मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे| महात्मा गांधीचा पोवाडा पोवाडे महात्मा फुले शिवाजी महाराज अज्ञात शाहिर पेशवाईच्या उत्तरार्धाचा पोवाडा श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा शहाजीची सुटका लोकमान्य टिळक पोवाडा महात्मा गांधीचा पोवाडा झाशीची राणी इचा पोवाडा हुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा लेखणी तलवार भांडण दारुबंदी पोवाडा ४२ चे चळवळीचा पोवाडा वडगावची लढाई काँग्रेसचा पोवाडा छ. राजाराम महाराजांचा पोवाडा कल्य़ाण खजिना पोवडा महात्मा गांधीचा पोवाडा इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो. Tags : mahatma gandhipowadaपोवाडामहात्मा गांधी महात्मा गांधीचा पोवाडा Translation - भाषांतर चौक १ लाठेवुनी हात स्वातंत्र्य देवि पदकमला । स्वातंत्र्य-प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला । कसुनिया कास देशार्थ फकिर जो झाला । जयाचा देव सखा बनला ॥(चाल : धन्य धन्य धन्य छ्त्रपती) ज्यांचि कीर्ति गाजे जगतांत । भरतखंडांत । साधुसंतांत । गांधि जाहले पूर्ण विख्यात । वंद्य जे झाले सकळ लोकांत । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥पाहुनी हाल दीनांचे । कळवळे सांचें । हृदय गांधीचे । हिंदुचे दु:ख दूर करण्यांत । हाल सोशिले अफिका खंडात । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥तन मन धन अर्पुनी । लंगोटि लावोनि । फकिर होवोनी । देश - स्वातंत्र्य एक चित्तांत । ध्यास लागला दिनरात । महात्मा म्हणुनि त्यास. ॥परस्त्रीस माता समजोनी । विलास सोडोनी । इंद्रियदमनी मिळवुनी विजय जाहले ख्यात । ऐन तारुण्यबहर कालांत महात्मा म्हणुनी. ॥चाल १ :- समजोनि बहिण स्वस्त्रीला । मारिली लाथ सौख्याला अवघड विश्वामित्राला । तो विषयपोश तोडिला ॥दोन तपे ब्रम्हचर्याला । पाळुनी विरक्त जाहला ॥वैराग्य असे जगताला । पाहुनी अचंबा वाटला ॥चाल २:- वैराग्य लाभलें श्रीरामासम ज्याला । रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा । एकपत्नि वचनि एकवाणी या त्रिगुणाला । पाहुनि त्रिगुण गांधिजीपाशी जगताला । श्रीराम जणू कलियुगी वाटे अवतरला । नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला ।नेसुनि खादी गांधिजी गेले आफ्रिकेला । त्याने सीतादेवी याने कस्तुरबाई जोडीला । मारुनी लाथ राज्याला राम नीघाला ।सोडोनी पाणि वैभवावरी हा गेला । वनवास चौदा वर्षांचा त्याने भोगिला । आफ्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला । वानर साह्य त्याला सत्याग्रहि वश याला । त्यानें लंकापति यानें लंडनपति हलवीला ।चाल मोडते - हिंदूचे हाल पाहोनि । गेले धावोनि । सत्याग्रह करुनि । केले रक्षण आफ्रिका खंडांत । गर्व गोर्यांचा जिरविल । त्यांत । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥ चौक २ रा - रौलेट बिलाचा वरवंटा । सत्याग्रह सोटा । दाबूनी मोठा । गांधिनी दूर पळवलें त्यांस । जागृत केलें हिंदुस्थानास । बनविले सहनशील लोकांस ॥हरताळ सर्वं देशांत । पडला कडकडित । चळवळ जोरांत । पाहुनी क्रुद्ध झालें सरकार । दिल्ली शहरात केला गोळिबार । तिकडे गांधिजे गेले सत्वर ॥चाल १ ली :- गांधिजी तेथे जातात । पकडिलें त्यांस इतक्यात ॥ खळबळ झाली लोकांत । रौलेटबील निषेधार्थ ॥भिती पडली सरकारात । सोडिलें गांधि मुम्बईत । सरकार पडलें पेचांत । पाहुनी सत्याग्रह शस्त्र । शांतता, भंग सदरांत ।गोळीबार पुन्हां दिल्लींत ॥चाल ४ थी : - स्वामी श्रद्धानंद दिल्लींत । चालले होते शिस्तीत गोळीबार झाला इतक्यांत ॥स्वामीचा घात । करण्याचा हेतु हृदयांत । स्वामिचा सवाल गुरख्यास । कारण काय गोलिबारास । ऐकुनि सवाल म्हणे त्यास । आले रागास । छेद देंगें तुमकू म्हणे त्यांस ॥ जी ।छातीचा करुनि कोट । दावूनि धैर्य अलोट । मै खडा सामने ताठ । म्हणे मुझें काट । आला गोरा तेथे इतक्यांत ॥ जी ॥रोखिल्या हुकुमावांचून । बंदुका त्यांनी दडपून । शिपायाच्या गळल्या हातून । गोरा पाहून । अशि फजिती केली धैर्यान ॥ जी ॥चाल बदल :- गांधिनी साह्य करुनिया महायुद्धांत । इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत । पाजुनी दूध पोशिला सर्प गृहात ।तो सर्प जसा घे प्राण । तसें शिरकाण । करुनि देशाचि केलि धूळधाण ॥ जी ॥कटाव ३ रा :- जालियनवाला बागेचे । केलें रक्ताचे । अंगण साचें । कत्तलिचा असा नाही दाखला । कलंक हा इंग्रजी राज्याला ।सांगतो ऐका प्रसंगाला । जालियनवाला बाग केला । पिंजरा लोकांन कोंडण्याला । वाघापरि ठार मारण्याला । वीस हजार लोक सभेला । विमान घारीपरि हो घिरट्याला । घालु लागले त्या समयाला ।हत्यारबंद शिपाई दाराला ।पाहून गर्भगळित लोक झाला। भिती आहे जिवाची प्रत्येकाला । भिंतीवरून चढुन जाउ लागला । जाऊ दिले नाही परी कोणाला । वाघ जणु पिंजर्यात सांपडला । तसा सारा लोक कोंडला गेला । गोळीबार त्यांनी सुरु केला । मुंग्यापरि लोक ठार झाला । इतक्यांमध्ये दारु गोळा संपला ।नाहीतर आणखी कांही स्वर्गाला । पाठविण्याची इच्छा होती डायराला । कांही लोक लोळुन जमिनीला । वाचवूं पाहती प्राणाला । असें पाहुन हुकूम झाला । गुडघे टेकुन जमिनीला । ठार करा तुम्ही निजलेल्या ।प्रेतांचा ढीग तेथे झाला ।काय वर्णांवें प्रसंगाला । सांगा तुम्ही दादा? ॥चाल मोडते -- जालियनवाला बागेंत केला गोळीबार । मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार । डोळ्याची धुंदी परि नाही उतरली पार । राव रंक सारे सरसकट । जाण्या फरफटत पोटानें सरपटत । लावी सरकार ॥ जी । उपकारफेड ज्यांनि केली करुनी अपकार । राक्षसी अशि डायर कृत्यें करणार । सरकार त्यास पेनशन देण्या तय्यार ।पाहुनीं अमानुष छळा । गांधि खवळला । पुकार केला दुष्ट सरकार ॥ जी जी ॥चौक ३ रा - एकोणीसशे वीस सालाला । आगष्ट पहिलीला । घात जवा झाला । कालानें नेले बाल टिळकास । मायभूमीच्या भाल तिलकांस । पुसुनी दुर्दैव तिच्या वाट्यास । मायभूमी ढाळीं अश्रुला । दास्य शृंखला । तोडणार गेला । म्हणजे मम दया माझ्या पुत्रासं । येती कां कोणा सदय हृदयास । तोंचे पातले गांधि समयास ॥ जी ॥असहकार त्यांनी पुकारुन । देश हालवून । जागृति करुन । दु:ख मायभूचें कमी करण्यास । पारतंत्र्याचे पाश तोडण्यास तुरुंगवासाचा सोशिला त्रास ॥ जी ॥कटाव २ : - असहकार कर्णा फुंकिला । त्याचा नाद देशभर झाला खडबडून जागृत केला । जणु सिंह खावया उठला । इंग्रजां बहिष्कार घाला । नका जाउ त्यांच्या कोर्टाला । सोडा त्यांच्या शाळा काँलेजाला । करुं नका त्यांचे नोकरीला । कौंसिली बहिष्कार घाला । नका घेऊं त्यांच्या पदविला । नका घेऊ विदेशी माला सर्वांनी बहिष्कार घाला । शरण येण्याला ॥चाल २ :- एक कोटी एका महिन्यांत फंड जमविला । खादिचा धंदा त्यांतूनि त्यानी सुरु केला । जिकडे बघावें तिकडें पाहून गांधि - टोपिवाला । क्रोधाग्नि नोकरशाहिचा त्यानें भडकला । मुस्कटदाबी कैक लोकांची केली त्या काला । गोर्याच्या पोटाला चिमटा खादीनें बसला । पकडिले त्यानें त्यावेळी म्हणूनी गांधीला । कांही वेळा ढगाच्या आड सूर्य जाहाला । जातांना ढग बाजूलासूर्य तळपला । काराग्रह एका वर्षात त्यांचा संपला । भगवान कृष्ण गोकुळी जसा जन्माला । इंग्रजांचा जेल पुरणार याच्या जन्माला । मोहनी त्यानें गोकुळां यानें भारताला । कृष्णाने सुदर्शनानें कंस वध केला । यांचे चरखा - चक्र मारितें मँचेस्टरवाला ।लक्ष्मी सदा सेविते त्याचें चरणाला । धांवते लक्ष्मी या मार्गें नित्य कार्याला । अर्जुना गीता सांगूनी निर्भय केला । शिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला । त्यानें कौरवा शींयुद्धार्थ अर्जुन सिद्ध केला । यानें हिंदी केला तय्यार कायदेभंगाला ।चाल मोडते : - असहकार काळ संपला । चला हो चला कायदेभंगाला । मुंबईकर ज्यामध्यें ख्यात । ज्यानी केली इंग्रजावर मात । त्याचें वर्णन पुढील चौकांत ॥ जी ॥चौक ४ था -- सायमन कमिशन नेमून । केला अपमान । घेतला लाठी मारुन लालाजीचा प्राण । पाहून जाहला जागृत देश-अभिमाने । स्वातंत्र्य ध्येय जाहीर । करण्यास धीर तरून तयार । करण्या बलिदान ।कटाव ३ :- जसा कृष्ण भगवान गेला । शिष्टाई करण्याला दुर्योधनाला सामोपचारानें वळविण्याला । धर्माची हो बाजू मांडण्याला । हिताची गोष्ट सांगण्याला । दुर्योधन ऐका काय बोलला । माति जेवढी सुईच्या आग्राला । नाही देणार पांडवाला । पांच नांवांची गोष्ट कशाला । कपटानें घेऊन राज्याला । दुर्योधन मस्त फार झाला । दुरुत्तर भगवानाला बोलला । बुडत्याचा पाय खोलाला । गर्व जसा त्याचा हरण केला । थेट तसा प्रसंग झाला । ऐका तुम्ही दादा ॥दुर्योधनापरमाण झाला । इंग्रज मातला । विचर नाही त्याला । सत्याची चाड नाही त्याला । कृष्णापरि शिष्ठाई करण्याला । गांधी गेले व्हाइसरायच्या भेटीला, गांधी म्हणे व्हायसर साहेबाला । एका वर्षाचा काळ सरला । सरकार काय देणार देण्याला । नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला । सरकारचा इचार काय झाला सायबान दिल उत्तराला । तयार नाहीं वचन मी देण्याला अजून नाहीं इचार पुरता झाला । सायबाच्या ऐकुन या बोला । गांधी गेले लाहोर काँग्रेसला झटक्यानं दादा ॥स्वातंत्र्य पुकारां केला । गांधीनी लाहोरला तरूण हालविला । एकोणीसशें तीस आरंभला । जानेवारी सव्विस तारखेंला । स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचला जागृत सारा देश झाला । गांधी म्हणे कायदेभंगाला । सुरूं करणार याच काला । कायद्याची भीति लोकांला कोणी म्हणे थांबा या वेळेला । गांधि म्हणे भिऊ नका कायद्याला । भिऊ नका मुळिच कां संकटाला । वाघाचे बच्चे प्रसंगाला । भिऊनि पळता कां संकटाला । वाघ असुनी कां शेंळी बनला । आरसा इतिहासाचा डोळ्याला । दिसतो का नाही तुम्हाला । त्यांत पहा शूर पूर्वजाला । त्यांत पहा शिवाजी राजाला पारतंत्र्यात राहण्याला । लाज कशी नाही चित्ताला । काळिमा पूर्वज किर्तीला । हाती घ्या सत्याग्रह शस्त्राला सविनय कायदेभंगाला । तयार व्हा त्वरितचि कार्याला आज तुम्ही दादा ॥मीठ कायदाभंग करण्याला । गांधि निघाले मार्च बाराला । सत्याग्रही ऐशी लोकाला । घेऊनि मदतीला । चालत गेले दांडीला ॥ लोटले लोक बघण्याला । उधळती फुलें पैशाला । धन नको लोक या काला । पाहिजे मजला असें सांगुन कायदा तोडला ॥शस्त्रासि टक्कर देण्याला । शस्त्रहीन सिद्ध कसा झाला परदेश लोक लोटला युद्ध पहाण्याला । आश्चर्य वाटे जगताला ॥कटाव २ - आदर गांधिविषयी वाढला । जगीं साधु म्हणुन गाजला । धर्मात्मा म्हणुन गाजला । राजकारणी म्हणून गाजला । रामदासापरि त्रिगुणानें गांधी चमकला । जी ।सहनशीलपणा दुष्टाला । शरण येण्या लावतो त्याला । असा परसंग एकनाथाला । यवनाने मुद्दाम आणला एकनाथ गेले स्नानाला । यवन बसला त्यांचे वाटेला । एकनाथ परत चालला । पाहून आंघोळ केलेला । यवनानें विडा हो थुंकला । एकनाथ परत स्नानाला । स्नान करुन परत चालला । यवन विडा खाऊन रंगला । येतांचे पुन्हा लाल केला । असा एकशें आठ हो वेळेला । यवन त्याच्या आंगावर थुंकला । यवन त्यांना शरण मग आला । एकनाथ हार्णे यवनाला । एकशें आठ स्नान करण्याचे पुण्य दिले मजला ॥ जी ॥चाल २ री एकनाथ , प्रल्हाद, तुकाराम या कसोटीला । उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला । सामुदायिक रीतीने तसे सोसू कष्टाला । सोसुनी हाल देशार्थ मिळवू विजयाला । उतरले सत्याग्रही सर्व या कसोटीला । करणार म्हणे गांधिजी मिठागरी हल्ला । करूं गोळीबार जर कराल मिठागरी हल्ला । प्राणाची पर्वा देशार्थ नाही हो ज्याला । तो भिईल काय सरकारी गोळीबाराला ।सत्याग्रही कैक तय्यार हल्ला करण्याला । सरकारने असे पाहुनी पकडले गांधिला ॥ जी ॥ N/A References : N/A Last Updated : January 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP