मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ५०६ ते ५१५

जनांस उपदेश - अभंग ५०६ ते ५१५

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


५०६

उपजोनि संसारी आपुला आपण वैरी ।

मी माझे शरीरीं घेऊनि ठेला ।

या देहातें म्हणे मी

पुत्र दारा धन माझें ।

परि काळाचें हें खाजें

ऐसें नेणतु गेला ॥१॥

कामक्रोधमदमत्सराचेनि गुणें ।

बांधला आपण नेणे भ्रमितु जैसा ।

मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा ।

मुक्त परि अपैसा पळों नेणें ॥२॥

जळचर आमिष गिळी ।

जैसा का लागलासे गळीं ।

आपआपणापें तळमळीं ।

सुटिका नाहीं ॥

तैसें आरंभी विषयसुख गोड

वाटे इंद्रियां फ़ळपाकीं

पापिया दु:ख भोगी ॥३॥

राखोंडी फ़ुंकिता दीप न

लगे जयापरी ।

तैसा शब्द ब्रह्मकुसरी

ज्ञान न पवे ।

व्रत तप दान वेचिलें पोटा

दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥

मृगजळाची नदी दुरुनि देखोनि ।

धांवे परी गंगोदक न पवे

तान्हेला जैसा तैसें

विषयसुख नव्हेचि हित ।

दु:ख भोगितो बहुत ।

परि सावधान नव्हे ॥५॥

परतोनि न पाहे धांवतो सैरा ।

करितो येरझारा संसारींच्या ।

ज्ञानदेव म्हणे बहुतां

जन्मांचा अभ्यासु ।

तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥६॥

५०७

दुजेपणाचा भावो वायां वाढविसी गव्हारा ।

उतराई या देहा कैसा होसील ।

दुजेपणें पाहसी तरि देहीं देवो पाही ।

सेखीं दुजेपणे नाहीं तूंची येकला रया ॥१॥

भ्रांति पडलिया मना नेणसी

सुख ब्रह्म चुकलासि वर्म अरे मुढा ॥२॥

ते कल्पिलिया नकळे गुरुकृपे वेगळें ।

वायांविण उगलें कां धांवतोसि सैरा ॥३॥

बापरखुमादेविवरुविठ्ठलु जन्मोजन्मीं

वोळगिला अससी तरि ते

खुण पावसी निभ्रांतरया ॥४॥

५०८

आउट हात आपुले आपण होतासी ।

येर तें सांडितासी कवणावरी ।

ऐसेंनि सांडिसी तरी

थोडें तें सांडी ।

कां सकळैक मांडी तेणें

सुखिया होसी रया ॥१॥

कळिकाळ ते आपण ।

प्रभा अनु कोण ।

करितां दीपें लाजिजे ।

घरामाजी घरकुल करुं पाहासी

तें दैन्यचि वाउगें येर

सकळैक तूं आहासी रया ॥२॥

पृथ्वी येवढा घडु लाघे यावा ।

मा गगन भरुं जावें अनाठायां ।

अस्ति नास्ति दोन्ही येकेचि पदीं ।

आकाशाची भरोवरी घटे

केविं कीजे रया ॥३॥

धावतां धावतां वेगें ।

तुजचि तूं आड रिगे पाय

खोंवितु खोंवितु मार्ग ठाके

काई जासलट ज्या वाही

त्याचि सवा पाहीं ।

वायां तूं हावे जासी रया ॥४॥

जागणेंन काय जन्मलासी निजेलेनि

निमालासी ।

स्वप्नें कय केलासि तडातोडी ।

ऐसा जाणत नेणत तेथींचा तेथें

आभासत असे तूंचि तूं भल तेथें रया ॥५॥

आपला आरोहणीं लाऊ पाहातोसि निशाणी ।

तरी सांगेन ते वाणी लाविजेसु ।

श्रीगुरुनिवृत्तिनाथा चरणकमळीं ।

पाखोवीण होय अलिया

म्हणे ज्ञानदेव ॥६॥

५०९

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु ।

नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥

कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत ।

मृगजळवत जाईल रया ॥२॥

विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली ।

अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥

ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें ।

स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥

५१०

स्वप्नींचा घाई विवळें साचें ।

चेईलिया वरी म्हणे मी न वाचें ॥१॥

जन कैसें माया भुलले ।

आपलें हित चुकले ॥२॥

आपींआप देखिलें ।

परतोन पाहे तों येकलें ॥३॥

आपींआप असे ।

मी काय जालोंसे लोकां पुसे ॥४॥

सकळहि शास्त्र पढिनले ।

नुगवेचि प्रपंची गुंतले

बापरखुमादेवीवरा विठठलें ।

कैसें गुरुमुखें खूणा उगविलें ॥५॥

५११

वहिलिया येईरे सौरभ्य घेऊनि जाईरे ।

तिया इया जिवित्वाच्या लाह्यारे भ्रमरा ॥१॥

सुमनाचे जीवन विरुळेविपाये ।

वियोगु जालिया केहीं न साहेरे भ्रमरा ॥२॥

येर सकळिक पाल्हाळरे ।

बापरखुमादेविवरु सुखाचें निधान

रे भ्रमरा ॥३॥

५१२

सुखाचिया गोठी आतां किती हो

करणें सुखें सुख अनुभवणें ऐसें करी ॥१॥

पढियंते बाईये गुणेविण हातां नये ।

साचेविण सये तेथें आवडी कैची ॥२॥

कैसेनि कीजे मनासी रक्षण ।

भावासी बंधन केवीं घडे ॥३॥

बापरखुमादेविवरुविठ्ठलुचि पुरे ।

सुखीं सुख मुरें ऐसें करी वो बाईये ॥४॥

५१३

त्रिभुवना परतें दाविसी दुरी ।

आधीं तूं आपुली शुध्दी करी ।

उदयो अस्तु कवणिये घरीं ।

पिंडा माझारीं सांग बापा ॥१॥

जाग्रतीमध्यें कवण जागत ।

सुषुप्ती मध्यें कवण निद्रिस्त ।

दोघे भ्रमलिया स्वप्न देखत ।

जीव कीं मन सांग पा रे ॥२॥

जाग्रति वरुन काढीं चेतना ।

सुषुप्ति मध्यें रिघता ज्ञाना ।

दोन्ही चेईलिया स्वप्ना ।

मग अनुवादती कवण ॥३॥

इंद्रीयें सूत्रें दारें दाटली ।

जागत होती तें काय झालीं ।

सांग पा कवणें ठाई लपालीं ।

मग मिळाली कवणे ठाई ॥४॥

शब्दातें नाइकती श्रवण ।

पहात पहात डोळे जाले हीन ।

नासाग्रीं ठेवूनियां सुमन ।

परि नेणिजे परिमळ ॥५॥

पाहेंपां येथें अनुवादु काईचा ।

मी माजी हरपली खुंट्ली वाचा ।

ज्ञानदेव ह्मणे सदगुरु साचा ।

अढळपदीं बैसविले ॥६॥

५१४

परियेसी गव्हारा सादर ।

कर्मे निर्वश झाले सगर ।

भिल्लें विंधिले शारंगधर ।

झाला पुरंदर सहस्त्र नयन ॥१॥

कर्मे मन्मथ झालासे राख ।

कर्मे चंद्रासि घडला दोष ।

कर्मे भार वाहती कुर्मशेष ।

कर्मे खरमुख ब्रह्मा देखा ॥२॥

कर्मे वासुकी लंके दिवटा ।

कर्मे हनुमंता उदरीं कांसोटा ।

कर्मे शुकदेव गर्भी कष्टा ।

पाताळवाटा बळी गेला ॥३॥

कर्मे दशरथ वियोगें मेला ।

कर्मे श्रीराम वनवासा गेला ।

कर्मे रावण क्षयो पावला ।

वियोग घडला सीतादेवी ॥४॥

कर्मे दुर्योधनादि रणीं नासले ।

कर्मे पांडव महापंथें गेले ।

कर्मे सिंधुजळ शोषिलें ।

नहुष जाला सर्प देखा ॥५॥

कर्मातें शंभु मानी आपण ।

किती पळसि कर्माभेण ।

बापरखुमादेविवरविठ्ठला शरण ।

केलीं कर्मे निवारी नारायण ॥६॥

५१५

वृंदावनीं वनमाळी ।

खेळे गोपींसी धुमाळी ।

मदनमेचुची नवाळी ।

रसाकाळीं मनोहर ॥१॥

तयाचे करी पा स्मरण ।

आळसु न करी अंत:करण ।

भीतरलीया सुमनपण ।

निहारण होईल ॥२॥

बरवेपणाचेनि मिसें देवातें

वाणि या सौरसे ।

जडत्त्व फ़िटेल तया सरिसें ।

रसनें ऐसें चुकों नको ॥३॥

तरी हा देवो तूं न्याहाळीपां ।

पिसाटपण फ़िटेल बापा ।

पावन होसी परमस्वरुपा ।

नेत्री ऐसा चुकों नको ॥४॥

वेगीं क्षेम देऊनिया निविजे ।

ऐसें दैव कैं लाहिजे ।

जरी तो ह्र्दयीं ध्याईजे ।

तै पाविजे अंगसुखा ॥५॥

मन भ्रमर येकी हेळा ।

झेपावे पदकमळा ।

बापरखुमादेविवरा विठ्ठला ।

होईल जवळा सौरसु ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP