पोवाडा - खर्ड्याचे लढाईचा पोवाडा

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

श्री. सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत मराठेशाहीचे उत्कर्षाची जी बढती झाली, तिचा ही लढाई हा कळसच होय, असे सामान्यतः मानले जाते. ह्या लढाईतील विजयाने, मराठ्यास जे ३५ वर्षापूर्वी पानपतचे लढाईत अपेश आले त्याचे प्रक्षालन पूर्णपणे झाले अशी समजूत आहे. लढाईची तयारी इ.स. १७९४ चे अखेरीस जारी होऊन, श्री. सवाई माधवराव यांची स्वारी आपल्या फौजेसह स. १७९५ चे जानेवारी महिन्यात पुण्याहून रवाना झाली. आणि मुख्य लढाईची शिकस्त ता. १० व ११ मार्च रोजी खर्ड्याचे मैदानात होऊन, विजयश्रीने मराठ्यास माळ घातली. लागलीच मोगलाशी अत्यंत फायदेशीर तह करून स्वारी परतली. दरकुच दर मुक्काम करीत स्वारी एप्रिल १७९५ अखेर पुण्यानजीक पोहोचून, प्रचंड लव्याजम्यासह बादशाही थाटाच्या डौलाने स्वारीने ता. १ मे रोजी नगरप्रवेश केला.

या पोवाड्याचे एकंदर ६ चौक आहेत. १ ले चौकात स. माधवरावांचा जन्म-दादासाहेबांची कैस-तोतयाचा मोड-तळेगावची लढाई-व्रतबंध व लग्न-आणि कर्नाटकची यशस्वी स्वारी इतके वर्णन आहे. २ रे चौकात-दिल्लीपतीकडील मरातबांचा स्वीकार-पातिलबोवांचे शौर्य व धन्यता-रंग-पाटिलबोवांचा मृत्यू आणि खर्ड्याचे लढाईची तयारी-इतकय गोष्टींचा उल्लेख आहे. तिसरे व चौथे चौकात या स्वारीत जे सरदार व दरकदार वगैरे हजर होते त्यांचा नामनिर्देश आहे. पाचवे चौकात खुद्द लढाईचे वर्णन आहे. आणि सहावे चौकात विजय संपादन करून स्वारी परत पुण्याकडे फिरली आणि मोठ्या थाटाने नगरप्रवेश करून शूरांचा बहुमान केल्यासंबंधे वर्णन आहे.

खर्ड्याच्या लढाईसंबंधे जे ७/८ पोवाडे प्रसिद्ध झाले आहेत, त्या सर्वात प्रस्तुतचा पोवाडा सरस आहे.


दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगात अवतरले ॥ध्रुपद॥

भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥

कलियुगी धर्म ताराया ॥ ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपुनिर्मूळ कराया ॥

सुकिर्ती मागे उराया ॥ सौख्य दिले सर्वास अहारे सवाई माधवराया ॥चाल॥

धन्य धन्य नानाचे शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण ।

गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हाच केला दुर्धट हा पण ।

आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालून कुंपण ।

आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंताना करुनि रवाना ॥

(चाल) दादासाहेब मागे वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ।

अपुल्या राज्यापार पळविले । काही दिवस दुःखात आळविले ।

इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायात खिळविले ।

ठेवून गडावर चणे दळविले । बंदीवान तेथेच खपविले ॥चाल॥

बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ।

जमाव ठायींच ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ।

शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजुर ओढिला ।

लागेल तितके द्र्व्य पुरविले ॥चाल॥ तळेगावावर इंग्रज हरला ।

इष्टुर साहेब रणीच वीरला । उरला इंग्रज घाट उतरला ।

सरमजाम गलबतात भरला । रातोरात मुंबईत शिरला ।

सवेच गाढर पुढेच सरला । शिकस्त खाउन तोही फिरला ।

फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥चाल॥ अशी रिपूची मस्ती जिरविली ।

शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली । कारभार्‍यांनी पाठ पुरविली ।

पुण्यामध्ये अमदानी करविली । पुरंदराहुन स्वारी फिरविली ।

पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली ।

कालूकर्णे वाजंत्री वाजती ॥चाल॥ लग्नचिठ्या देशावर लिहिल्या ।

ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या । पाठविल्या बोलाऊ पहिल्या ।

पठाण मोंगलसहित सहिल्या । छत्रपति रोहिले रोहिल्या ।

भोसल्यांच्या मौजा पाहिल्या । आणिक किती नावनिशा राहिल्या ।

कवीश्वराची नजर पुरेना ॥चाल॥ आरशाचे मंडप सजविले ।

चित्रे काढून चौक उजविले । थयथयांत जन सर्व रिझविले ।

गुलाब आणि अत्तरे भिजविले । शिष्ठ शिष्ट शेवटी पुजविले ।

रुपये होन मोहोरांनी बुजविले । श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ।

यशस्वी झाली सकल मंडळी ॥चाल॥

सत्राशे सातात बदामी । हल्लयाखाली केली रिकामी ।

एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामी ।

बाजीपंत अण्णा ते कामी हरीपंत तात्याचे लगामी ।

परशुरामपंत त्या मुक्कामी । स्वामी सेवक बहुत जपले ॥चाल॥

गलीमास काही नव्हते भेऊन । पराक्रमाने किल्ला घेऊन ।

अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन ।

श्रीमंतांनी वाड्यामध्ये नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ।

बहुमानाची वस्त्रे देऊन । बोळविले तयाला ॥चाल॥

सत्राशे तेरावे वरीस । अवघड गेले पहिल्या परीस ।

करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ।

तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ।

आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥चाल पहिली ॥

नंतर मागे फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकी धरिले ॥

दैन्य दिवस आज सरले ॥१॥

केवढे भाग्य रायाचे । चहुंकडे सेवक यशस्वी होती हे पुण्य त्या पायांचे ॥

करिता स्मरण जयाचे । काही तरी व्हावा लाभ असे बलवत्तर नाम जयाचे ॥

प्रधानपद मूळ याचे । सत्रशे चवदात मिळाले वजीरपद बाच्छायाचे ॥चाल॥

मुगुटमणी ते पाट्लबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ।

दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसिता फळास यावा ।

हर हमेशा शत्रुसि दावा । माहित सगळा मराठी कावा ।

हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥चाल॥

चवदा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ।

तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ।

देउन फार मर्जीने वागले । भेटीसमयी जंबूर डागले ।

मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झाकले ॥चाल॥

राव जेव्हा नालकीत बसले । कृष्ण तेव्हा ते जनास दिसले ।

अर्जुन पाटिलबावा भासले । पायपोस पदराने पुसले ।

चरणी मिथी माराया घुसले । कर प्रभुनी बगलेत खुपसले ।

इमानी चाकर नाहीत असले । धन्य धनी आणि धन्य दास ते ॥चाल॥

दोन्ही दळे या सुखात दंग । त्यावर जाला अमोल रंग ।

गुलाल आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाही प्रसंग ।

मस्त चालतीपुढे मातंग । कोतवाल घोडे करिती ढंग ।

राज्य प्रभुचे असो अभंग । अहर्निशि कल्याण चिंतिती ॥चाल॥

गुलाम सोदे बुडवुनि पाजी । पंत प्रधान राखुन राजी ।

लष्कर दुनया करून ताजी । शके सत्राशे पंधरामाजी ।

माघ मासी भली मारून बाजी । पाटिलबावा सुरमर्द गाजी ।

अगोदर गेले विष्णुपदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥चाल॥

सवाचार महिन्यांचे अन्तर । हरीपंत तात्या गेले नंतर ।

तेथे न चाले तंतर मंतर । वर्तमान हे एक अधिकोत्तर ।

काही न करिती नाना उत्तर । दिलगीर मर्जी सुकले अंतर ।

हिरे हरपले राहिले फत्तर । तरि तो पुरुष बहुत धिराचा ॥चाल॥

दौलतीचे आज खांबच खचले । लाल्होते ते कोठेच पचले ।

शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाही कचले ।

कडोविकडीचे विकार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ।

मोंगलावर मोर्चे रचले । जिकडे तिकडे झाली तयारी (चाल) पुकार पडला पृथ्वीवरती ।

सैन्य समुद्रा आली भरती । आगाऊ खर्ची मोहरा सुर्ती ।

रात्रंदिवस श्रम नाना करती । कशी ही मोहिम होईल पुरती ।

राव निघाले सुदिनमुहूर्ती । लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥चाल॥

गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ।

उजव्या बाजुस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना ।

देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुब सिलेखाना ।

मध्ये रायाचा तालिमखाना खळ ॥ खळ खळ लेजिमा वाजती ॥चाल॥

वाड्याबाहेर जिन्नसखाना । पदार्थ भरपुर मोदीखाना ।

मागे उतरला उष्टरखाना । डेर्‍यासन्निध नगारखाना ।

तर्‍हतर्‍हेचा शिकारखाना । बाजाराच्या पुढे पिलखाना ।

दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठ्या पल्ल्याच्या जरबा ॥चाल पहिली॥

चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ।

दैन्य दिवस आज सरले० ॥२॥ बहुत शिंदे जमले ।

शिलेपोस पलटणे लाविती पठाण जरीचे समले ॥ रणपंडित ते गमले ।

भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेत येउन रमले ।

ज्यापुढे शत्रु दमले । त्यांणी शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥चाल॥

आधीच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ।

फौज सभोवती जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ।

सर्व लढावया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ।

हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिजे ॥चाल॥

बाळोबास तर काळिज नाही । धीट रणामध्ये उभाच राही ।

धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही ।

सदाशीव मल्हार काही । मागे पुढे तिळमात्र न पाही ।

देवजी गवळी रिपूस बाही । रणांगणाचा समय साघिती ॥चाल॥

निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ।

बंदुकीला कटपट्यास नक्षी । फत्ते होई तो गौंड न भक्षी ।

रायाजी पाटिल महत्त्व रक्षी । नित्य कल्ल्याण धन्याचे लक्षी ।

पिढीजाद शिंद्याचे पक्षी । केवळ अंतरंग जिवाचे ॥चाल॥

मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ।

सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ।

हपिसर पदरी चंगी भंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी ।

दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर झर बुरुज बांधुनी ॥चाल॥

शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजदे थेट इराणी ।

किती काबूल खंदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ।

कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ।

इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमधे ज्वान पलटणी ॥ ( चाल ) ॥

येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ।

तुकोजी बावांना गुरमाई । आधीच बळ स्वार शिपाई ।

वारगळ बरोबर फणशे जावाई । लांब हात बुळे वाघ सवाई ।

वाघमारे कुळ धगनगभाई । खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥चाल॥

शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फासे ।

लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणे करतात तमाशे ।

बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ।

जा जा म्हणती लोक बगासे । जहामर्द तरवारकरांचे ॥चाल॥

हरजी विठूजी आनंदराव । स्वता धनी यशवंतराव ।

संताजीचे प्रसिद्ध नाव । आबाजीचा तिखट स्वभाव ।

दूर नेला साधितात डाव । विचारी मतकर माधवराव ।

भागवतांनी सोडुन गाव । ताबडतोब निघाले ॥चाल॥

महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ।

चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ।

परशुराम रामचंद्र असारे । चहुकडे ज्याचा पूर्ण ठसारे ।

अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कापती ॥चाल॥

रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ।

विंचुरकरांमधि गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुष जवादा ।

चौपट खर्च दुप्पट आदा । पुरंधर्‍यांची कदीम इरादा ।

तत्पर पेठे मोगल वादा । ओढेकरही येऊन भेटले ॥ ( चाल पहिली ) ॥

वामोरकर सावरले । आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले । दैन्य दिवस आज सरले ॥३॥

खास पतक नानाचे । निवडक माणुस त्यात पुरातन सूचक संधानाचे ॥

पद देऊनि मानाचे । खुष करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचे ॥

बळ विशेष यवनांचे । हे ऐकुनी लोकांनी सोडिले पाणी शीरसदनाचे ॥चाल॥

आपा बळवंतराव सुबुद्ध । बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध । पवारात मर्दाने शुद्ध ।

वाढविती भापकर विरुद्ध । केवढ्यांना शुष्कवत युद्ध ।

काढिती हांडे रणी अशुद्ध । धायगुडे निर्बाणी कुबुद्ध ।

शेखमिरा फौजेत मिसळले ॥चाल॥

पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ।

अमीरसिंग जाधव माळेगावकर । सुजाण गोपाळराव तळेगावकर ।

जानराव नाईक नट निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ।

करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥चाल॥

कामरगावकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले ।

हर्ष वाहिले पुढे सरसावले । रण नवरे दरकुच धावले ।

समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले ।

शहर पुणे रक्षणार्थ ठेविले । माधवराव रामचंद्र कानडे ॥चाल॥

सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागे नाही लपले ।

धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धा ते आपापले ।

गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ।

खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ।

जाधव काळे माळशिकारे ॥चाल॥ बाजीराव गोविंद बर्वे ।

लाड शिरोळे धायबर सुर्वे । दाभाड्याचा हात न धरवे ।

भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे ।

खंडाळ्याचे पोषाग हिरवे । नलगे भोयते सुंदर सर्व ।

सखाराम हरी बाबुराव ते ॥चाल॥

कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ।

राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे वरची ।

एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ।

काय कथा त्या भागा नगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥चाल॥

दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलोट ।

मारिती पुढे समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ।

देवकात्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ।

जगतापाचे महतर भोयटे । भले मर्तृजा महात थड्याचे ॥चाल॥

गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ।

आयतुळे मान्य सकळ शूरात । बेहरे मांजरे योग्य बीरात ।

राघो बापुजी रणघोरात । येसोजी हरी सैन्य पुरात ।

दारकोजीबावा निंबाळकरांत । वीरश्रीत तो धुंद सग्याबा ॥चाल॥

कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ।

दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ।

मैराळजी पायघुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे ।

गणेश विठ्ठल वाघमारे । बिडकर खुर्देकर आटीचे ॥चाल॥

गिरजोजी बर्गे फार दमाचे । बहादर बारगिर ते कदमाचे ।

आठवले तर बहु कामाचे । दुर्जनसिंग राठोड श्रमाचे ।

टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ।

श्रीमंतस्मरणे काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥चाल पहिली॥

प्रपंच वैद्य विसरले । चिलखत बखतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळे गुर्के । जरी पटक्याभोताले घालिती गरर मानकरी गर्के ।

सुंदर गोरे भुर्के । घोरपडे पाटणकर महाडिक खानविलकर शिर्के ।

मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥चाल॥

पुढे पसरले रिसालदार । मुसा मुत्रीम नामदार । सय्यद अहमद जमादार ।

अमीर आबास नव्हे नादार । शहामिरखा ते डौलदार ।

इतक्या वर ते हुकूमदार । राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥चाल॥

गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ।

विनायकपंताचा गलोल । आबा काळे गुणीच डोल ।

टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ।

तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणे ॥चाल॥

संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ।

राघोजीबावा नाव विराजे । बाणांचा भडीमार माजे ।

सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ।

अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥चाल॥

दक्षण उत्तर पश्चिम भागी । पसरुन तोफा जागोजागी ।

तमाम गारदी त्याचे मार्गी । स्वार सैन्य त्यामागे झगागी ।

जरी पटका तो दुरुन धगागी । कोणीच नव्हता त्यात अभागी ।

स्वस्ति बक्षिस पावे बिदागी । जासूद सांडणी स्वार धावती ॥चाल॥

काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या झडती ।

शिरकमळे कंदुकवत उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ।

कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ।

वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥चाल॥

पाउल पाउल पुढे सरकती । घाव चुकाउनी शुर थडकती ।

सपुत वाघापरी गुरकती । हत्यार लाउन मागे मुरकती ।

खुणेने शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागे सरकती ।

जिवबादादा मनी चरकती । अररररर शाबास बापांनो ॥चाल॥

सुटती तोफा धुंद दणाणत । गुंगत गोळे येती छणाछण ।

सों सों करिती बाण सणासण । खालेले घोडे उडती टणाटण ।

टापा हाणती दुरुन ठणाठण । वाजति पट्टे खांडे खणाखण ।

नौबती झांझा झडती झणाझण । एकच गर्दी झाली धुराची ॥चाल॥

थोर मांडली रणधुमाळ । अगदीच बसली मग काठाळी ।

फौज पसरली रानोमाळी । लाखो लाख तरवारी झळाळी ।

होळकराची फिरती पाळी ॥ जिवबांची मदुमकी निराळी ।

मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूंचे ॥चाल॥

अठरा घटका लाही फुटली । तोफ हजारो हजार सुटली ।

मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निःसंग तुटली ।

मोंगल सेना मागे हटली । त्या समयी कैकांची उपटली ।

पेंढार्‍यांनी दौलत लुटली । गबर झाले एका दिसात ॥चाल॥

शके सत्राशे सोळा भरता । आनंद संवत्सरही सरता ।

दहा दिवस शिमग्याचे उरता । वद्य पंचमी सुवेळ ठरता ।

ती प्रहरांचा अंमल फिरता । मोंगलाशी प्रसंग करिता ।

पळाले मोंगल धीर न धरता । चंद्रउदयी खर्ड्यात कोंडिले ॥चाल पहिली॥

गढीत खासे शिरले ।

मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोभर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली ।

मोहोर्‍यावरची फौज सैनिका सहित नाहली ॥

त्यात उन्हाची काहाली ।

रुपयाचे दिड शेर पाणी अशा कठीण वेळा वाहाली ॥

ती सर्व जनांनी पाहिली ।

जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥चाल॥

निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानात मान्य ।

जुनाट पुरुषात राजमान्य । अपार पदरीमण धनधान्य ।

कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचे मुळी प्राधान्य ।

तशात झाले अनुकुळ दैन्य । नाही तर घेते खबर पुण्याची ॥चाल॥

जेव्हा मारिती यवन मुसंडी । तेव्हाच होईती फौज दुखंडी ।

साठ सहस्त्र पठाण बुडी । तिनशे तोफा खंडी ।

असे असुनिया दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥चाल॥

झाला जन्म त्या कुळात माझ्या बाई राजेंद्राचा ।

केवळ माघव मूर्ति म्हसोबा नव्हेच शेंदराची ॥

अणीक मंत्री मर्द मराठा बंद्रोबंद्रांचा ।

ऐरावत बांधून आणतिल प्रसंगी इंद्राचा ॥

येथे न चाले यत्‍न ब्रहस्पती भार्गव चंद्राचा ।

उपाय असता तरी न मरता बापू रामचंद्राचा ॥

चा० हरहर जगन्निवासा, अता काय करू ॥

पोटी जरी एक झाले असते राजबीज लेकरू ॥

राज्य न बुडते मी मात्र मरत्ये शोक सदा कर शकू ॥

चा० पुढे काळ सख्यांनो कसा मी घालवू ॥

हिरकणी कुटुन जाऊ पाण्यामधे कालवू ॥

ती पिउन पौढत्ये नका ग मज हालवू ॥

चा० जा समया मालवून आपल्या घरास न्हायाला ।

जिवंत मी असल्यास उद्या मी नेत्र पुसायाला ॥ कमि नव्हते० ॥१५॥

धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले ।

शत वर्षे द्विज पक्षी आनंदे त्या तरुवर टिकले ।

जलचर हैदर नबाब सन्मुख रण करिता थकले ।

ज्यांनी पुण्याकडे विलोकिले ते संपतिला मुकले ।

असे प्रभु कसे अमर कराया ब्रह्मदेव चुकले ।

गहन गती कर्माची सर्वजण पूर्वी फळ विकले ॥चाल॥

संपविला अवतार धन्यांनी म्हणे गंगुहैबती ।

ध्वज पडले उलथुनी थडकल्या सुरु साहेब नौबती ।

कोण करिल प्रतिपाळ तुर्त मुलुखास लागली बती ॥चाल॥

महादेव गुणीराज श्रुती गादिचे ।

नवे नुतन नव्हती शाईर जदिप वादिचे ।

पीळ पेच अर्थ अक्षरात वस्तादिए ॥चालपहिले॥

प्रभाकराचे कवन प्रतिष्ठित सभेत गायाला ।

अशा कवीची बुज नाही कोणि करायाला ॥

कमि नव्हते० ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP