रामदासांचे अभंग - १३१ ते १४०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग--१३१

दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधु रे राम दयासिंधु रे भिल्लटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेवलीं दासप्रमळें चरणीं उध्दरी दिव्य सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी वेदगर्भ जो शिव चिंतितो । वानरां रिसां गूज सांगतो राघवीं बिजें रावणानुजे । करुनि पावला निजराज्य जें पंकजाननें दैत्यभंजने । दास पाळिलें विश्वमोहनें

भावार्थ--

कमळासारखे मुख असलेला, राक्षसांचा विनाश करणाय्रा श्रीरामांना दीनबंधू, दयासिंधु असे संबोधून संत रामदास श्रीरामाची महती सांगत आहेत.  शबरीची उष्टी फळे, दासा वर प्रेम करणार्‍या भक्तवत्सल श्रीरामाने सेवन केली.  आपल्या चरणस्पर्शाने अत्यंत सुंदर अशा अहिल्येचा गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता करून उद्धार केला. रामचरणांचे नित्य चिंतन करतात अशा वानरसेनेशी श्रीराम हितगुज करतात. रावणबंधू बिभिषणावर कृपा करून श्री रामाने त्याला आपण जिंकलेले लंकेचे राज्य देऊन उपकृत केले.  असे विश्वाला मोहिनी घालणारे श्रीराम, दासांचे पालन करतात असे रामदास म्हणतात.

अभंग--१३२

धांव रे रामराया । किती अंत पाहसी प्राणांत मांडला कीं, । नये करुणा कैसी पाहीन धणीवरी । चरण झाडीन केशीं नयन शिणले बा । आतां केधवां येसी मीपण अहंकारें । अंगी भरला ताठा विषयकर्दमांत । लाज नाही लोळता चिळस उपजेना । ऐसे जालें बा आतां मारुतिस्कंधभागीं । शीघ्र बैसोनी यावें राघवें वैद्यराजे । कृपाऔषध द्यावें दयेच्या पद्महस्ता । माझे शिरीं ठेवावें या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा कौतुक पाहतोसी । काय जानकीकांता दयाळा दीनबंधो । भक्तवत्सला आतां

भावार्थ--

या अभंगात रामदास श्रीरामाला दयाळा, दीनबंधो भक्तवत्सला असे संबोधून धाव रे रामराया अशी विनवणी करीत आहेत.  मीपणाच्या अहंकाराने मनामध्ये गर्व निर्माण झाला, देहबुद्धीने विषयाच्या चिखलात लोळत असताना त्याची किळस वाटेनाशी झाली आहे. या संसारात अनेक व्यथा भोगाव्या लागत आहे. प्राणांतांच्या वेदना सहन कराव्या लागताहेत. वाट बघून नयन थकून गेले आहेत.  आपली हाक ऐकून करुणाघन राघवानें मारुतीच्या खांद्यावर बसून व त्वरेनें दर्शन द्यावे अशी विनंती करून संत रामदास म्हणतात की त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण धरणी वर लोळण घेऊन आपल्या केसांनी राम चरणधूळ झाडू. वैद्यराजे राघवाने दयेचा कमलकर मस्तकावर ठेवून कृपा औषध द्यावे व दासाला भव रोगातून मुक्त करावे.

अभंग--१३३

कंठत नाहीं सुटत नाहीं । पराधीनता भारी शोक सरेना धीर धरेना । अहंममता दु:खकारी दास म्हणे तो लोभें शिणतो । राघव हा अपहारी

भावार्थ--

संत रामदास म्हणतात की, दुःखकारी अहंमन्यता व अनावर लोभ याने आपण पराधीन बनलो आहोत.  ही पराधीनता सहन करवत नाही, सरत नाही व धीर धरवत नाही. केवळ दुःखाचे अपहरण करणारा राघवच यांतून सुटका करू शकतो.

अभंग--१३४

कल्याण करीं देवराया । जनहित विवरीं तळमळ तळमळ होत चि आहे । हे जन हातीं धरीं अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूंचि सांवरीं कठीण त्यावरि कठीण जालें । आतां न दिसे उरी कोठें जावें काय करावें । आरंभली बोहरी दास म्हणे आम्हीं केलें पावलों । दयेसि नाहीं सरी

भावार्थ--

या अभंगात रामदास रामरायाला जनहिताचा विचार करून त्यांचे कल्याण करण्यासाठी आळवीत आहेत. सतत चुकत जाणार्‍या अपराधी लोकांना मदत करण्याची विनंती करीत आहेत.  संत रामदास म्हणतात परिस्थिती अधिकाधिक कठीण बनत आहे.  कोठे जावे काय करावे हे कळेनासे झाले आहे.  जीवाची तळमळ होत आहे. म्हणून मदतीसाठी याचना करीत आहेत. राघवाने अज्ञानी लोकांना सावराव योग्य मार्ग दाखवावा कारण रामाच्या दयेची सर कशालाच येणार नाही.

अभंग--१३५

रामा हो जय रामा हो । पतितपावन पूर्णकामा हो नाथा हो दिनानाथा हो । तुमचे चरणीं राहो माथा हो बंधु हो दीन बंधु हो । रामदास म्हणे दयासिंधु हो

भावार्थ--

श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे पतितपावन आहेत.  ते दिनानाथ असून त्यांच्या पायावर आपण माथा ठेवत आहोत.  ते दीनबंधू, दया सिंधू आहेत.  त्यांचा जयजयकार असो.  अशी रामस्तुती संत रामदासांनी या अभंगात केली आहे.

अभंग--१३६

जिवींची जीवनकळा सहसा न धरी माइक माळा वो नादबिंदु कळा त्याहीवरती जिची लीळा वो तारी दीन जनांला शम विषम दु:खानळा वो हरी निर्भ्रममंडळा दावी निजात्मसुखसोहळा वो योग्यांची माउली ऐक्यपणेंविण वेगळी वो सर्वरुपी संचली पाहतां देहबुध्दि वेगळी वो नवचे हे वर्णिली परादि वाचा पारुषली वो अभिन्नभावें भली दासें नयनेविण देखिली वो

भावार्थ-- परमात्म्याशी एकरूप होण्याची कला शिकलेला भक्त गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून भक्तीचे खोटे प्रदर्शन करीत नाही.  नाद बिंदु कला लोकांच्या दुःखाचा अग्नी शांतवून दीनांचे रक्षण करते व भक्तांचा भ्रम घालूवून आत्मरुपाचा सुख सोहळा दाखवते.  त्याता एकपणा साधता न आल्यास योग्यांची माऊली वेगळी रहाते. योग्यांची माऊली सगळीकडे भरून राहिली आहे असा बोध होताच देहबुध्दी वेगळी होते या अनुभवाचे वर्णन केवळ परावाणीतच करणे शक्य आहे.  आत्म भावाने एकरूप झालेल्या रामदासांना रामरूप नयना शिवाय केवळ अंतर्दृष्टीने बघता आले असे रामदास म्हणतात.

अभंग--१३७

रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी नरापरिस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेले ज्यासी रघुराज । हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणाची वंदीन माती नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणे रघुनाथीं उपजेल प्रीती रामीरामदास म्हणे ऐका करु । यारे आम्ही तैसाचि भाव धरुं भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारु । तेणें आम्हां भेटेल रघुवीरु भावार्थ-- संत रामदास या अभंगात म्हणतात की नरापेक्षा वानर चांगले ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी रामाचे दर्शन घेतले ज्या वासरांवर श्रीरामाने विश्वास ठेवून त्यांच्याशी हितगुज केल, युद्धाच्या योजना आखल्या. कोणत्या भाग्याने त्यांना भगवंताच्या भेटीचा लाभ झाला असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात परमात्म्याशी भक्तिभावाने एकरूप झालेले वानर निच योनीतले असले तरी आपण त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून वंदन करू.  त्यांची स्तुती पर गीते गात राहू की ज्यामुळे रघुनाथाचे भक्तिप्रेम उपजेल.  रामदास शेवटी म्हणतात आपणही त्या वानरासारखा भक्तिभाव धरून भक्तिप्रेमाचा निर्धार करूं की ज्यामुळे आपल्याला श्रीरामाच्या भेटीचा प्रसाद मिळेल.

अभंग--१३८

पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णूं मी आतां काय गे नंद ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय रे क्षीरसागरवासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी ग अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे चोख्यामेळ्यासंगें जेवी । दहीदूध भात गे नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे रामदास प्रेमें गाय । नित्य त्याचा छंद गे

भावार्थ--

जो केवळ पूर्णब्रह्म म्हणून ओळखला जातो त्याचे वर्णन शब्दांनी करणे शक्य नाही. नंदराजा त्याचे पिता आणि यशोदा माता आहे तो क्षीरसागरात रहात असून प्रत्यक्ष लक्ष्मीच्या स्वामी असूनही अर्जुनाचा सारथी बनून त्याच्या घोड्यांचा खरारा करतो त्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही. जातीपातीचा कोणताही भेद भाव न करता तो केवळ अनाथांचा नाथ आहे. तो चोखामेळ्या सारख्या आपल्या आवडत्या भक्ताबरोबर दही दूध भाताचे जेवण करतो.  नंदाचा नंदन असून त्याच्या सर्व सुखाचा कंद आहे. संत रामदास म्हणतात आपणास त्याचा नित्य छंद असून त्याचे नाव आपण प्रेमाने गात असतो.

अभंग--१३९

वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुध्दि थोडी घडेना पारायण एका भावें भजावा नारायण । पुढें सहजचि सार्थकाचा क्षण दास म्हणे भजनपंथ सोपा । हळूहळू पावसी पद बापा कष्ट करुनी कायसा देसि धांपा । रामकृपेनें अनुभव सोपा

भावार्थ--

या अभंगात संत रामदास सांगतात की, भक्तिभावाने नारायणाचे भजन करावे त्यामुळे जीवनाचे सार्थक करणारा क्षण सहज येतो. भजन पंथ हा आचरणास अगदी सोपा आहे. या मार्गाने गेल्यास यथावकाश मुक्ती सहज प्राप्त होते.  असे म्हणतात बालवयात तीर्थयात्रा करणे शक्य नाही बुद्धी अल्प असल्याने धार्मिक ग्रंथांची पारायणे होऊ शकत नाहीत. या गोष्टींसाठी कष्ट करून मन व बुद्धी थकवण्यापेक्षा भजन मार्गाने गेल्यास राम कृपेचा सहजच अनुभव येतो.

अभंग--१४०

रामाची करणी । अशी ही पहा दशगुणें आवरणोदकीं । तारियली धरणी सुरवर पन्नग निर्मुनियां जग । नांदवी लोक तिन्ही रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसां तो तरणी सत्तामात्रें वर्षति जलधर । पीक पिके धरणी रामदास म्हणे आपण निर्गुण । नांदे ह्रदयभुवनीं

भावार्थ--

या अभंगात संत रामदास श्रीरामाचे महात्म्य वर्णन करीत आहेत.  समुद्राने वेढलेली धरणी श्रीरामाने तारली आहे.  देव, मानव, पन्नग यांची निर्मिती करून स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांचे पालन करीत आहेत.  रात्री चंद्र तारे व दिवसा सूर्य आपल्या तेजाने प्रकट करीत आहेत.  श्रीरामाच्या सत्तेने मेघ वर्षाव करतात व धरतीवर पिके पिकतात.  संत रामदास म्हणतात असा हा निर्गुण परमात्मा सर्वांच्या ह्रदयांत नांदत आहे.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP