया अलिंगून । गाढ वचन बोलतसे ॥६४॥बापा तूं साच धन्य । अससी सर्व देवमान्य ।तुझ्यासारिखा कोण अन्य । तूं संन्यस्त साच मानी ॥६५॥कोणीही पुरुष पाहे । कधींही अकर्मा न राहे ।प्रकृतीस्वभावप्रवाहे । कर्म करिती हें निश्चित ॥६६॥तरी करावें शास्त्राचरण । दुसर्यालाही तें शिक्षण ।मिळेल त्याणें दूषण । कीं भूषण येईल ॥६७॥जे वशिष्टादिक । ते ज्ञानी सम्यक ।परंतु ते लौकिक । सर्वथा न टाकिती ॥६८॥स्वयें आचरूनी । अन्या मार्ग दावूनी ।ज्ञानभूमी धरूनी । पहिले मुनी राहिले ॥६९॥पहिल्या योगभूमी तीन । योगी यांचे जागरण ।मानिती चौथी स्वप्न । तेथें जाण ब्रह्मवेत्ता ॥७०॥भूमी धरितां पांचवी । ब्रह्मविद्वर पदवी ।मिळे घेई जो सहावी । तो ब्रम्हविद्वरीयान ॥७१॥पांचवी स्वल्प निद्रा । सहावी गाढ निद्रा ।ही स्वयें न सोडी योगमुद्रा । परत: उत्थान होय जेणें ॥७२॥तुर्या ते सातवी । स्वत: परत: न उठवी ।इच्या योगें ये पदवी । ब्रम्हविद्वरिष्ठसंज्ञक ॥७३॥तो विधिनिषेधातीत । अजूनी तूं ती मात ।नेणसी म्हणूनी भीत । करिसी व्यर्थ ह्या चेष्टा ॥७४॥सुखी राहे जीवन्मुक्त । वागूनियां अनासक्त ।करी कर्म शास्त्रोक्त । मुक्तसंग होवूनी ॥७५॥येणें ज्ञान होय स्थीर । घडे लोकोपकार ।ढिला होई अहंकार । शास्त्राधार असा असे ॥७६॥अभिमान हाची बंध । सोडी त्याचा संमंध ।हीच युक्ती म्हणती वुध । आत्मबोध होई जेणें ॥७७॥ठेवितां स्वात्मदृष्टी । नोहे अहंममता भेटी ।मानापमानाच्या गोष्टी । केंवी पोटीं येती मग ॥७८॥असी बाणतां स्थिती । विषयवासना नुठवी ।मना विकार केवीं होती । निरंहकृती राहतां ॥७९॥असा जो समाहित । तोची मानिजे मुक्त ।त्याची दृष्टी जेथें जात । तेथें होत समाधी ॥८०॥जो कर्मफळ सोडी । अहंकारा न जोडी ।हो कां तो अज्ञ अनाडी । बंध तोडी निश्चयें ॥८१॥आतां तूं तरी ज्ञाता । बंधाची नसे वार्ता ।यापरी वागतां । केवी बद्धता येईल ॥८२॥ज्याचें अवश चित्त । होई विषयसक्त ।तो न होई मुक्त । घेई गुप्त मार तो ॥८३॥ज्याचें स्वात्मनिष्ठ मन । तो विषयां भोगून ।अलिप्त असे नित्य जाण । तया कोण बद्ध म्हणे ॥८४॥परव्यसनीं जी नारी । घरधंदा करी जरी ।जारसंग अंतरीं । ती घरीं वावरतांही ॥८५॥तेवीं रूपीं विश्रांत । बाहेर वावरे मुक्त ।तसा तूं अनासक्त । होई मुक्त बाळका ॥८६॥मोक्ष नाहीं स्वर्गावरी । खालीं किंवा भूमीवरी ।जो अहंकारा मारी । त्याचे अंतरी मोक्ष वसे ॥८७॥जाईचेंही फूल । चोळतां श्रम होईल ।त्याहुनी सुखें करवेल । अहंकारत्याग तो ॥८८॥मीतूंपणाची गती । जी उठे स्फूर्ती भ्रांती ।ह्या मनाच्या चेष्टा निश्चिती । त्या न शिवती ज्ञात्याला ॥८९॥चित्तीं ठेवी हा बोध । न बाधेल मग संबंध ।तुटेल तो कर्मबंध । हा निर्बंध न मानी ॥९०॥मग ज्ञान स्थिरावेल । शांती अंगीं बाणेल ।मुक्तिपदीं डोलशील । माझा बोल साच मानी ॥९१॥असें वचन ऐकून । बाळ चेष्टा दे सोडून ।विष्णुदत्ताचे घरीं जाऊन । करी भोजन स्वस्थचित्तें ॥९२॥सतीचे हातानें मिळतां अन्न । तयाचा भ्रम गेला निघोन ।त्याची शांत वृत्ती पाहून । झालें समाधान मायबापा ॥९३॥म्हणती जन्मापासून । जो धड न बोले वचन ।त्याला न लागतां क्षण । सावधान केला विप्रें ॥९४॥ते म्हणती विष्णुदत्ता । आम्हांवरी दया केली आतां ।काय उपाय योजला सुता । जेणें स्वस्थता शीघ्र आली ॥९५॥आम्हां दिलें जीवदान । म्हणोनि घालिती लोटांगण । घरीं जाती आज्ञा घेऊन । बाळही सावधान वागे तो ॥९६॥शास्त्राचें एक तात्पर्य । अज्ञा पदोपदीं भय ।संसार असतां ब्रम्हमय । वाटे मायामय तयासी ॥९७॥स्वरूपातें भुलोनी । कर्तृत्व भोक्तृत्व वाडूनी ।व्यर्थ जाते शिणूनी । हे अज्ञानी मूढपणें ॥९८॥नथ गळसरींत खोंविली । तिची विसर पडली ।तसे असे ही बोली । चतुरीं जाणिली पाहिजे ॥९९॥नथ गळ्यांत दावितां । ती म्हणे मिळाली आतां ।तेवीं शास्त्रीं स्वात्मा कळतां । म्हणती आतां मिळाला ॥१००॥शास्त्रें लहान थोर । सर्व असती बोधपर ।असें गुरूचें उत्तर । ऐकोनी इंद्र नमन करी ॥१०१॥करा जी अपराध क्षमा । चित्तीं न ठेवा अतिक्रमा ।असें म्हणूनी सुत्रामा । नमोनी स्वधामा चालिला ॥१०२॥श्रीदत्त म्हणे अर्जुना । ठेवी शास्त्रसारांशीं मना ।शास्त्रापासुनी परोक्षज्ञाना । घेवूनि विज्ञाना पावसी ॥१०३॥जीं कर्मांचीं फळें बोलती । अणिमादी सिद्ध असती ।तिकडे न द्यावी चित्तवृत्ती । नश्वर होती अंतीं ज्या ॥१०४॥सर्व शास्त्रें पाहून । स्वार्थ घ्यावा शोधून ।हंस जेवीं पाणी टाकून । दुग्ध पिवून जाई तेवीं ॥१०५॥असें श्रीदत्ताचें वचन । सविस्तर ऐकून ।तो कार्तवीर्य अर्जुन । बोले वंदून श्रीदत्ता ॥१०६॥सह्याद्रीवर येवून । किंचित् जटांनीं आच्छन्न ।जें पाहिलें हें श्रीवदन । तेणें सदन समृद्ध झालें ॥१०७॥हें वैराग्यही झालें । शास्त्रतत्व ऐकिलें ।आतां ज्ञान विज्ञान भलें । कृपेनें कळलें पाहिजे ॥१०८॥इति श्रीदत्तचरिते एकादशोsध्याय: ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP