मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता| अध्याय चौतिसावा ग्रामगीता प्रस्तावना अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चवदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणीसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्वीसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा अध्याय तेहतिसावा अध्याय चौतिसावा अध्याय पस्तिसावा अध्याय छत्तिसावा अध्याय सदतिसावा अध्याय अडतिसावा अध्याय एकोणचाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय एकेचाळीसावा ग्रामगीता - अध्याय चौतिसावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते. Tags : grama gitatukadojiग्रामगीतातुकडोजी प्रारब्धवाद Translation - भाषांतर ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास । तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥ करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । आपण आपुला करी उध्दार । शांति देई जगासहि ॥२॥ सोडूनि दुबळा निराशावाद । साधावा सत्य अवतार-बोध । म्हणोनि केलें असे विशद । अवतारतत्त्व हें सारें ॥३॥ लोक करूं लागतील सत्कार्य । तरि गांवीं नांदेल सर्व ऐश्वर्य । त्यासाठी वाढविलें पाहिजे मनोधैर्य । सर्व लोकीं ॥४॥ परि श्रोते बोलती त्यावरि वाचें । अहो ! भाग्यचि हीन आमुचें । म्हणोनि आमुच्याने कोणचें । सत्कार्य नोहे ॥५॥ मनांत असतें कांही करावें । परि वेळचि जरा ना फावे । सांगा यास काय करावें । आम्हीं तरी ? ॥६॥ मित्रहो ! ज्याची जयासि आवड । त्यासाठी त्या मिळे सवड । कोणी नये इच्छेआड । प्रयत्न करितां ॥७॥ गरजेपोटीं जन्मे युक्ति । प्रसंग आणितां वाढे शक्ति । प्रयत्न पेरतां फळें येती । आवडी ऐसीं ॥८॥ श्रोते म्हणती कितीहि प्रयत्न केले । तरि काय सर्वचि राजे झाले ? यास पाहिजे भाग्य उघडलें । आम्हां वाटे ॥९॥ इच्छेंत जरी राज्य जडलें । तरी रोजचेंचि कार्य नडलें । तेथे उदंड मनांत आलें । तरी काय होतें ? ॥१०॥ इच्छेप्रमाणें सर्वांस घडतें । तरि काय भिकारी बनावें वाटतें ? इच्छा करणारे कितीतरी येथे । फिरती बेकार सडकेने ॥११॥ कोणास सहजमार्गी चालतां । धनाचा हांडा सापडे आइता । त्यांना बघा इच्छा न करितां । मिळालें धन ॥१२॥ कोणी दरिद्रयाच्या घरीं जन्मले । मेंढयाबकर्या चारूं लागले । अचानकचि भाग्य उघडलें । गेले दत्तक राजवाडीं ॥१३॥ ऐसें कोण्या उपायें होतें । हेंचि विचारावें वाटे आपणातें । प्रयत्न केल्यानेच फळ येतें । हें तों येथे शोभेना ॥१४॥ गांवीं आमुच्या एक सज्जन । अति कुशल प्रयत्नवान । नाना कलांनी निपुण । परि पोटाचेंहि भागेना ॥१५॥ सांगा याहूनि काय करावें ? इच्छेने फल कैसें पावे ? कोण्या परीने योजावें । कार्य आम्हीं आपुलें ? ॥१६॥ मित्रहो ! तुमचें सर्व म्हणणें । ऐकलें मीं जीवेंप्राणें । म्हणोनीच आपल्या परीने । देतों उत्तर तुम्हांसि ॥१७॥ भाग्याचा हा प्रारब्धवाद । उन्नतीचा करी विरोध । गांवोगांवच्या जीवनासि बाध । आणला याने ॥१८॥ ही दुबळी निराशा घालवून । केलाच पाहिजे प्रयत्न । तरीच भाग्य येईल जाण । उदया आपुलें ॥१९॥ एरव्ही हें भाग्य कोणी देईना । प्रयत्नाशिवाय भोग येईना । त्यासि प्रयत्नचि प्रधान जाणा । लागे केव्हाचा तरी ॥२०॥ कांही संस्कार असती पूर्वीचे । कांही प्रयत्न या जन्मींचे । मिळोनि येई फळ भाग्याचें । उदया लोकीं ॥२१॥ संत गुलाबराव बालान्ध । त्यांच्या जिव्हाग्रीं शास्त्रवेद । हें पूर्व जन्मींचें संचितचि सिध्द । नव्हे प्रारब्ध फुकाचें ॥२२॥ कांही पूर्वसंस्कारगति । कांही करणी कांही संगति । कांही संकल्प इच्छाशक्ति । योग्य काळीं येती भाग्यफळें ॥२३॥ पाहणार्यास अचानक दिसती । याचें भाग्य उघडलें म्हणती । धनवैभव लाभतां ठरविती । भाग्यवंत लोकीं ॥२४॥ येथे एक प्रश्न उठतो । भाग्यवंत कोण असतो ? ऐका त्याचेंहि सांगतों । उत्तर आता ॥२५॥ असेल कोणी धनवंत । परि तो नव्हे भाग्यवंत । भाग्य असे सुखसंतोषांत । अवडंबरांत तें नाही ॥२६॥ भाग्यवंत त्यासचि म्हणावें । ज्याने ईश्वरास समर्पण व्हावें । अनन्यगतीने राहावें । शरण देवासि ॥२७॥ आणि सत्कार्यी असावें तत्पर । सर्व सोडोनि दुर्व्यवहार । सहजकर्म मिळे पोटभाकर । त्यांतचि सुखें नांदावें ॥२८॥ आपणासीच सुख व्हावें । आणि दुसरे ते ओसरून जावे । ऐसें कधी न मानी जीवें । तोचि भाग्यवंत म्हणावा ॥२९॥ कांही चोरी करोनि भाग्यवंत होती । सर्व लोक तुच्छ भावें हसती । म्हणती भाग्यवंताची गति । त्वरित पडेल दृष्टीला ॥३०॥ मग पाप आणोनि पाडी संकटा । धनभाग्य जातें भलतिया वाटां । पुन्हा राहतो करंटा । कैसा भाग्यवान म्हणावा ? ॥३१॥ कुणाचें भाग्य रात्रींतून येतें । जुगारीं कधी द्रव्य लाभतें । दुसर्या दिनीं पुन्हा धांव घेतें । दरिद्रपण त्याच वाटें ॥३२॥ हा आहे पापाचा आविष्कार । नव्हे नव्हे हे भाग्य थोर । भाग्य तेंचि निरंतर । लोक कीर्ति गाती मागेहि ॥३३॥ भाग्यवंत धनाने नव्हे । भाग्य सत्तेसीहि न म्हणावें । भाग्य सत्कार्यानेच पावे । जीवालागी ॥३४॥ भाग्यवंत श्रीमंत न होय । ऐसे माझें म्हणणें नोहे । परि उत्तम व्यवहारी धनिक राहे । तोचि खरा भाग्यवंत ॥३५॥ एकाची श्रीमंती दुसर्या भूषवी । एकाची श्रीमंती रक्तचि शोषवी । त्यास कैसी द्यावी पदवी । भाग्यवंताची ? ॥३६॥ माती धरितां सोनें होतें । चालत्या काळीं भाग्यचि तें । परि अहंकारें व्यसनें मुकले सेवेतें । झाली शेवटीं दुर्दशा ॥३७॥ म्हणोनि म्हणतों प्रयत्न करा । आपापलें जीवन सुधारा । भाग्यहीन म्हणण्याचा प्रसंग सारा । टाळा मागे ॥३८॥ भाग्यकरितां संकल्प करावे । दृढनिश्चया वाढवीत जावें । तैसेचि प्रयत्न करीत राहावें । आळस सांडोनि ॥३९॥ जेवढा करावा उच्च विचार । तेवढाचि उच्च ठेवावा व्यवहार । त्यानेंच पावतें भाग्य थोर । सकळ योजना साधतां ॥४०॥ केल्यानेच भाग्य फळतें । केल्यानेच स्वर्गसुख मिळतें । केल्यानेच सर्वकांही होतें । मानवाचें ॥४१॥ माणूस बसतां भाग्य झोपतें । चालतां पुढेचि घेई झेप तें । प्रयत्नांचेंचि रूपांतर होतें । भाग्यामाजीं निश्चयाने ॥४२॥ ऐसें बोलले ऋषिजन । संत कवीश्वर अवतार महान । धर्मग्रंथ हेंचि प्रमाण । बोलले लोकीं ॥४३॥ ज्याचें अचानक भाग्य उघडले । त्याचें सुकृत साचत आलें । म्हणोनीच एकाएकी लाभलें । भूषण तया ॥४४॥ जरि त्याने केलेंचि नसतें । तरि तें आज कैसें लाभतें ? देवाने द्वैतभाव केला येथे । ऐसें म्हणणें शोभेना ॥४५॥ एकाएकीच भाग्य लाभतें । म्हणोनि धुंडाळाल कोठे कोणतें । तरि आहे हेंहि जातें । मनुष्यपण हातचें ॥४६॥ तुम्ही म्हणाल मग काय करावें ? आपणहि आता प्रयत्नशील व्हावें । प्रबल इच्छेसि वाढवावें । सदभाग्याच्या ॥४७॥ काळ असेल प्रतिकूल । तरि हळू पडेल पाऊल । परि सत्कार्य वाया न जाईल । केलें तें तें ॥४८॥ तीव्र इच्छेने कार्य केलें । तें आज जरी नाही फळलें । तरी अचानकचि भाग्य उघडलें । वाटेल ऐसें फळ येतां ॥४९॥ श्रोते साशंक झाले हृदयीं । प्रयत्न इच्छिलें फळ देई । ऐसें कथिलें जें जें कांही । म्हणती अजुनीहि पटेना ॥५०॥ प्रयत्नें साधती सर्व उपाय । ऐसा केला जरी निश्चय । तरी कां उपाय करितां अपाय । अनुभवा येती ? ॥५१॥ सर्वचि जगण्याचे करिती प्रयत्न । कोणास वाटे घडावें मरण । येथे पूर्वी तरी केलें साधन । मरणाचें कोणी ? ॥५२॥ लोक जगण्याचाचि प्रयत्न करिती । वैद्य डॉक्टर बोलाविती । तरी कय होते त्यांची स्थिति ? प्राण जाती कितीकांचे ॥५३॥ कोणी बिमार राहे वर्षोगणती । काय बिचार्याची फजीती । नाही करणाराची संगति । अंतकाळीं हाल त्याचे ॥५४॥ त्याने काय बिमार पडावें इच्छिलें । म्हणोनि देवाने तसें केलें ? यांत काय प्रयत्न नाही झाले । त्याच्या हातें स्वहिताचे ? ॥५५॥ तैसेचि कोणी मरण इच्छिती । परि मृत्यु नये वर्षोगणती । सांगा यांत मानवी इच्छेला किती । मान्यता आहे ? ॥५६॥ आम्ही म्हणतों सूत्रधार हरि । त्याच्या हातीं दैवाची दोरी । मानव बाहुलीं कळसूत्री । इच्छाप्रयत्न फोल त्यांचे ॥५७॥ मित्रांनो ! सुंदर तुमचे प्रश्न । यांत मज न वाटे विचित्रपण । हें तों आहे सहज अज्ञान । रुजलें लोकीं ॥५८॥ सुखासाठी करिती धडपड । दु:खीं देव घालिती आड । मूळ न शोधितां बोलती बोजड । सिध्दान्तवाक्यें ॥५९॥ आम्ही पाषाण फेकला वरि । तो चुकोनि पडला मस्तकावरि । येथे गुरुत्वाकर्षण काय करी । आपुल्याकडोनि ? ॥६०॥ वाफ्यांत मिरची-ऊस लाविले । तिखट-गोड फळ नशिबीं आलें । येथे पाण्याने काय केलें ? दिलें फळ जैसें तैसें ॥६१॥ देवभक्ति ऐसी सर्वत्र । परि ती स्वयें न चालवी सूत्र । कर्में फळती पवित्रापवित्र । आपुलींच आपणा ॥६२॥ देवाचेंच हें असतें करणें । तरि लोक कां निर्मिता केविलवाणे ? कशासि लाविता अल्पकाळीं मरणें । जीवप्राण्यासि ? ॥६३॥ हें तों आहे आपुल्याच आधीन । जन्मा येणें आणि मरण । यांत शंका घेण्याचें कारण । मुळीच नाही ॥६४॥ आपणचि इच्छा करितों । म्हणोनिया जन्माला येतों । यांत कोणी कशाला पाठवितो । दुनियेवरी ? ॥६५॥ तैसेंचि आहे मरणाचें । आम्हीं कारण व्हावें बिघडविण्याचें । जेव्हा असह्य होय भोगणें साचें । तेव्हा म्हणावे ’ वाचवा ’ ॥६६॥ चोर चोरीसाठी गेला । आधी विचार नाही केला । संकटीं सापडतां म्हणे ’ बोला । कैसें केलें देवाने ? ’ ॥६७॥ कितीकांचें दुखवावें मन । हिरावूनिया आणावें धन । मग भोग येतां दैवावरून । बोल द्यावा देवासि ॥६८॥ माणसाला मरावें ऐसें न वाटे । परि मरणाऐसें केलें ओखटें । पुढे आसक्तीने म्हणे ’ मोठें । देवा ! संकट ओढवलें ’ ॥६९॥ मरणाऐसें करावें आचरण । सोडोनिया तारतम्यज्ञान । मग भोग येतां म्हणावें ’ नको मरण ’ । कैसें कोण मानील ? ॥७०॥ हें म्हणणें कांही इच्छा नोहे । इच्छेसाठी मार्ग आहे । तो वेळेवरीच करतां नये । त्यासि पाहिजे अभ्यास ॥७१॥ जन्मणेंहि इच्छेने होतें । परि त्यासि गर्भधारणा लागते । अंतरीचें प्रगट करावया तेथे । वेळ लागे तैसाच ॥७२॥ अग्नि देवोनि लोखंड तापवावें । आणि लगेच म्हणे थंड व्हावें । ऐसें कैसें घडेल स्वभावें । एकाएकी ? ॥७३॥ जीव कर्म करितां स्वतंत्र । त्याचा भोग भोगतां परतंत्र । केलें त्याचें फळ येणार । इच्छेचाचि परिपाक तो ॥७४॥ सर्वासचि वाटे कधी न मरावें । सर्वांसचि वाटे राजे व्हावे । परि इच्छा क्रियामार्गे न धावे । अचूकतेने तीव्रपणें ॥७५॥ तेणें भोगावा लागे नको तो भोग । जो पूर्वी घडला कार्य भाग । इच्छेनि व्यसनी होतां झाला क्षयरोग । जगणें मग साधेना ॥७६॥ म्हणोनि सांगतों जें जें होतें । तें इच्छाबळेंच प्रत्यया येतें । यासि कर्महि पाहिजे इच्छेपुरतें । तरीच साधतें कार्य पुढे ॥७७॥ एक इच्छा असते चंचल । तींत होतो नेहमी बदल । एक इच्छा असे निश्चल । जी कर्म करोनीच प्रकट होय ॥७८॥ कधी इच्छा इच्छेने प्रकट नोहे । ती कर्मानेच दिसों पाहे । नाही म्हणोनिया काय होय ? प्रत्यक्ष दिसे कार्यावरि ॥७९॥ बादशहा ’ मी गरीब ’ बोलला । तरी ओळखती लोकचि त्याला । तो लपल्याने न जाय लपाला । ढगाआड सूर्य जैसा ॥८०॥ तैसी इच्छा परिपाकासि आली । आतां वृत्ति फळासि भ्याली । मग ऐनवेळीं दुजी इच्छा केली । न टळे फळ मृत्यूचें ॥८१॥ कित्येकांची प्रमाणें दिसती । मृत्यु आपणचि प्रकट करिती । दिवस क्षण वेळा सांगती । येणार्या फळाची ॥८२॥ त्यांची आसक्ति देहांतूनि सुटली । म्हणोनि स्थिति प्रकट झाली । कित्येकांनी दुसर्यांचींहि कथिलीं । परिपक्व फळें ॥८३॥ विचारी पुरुष जे जाणते । फळ भोगाया होती सज्ज ते । आधीच वृत्ति अविचारपंथें । जाऊं न देती ॥८४॥ अविचारी ते कुमार्गे जाती । फळ भोगतां तळमळती । अति होतां भलतीच घेती । विकृति मनीं वेडयाऐसी ॥८५॥ आसक्तिकांची विकृति वाढली । देहबध्द वृत्ति भांबावली । दु:ख न सोसूनि धांव घाली । इच्छा त्याची मृत्यूकडे ॥८६॥ मागील कुकर्म असह्य झालें । म्हणोनि जीव द्याया धावले । आतां मृत्यु येईल तरीच भलें । वाटे तयांसि ॥८७॥ खरोखर मरणें एक स्वप्न । शरीरपरिवर्तनाचें विरामस्थान । परि केलेल्या पापपुण्याचें निवारण । तेणें नव्हे ॥८८॥ जैसा कपडा अंगींचा बदलावा । नवीन अंगावरि ओढोनि घ्यावा । तैसाचि जीव मरणीं समजावा । शरीर बदली इच्छेने ॥८९॥ कधी ती इच्छा प्रकट ना कळे । प्रकट इच्छा त्वरित ना फळे । येथेचि विचारीहि गोंधळे । निवाडा करितां ॥९०॥ इच्छेने घेतलें तलम वस्त्र । मग तें टिको म्हणे वर्ष सहस्त्र । ऐशा इच्छा होवोत मिश्र । परि भोगणें लागे आधीचें ॥९१॥ एकदा इच्छेने बसल्या घोडयावरि । चाबुक मारतां हौस पुरी । मग घाबरोनि म्हणे ’ देवा ! आवरी । सत्वरि आता ’ ॥९२॥ एकदा हातूनि गेला बाण । मग इच्छेऐसा नये परतून । पहिलें इच्छाकर्म गतिमान । भोगावेंचि लागे ॥९३॥ नुसती इच्छा उपयोगी नाही । ती संस्कार बनूनि कर्मपण घेई । नवी इच्छाहि याच क्रमें येई । फळासि पुढे ॥९४॥ मन बुध्दि चित्त अहंकार । पांचवें अंत:करण आधार । यांत दृढ होय इच्छासंस्कार । चाले व्यवहार त्यायोगें ॥९५॥ यांचे पालटतील संस्कार । तरीच सुखाचा होय व्यापार । एरव्ही इच्छा क्षणभंगुर । उपयोगी नये तत्काळ ॥९६॥ इच्छासंस्कार कर्तव्यसंस्कार । यांचा संग्रह पूर्वापार । तेंचि संचित असे थोर । पापपुण्यरूप ॥९७॥ त्यांतून जें भोगायासि आलें । तेंचि प्रारब्ध बोललें । तें भोगणें प्राप्तचि झालें । न चुके सहजीं ॥९८॥ तें भोगतां केली नवी धडपड । इच्छा आणि यत्न प्रचंड । तें क्रियमाण देई संचिता जोड । लाभेल पुढे फळ त्याचें ॥९९॥ ऐसें चाललें रहाटचक्र । या नांव जीवनाचा व्यापार । जन्ममरण, सुखदु:ख, व्यवहार । खेळ इच्छा-प्रयत्नाचा ॥१००॥ हें जाणोनि प्रयत्नासि लागा । याविण भाग्याचा भ्रम वाउगा । संत उपदेश देती जगा । क्रियमाण सुधारा म्हणोनि ॥१०१॥ क्रियेवीण मार्गचि नाही । कर्तव्य नरा देवपद देई । तुकडया म्हणे बना निश्चयी । प्रयत्नवादी ॥१०२॥ इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । प्रारब्ध-विचार कथिला येथ । चौतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥ ॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥*" भक्तींत मनुष्य प्रेमळ बनत असला तरी तो नेभळा व दैववादी होतो, असें म्हणणारास भक्तीचा परिचयच नाही असें मी म्हणतों " " मनुष्य विचाराने देव आहे व शरीराने पशु. विचाराचा शरीरावर ताबा ठेवणें हेंच खरें मनुष्यत्व ! " ---श्रीसंत गुलाबराव महाराज N/A References : N/A Last Updated : September 20, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP