मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड| अध्याय ११ वा काशी खंड प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा अध्याय ६५ वा अध्याय ६६ वा अध्याय ६७ वा अध्याय ६८ वा अध्याय ६९ वा अध्याय ७० वा अध्याय ७१ वा अध्याय ७२ वा अध्याय ७३ वा अध्याय ७४ वा अध्याय ७५ वा अध्याय ७६ वा अध्याय ७७ वा अध्याय ७८ वा अध्याय ७९ वा अध्याय ८० वा काशी खंड - अध्याय ११ वा स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे. Tags : kashikhandapothipuranकाशीखंडपुराणपोथी अध्याय ११ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ ॥ शिवशर्मा करीतसे प्रश्न ॥ स्वामी समूळ निरूपिला जी वरुण ॥ आतां पुढें क्रमितां कोण ॥ देखिला लोक स्वामिया ॥१॥विमान जातां ते विष्णुगण ॥ धर्मकथापरायण ॥ जे जे प्रश्न करी शिवशर्मा ब्राह्मण ॥ ते ते सांगत तयातें ॥२॥जें ऋषिवाक्य संस्कृत ॥ तें उघड कीजे सर्व जनांत ॥ जैसा अभ्रपटळीं शशी लेपित ॥ कवण देखे तयातें ॥३॥म्हणोनि भाषा केली मर्हाटी ॥ ते परिसा कर्मकाष्ठआगटी ॥ विमान चालतां व्योमकुटीं ॥ देखिला तो कवण लोक ॥४॥तंव विमानीं वदे शिवशर्मा ॥ एक पृच्छा असे जी गणोत्तमा ॥ जेणें महादुरितकर्मां ॥ होतसे पराभव ॥५॥ते गंगा तुमची वाणी ॥ अधरतटीं हेलावे रसनागुणीं ॥ तेणें उद्धरिजे श्रवणस्थानीं ॥ हेंचि मोठें सामर्थ्य ॥६॥आपणासी क्रमितां गगनोदरीं ॥ पुढीं दिसतसे कवण पुरी ॥ हे देखोनि माझे अंतरीं ॥ होतसे थोर आल्हाद ॥७॥ये स्थानीं सुगंधाची उत्पत्ती ॥ कवण येथींचा अधिपती ॥ हा लोक प्राप्त झाला याप्रती ॥ तें कवण पुण्य आचरला ॥ हा ॥८॥हा कवणाचा पुत्र ॥ यासी स्फुरला कवण मंत्र ॥ येणें आराधिला पंचवक्र ॥ तें कवण स्थान असे पैं ॥९॥गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ तूं बरा प्रश्न आम्हां केलासी ॥ तेणें थोर आनंद मानसीं ॥ होत असे आमुच्या ॥१०॥तरी हा लोक सांगूं तुजप्रती ॥ या लोकींचा मारुत असे अधिपती ॥ नगराचें नाम गंधवती ॥ हा तंव असे वायुलोक ॥११॥तरी या मारुताचें आदि अवसान ॥ शिवशर्म्या तुजं करूं निरूपण ॥ मग कथिते झाले विष्णुगण ॥ सुशील आणि पुण्यशील ॥१२॥आतां ब्राह्मणा अवधारीं ॥ हा पवन महापरोपकारी ॥ आणिक हा त्रैलोक्यामाझारी ॥ व्यापक असे ॥१३॥हा पवन परिमळें परम मंजुळ ॥ कीं अष्टगंधांचा पूर्ण गोळ ॥ उष्णकाळाचे ठायीं परम शीतळ ॥ परोपकारी जाणावा ॥१४॥अष्टगंधें अंगीं चर्चिलीं ॥ तीं पवनेंविण वृथा गेलीं ॥ उटीसी शोभा आणिली ॥ उष्णकाळीं या पवनें ॥१५॥सर्व सुगंधांचा परीक्षी ॥ सर्व जंतूंचा मृत्युसाक्षी ॥ याचेनि सर्व जीवांची ओळखी ॥ हा चिरंजीव असे सर्वदा ॥१६॥हा पवन जंव शरीरीं वर्तत ॥ तंव तो प्राणी म्हणावा सावचित्त ॥ हा नसे तरी पुरला अंत ॥ आयुष्याचा जाण पां ॥१७॥म्हणोनि हा मारुत केवळ ॥ सर्व आनंदाचें मूळ ॥ याजपासून सकळ ॥ विषयांचा उद्भव होतसे ॥१८॥चौर्यायशीं लक्ष जीवयोनी ॥ चिरंजीव असती यापासुनी ॥ यासारिखा परोपकारी म्हणोनी ॥ या त्रैलोक्यमंडळीं असेना ॥१९॥ज्या देवां प्रिय सुगंध जाती ॥ अतिउत्तम त्रिलोकीं असती ॥ त्यांची पवनापासाव उत्पत्ती ॥ झाली असे अवधारीं ॥२०॥तरी त्य सुगंधी कोण कोण ॥ ज्या चौखाणी असती व्यापून ॥ त्या सर्व श्रुत करूं जाण ॥ श्रवणीं श्रोतयांच्या ॥२१॥उद्भिजखाणीमाजी चंदन ॥ पुष्पयाती अनेक जाण ॥ धान्यामाजी मिष्ठान ॥ असे जें कां उत्तम ॥२२॥अंडजखाणीमध्यें राजहंस ॥ सुगधं असे अहींस ॥ अरुणउदया निःशेष ॥ प्रकाशद्दी सुगंधित असे ॥२३॥स्वेदजांमाजी परिमळ ॥ प्रतिस्थानीं आहे भूमंडळ ॥ आणि द्वीपांतरीं सुगंधजळ ॥ पृथक् पृथक् असे कीं ॥२४॥जारजखाणी सांगों आतां ॥ सुगंध असे मृगीं तत्त्वतां ॥ परी या समस्तांसी उद्भविता ॥ तो पवन असे एकचि ॥२५॥जैसें तें दधि मथितां ॥ निवाडा होतसे नवनीता ॥ तैसे सर्व सुगंध या मारुता- ॥ पासाव जाण उद्भवती ॥२६॥म्हणोनि परोपकारासी ॥ वायु उपयोगा आणीतसे यांसी ॥ तरी या वायूची उत्पत्ति कैसी ॥ ते परिसावी द्विजोत्तमा ॥२७॥अगस्तिऋषी करीतसे कथन ॥ परिसे लोपामुद्रा सगुण ॥ या वायूचें मूळ उत्पत्तिकथन ॥ तें कैसें अवधारीं ॥२८॥आतां विंध्याद्रिगिरीचे पाठारीं जाण ॥ ब्रह्मन्यानें केलें अनुष्ठान ॥ सृष्टी करावया उत्पन्न ॥ चंडवात प्रगटला ॥२९॥विधीनें मानसध्यान आरंभिलें ॥ नेत्रीं जीवन प्राप्त झालें ॥ तेंचि सरोवरासी नाम ठेविलें ॥ मानस सरोवर ऐसें ॥३०॥मानस सरोवर म्हणिजे कैसें ॥ त्यासी उपमा दीजे आकाशें ॥ पूर्ण जीवनें आथिलें तैसें ॥ तोचि शरय़ूचा उगमू ॥३१॥त्या सरोवरीं हेमकुमुदिनी ॥ जैशा त्या व्योमींच्या सौदामिनी ॥ त्यामाजीं कमळांची दाटणी ॥ तेजें जैसीं नक्षत्रें ॥३२॥ऐशा त्या हेमकुमुदिनी जाण ॥ विरिंचीनें केल्या निर्माण ॥ त्यांवरी भ्रमर क्रीडती जाण ॥ हारी बैसल्या हंसांच्या ॥३३॥ऐशा त्या पुण्यसरोवरीं ॥ कमळीं क्रीडती मुक्ताहारी ॥ तें सरोवर विंध्याद्रिपाठारीं ॥ असे रम्य जाण पां ॥३४॥त्याची महिमा जाणोनि ऐसी ॥ तेथें आला दुर्वासऋषी ॥ स्नानविधि सारोनि वेगेंसीं ॥ अवलोकी तें सरोवर ॥३५॥तंव देखे हेमकुमुदिनी ॥ मग दुर्वासा योजीतसे मनीं ॥ म्हणे हे कमळमाळा गुंफोनी ॥ उचित द्यावी वज्रधरा ॥३६॥मग दुर्वासें त्या कमळांची ॥ माळा गुंफिली थोर युक्तीची ॥ तयासी पद्मपत्रांची ॥ गवसणी केली तत्काळ ॥३७॥तेणें कळिका घेऊनि अपार ॥ तेथूनि निघाला ऋषीश्वर ॥ स्वर्गमंडळ क्रमितां अमरपुर ॥ पावला तो दुर्वास ॥३८॥तंव सिंहासनीं बैसला वज्रधर ॥ जो अदितिकश्यपांचा पुत्र ॥ त्या सुरसभेसी गेला मुनीश्वर ॥ दुर्वासऋषी जाण पां ॥३९॥बैसले दिक्पती देवगण ॥ नृत्यांगनांचें होतसे नर्तन ॥ आणि अप्सरा-गंधर्वांचें गायन ॥ होत निरंतर आनंदें ॥४०॥दुर्वासा देखोनि वज्रधर ॥ प्रेमें सन्मानूनि ऋषीश्वर ॥ मग करिता झाला थोर आदर ॥ दुर्वासाप्रती तेधवां ॥४१॥मग दुर्वासानें इंद्राजवळ ॥ पुढें ठेविली कमळमाळ ॥ होते जे सभेसी देव सकळ ॥ पुष्पें दिधलीं तयांसी ॥४२॥मग काय करी तो सुरपती ॥ वहन आणूनि ऐरावती ॥ मग ते कमळमाळा दिव्यदीप्ती ॥ घातली कंठीं गजाचिया ॥४३॥मग विचारिती देवगण ॥ भृत्यांकरवीं आणविती आपुलीं वहन ॥ मग तीं अर्पिती सुमन ॥ आपुलाले वहनांसी ॥४४॥ऐसें देखोनि दुर्वासा ॥ म्हणे उचिता अपमान झाला ऐसा ॥ मग ऋषि म्हणे देवाधीशा ॥ सहस्त्रनयना तेधवां ॥४५॥ऐरावतकंठीं घातली तुवां माळ ॥ तैसेचि वर्तले देव सकळ ॥ कैसें उत्तम झालें तुझें मौळ ॥ दिव्य कमळांपरी ॥४६॥म्हणे रे गर्विष्ठा सुरपती ॥ तुवां निर्भर्त्सिलें आमुच्या उचितीं ॥ हीं दिव्यकमळें पशूंप्रती ॥ प्राप्त कैंचीं सर्वथा ॥४७॥यांचा भोक्ता तो केवळ ॥ विष्णु ज्याच्या कंठीं वैजयंतीमाळ ॥ दर्दुर आला पद्मिनीजवळ ॥ तो केवीं जाणे गुणातें ॥४८॥या कमळीं क्रीडती राजहंस ॥ जयांसी दिव्यमुक्तांचे ग्रास ॥ तेथींचें सुख वायस ॥ केवीं जाणती सांग पां ॥४९॥रत्नजडित श्रृंगार रासभासी ॥ कीं मृगमद चर्चिला सूकरासी ॥ कीं दर्पण दावितां निर्नासिकासी ॥ उपजे खेद तयातें ॥५०॥ऐसी हीं कमळें दिव्यदंडीं ॥ इंद्रा न शोभती तुझ्या मुंडीं ॥ रणशौर्याविरहित शस्त्रें खंडी ॥ मशक केवीं जाणे तो ॥५१॥मग दुर्वास उठिला तेथूनी ॥ ह्रदयीं प्रज्वळिला क्रोधाग्नी ॥ म्हणे म्यां केवीं आणिला चिंतामणी ॥ पशुवालागीं मूर्खत्वें ॥५२॥मग दुर्वासें शापिलें त्यासी ॥ चतुर्दश रत्नें कायसी तुजसी ॥ सुंदर स्रिया जाण षंढासी ॥ प्राप्त होऊनि वृथाचि ॥५३॥माझें उचिताचें त्वां केलें निर्भर्त्सन ॥ आतां घेईं माझें शापदान ॥ तुझे घरींचीं चतुर्दश रत्नें पूर्ण ॥ गळतील जाण सागरीं ॥५४॥तंव सभेंत झाला हाहाकार ॥ शाप वदला तो ऋषीश्वर ॥ थोर गजबजिला वज्रधर ॥ महावातें वृक्ष जैसा ॥५५॥तंव धांवलें देववर ॥ त्यांहीं प्रार्थिला मुनिवर ॥ म्हणती उश्शाप मागे वज्रधर ॥ रत्नांविण अशोभ हा ॥५६॥मग समस्त सुरगणीं ॥ प्रार्थूनि तोषविला मुनी ॥ मग उश्शाप वदला वदनीं ॥ दुर्वास ऋषी तो ॥५७॥सिंधूसी करा रे कुरवंडी ॥ मंदराचळाची करा रविदांडी ॥ काद्रवेयाची करा दोरपरवडी ॥ विष्णु रविस्तंभ ॥५८॥माथां बैसेल त्रिपुरारी ॥ मग मथावा सुरासुरीं ॥ आपुल्या स्वार्थालागीं आदरीं ॥ रत्नें निघतील सुरेख ॥५९॥ऐसा उश्शाप बोलोनी ॥ मग क्रमिता झाला तेथुनी ॥ तंव रत्नें गेलीं गळूनी । सागरामाजीं ॥६०॥तीं रत्नें चतुर्दश कवणें ॥ निर्मिलीं शिवाचिया वहनें ॥ तीं रत्नजन्में संपूर्णें ॥ कथूं आदरें श्रोतयांसी ॥६१॥लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक ॥ धन्वंतरी कामधेनु मयंक ॥ रंबा अप्सरा देवदत्तशंख ॥ हालाहल पीयूष जें ॥६२॥ऐरावत गज होता घरीं ॥ शुभ्र जैसा घडिला काश्मीरीं ॥ सुरो जे सर्व मोहकरी ॥ ऐसीं रत्नें चतुर्दश ॥६४॥सागरीं गळालिया संपूर्ण ॥ विस्मित झाला सहस्त्रनयन ॥ ऐसे संवत्सर क्रमिले पूर्ण ॥ शत एक परियेसा ॥६५॥मग पाचारिला देवगुरु ॥ त्यासी विज्ञापना करी सुरेश्वरू ॥ म्हणे मी राज्यभ्रष्ट निर्धारू ॥ रत्नांविरहित सर्वदा ॥६६॥मग तो देवगुरु वेगेंसीं ॥ क्रमिता झाला सत्यलोकासी ॥ तेथें अभिवंदोनि विधीसी ॥ प्रार्थिता जाहला ॥६७॥गुरु म्हणे गा विरींचिनाथा ॥ इंद्रासी रत्नयोगाची व्यथा ॥ तरी उपाय देखावा समर्था ॥ विधि स्वामी आपण ॥६८॥मग तो बोलिला सृष्टिकर ॥ आतां प्रार्थावा शार्ङ्गधर ॥ मग विधि देवगुरु सुरेश्वर ॥ क्रमिते झाले वैकुंठभुवन ॥६९॥तेथें प्रार्थिते झाले मुरारी ॥ विरिंची म्हणे हो चक्रधारी ॥ चतुर्दश रत्नें सागरीं ॥ गळालीं ऋषिशापें ॥७०॥मग विष्णु म्हणे सृष्टिकरा ॥ आतां प्रार्थावें त्रिशूलधरा ॥ मग विरिंची हरिसहित शिवपुरा ॥ येते झाले तेधवां ॥७१॥त्यांहीं शिवासी कथिला विचारू ॥ तत्काळ सज्जिला नंदिकेश्वरू ॥ मग त्रिदेव आणि इंद्र गुरू ॥ आले जाण अमरावतीसी ॥७२॥अमरावतिये आला शंकर ॥ त्रिदेवीं स्थापिला एक विचार ॥ मथनीं योजिला नंदीश्वर ॥ हाहाकार झाला त्रिभुवनीं ॥७३॥सर्व गणेंसीं आला शंकर ॥ ज्याचें वहन नंदिकेश्वर ॥ विष्णुगणेंसीं गार्ङ्गधर ॥ आला गरुडवाहनें ॥७४॥हंसवहनीं आला सृष्टिकर ॥ दिक्पतींसहित आला वज्रधर ॥ ते कोण कोण मेळिकार ॥ करूनि आले साक्षेपें ॥७५॥पूर्वेंचा तो सहस्त्रनयन ॥ जयाचें ऐरावत वाहन ॥ अग्निदिशेचा आला कृशान ॥ मेंढयावरी आरूढ ॥७६॥यम आला महिषवाहनीं ॥ नैऋत्य सूकर पालाणुनी ॥ मगरावरी आरूढोनी ॥ वरुण आला तेधवां ॥७७॥वायव्यदिशेचा समीर ॥ मृगारूढ आला सत्वर ॥ नरवाहनीं कुबेर ॥ उत्तरेचा अधिपती ॥७८॥ईशानीचा आला ईश्वर ॥ पालाणोनि नंदिकेश्वर ॥ एवं दिक्पाळ समग्र ॥ वाहनीं बैसोनि चालिले ॥७९॥वाजिवाहनें आला देवगुरू ॥ मृगवहनीं आला शीतकरू ॥ एवं ग्रह पाचारिले शुभकरू ॥ ते कवण कवण सांगा जी ॥८०॥सोम सूर्य बुध शुक्र बृहस्पती ॥ हे आले पुण्यकीर्ती ॥ शनि मंगळ राहु केतु मूर्ती ॥ हे क्रूरे पापग्रह जाणावे ॥८१॥ऐसे तेहेतीस कोटी देव आले ॥ मग विरिंची राहूसि बोले ॥ तूं दैत्य पाचारीं वहिले ॥ जे कां पाताळपुटींचे ॥८२॥ मग राहुनें केला हाकारा ॥ तेथें झालें महाअसुरां ॥ संख्या नाहीं त्या दैत्यभारा ॥ आले कुलाचल जैसे कां ॥८३॥ऐसें मीनलें देवदैत्यकुळ ॥ भरें दडपलें भूमंडळ ॥ सप्त पाताळपुटें सकळ ॥ होऊं पाहाती एकवट ॥८४॥नामें सांगतां दैत्यकुळांचीं ॥ साठ कोटी संख्या त्यांची ॥ दक्षदुहिता माता जयांची ॥ दितिनामें कश्यपकांता ॥८५॥तेहतीस कोटी देवजननी ॥ ते अदिति नामें दक्षनंदिनी ॥ ह्या साक्षात उभयतां भमिनी ॥ प्रसवल्या देवदैत्यांतें ॥८६॥ऐसे मिळाले देव असुर ॥ अवघें कश्यपाचे कुमर ॥ तेरा स्त्रियांपासाव विस्तार ॥ सर्व सृष्टी जाण ही ॥८७॥ऐसीं मिळालीं दोनी कुळें ॥ अवघे आले आपुल्या मेळें ॥ वेगळाले पडिले पाळे ॥ देवदैत्यांचे ते ठायीं ॥८८॥चौसष्ट कोटी शिवगण ॥ महाबलिष्ठ दारुण ॥ संख्या चोवीस सहस्त्र योजनें ॥ तिंहीं रोधिली भूमिका ॥८९॥दहा कोटी संख्या विष्णुदूतीं ॥ रोधिली बारा सहस्त्र योजनें क्षिती ॥ ऐसा आपुले मेळीं लक्ष्मीपती ॥ वेगळाचि उतरला ॥९०॥सप्त कोटी ब्रह्मदेवाचा परिवार ॥ तो वेगळाचि पाळा सृष्टिकर ॥ तपस्वियांवांचूनि महावीर ॥ असेना ते ठायीं ॥९१॥त्यांहीं नव सहस्त्र भूमि रोधिली ॥ तंव कृतांताचीं सैन्यें आलीं ॥ चतुर्दश कोटी संख्या झाली ॥ तो पाळा किती योजनें ॥९२॥अठठयायशीं सहस्त्र योजनें क्षिती । इतुकी रोधिली यमदूतीं ॥ तेहतीस कोटी देवेंसीं सुरपती ॥ बाहेरी आला साक्षेपें ॥९३॥आणिक संख्या जरी सांगतां ॥ तरी ग्रंथासी होय विस्तीर्णता ॥ पुढें देवांसी जाणें असे पर्वता ॥ मंदराचळासी ॥९४॥मग बृहस्पति देवगुरू ॥ इंद्र पद्मताभ सृष्टिकंरू ॥ शिवासी पुसावया विचारू ॥ आले वेगें त्या ठायीं ॥९५॥साष्टांगें वंदिला त्रिपुरारी ॥ आज्ञा मागती विरिंचि हरी ॥ तंव शिवाजवळी मेळिकारीं ॥ राहु आला महादैत्य ॥९६॥ राहु म्हणे जी भवानीकांता ॥ आम्हांसी हांकारिलें कोण्या निमित्ता ॥ तंव बोलिला सृष्टिकर्ता ॥ विरिंचि राहूसी ॥९७॥सैन्य साठ कोटी महाअसुर ॥ इतुका राहूचा परिवार ॥ ऐशीं सहस्त्र योजनें अपार ॥ पाळा पडे राहूचा ॥९८॥सिंधुमथनाचें कारण ॥ काढावया चतुर्दश रत्न ॥ तीं समस्त विभागून ॥ देऊं देव-दैत्यांसी ॥९९॥मग राहु म्हणे ब्रह्मयासी ॥ जें रत्न बहु प्रिय आम्हांसी ॥ तें प्राप्त होईल तरी मथनासी ॥ येऊं आम्ही ॥१००॥नाहीं तरी निष्कारण ॥ आम्ही न करूं सिंधुमथन ॥ विधि म्हणे रे रत्न तें कवण ॥ अंगीकाराल सांगा तें ॥१०१॥तंव तो वदे राहु दैत्य ॥ आम्हांसी रत्न दीजे अमृत ॥ तयावांचोनि निश्चित ॥ आन रत्न नलगे आम्हांसी ॥१०२॥तथास्तु म्हणे सृष्टिकर ॥ तुम्हां प्रिय त्याचा करा अंगिकार ॥ मग आज्ञा करी शंकर ॥ आणा रे पर्वत वेगेंसीं ॥१०३॥तंव त्या क्षीराब्धीच्या तीरीं ॥ पर्वत असे मंडरगिरी ॥ तो आणावया गेला वज्रधारी ॥ देवांसमवेत ॥१०४॥मग समस्त देवअसुरीं ॥ उत्पाटिला तो मंदिरगिरी ॥ मग गिरि म्हणे न्यावया वैरी ॥ कैंचा आला अमरेश ॥१०५॥आम्ही आलों असों तपाप्रती ॥ शिवपूजनें आम्हां नाहीं तृप्ती ॥ कैसा हा तपस्वियां सुरपती ॥ देखों न लाहे सर्वथा ॥१०६॥ऐसें जंव विचारी तो गिरी ॥ तंव तो उत्पाटिला महाअसुरीं ॥ तेहतीस कोटी बलात्कारीं ॥ आणिला देवीं जवळिकें ॥१०७॥मागीं आणितां तो गिरिवर ॥ भारें दाटले देवअसुर ॥ मग खेदें क्षीण होऊनि फार ॥ गिरि टाकिला मार्गीं तो ॥१०८॥समस्त देवां उपजला खेद ॥ त्यांच्या सर्वांगीं उठला स्वेद ॥ शक्ति सांडूनि गोविंद ॥ स्मरते जाहाले ॥१०९॥खेद पावला तो वज्रधर ॥ म्हणे राहिला मथनें सागर ॥ आतां या पर्वताचा भार ॥ कवण नेऊं शके पैं ॥११०॥पांच लक्ष योजनें उंची ज्याची ॥ तीन लक्ष योजनें रुंदी त्याची ॥ महत्तरता पाहतां गिरीची ॥ न चले बळ न्यावया ॥१११तो दुसरा महामेरु ॥ पदमात्र न चले गिरिवरु ॥ हरि विचारी म्हणे कां उशीरु ॥ लाविला त्या वज्रधरें ॥११२॥मग विचारिलें नारायणें ॥ गरुड पक्षियासह केलें धांवणें ॥ तंव देखिले सुरेंद्रगण ॥ अशक्त तेथें ॥११३॥मग काय करी मुरारी ॥ पर्वत कवळी चहू करीं ॥ तो घातला गरुडपृष्ठीवरी ॥ आणिता झाला शार्ड्गधर ॥११४॥जयाचे उदरीं चतुर्दशभुवन ॥ तो गरुडपृष्ठीवरी आरोढून ॥ पुढें पर्वत राखिला धरून ॥ वृक्षफळाचियापरी ॥११५॥ऐसें देखोनि वज्रधर ॥ स्तविता झाला शार्ङ्गधर ॥ म्हणे स्वामी या गरुडबळाचा पार ॥ अगम्य आम्हां भासतो ॥११६॥कवण जाणे शार्ङ्गधरा ॥ आश्चर्य वर्तलें सुरां असुरां ॥ पर्वत आणिला एकसरां ॥ सिद्धाश्रमासी सत्वर ॥११७॥आतां पर्वत घालूनि सागरीं ॥ मथिजे मिळूनि सुरासुरीं ॥ आतां मथन मांडलें सागरीं ॥ ते कथा पुढारी परिसिजे ॥११८॥शिवदास गोमा म्हणे श्रोतां ॥ कथेसी द्यावी सादरता ॥ परिसा मंथनाची कथा ॥ सावधान चित्तें ॥११९॥इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे समुद्रमथनवर्णनं नाम एकादशाध्यायः ॥११॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ ॥ इति एकादशाध्यायः समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : September 27, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP