मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तेविसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


नूनं मे भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः ।

येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥२८॥

मी पूर्वी होतों अतिअभाग्य । आतां झालों अतिसभाग्य ।

मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥३६॥

माझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान ।

तें हरीनें हरोनि आपण । कृपा पूर्ण मज केली ॥३७॥

भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो ’हरी’ ।

तेणें कृपा करुन पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥३८॥

वैराग्य विवेकावीण आंधळें । विवेक वैराग्यावीण पांगळें ।

ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥३९॥

ऐशी हरीनें कृपा करुनी । माझें धनेंसीं अज्ञान हरुनी ।

विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥४४०॥

परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं ।

हरि कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥४१॥

भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त ।

वित्तत्यागें करुनि सुचित । दे विवेकयुक्त वैराग्य ॥४२॥

ऐसें घेतेदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण ।

यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साशी गुण वशवर्ती ॥४३॥

त्याचें अचिंत्यानंतरुप । परी मजलागीं झाला सकृप ।

माझें धनेंसीं निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥४४॥

हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता ।

त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥४५॥

करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ ।

विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥४६॥

देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी ।

तो पाठिराखा नरहरि ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥४७॥

जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी ।

त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥४८॥

जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां ।

तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥४९॥

ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव ।

तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥४५०॥

सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररुपें माझा हरी ।

ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥५१॥

ऐशिये कृपेचें कारण । ये जन्मीं नाहीं साधन ।

हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥५२॥

पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशीं ।

कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥५३॥

मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण ।

त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥५४॥

हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख ।

भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारुं ॥५५॥;

हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण ।

वृथा जावों नेदीं अर्ध क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP