मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|श्री दासगणु महाराजांची आख्याने|
श्री कबीर चरित्र १

श्री कबीर चरित्र १

श्रीसद्गुरू दासगणु महाराजांची कीर्तनाख्यानें हीं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, रसाळ आणि विविध काव्यगुणांनी संपन्न असून श्राव्य काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.


( भाग पहिला )

॥ श्लोक ( पृथ्वी ) ॥
महापुनित क्षेत्र तें कलियुगांत वाराणशी ।
तिथें वसत तो शिरीं विलसतो जयाच्या शशी ॥
अशा पुनित पट्टणीं यवनवंशिं जो जन्मला ।
कबीर म्हणती तया बुधशिरोमणी जो भला ॥१॥

॥ लावणी ॥ ( भला जन्म )
कबीरसम ती कबीरकांता जोड  न ज्या वधुवरां ।
जडावाच्या कोंदणीं जैसा हिरा ॥
शांत दांत नांदतीं उभयतां क्रोध न ये ज्यां जरा ।
जोडिला रामसखा सोयरा ॥
( चाल ) दारिद्र्य जयाला गांजित नानापरी ॥
ना मूठपस जोंधळे जयाच्या घरीं ॥
जेवण्या परळ मातीचि जला घागरी ॥
ऐशी विपत्ती कुठवर वानूं थकली माझी गिरा ।
कवन करि गणू सिनेच्या तिरा ॥२॥

॥ पद ॥ ( धोंडे पुजिता का )
कमाल नांवाचा । झाला पुत्र तयां साचा ॥
सद्भक्तीची कमाल केली सागर ज्ञानाचा ॥
कोश शांततेचा पुतळा प्रति वैराग्याचा ॥
रसना रतली अक्षय नामीं ध्यास राघवाचा ॥३॥

॥ आर्या ॥
ऐसे त्रिवर्ग साधू अणिमागरिमादि जोडिती हात ।
परि ना पर्वा ज्यां बा अधिदैवत राम जानकीनाथ ॥४॥

॥ ओवी ॥
मोमीनपणाचा व्यवहार । शेले विणीतसे कबीर ।
मागीं बैसतां साचार । भजन करी रामाचें ॥५॥

॥ श्लोक ॥
ज्ञानेश, सोपान, निवृत्तिनाथ ।
मुक्ता नि ते नामदेवादि भक्त ॥
काशीप्रती पातले एक वेळा ।
विश्वेश विश्वंभर वंदण्याला ॥६॥

॥ पद ॥ ( नृपममता )
घनदाट भरलि ती काशी । ना पडे संत दृष्टीसी । एकही ॥
ना कुणी विचारी त्यासी । जन लुब्ध बाह्य रंगासी । सर्वही ॥
( चाल ) ज्ञानेश, नाथ निवृत्ति उपाशीं फ़िरती, अचंबा करिती,
बघुन जगतासि । पावला रविं अस्तासी ॥तेधवां॥७॥

॥ ओवी ॥
तैं निवृत्तिनाथांनीं । पाहिलें समाधि लावुनी ॥
कीं या पुनीत पट्टणीं । कोण आहे हरिभक्त ॥८॥

॥ अभंग ॥
ऐसें कळलें तयांप्रत । येथें कबीर नामें भक्त ॥
चला जाऊं त्याचे घरीं । सेवुं प्रेमाची भाकरी ॥
जरी जातींचा यवन । परि आहे तो ब्राह्मण ॥
गणु म्हणे जातगोत । पहाती ना भगवद्भक्त ॥९॥

॥ श्लोक ॥
कबीराश्रमीं संतमांदी मिळाली । तयांनीं मुखें गर्जना थोर केली ॥
कबीरा ! अम्हां घालनें अन्न बापा ! । क्षुधेच्या झणीं वारि दु:सह्य तापा ॥

॥ ओवी ॥
कबिरें तें ऐकुन । केलें संतां साष्टांग नमन ।
गृहामाजीं आणून । सन्मानेंसी बैसवीले ॥११॥
घरांत येऊन कबीर बायकोस म्हणाले कीं -

॥ दिंडी ॥
शिधा संतांसी आज द्यावयातें । काय आहे गेहांत सांग कांते ! ॥
वदे साध्वी ‘ कांहीं न गृहामाजीं । कशी राखिल श्रीराम लाज आजी ? ’ ॥

॥ पद ( मित्रा मम जन्म ) ॥
सोडुं नको धीर परी जोडितें करा ।
जाउन मी येतें हाटीं गणूगंभिरा ॥
उसनवार वा उधार आणितें शिधा ।
संतसाधू यापरी न भेटती कदां ॥१३॥

॥ आर्या ॥
आज्ञा पतीची घेउन ती साध्वी शीघ्र पातली हाटीं ।
रक्षण तिचें कराया परमात्मा धांवला तिच्या पाठीं ॥१४॥

॥ अभंग ॥
जाउनिया दुकानासी । सती बोले हो प्रेमेंसी ॥
आठ दिवसांचा करार । मागे सामान उधार ॥
वाणी बोले हें ना घडे । काय घेऊं तुमचें पुढें ? ॥
तुम्ही भणंग भिकारी । जिते असून मेल्यापरी ॥१५॥

॥ ओवी ॥
परी पाहून तुजप्रती । दया उपजे मज चित्तीं ॥
मान माझ्या वचनाप्रती । दिधल्या देईन शिधा मी ॥१६॥

॥ लावणी ॥
तूं सगुण सुरुप सुंदरी कुणाची ग तरी ।
तुज पहातां ग मजला झाली, स्मरव्यथा हरी लौकरी ॥
नाहीं गोठपाटल्या करीं तुझ्या गडे, जरी ॥
किति गोंडस कर तव बाळे, नागीण जशीं का परी ॥
तुज देतों पैठणी जरीबुट्याचि ग खरी ।
हा टाकी घोंघडा वेडे ! तूं बांड नगरभिंगारी ॥
एक रात्र मशीं रति करी पलंगावरी ॥
मढवीन तुला सोन्यानें तूं धनिण येथली खरी ॥
वाचेनें वदुन यापरी अतुर अंतरीं ।
गेला होऊन वेडा वाणी, गणुदास कवन हें करी ॥१७॥

॥ पद ॥ ( मित्र मम )
ऐकुनिया वणिजवचन बोलली सती ।
आणुं नको पाप असें बा कदां चित्तीं ॥
या नादें नागवले लोक ना मित्ती ।
नाहिं बरा विषयछंद सूज्ञ सांगती ॥१८॥

॥ लावणी ॥
नको सांगुस मज या कथा किं भाकड वृथा ।
हा तरुणपणाचा वेडे ! न ये बहार पुन्हा मागुता ॥
मी वृक्ष, माधवी लता होय तूं आतां ।
मी चंद्र, रोहिणी तूं हे, ना करी अवज्ञा वृथा ॥
म्हणे होय, मजसिया हंसुन पाहीं ना रुसून ॥
शांतवूं पंचबाणाला, उभयतां पलंगीं बसून ॥
दारिद्रयपंकिं या फ़सुन नको राहुं बसून ।
तुज आली घडी ग सोन्याची, गमविं ना उगी ही रुसून ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP