वारांची गीते - भजनांचा उपसंहार

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ समर्थ निर्याण अभंग ॥१॥ आज्ञेप्रमाणें परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥
आतां एकचि मागणें । कृपा करू-नियां देणें ॥३॥
ज्याची दर्शनाची आशा । त्याची पुरवावी इच्छा ॥४॥
ऐक सखया वचन । त्याशीं देईन दर्शन ॥५॥
तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील जो साचा ॥६॥
गणना होतां तेरा कोटी । त्यासी भेटेल जगजेठी ॥७॥
भय न धरावें मनीं । बहु बोलिलों म्हणुनी ॥८॥
नलगे आसगें आसनीं बैसावें । नलगे अन्नही त्यागावें ॥९॥
येतां जातां धंदा करितां । जप संख्या मात्र होतां ॥१०॥
तेरा कोटी गणना तेची । पापें निरसती जन्मां-तरिंचीं ॥११॥
त्यासी देईन दर्शन । तात्काळचि मुक्त होणें ॥१२॥
ऐसा वर होतां जाण । दास झाला सुखसंपन्न ॥१३॥

॥ अभंग ॥२॥ उतावेळ चित्त भेटीची आरत । पुरवी मनोरथ मायबापा ॥१॥
रात्रंदिस मज लागलासे सोस । भेटी द्यावी असे उच्चाट हा ॥२॥
पराधीन जिणें नको करूं रामा । नेई निजधामा आपुलीया ॥३॥
तुजवीण रामा मज कोण आहे । विचारूनि पाहें मायबापा ॥४॥
रामीं रामदास बहु निर्बुजला । मीतूंपणा ठेला बोळवूनी ॥५॥

॥ अभंग ॥३॥ माझा देह तुजदेखत पडावा । आवडी हे जीवा फार होती ॥१॥
फार होती परी पुरली पाहतां । चारी देह आतां हारपले ॥२॥
हारपले माझे सत्य चारी देह । आतां नि:संदेह देहातीत ॥३॥
नि:संदेह झालों देवा देखतांचि । चिंतिलें आतांचि सिद्ध झालें ॥४॥
सिद्ध झालें माझे मनीचें कल्पिलें । दास म्हणे आलें प्रत्ययासी ॥५॥


॥ अभंग ॥४॥ जन्मोनियां तुज भयों याच बुद्धीं । प्राणत्यागसंधि सांभाळीशी ॥१॥
उचीत न चुके अचिंत्य श्रीरामा । स्वस्वरूपीं आम्हां ठाव देई ॥२॥
जन्मवरी तूज धरिलें हदयीं । आतां या समयीं पावे तूं बा ॥३॥
निष्काम ती तूज सेवायाची आशा । अंतीं रामदासा सांभाळावेम ॥४॥

॥ अभंग ॥५॥ अपराधी अपराधी । आम्हां नाहीं दृढबुद्धि ॥१॥
माझे अन्याय अगणीत । कोण करील गणीत ॥२॥
मज सर्वस्वें पाळावें । प्रतीतीनें सांभाळावें ॥३॥
माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं ॥४॥

॥ अभंग ॥ सज्जनगडनिवासी माझे रामदास माये ॥ नंतर सर्वांनीं प्रदक्षिणा करून यथाशक्ति करण्याचें भजन ॥ जयजय राम राम राम ॥ सीताराम राम राम ॥

॥ आरती ॥ जयदेव जयदेव आत्मया रामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ जय० ॥१॥
नाना देहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रुप साजे । नाना तीर्थीं क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे ॥ धृ० ॥२॥
बहुरूपी बहुगूणी बहुता काळाचा । हरिकर ब्रह्मादिक देव सकळांचा । युगानयुगीं आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥३॥ जय० ॥
कायेन वाचा मनसा इत्यादि पासून जयजयकार केल्यावर महारुद्र हनुमाननकी जय म्हणून बसावें व प्रार्थनेचे श्लोक म्हणावे ते:-

॥ श्लोक ॥ दु:खानळें मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं । आधार तूझा बहू मी विदेशी । श्रीरामराया कधिं भेट देशी ॥१॥
प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामी समर्थासि वियोग झाला । तेणें बहू खेद वाटे जिवासी । श्रीरामराया० ॥२॥
तुझिया वियोगें बहू वेदना रे । विवेक नाहीं आम्हां दिना रे । पडिला समंधया दुर्जनासी । श्रीरामराया० ॥३॥
संसारचिंता मज वाटती रे । रामा प्रपंचीं मन जातसे रे । संसर्ग आहे इतरां जनांसी । श्रीरामराया० ॥४॥

॥ हिनाहूनि मी हीन जैसें भिकारी । दिनाहूनि मी दीन नानाविकारी । पतीतासि रे आणि हातीं धरावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥१॥
समर्थें दिलें सौख्य नानापरीचें । सदा सर्वदा जाणसी अंतरींचे । लळे पाळिले त्वां कृपाळुस्वभावें । समर्थां तुझें काय० ॥२॥
जनीं भक्ति नाहीं नमीं भाव नाहीं । मला युक्तिना बुद्धि कांहींच नाहीं । कृपाळूपणें राज्य रंकासि द्यावें । समर्था तुझें काय० ॥३॥
बहूसाल अभ्यास कोटयानकोटी । रघूनायकें घातले सर्व पोटीं । किती काय गूणासि म्यां आठवावें । समर्था तुझें काय० ॥४॥
दिनानाथ हें ब्रीद त्वां साच केलें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरीलें । सुखें सांडणें या देहाचें करावें । समर्था तुझें काय० ॥५॥

॥ पद ॥ अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांहीं । तुजविण मज या जगीं पाहतां कोणीच नाहीं ॥१॥
ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा । विद्या नाहीं वैभव नाहीं ऐसा पूर्विंल ठेवा ॥२॥
युक्ति असेना बुद्धि असेना शांति वसेना अंगीं । रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी ॥३॥

॥ ओवी । हनुमंत आमुची कुळवल्ली । राममंडपीं वेला गेली । श्रीरामभक्तीनें फळली । रामदास बोले ॥१॥
आमुचे कुळीं हनुमंत । हनुमंत आमुचें दैवत । तया-वीण आमुचा परमार्थ । सिद्धीतें न पावे कीं ॥२॥
साह्य आम्हांसी हनुमंत । आराध्यदैवत श्रीरघुनाथ । गुरु श्रीराम समर्थ । उणें काय दासायी ॥३॥
दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देई कोण । हे त्यागोन आम्ही जन । कोणाप्रती मागावें ॥४॥
म्हणोनि आम्ही रामदास । रामचरणीं विश्वास । कोसळोनि पडो हें आकाश । आणीकाची वास न पाहूं ॥५॥
स्वरूपसंप्रदाय अयोध्या मठ । जानकी देवी रघुनाथ दैवत । मारुती उपासना नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥

॥ अभंग ॥ ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥
जेथें पाहे तेथें राघोबाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥
राम माझे मनीं राम माझे ध्यानीं । शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥
रामदास म्हणे विश्रांति मागणें । जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥
जयजय रघुवीर समर्थ ॥

॥ आरती ॥ बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी । आरत्या घेवोनियां करिं आल्या त्या नारी ॥१॥
श्यामसुंदर रामा चरणकमळीं । ओवाळूं आरती कनकगंगाळीं ॥२॥
चौघी म्हणती शेजे चला मंदीरा । नव त्या इच्छिति सेवा श्याम सुंदरा ॥३॥
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी । क्षण एक विश्रांति घ्याहो अंतरीं ॥४॥

॥ अभंग ॥ सकळां तांबूल पुष्पमाळा । भक्तांचा सोहळा पुरविला ॥१॥धृ०॥
स्वामी चलाहो निजमंदिरा । रघुवीरा सुखशेजेसी ॥२॥

॥ अभंग ॥ भक्तासि पालक ब्रह्मांडनायक । श्रीरघुटिळक स्तविती दास ॥१॥
जनकात्मजा अहो रघुराजा । तिष्ठतसे तुझा मार्ग लक्षी ॥२॥
झाली वाढराती अहो रघुपती । मार्ग सोडविती बंदीजन ॥३॥
उठले जगज्जीवन सिंहासनींहून । वेगीं लिंबलोण ऊतरीलें ॥४॥ ॥ भजन उपसंहार गीतसंख्या ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP