मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र चवथी

श्यामची आई - रात्र चवथी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" त्या दिवशी शनिवार होता , एकादशी होती ." श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली .

" जरा थांब . बारकू यावयाचा आहे . काल तो भाकर न खातास आला होता . " शिवा म्हणाला .

" तो पहा आलाय . ये बारकू ये ; माझ्याजवळ बै . " असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले .

श्याम सांगू लागला :

" ते पावसाळ्याचे दिवस होते . कोकणातील पाऊस तो . मुसळधार पाऊस ओतत होता . जिकडे तिकडे पाण्याने लोटे खळखळाटत वहात होते . पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो . त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या . इरली फारच सुंदर व साधी असतात . आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही . दादा व मी शाळेत गेलो .

आम्ही शाळेत गेलो ; परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले . तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता ; परंतु ते दुखणे बरे झाले होते . दुसरेच दुखणे उत्पन्न झाले . पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले . पोट जास्त दुखू लागले . पोटे फुगू लागले . त्याला शौचास होईना व लघ्वीसही होईना . खेड्यात कोठेला डॉक्टर , कोठेला एतिमा ! घरगुती उपाय चालले होते . आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलविण्यासाठी आला . अण्णा , दादा , अशी यशवंता आमची आठवण करीत होता .

आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी ! गावातील काही वैद्य आले होते . पितांबरंभाई , कुशाआप्पा आले होते . माझा भाऊ गडबडा लोळत होता . पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागत होती . त्याला पाणी देत नव्हते . पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे . त्याला पुन्हा धरून ठेवीत .

त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा . आदत्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती . अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती . शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली . शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती . ती तो सारखी करीत होता . गोळा करून ठेवीत होता . इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली , " डाळ खातोस का रे चोरा , आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते ? बराच की रे आहेस !"

" नाही ग आजी , मी नव्हतो खात ; उगीच आपला माझ्यावर आळ !" रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला .

घरात आई सांधे दुखण्याने त्या वेळेस आजारी होती . तिला चालता येत नसे . ती फार अश्क्त झाली होती . खोलीत पडलेली असे . यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली . " डाळ खात होतास का रे ? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून ?"

" आई ! मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ , का सारीजणं मला बोलता ?" असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला .

आदल्या दिवशीचा तो प्रकार ; परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता . सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते . यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला ? इतके का त्याच्या मनास ते लागले ?

यशवंत वाचणारे नाही , असे वाटले . नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे . " आई ! मला ठेवा !" तो क्षीण आवाजात म्हणाला .

अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते . तिच्या डोळ्यांत पाणी आले होते .

" आई , माझे डोके खाली ठेव हो . तुझी मांडी दुखले . तुझे दुखतात ." यशवंत खोल आवाजात म्हणाले .

आईचे ह्यदय गाहिवरले . " नाही हो बाळ दुखत सांधे , मला काही होत नाही . मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो , मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते , माझी मांडी नाही हो दुखत . तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपच असतील . " आई म्हणाली .

आई शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातांत घेऊन यशवंत म्हणाला , " आई ! तू आपली माझ्याजवळ बस , म्हणजे पुरे , तू जवळ असलीस म्हणजे झाले ."

यशवंताचा एकेका शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या ह्यदयात घरे पाडीत होता . आईला आदल्या दिवशीची आठवण झाली . भरून आले तिचे डोळे . भरून आला ऊर . तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले . त्या म्लान होणार्‍या मुखकमलावर अश्रुसिंचन केले . ते पहा , प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले .

त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत " राम राम " म्हणत आम्हांस सोडून गेला !

आई नेहमी म्हणायची , " यशवंत पुण्यात्मा होता , म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला . "

लहानपणी आम्ही आकाशाकडे पहात असू व तो तारा यशवंताचा असेल , असे एकमेकास दाखवून म्हणत असू . पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात , असे वडील आम्हास सांगत . आम्हालाही ते खरे वाटे .

आज यशवंत नाही व आईही नाही ; परंतु त्या मरण - प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम , ते अमर आहे . असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती . या विचाराने मला धन्यता वाटते . त्यांच्या नखांची सर मला नाही ; मी पामर किडा ; परंतु माझ्यातही काही चांगुलपणा , काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठा भावास व मुलांच्या शीलांस जपणार्‍या त्या थोर मातेस आहे . अशी आई व असे भाऊ लाभावयाली पूर्वसुकृतच लागते . ‘ बहुता सुकृतांची जोडी ’ पदरी असावयास हवी . सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते , त्याप्रेमाणे थोर मातपितरे , थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते ; परंतु माझी असेल असे मला वाटत नाही . ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती ."

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP