मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १२ वा| श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा आरंभ श्लोक १ ते ४ श्लोक ५ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ ते १४ श्लोक १५ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४४ अध्याय १२ वा - श्लोक ३६ ते ४४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४४ Translation - भाषांतर राजन्नाजगरं चर्म शुष्कं वृंदावनेऽद्भुतम ॥ व्रजौकसां बहुतिथं बभूवाक्रीडगह्वरम् ॥३६॥ राया मग तें अजगरचर्म । जयामाजी पुरुशोत्तम । रोघोनि आघातें सायुज्यधाम । ओपी सुगम प्रकारें ॥९२॥तें अघासुराचें कलेवर । शुष्क झालें पाथराकार । अद्भुत पर्वताचें विवर । महाथोर राहिलें ॥९३॥तें बहुकाळ वृंदावनीं । समस्त व्रजौकसांलागुनी । क्रीडास्थान झालें अवनीं । जेवीं लेणीं पर्वतांचीं ॥९४॥योजनायत लांबरुंद । उच्च जैसे कां अंबुद । माजीं रिघोनि बल्लववृंद । क्रीडा आनंदें भोगिती ॥३९५॥मग हांसोनि म्हणे श्रीशुकमुनि । परमाश्चर्ये वृदावनीं । वर्तलें तें ऐकें श्रवणीं । अगा फाल्गुनिऔरसा ॥९६॥एतत्कौमारजं कर्म हरेरामाहिमोक्षणम् । मृत्योः पौगंडके बाला दृष्ट्वोचुरिविस्मिता व्रजे ॥३७॥कृष्णें केलें कुमारपणीं । तें हें आजि वर्तलें म्हणोनि । पौगंडवयीं वत्सपगणीं । कथिलें येऊनि व्रजभुवनीं ॥९७॥कौमार पौगंड वयसा भेद । ते तूं राया ऐसें विशद । कौमार तें प्रथम पंचाब्द । द्वितीय पंचाब्द पौगंड ॥९८॥तृतीय पंचाब्ध तें कैशोर । यौवन म्हणिजी तदुचर । ऐसा वयसेचा विचार । शास्त्रज्ञ चतुर बोलती ॥९९॥पांचवे वर्षीं पुरुषोत्तम । करिता झाला अघवधकर्म । तें आमुचें वर्षीं पाहोनि चर्म । विस्मित परम वत्सप ॥४००॥विस्मित होऊनि सांगती व्रजीं । कृष्णें आमुचें मोक्षण आजि । केलें आणि सहजेंसहजीं । अधोक्षजीं अघ मिनला ॥१॥अजगरापासोनि आमुचें मोक्षण । संसारापासूनि अजगरोद्धरण । आजि करिता झाला कृष्ण । करिसी कथन वत्सप हें ॥२॥नैतद्विचित्रं मनुजार्भमाविनः परावराणां परमस्य वेधसः । अधोऽपि यत्स्पर्शनधौतपातकः प्रपाऽऽत्मसाम्यं त्यसतां सुद्र्लभम् ॥३८॥जो निर्जरांसि हृदयशल्य । ज्याचें दैत्यपक्षीं प्राबल्य । जेणें विश्वातं । केला स्वतुल्य तो कृष्णें ॥३॥गिळिले वत्स वत्सपगण । काळानळें जैसें तृण । तें अमृतदृष्टी करूनि कृष्ण । काडी सप्राण मागुते ॥४॥मायेंकरूनि मनुजबाळ । जरी झाला त्रैलोक्यपाळ । परात्पर श्रीगोपाळ । नव्हे कीं केवळ मानवि ॥४०५॥जो परम पुरुष परात्पर । तयासी आघासुराचें गात्र । भेदणें नोहे कीं विचित्र । पशुकुमार झालिया ॥६॥ परंतु अघाचेंहि भाग्य थोर । योनि पावूनि असुर । कर्म करूनि द्वेषपर । आत्माकार जाहला ॥७॥जो ब्रह्म्यातें उपजविता । म्हणूनि परमवेधा हें नाम अच्युता । त्याचा अघातें स्पर्श होतां । निष्पापता पावला ॥८॥ज्याच्या स्पर्शें धौतपाप । होऊनि पावला निजात्मरूप । न लभे करितां उत्कृष्ट तप । जें दुष्प्राप असज्जनां ॥९॥आत्मसाम्य म्हणजे स्वरूपता । दिधली म्हणों जरी तत्त्वतां । तरी ज्योति ज्योतीसीं समरसतां । सायुज्यता नव्हे कांहीं ॥४१०॥सकृद्यदंगप्रतिमांऽतराहिता मनोमयी भागवतीं ददौ गतिम् ।स एव नित्यात्मसुखानुभूत्यभिव्युदस्तमायोंऽतर्गतो हि किं पुनः ॥३९॥ज्याचे अंगमूर्तीची प्रतिमा । माजीं प्रतिष्ठिता हृदयपद्मा । एकवारही मानसीं प्रेमा । ओपी अनुत्तमा भागवती गति ॥११॥ज्या श्रीकृष्णाचें मूर्तिध्यान । काल्पनिक मनश्चिंतन । अंतरीं धरितां यत्नेंकरून । पावती स्थान वैष्णव ॥१२॥बलात्कारें चिंतितां मूर्ति, । स्तिर न राहे चित्तवृत्ति । एकादि वेळ रंगल्या रति । गति भागवती संप्राप्ता ॥१३॥प्रल्हादादि भक्तगणीं । ध्यानमूर्ति हृदयीं धरूनि । कैवल्यसुखीं समरसोनि । शांतिनिर्वाणीं विराजले ॥१४॥लटिकी मनोमय प्रतिमा । अंतरीं धरिता एवढा मह्मा । अपा उदरीं त्या पुरुषोत्तमा । रिघतां कामा श्नुद्धरे ॥४१५॥स्वयें जो कां कैवल्यपति । देहीं प्रवेशे चिन्मयमूर्ति । अरिबलमायेची करूनि शांति । सायुज्यमुक्ति नेदी कां ॥१६॥जो कां इत्यात्मसुखानुभव । जेणें मायेचा पराभव । देहीं रिघतां तो केशव । कोण वैभव मग नलभे ॥१७॥ज्याच्या स्मरणें माया निरसे । ज्याच्या ध्यानें विवर्त नाशे । ज्याच्या कृपेच्या कटाक्षलेशें । निःश्रेयसें वोळगती ॥१८॥तेणें प्रवेशोनि अंतरीं । अखिल मायेचा नाश करी । तो स्वसुखानुभव ओपी हें नवल परी । काय म्हणोनि वाणावी ॥१९॥सूर्योदयीं निरसे तम । सन्निधिमात्रें ओसरे हिम । उष्मा प्रकाश होय सुगम । हे सहजधर्म सूर्याचे ॥४२०॥तैसा हरि भरतां अभ्यंतरीं । होय मायेची बाहेरी । आत्मसुखानुभूतीची उजरी । हे कय नवलपरी बोलावी ॥२१॥ऐसें नैमिषारण्यदेशीं । श्रोते शौनकादि प्रमुखऋषि । सूतें सांगूनि हें त्यांपाशीं । वत्सहरणासी आरंभी ॥२२॥सूत उवाच - इत्थं द्विजा यादवदेवदत्तः श्रुत्वा स्वरातुश्चरितं विचित्रम् ।पप्रच्छ भूयोऽपि तदेव पुण्यं वैयासकिं यन्निगृहतिचेताः ॥४०॥द्विजवर्यातें म्हणे सूत । परीक्षिति यादवदत्त । तो स्वरक्षाचें ऐकोनी चरित । प्रश्न करीत पुनरपि ॥२३॥जेणें श्रवणीं वेधलें मन । त्या वैयासकीतें पुढती प्रश्न । करूनि तेंची पुण्यकीर्तन । ऐकों आपण इच्छितसें ॥२४॥यादवदेव तो कृष्णनाथ । तेणें द्रौण्यस्त्र करूनि शांत । उत्तरेसी केला दत्त । तो देवरात परीक्षिति ॥४२५॥पूतनादि अघमोक्षण । ऐसें विचित्र कृष्णाचरण । ऐकोनि करी पुढती प्रश्न । चमत्कारून शुकातें ॥२६॥राजोवाच - ब्रह्मन्कालान्तरकृतं तत्कालीनं कथं भवेत् । यत्कौमारे हरिकृतं जगुः पौगंडकेऽर्भकाः ॥४१॥राजा म्हणे गा ब्राह्मणोत्तमा । कालांतरीं केलिया कर्मा । आजि केलें ऐशिया नामा । झाली कां या योग्यता ॥२७॥कुमारवयसेंमाजी केलें । तें पौगंडकीं अर्भकीं कथिलें । एक वत्सर गुप्त ठेविले । कैसें झालें विस्मरण ॥२८॥तद्ब्रूहि मे परं योगिन्परं कौतूहलं गुरो । नूनमेतद्धरेरेव माया भवति नान्यथा ॥४२॥तें तूं आतां योगनयनीं । पाहोनि निवीएं माझिये कर्णीं । परमयोगियां शिरोमणि । त्रिकाळज्ञानी मुनिवर्या ॥२९॥भूत भविष्य वर्तमान । तिहींचें तुजला प्रत्यक्ष ज्ञान । परमयोगसिद्धी करून । तूं सर्वज्ञ मुनींद्रा ॥४३०॥जो विश्वाचा आदिगुरु । कृष्ण परमात्मा परमेश्वरू । परम कौतूहल चरित्र । तेणें मच्छ्रोत्र तोषवीं ॥३१॥निश्चयेशीं आमुचे मनीं । हे हरिमाया विश्वमोहिनी । अन्यथा नाहींच म्हणोनि । विश्वासोनि राहिलों ॥३२॥वयं धन्यतमा लोके गुरोऽपि क्षत्त्रबंधवः । यत्पिबामो मुहुस्त्वत्तः पुण्यं कृष्नकथाऽमृतम् ॥४३॥तें सविस्तर तुम्ही स्वमुखें । माझे श्रवणीं घाला निकें । येणें आमुचेनि भाग्यें तुके । ऐसें न देखें त्रिलोकीं ॥३३॥तूं उपदेष्टा गुरुस्वामी । तेणें सर्व लोकीं धन्य आम्ही । जरी झालों राजन्यधर्मीं । तरी उत्तमोत्तमीं श्लाघ्यता ॥३४॥एथ इतुकेंचि कारण । कृष्णकथामृताचें पान । पुण्यरूप तुजपासून । करूं प्राशन पुनः पुनः ॥४३५॥कृष्णस्मरणमात्र वाचें । करितां पर्वत पातकाचे । भस्म होऊनि सुकृताचे । होती साचे शतश्रृंगी ॥३६॥अनेक यज्ञें शक्रपदा । पावोनि चुकती पुन्हा आपदा । जे झळके त्या पुण्यपदा । होईल कदा त्या मोक्ष ॥३७॥आब्रह्मभुवनाल्लोकां । पुनरावृत्ति न चुके देखा । आचरतां सुकृता अनेका । यज्ञप्रमुखा आदिकरूनि ॥३८॥तैसें नोहे कृष्णस्मरण । स्मरणें जन्ममरणासी ये मरण । पावती अक्षय्य सायुज्यसदन । पुनरावर्तनवर्जित ॥३९॥वाल्मीकीचें अपार पाप । स्मरणें झालें भस्मरूप । अद्यापि त्याचा रहस्यजप । जपे गरप गौरीशीं ॥४४०॥गणिकां गजेंद्र गौतमसती । व्यास वाल्मीक बल्लवयुवती । अजामिळादि सांगों किती । भगवत्स्मृती उद्धरले ॥४१॥परी तूं त्यांसी पुनरावृत्ति । कोठें नाहीं ऐकिली पुढती । ऐशी अगाध कृष्णकीर्ति । श्रवणीं रति बहुभाग्यें ॥४२॥तरी तें सांगा स्वामी आम्हां । म्हणोनि मौळें पादपद्मा । स्पर्शोनि पाहे मुखचंद्रमा । नेत्रचकोरें करूनियां ॥४३॥सूत उवाच :- इत्थं स्म पृष्टः स तु बादरायणिस्तत्स्मारितानंतहृताखिलेंद्रियः ।कृच्छ्रात्पुनर्लब्धबहिर्दृशिः शनैः प्रत्याहतं भागवतोत्तमोत्तम ॥४४॥सूत म्हणे गा शौनकाचार्या । भागवतोत्तमामाजीं धर्मा । ऐसा प्रश्न ऐकोनियां । योगिवर्या सुख झालें ॥४४॥प्रश्नचंद्रें शुकसमुद्र । झाला आनंदें निर्भर । इंद्रियग्रामींचे व्यापार । तेणें सत्पर बुजाले ॥४४५॥कीं प्रश्नभास्कराच्या किरणीं । लोपतां इंद्रियतारांगणीं । संपली दृश्यावबोधरजनीं । विपरीत स्वप्नीं उपरमतां ॥४६॥मुख्य बिंबाच्या अवलोकनें । आनंदबाष्पें ढळती नयनें । हृत्पद्माचें प्रफुल्ल होणें । पुलक तेणें टवटविले ॥४७॥आनंद समुद्रींचा लोट । तेणें बुजोनि गेला कंठ । चंद्रसूर्य एकवट । तेणें लोटती पाट श्वेदाचे ॥४८॥विश्रांतिजीवनें अंतर बिंबें । तेणें रोमांच राहिले उभे । सद्गदप्रेमाचेनि वालभें । ज्ञप्ति नुलभे स्फुंदनें ॥४९॥ऐसें सुखसमुद्राचें भरतें । स्वमानें स्थिरावोनि मागुतें । साठवितां जेथिंच्या तेथें । पडिलें रितें स्मृतितट ॥४५०॥विश्रांतीपासूनि ओहटणें । बाह्यप्रपंचा भेटणें । यास्तव कृच्छ्रात् ऐसें पठण । घडलें वदनें सूतातें ॥५१॥श्वास घालूनि उघडी दृष्टि । लब्ध अवस्था जिरवूनि पोटीं । नेत्र पुसूनि अंगयष्टि । सकंप नेटीं स्थिरावी ॥५२॥ऐसा बादरायणि प्रश्नोत्साहीं । अनंत स्मरविला जो हृदयगेहीं । तेणें इंद्रियवृत्ति सर्वही । अति लवलाहीं विरतिल्या ॥५३॥तें इंद्रियां नेणतां चिन्मात्रसुख । अनुभवूनि सत्त्वात्मक । पुन्हां परिमार्जूनी नेत्रोदक । कृच्छ्रें श्रीशुक स्मृतिलब्ध ॥५४॥मग बाहेर पाहें उघडूनि दृष्टि । उत्तमोत्तम प्रश्नपरिपाठी । जाणोनि परीक्षितीप्रति गोष्टि । बोले ओष्ठीं हळूहळू ॥४५५॥प्रमेय पुसिलें उत्तमोत्तम । तें सांगावया शुकासि प्रेम । ऐसें एथिचें जाणोनि वर्म । श्रवणकामसभाग्या ॥५६॥सूत म्हणे शौनकाप्रति । हे कथा श्रीमद्भागवतीं । महापुराण संहिता म्हणती । परमहंसी इयेतें ॥५७॥अठरासहस्र संख्या विशद । त्यामाजी हा दशम स्कंध । शुकपरीक्षित्संवाद । अध्याय प्रसिद्ध द्वादश ॥५८॥श्रीएकनाथवंशमाळे - । माजि गोविंदसद्गुरूचीं श्रीपादकमळें । प्रक्षाळणाच्या पावनजळें । प्रेमें उचंबळे दयार्णव ॥५९॥इति श्रीमद्भागवते महापुराणें अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां अघवधो नाम द्वादशोऽध्यायः ॥१२॥श्लोक ॥४४॥ टीकाओंव्या ॥४५९॥ एवं संख्या ॥५०३॥ ( बारावा अध्याय मिळून ओवीसंख्या ६८०९ )बारावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : April 28, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP