यशवंतराय महाकाव्य - सर्ग पाचवा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


बंडाची बातमी ऐकून मुसलमान अमीर उमराव दिल्लिरखानास भेटण्याकरितां राजवाड्यांत जाण्यास निघतात - त्यांची वाटेंत झालेली दुर्दशा - राजवाड्याचें दर्शन - मुसलमानांनीं दिल्लिरखानाजवळ केलेलीं गार्‍हाणीं - त्याने केलेलें सांत्वन - दिल्लीच्या बादशाहाकडून आलेला हुकूम - कोटा शहरांतील लोकांचें बंड मोडण्यास बादशाहाचे हुकुमावरून मल्हारराव होळकर येणार - ही बातमी ऐकून मोंगलांस झालेला हर्ष - दिल्लिरखान यशवंतरायास बंडांतून फोडण्याचा निश्चय करितो.

श्लोक
कोटा या नगरिंतले समस्त पौर । त्या रात्रीं मसलत ती करीति थोर ॥
दिल्लीरालयिं दुसर्‍या दिनीं सकाळीं । म्लेच्छांची अभिमत मंडळी निघाली ॥१॥
सर्वांच्या प्रकट दिसून चेहर्‍यांत । ये चिंता सतत मनांत जी रहात ॥
जाती ते पथिं उमराव थोर काजी । वेगानें उडवित वायु - तुल्य वाजी ॥२॥
मार्गांत प्रळय उडे तयांसभोंतीं । पाषाण प्रचुर शिरावरून जाती ॥
जाऊनी अडविति पौर धांव घेती । संतापें बघति शिव्याहि शाप देती ॥३॥
तें झालें यवन जनां असह्य फार । कीं गेलें भरूनिच कर्दमें शरीर ॥
क्रोधानें चरफडतात ते मनांत । “ होवो हें शहर जळून सर्व फस्त ! ” ॥४॥
धिक्कारी गिरि - शिखरास तुंग -कायें । तो वाडा नयन - पथांत त्याचिया ये ॥
सोळा ज्याप्रत अति थोर चौक होती । दिल्लीरें सुखकर केलि ज्यांत वरती / वस्ती ॥५॥
कारंजी आणि जल - मंदिरें महाल । राजं - स्त्री - वसति - गृहें तशीं विशाल ॥
होते त्या विलसत खांब चंदनाचे । कित्येक स्थळिं बहु शोभिवंत साचे ॥६॥
स्तंभांती सुबक सुरूप सुप्रमाण । कोरील्या असति सुपुत्तली मधून ॥
त्यागाती निजति कितीक नाचताती । की त्या त्या स्थिति परिपूर्ण दाविताती ॥७॥
प्रत्येकी सुललित वापिका प्रकोष्ठीं । पुष्पांनीं नमित लता - समूह कांठीं ॥
तच्छाया पडति जळांत रम्य फार । दे शोभा विकसित आंत पद्म - भार ॥८॥
बर्फानें मढवुन काय शुभ्र केल्या । कीं चंद्रा पिळुन रसांत त्या भरील्या ! ॥
वाड्याच्या शिरिं वसतात हंस - कांटी । गच्च्या कीं जणु गगनीं उडूं पहाती ॥९॥
कीर्ती ज्या जनिं रजपूत - वंशिं केली । जे झाले महित जगांत पूर्व काळी ॥
तत्पुण्य - स्थिति - कृति - दर्शकें पवित्रें । हीं भिंतीवर दिसतात चित्र चित्रें ॥१०॥
मातीचा दृढ तट वर्तुलाकृतींत । होते त्यावरति बुरूजही अनंत ॥
वेष्टोनी तट परिखा - जल - प्रवाह । वाहे कीं जणु बहु थोर सर्प - देह ॥११॥
शेजारीं अरबलि घांट, दुर्ग, झाडी । कोटा, त्याजवळिल देश, दूर खेडो ॥
उद्यानें, सुर - सदनें हि राज - पंथ । प्रासादावरून समस्त दीसतात ॥१२॥
हा वाडा खरचुन संपदा अमूप । हौसेनें प्रथम रचीत पूर्व भूप ॥
गेले ते दिन ! नृपशूर तोहि गेला ! । म्लेच्छांनीं मग वसतीस योग्य केला ॥१३॥
ज्या स्थानीं बहु सुटले हुकूम जाया । शत्रूतें पळवुन कीर्ति लूट घ्याया ॥
होते जें स्थळ नृप - पाल भूशवीत । दिल्लीप - प्रतिनिधि आज राहि तेथ ॥१४॥
ज्या ठायीं बसुन बलाढ्य सिंह गर्जे । तो सिंह - ध्वनि भुवनांतरांत गाजे ॥
तो त्याचे कुलजहि जाति काळ चाले । त्या ठायीं वसति करीति आज कोल्हे ! ॥१५॥
दिल्लीर प्रतिदिनिं भीति बाळगीत । होता कीं, उठतिल पौर ते समस्त ॥
पाहोनी निवडक शूर वीर अंगें । रक्षाया गृह दिनरात्र त्यांस सांगे ॥१६॥
ते होते फिरतच पेटवून तोडा । स्वस्थानीं निशिदिन रक्षितात वाडा ॥
खङ्गातें उपसुन तीनशें प्रसिद्ध । द्वारीं ते बसति शिपाइ लोक सिद्ध ॥१७॥
निर्बंधाविण उमराव जाति आंत । स्व - स्वामि - प्रतिनिधि - शोध ते करीत ॥
दिल्लीर श्रवुन तदागम - प्रवेश । भेटाया त्वरित तयार चारुवेष ॥१८॥
“ आहे कीं सुख तुमच्या मुलां स्त्रियांतें । हें येवो प्रथम कळून शीघ्र मातें ” ॥
कीं वार्ता नव नगरामधें उदेली । ज्या योगें प्रकट तुम्हांत भीति झाली ॥१९॥
“ वार्ता ही भयकर दिल्लिरा उदारा । सांगाया तुज बघतों त्यजून धीरा ॥
कोट्याचे जन करितात बंड थोर । उत्तेजी भट यशवंत त्यांस शूर ॥२०॥
युद्धाची त्वरित तयारि होत आहे । क्रोधानें खवळुन लोक धुंद राहे ॥
या कैसी तजविज सांग ती अम्हातें । हें येतें व्यसन गृहा धना जिवातें ॥२१॥
ते निंदा करिति छळीति तापा देती । द्वेषातें उघडच पौर दाखवीती ॥
ही रात्रंदिन मनिं काळजी वहावी । योजोनि कवण उपाय शांति यावी ! ॥२२॥
राजाचा धरुनहि पक्ष हाल व्हावे । हें आम्हीं कुठवर दिल्लिरा सहावें ? ॥
जें प्रेम प्रकट अम्हांत हिंदु लोकीं । होतें तें दिसत नसे कुठे विलोकीं ॥२३॥
हे आहे अवगत आमुचे शिपाई । त्या दुष्टांसह करितील हातघाई ॥
अंगारीं शलभसमान मृत्यु - पंथा । जातील क्षण न तयांस झुंज देतां ॥२४॥
यासाठीं जरि करिसी न हा विचार । या वेळीं तरि घडतो अनर्थ घोर ॥
हे आतां सकळ लिहून पाठवावें । श्रीदिल्लीश्वर - चरणांस जाणवावें ॥२५॥
बंडाची कुणकुण चार पांच मास । ही होती विदित पुरामधें अम्हांस ॥
या पंथावरि गमलें न गोष्टि येती । यासाठीं धरिली न लेशमात्र भीती ” ॥२६॥
दिल्लीर स्वजन - मुखांतली सदुक्ती । ऐकून क्षण बसला उगा कुकीर्ती ॥
कल्लोळे उठति मनांत चित्त - वृत्ती । तो बोले मग लटकी धरून शांती ॥२७॥
“ सद्धर्म - प्रसर - परायणांस यावें । सद्भक्तां मरण हि काफरीं वधावें ।
देवाच्या जरि असलें असें मनांत । शांतीनें तरि मग या मरूं समस्त ॥२८॥
लोकांच्या हृदय - तलीं वितुष्ट राहे । हें चारी गत महिन्यांत पाहताहे ॥
मी झालों लवहिन संकटीं निराश । हें केलें सुविदित बादशाह यास ॥२९॥
शिक्षा मीं समुचित भूषणास केली । त्या योगें गडबड नागरीं उडाली ॥
झालों मी चकित लिहून त्याच रात्रीं । दिल्लीशा कळविलि ती समग्र पत्रीं ॥३०॥
‘ स्वामीच्या चरण - रजासमान दास । रक्षावें करून दया - सहाय यास ॥
हें नोहे तरि रजपूत गांठितात । भांडोनी नगर सदेश जिंकितात ’ ॥३१॥
ये साह्या जरि नृप - राज - राज - सेना । या आठा दिवशिं बहु प्रतीक्षमाणा ॥
बंडाचे प्रमुख धरून लोक मारूं । शत्रूतें निवटुनि संकटास वारूं ॥३२॥
आली ती नच तरि एक नीट पंथ । दिल्लीचा धरून पळूं सुटूं जिवंत ॥
त्यापूर्वीं जरि करितील शत्रु चाल । स्व - स्थानीं बसुन लढून नेउं काळ ” ॥३३॥
ऐसें जों वचन सुयुक्ति - सिद्धि बोले । वेगानें पळतच दूत आंत आले ॥
धापांनीं स्फुट वदनी फुटे न वाचा । सांगाया न शकति ही निरोप त्यांचा ॥३४॥
दिल्लीरें जंव पुशिलें तयांस काम । नम्रत्वें वदति करून ते सलाम ॥
“ त्वत्पदें बघुन विचार फार केला । भूपाळें तुजसिं हुकुम हा लिहीला ” ॥३५॥
हें कर्णामृत नृप - दूत - वाक्य ऐके । खानाच्या मुखिं हरिखें सुकांति फांके ॥
वंदोनी शिरिं धरि भूप - शासनातें । उत्कंठाकुल मग ऐकवी जनातें ॥३६॥
“ सद्धर्म - वर्धक रवि - प्रखर - प्रताप ।
दिल्लीश्वर क्षिति - तलावर एक भूप ॥
नैक - प्रसंग - रण - संहत - शत्रु - कीर्ति ।
आज्ञा निज प्रतिनिधीस अशी करीति ॥३७॥
एकत्र दुष्ट जन त्या नगरांत होती ।
राजाविरूद्ध अपराध करूं पहाती ॥
कोपास पात्र अमुच्या ह्मणुनीच झाले ।
येईल दंड करण्यांत तयांस काळें ॥३८॥
कोटा - पुरांतिल जनांप्रत दंडण्यास ।
लागेल काळ पडतील महाप्रयास ॥
सेना नसे जवळ आज तयार याया ।
तेथें प्रसंगि उपयोगिं तुम्हां पडाया ॥३९॥
जे शासितात नृप राजपुतानियास ।
या गादिचे म्हणति अंकित आपणास ॥
ते गर्व - मत्त करभार न देति काळीं ।
तद्दंडनीं म्हणुन बुद्धि अम्हांस झाली ॥४०॥
मल्हार होळकर थोर मराठियांत ।
जो आमुचा परम मित्र म्हणों मनांत ॥
त्या साठ लाख रूपये करितों बहाल ।
येईल तो त्वरित दूर करील हाल ॥४१॥
शत्रूंस धाडुन दिगंतर पाहण्यास ।
देईल शांति सुख तोच तया पुरास ॥
मार्गास मत्त नृप आणिल तोच वीर ।
प्रख्यात - शौर्य - बल घेउन सैन्य - भार ॥४२॥
तो येइ तों दिवस लोटति आठ चार ।
आधीं उठून जरि शत्रु करील मार ।
रक्षावया पुर तिथेच तुम्हीं रहावें ।
होईल यत्न तितुका मरुनी लढावें ॥४३॥
आटोपल्यावर तिथील समस्त काम ।
मल्हार होळकर वीर - शिरो - ललाम ॥
जाईल पश्चिम दिशे रजपूत - देशी ।
पाहील कोण करि भूप लढाइ कैसी ॥४४॥
ऐका अवश्य जरि कांहिं हुकूम सांगे ।
द्या जें अवश्य तृण - धान्य - धनादि मागे ॥
विश्वास त्याजवर पूर्ण तुम्हीं धरावा ।
अल्प - श्रमें व्यसन - वारि - निधी तरावा ” ॥४५॥
व्यक्तार्थ हा ऐकुन राज - लेख । गर्जोनि टाळ्या पिटितात लोक ॥
ईश - स्तवातें करितात भावें । अनंद त्यांचा गगनीं न मावे ॥४६॥
दिल्लीर बोले मग तो स्व - लोकां । “ नाहीं जिवाला किमपीहि धोका ॥
हे बंड थोड्या दिवसांत मोडे । दंडूं तदग्रेसर उग्र दंडें ॥४७॥
मल्हाररायास पुरांत घेऊं । त्या लागतें साह्य अवश्य देऊं ॥
ते दोहनादी यशवंत आणी । जातील फांशी चदुनी मरूनी ॥४८॥
परंतु तो येइल येथ तोंवरी । कसें रहावें सुखरूप या पुरीं ? ॥
न काय हल्ला करितील येउनी । पुरस्थ ? भीती उपजे पुन्हा मनीं ॥४९॥
अशा संकटीं एक युक्ती दिसून । मला येतसे ती पहावी करून ॥
बळी बंडवाले दहा ते हजार । तयां शांत ठेवूं करावा विचार ॥५०॥
साधा स्वभाव बहु वर्तन नम्र लोकीं ।
ज्याचें तयांत यशवंत असा विलोकीं ॥
आशांमधें परम दुस्तर जी धनाशा ।
तीनें तया वळवितों न घडो निराशा ॥५१॥
वळेल लोभें यशवंतराज । साधून घेऊं तरि कार्य आज ॥
मल्हार आल्यावर सूड साधूं । धरून त्यातें कपटेंचि बांधूं ” ॥५२॥
हत्तीतें कमलांतल्या मृदु अशा जो तंतुनीं बांधिता ।
झंझावात धरून एक समयीं जाळ्यामधे कोंडिता ॥
त्या मनी कमलात्मजास कुमती द्रव्यें विकाया बसे ।
प्राण - प्राण - परायणांस यवनां दिल्लीर बोले असें ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP