मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग पहिला यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग पहिला श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग पहिला Translation - भाषांतर इष्टदेवतानमन - उपोद्घात - कोटा-शहराचा इतिहास - दिलिरखानाचा जुलूम - भूषणसिंग - त्याची पत्नी - तिचा छळ व नाश - भूषणसिंगाचें धैर्याचें वर्तन - भूषणसिंग आपला मुलगा अभयसिंग व कन्या लीलावती यांस यशवंतरायाच्या स्वाधीन करितो - भूषणसिंगाचा मृत्यु - पठाणांने नीच कर्म - त्यांची व कोटा - शहरांतील लोकांची लढाई - दिलिरखान नागरिक लोकांची समजोत काढितो - भूषणसिंगाच्या वाड्याची दुर्दशा. श्लोक मी वंदितों तव पदांस भवानि माते ।दे सच्चरित्र - कथनास्तव बुद्धि मातें ॥हें मूल मंदमति यास करीं धरावें ।मार्गास लावुन सुधन्य तुवां करावें ॥१॥देवी ! भजून तुजला तरले मराठे ।दुर्वार्य तो स्व - रिपु - सैन्य - समुद्र वाटे ॥त्यांच्या कथा कथिन हा मम हेतु पूर्ण ।आलों तुला शरण मी मज पाव तूर्ण ॥२॥महेश - बंधु जन जे असतील मानी ।साधूं स्वदेश-हित जे झटती इमानी ॥औदार्य धैर्य गुण हे प्रिय ज्यांस होती ।घेवोत ते रसिक मत्कवितेस हातीं ॥३॥व्हावें स्वतंत्र. उदया निज राष्ट्र यावें ।सन्मान्य उच्च-पद ही स्व-जनीं वरावें ॥आचंद्र-सूर्य निज कीर्ति रहावि मागें ।ज्यांच्या प्रशस्त मनिं हेतु असाच वागे ॥४॥जे संकटीं स्थिर, असे व्रत ज्यांस साचें ।यत्नें निवारण करूं भय दुर्बलांचें ॥त्यांच्या कथा सुरस वर्णिन पद्य-रूप ।देवोत हर्ष रसिकांप्रत त्या अमूप ॥५॥वाहे जयाजवळ निर्मळ चंबळेचें ।पाणी तय अपिऊन बाग हजार वांचे ॥व्यापार लोकसमुदाय जिथील मोठा ।प्रख्यात तें नगर मालव - देशिं कोटा ॥६॥पन्नास कोसभर त्या नगरासभोंती ।आहेत गांव दृढ दुर्ग पुरें हि मोठीं ॥प्राचीन काळिं रजपूत नृपाळ होते ।येथील राज्य करिते बहु शूर होते ॥७॥सिंधूदका तरून वानर जेंवि आले ।लंकेस आक्रमुन नाशुन तुष्ट झाले ॥सिंधूदका तरून भारतवर्षिं धीट । येऊन मोंगल करीति तशीच लूट ॥८॥लाटा जशा उठति थोर महोदधीच्या ।स्वांर्या तशा बहु भयंकर मोंगलांच्या ॥येऊन आदळति या हतभाग्य देशीं ।कोणी निवारण करूं शकले न त्यांसी ॥९॥राज्यें अनेक विलयाप्रत मोंगलांनीं ।नेलीं अरींस जरि देउन थोर हानी ॥कोटापुरेश्वर तयांसह फार वर्षे ।झुंजोनि रक्षि निज देश बल - प्रकर्षे ॥१०॥विस्तीर्ण राष्ट्र तरि केवळ मोंगलांचें ।सैन्य प्रचंड जय जोडुन हात नाचे ॥त्याच्यापुढें चिमुकला रजपूत - देश ।तो राहिला अजित कीर्ति तया विशेष ॥११॥दिलीश्वर प्रबळ घेउन सैन्य आला ।एके प्रसंगिं सहसा करि थोर घाला ॥मेला तयासह लढून नृपाळ मानी ।केलें स्वहस्तगत हें पुर मोंगलांनीं ॥१२॥या प्रांतिं लोक अतिशूर महाभिमानी ।अद्यापि दृष्टि पडतील हठी इमानी ॥हे द्वेषितात परकीय जनां स्वभावें ।स्वातंत्र - रक्षण जिवाहुन यांस ठावें ॥१३॥सत्ता स्वकीय नगरामधिं चालवाया ।दुष्टांस दंडन यथासमयीं कराया ॥दिल्लीपति स्वजन दिल्लिरखान नेमी ।होता अयोग्य जरि थोर पदास कामी ॥१४॥तो दुष्ट न्याय बघुनी न कधींच वागे ।दावूं जनांस निज उग्र चरित्र लागे ॥झाला तिथे कहर कोण तयास सांगे ! ।मानी मनीं जळति सत्कुलवंत रागें ॥१५॥द्रव्य प्रजेजवळचें लुटण्यास यानें ।केले जुलूम भलते अधमाधमानें ॥मेले अनेक अपराध नसून लेश ।गेले किती पळुन सोडुन गांव देश ॥१६॥वेश्या तमासगिर नीच धनास पावे ।जाती सुशील मिळुनी धुळिला स्वभावें ॥त्यांच्या सभोंति हलका जन नित्य वाढे ।गेलें बुडोन पुर दुर्व्यसनांत गाढें ॥१७॥वेश्या - विलास - मदिरा - प्रिय नाच रंग ।वाड्यांत चालति तयांतच खान दंग ॥योजून युक्ति विविधा जमवी अनार्य ।जें वित्त तें खरचुनी करि हेंच कार्य ॥१८॥दावोनि मोह कुलवंत सती जनातें ।ओढी बळें प्रतिदिनीं किति दुष्पथातें ! ॥नेल्या स्त्रिया मुलि सुना किति चारुगात्री ! ।त्यानें स्वयें शिरून पौरगृहांत रात्रीं ॥१९॥आप्तेष्ट बंधु - गृह - वित्त - शिशु - स्त्रियांचा ।विश्वास न क्षणभरी हि वसे जिवाचा ॥ऐशा स्थितींत सुख लेश कसा असावा ! ।कोट्यामधें सुज्जन केंवि सुखें वसावा ! ॥२०॥हा खान जाय विलया कवण्या उपायें ? ।कैशी पुन्हा निजमना सुख शांतता ये ? ॥जाऊं कसे तरून या व्यसनोदधीतें ? ।हें चिंतिती नगर - वासि - जनांत मोठे ॥२१॥ज्या नांव भूषण असा जन एक कोणी ।होता सुखें वसत त्या नगरांत मानी ॥तो पूर्विंच्या नृप - कुलांतच जन्म पावे ।सन्मान देति रजपूत तया स्वभावें ॥२२॥त्याची प्रिया गुणवती अतिरम्य मूर्ती ।लक्ष्मीच काय गृहिं शोभलि त्याचिया ती ॥न्याया तिला धरून दाउदखान नामेम ।आला पठाण सरदार मदांध कामें ॥२३॥होती महालिं बसली सुदती सुखानें ।दोन्ही मुलें जवळ खेळति कौतुकानें ॥तों दुष्ट दाउद पठाण भटांसमेत ।घोड्यावरी बसुन गर्दि करीत येत ॥२४॥द्वारीं बळें घुसुन गर्जति “ दीन दीन ! " ।“ हाणा धरा ! ” म्हणति हालतसे जमीन ॥नाहीं पती निकट - संकट हें बघून ।साध्वी पडे महिस मूर्च्छित फार दीन ॥२५॥झालें विवर्ण मुख लोळति केश कीर्ण ।आक्रोश मांडिति मुलें भंवतीं बसून ॥ती या स्थितींत असतां उचलून नेली ।दुष्टें, तया न करूणा लव ही उदेली ॥२६॥साधावया निज मनोरथ कामुकांनी ।केली न कोणति अशी करणी खलांनीं ! ॥गेले परंतु उलथून बळी उदंड ।चाले अनाहत सती - जन - कोप - दंड ॥२७॥ती बापुडी बघुन या हरिणी वृकासी ।कांपे करी विनवण्या हि महाप्रयासीं ॥ऐकून त्या नच खळा करूणा शिवे त्या ।शापी सती करित नंतर आत्म-हत्या ॥२८॥“ अक्षय्य निर्मळ विवाह-भव प्रशस्त ।जो प्रेम-बंध वसतो मम मत्पतींत ॥त्यातें तुटातुट करूं छळुनी पहासी ।तस्मात्सबांधव सवंश लयास जासी ! ” ॥२९॥जेव्हां तिच्या पतिस वृत्त कळून आलें ।तो शोक फार करि दुःसह दुःख झालें ॥“ स्त्री-रत्न तूं सकल-सद्गुणरम्यखाणी ।नाहीं च लाभलिस कीं मजला शिराणी ! ॥३०॥संतोषवीत सुख देत जना स्वकीय ।सन्मार्ग - वर्तन तुझें भुवनीं अनिंद्य ॥नाहीं असें बघवलें नयनीं खळांतें ! ।ही दुर्दशा अशि घडे ह्मणुनीच तूतें ॥३१॥आतां मला न सुख-लेश जगीं मिळेल ।ध्यायास सूड मम देह सदा जळेल ॥साध्वी ! तुझें चरित निर्मळ मालवून ।शोकांधकारिं मज दाउद लोटि जाण ! ॥३२॥तत्कंठ - नाळ जरि मी न चिरीन आजी ।माता मला प्रसवली तरि व्यर्थ माझी ! ॥माझा हि जन्म रजपूत - कुळांत व्यर्थ ! ।होईन सिद्ध मरण्यास सखे ! त्वदर्थ ! ” ॥३३॥प्राचीन - भूप - कूल - तंतु जरी लहान ।साहेल काय खल - दत्त निजापमान ? ॥कोपें जळे स्थिर नसे मन एक ठायां ।तो शूर भूषण उठे मग सूड घ्याया ॥३४॥घेऊन मित्र मग गांठित दाउदास ।रात्री गृहांतरि शिरून जयी उदास ॥झाली चकामक भयंकर त्यांत मेला ।दाऊद, भूषण जयी स्वगृहास गेला ॥३५॥वृत्तांत हा कथित दाउद - सेवकांनीं ।कीं सर्पासाच उठला परिसून कानीं ॥आरक्त नेत्र करि चावुन ओंठ दांत ।कोपें जळे कुमति दिल्लिर तो अलोट ॥३६॥बोलावुनी जवळ पांच शर्ते पठाण ।आज्ञा तयांस करि निष्ठुर फार खान ॥“ जा. भूषणा त्वरित येथ धरून आणा ।हाणा. धरा. लुटुन घ्या. न भयास माना. ” ॥३७॥हें वृत्त ऐकुन न भूषण लेश भ्याला ।बोलावुनी जवळ नागरिकां ह्मणाला ॥“ बैसा तुम्हीं घरिं खुशाल असा समस्त ।न प्राण - हानि कवणाहि घडो मदर्थ ” ॥३८॥लीलावती अभयसिंग जयांस नांवें ।तीं बालकें बहुन भूषण दुःख पावे ॥मातापिता कवण होइल यांस आतां ? ।सांभाळ कोण जपुनी करि या अनाथां ? ॥३९॥तन्मित्र जो नगरिं त्या यशवंतराव ।होता धनाढ्य गुणवंत महाप्रभाव ॥त्या हांक मारून वदे “ सखया ! मुलांतें ।सांभाळ यां कर दया धर यांस हातें ॥४०॥हें जों घडे तंव पठाण समीप येती ।ज्यांतें स्मरून च मनीं रिपु घेति भीति ॥भ्याला न त्यांस रजपूत न मृत्युलाही ।द्वारीं हत्यार पडताळुन धीट राही ॥४१॥ विश्वासु सेवक सशस्त्र उभे सभोंती ।स्व - स्वामि - रक्षणिं लढून च जीव देती ॥लागून वार मग भूषण ही निमाला ।गेला असा सुजन शेवट घोर झाला ! ॥४२॥हर्षेंकरून मग गर्जति ‘ दीन दीन ! ’ ।वाड्यांत त्या शिरति मत्त जयें पठाण ॥फोडून तोडुन लुटून गृहास आग ।ते लविती धरिति थोर मनांत राग ॥४३॥होता जिवंत जंव भूषण त्या बघून ।होते भयें यवन घालित खालिं भान ॥आतां अचेतन बघून शरीर तेंच ।हे ओढिती फरफरा किति कर्म नीच ! ॥४४॥अत्यंत शोक - कर भूषण नागराची ।ही दुर्दशा बघुन सद्गुण - सागराची ॥आबालवृद्ध जन होति समस्त कष्टी ।उग्रस्वरें रडति वर्षति अश्रुवृष्टी ॥४५॥संतापती कितिक मानधनोग्रवीर्य ।आवेश एकदम त्यांत भरे अवार्य ॥जें सांपडे धरून तेंच हत्यार हातीं ।शें दोनशें प्रथम त्यांतुन धांव घेती ॥४६॥द्वेषाग्नि जो धुमसत प्रतिनागराच्या ।होता मनीम स्मरून दुष्कृति मोंगलांच्या ॥ती पेटला सहज आज तदा अनर्थ ।कोट्यांत होय करणार अनेक घात ॥४७॥तैं कांपले थरथरा भय - भीत भीरू ।विघ्नांतुनी म्हणति ईश्वर आजि तारू ॥आले गृहांतुन परी रणशूर वारूं ।शत्रूंस, बोलति “ मरूं परि आज मारूं ! ” ॥४८॥व्यापारि लाविति भयें सहसा दुकानें ।होणार काम पुढची स्थिति कोण जाणे ! ॥श्रीमंत ठेविति सुसेवक शस्त्र - पाणी ।द्वारीं, उभे सदन रक्षिति ते इमानी ॥४९॥स्त्री बोलली पतिस “ मार पठाण सारे ! ।साहित्य सांग करण्यास मला सख्यारे ! ॥बंदूक देइन भरून तुझी कट्यार ।आणीन. सांग. तुज काय रुचे हत्यार ? ” ॥५०॥हा रोध पाहुन हठा पडेल पठाण ।एकेक पाउल हि देति न ते जमीन ॥जावो न यांतिल जिवंत घरास एक ।या निश्चयें लढति ते रजपूत लोक ॥५१॥न्हाले रक्त - जलें भलें करूनियां झाले श्रमी भांडण ।धाले तोडुन हातपाय हृदयीं भ्याले न एक क्षण ॥अंगारीं तृणसे पठाण पडले भंगास ते पावुन ।दंगा ऐकुन दंग खान उठला संभ्रांत रंगांतुन ॥५२॥दंडाया मी पुर - जन हरी हेतु आतां धरीन ।ऐशा काळीं तरि निजकरें नाश माझा करीन ॥ऐसें आणी मनिं, विनवुनी धाडि तो पौर मागें ।रागें लोका परत अपुल्या खान जायास सांगे ॥५३॥स्मशानिं मग नेउनी सदय - भूषण - प्रेत ते ।मनांत अतिगौरवा धरुन जाहले जाळिते ॥“ असा पुरूष आपणांमधुन आज गेला दुर ! ” ।असें म्हणत तद्गुणां स्मरति लोक शोकातुर ॥५४॥होते पाहुणचार घेत जिथला सन्मार्ग - गामी जन ।दुःखी दीन अनाथ भूषण - करें पावून गेले धन ॥लक्ष्मी, सद्गुण, सद्विचार, सुख, सत्कांता जिथे नांदली ।होता भूषण भूषवीत भवना भूषाच भू - मंडलीं ॥५५॥अन्यायें अपराधहीन जन ही मृत्यू जिथे पावले ।त्यांचें रक्त पवित्र दुष्ट यवनीं कीं ज्या स्थळीं शिंपिलें ॥वाडा तो पडला परंतु तिथल्या खाणाखुणा राहती ।पांयांतें जन नागरीक अजुनी दुःखें करें दाविती ॥५६॥जे या जगीं सतत पापभया धरीती ।सन्मार्ग आचरिति दुःख परां न देती ॥या लोकिं त्यांस सुख शांति सदा मिळेल ।हें कोण भूषण - गती बघुनी म्हणेल ? ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP