प्रासंगिक कविता - प्रसंग ४

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.


( कृष्णातीरीं आल्यावर श्रीसमर्थ चरेगांवाजवळील चंद्रगिरी ऊर्फ चांदोबाच्या डोंगरांतील गुहेंत शके १५६७-६८ मध्यें राहात असत व आसपासच्या प्रांतांत संचार करीत असत. पुढील डफगाण्यांत कोल्हापुरापासून शहापुरापर्यंत असलेल्या मुख्य तीर्थस्थानाचें वर्ण श्रीसमर्थांनीं केलें आहे. )
( डफगाणें )
केला काशी विश्वेश्वर । सेतुबंध रामेश्वर ।
न पाहातां कोल्हापुर । व्यर्थ होय ॥१॥
पूर्वीं होता कोल्हासुर । म्हणोनि नाम कोल्हापुर ।
तेथें लक्ष्मीचा अवतार । तुम्ही पाहातां ॥२॥
तेथें बहुसाल देउळें । तळें रंकाळें पद्माळें ।
जळें वाहाती निर्मळ । ठायीं ठायीं ॥३॥
तेथुनि पाहातां उत्तर । पुढें आहे केसापुर ।
नदी पंचगंगेचें तीर । सुंदर नीर ॥४॥
वरतें जळसेनाचें तळें । तया तळ्यामाजीं कमळें ।
तेथुनि दिसत पन्हाळा । सारा गड ॥५॥
मार्कंडेयाचा डोंगर । त्यावरि थोर रत्नागीर ।
आला हिमाचळाहुनि केदार । भक्तिलागीं ॥६॥
जागा लक्ष्मीचें सिराळें । तेथें निघती नागकुळें ।
श्रावणमासीं मुलेंबाळें । खेळवितीं ॥७॥
ऐका पुढील प्रसंग । आळतें वाहे रामलिंग ।
नरसिंहपुरीं देव धिंग । गुप्त आहे ॥८॥
कराड नगर सांगों काई । तेथें सुंदर तुकाई । कृष्णासंगम ठायीं ठायीं । देवस्थानें ॥९॥
भुलेश्वर धारेश्वर । रुद्रेश्वर चापेश्वर । तेथें महिमा अपार । रघुनाथाचा ॥१०॥
चंद्रगिरीमध्यें गवी । तेथें वास करी कवी । त्याची जागा ते पुरवी । शहापुर ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP