मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|

सुंदरकांड

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


नमूं सर्वकर्ताचि तो विश्वभर्ता । गुणी शोकहर्ताचि हर्ता विवर्ता । परेहूनि परर्ताचि पर्ता विवर्ता । भुतें भूतधर्ताचि धर्ता उधर्ता ॥१॥
महीमंडळींचे कपी रीसराचे । तयां मध्यभागीं महावीर साजे । महारुद आज्ञेप्रमाणें निघाला । सिताशुद्धि आणावया सिद्ध जाला ॥२॥
सवें मंडळी चालिल्या वानरांच्या । नभोमंडळामाजिं फौजा विरांच्या । गिरीकंदरें देश नानापरींचे । तटाकें नद्या ओघ जाती नदींचे ॥३॥
पुरें पट्टणें अट्टणें धुंडिताती । कपी वीर दाही दिशा हिंडताती । सिता शोधितां शुद्धि कोठें न लागे । बळें धुंडितां ते विरें वीरु भागे ॥४॥
वनें भूवनएं रम्य नानापरींची । बरीं शोधिलीं तीं गिरीकंदरींचीं । दरें शृंग पाठार मैदान दारी । कपाटें गव्या वीवरें तीं भुयारीं ॥५॥
कपी शोधितां शोधितां सुस्त जाले । नव्हे कार्य तैं दैन्यवाणे मिळाळे । समुद्रातिरीं ते उदासीन जाती । गळाल्या तनू थोर उद्वेश चित्तीं ॥६॥
कपी बोलती काय आतां करावें । न लागे सिताशुद्धि तेव्हाम मरावें । म्हणे मारुती वीर हो स्थीर बैसा । तिन्ही लोक पाहून येतों तमासा ॥७॥
भयासूर तो भीम सिंधू उडाला । त्रिकूटाचळाहून पैलाड गेला । पुढें सर्वही पाणजंजाळ पाहे । हनूमंत विस्मीत होऊनि राहे ॥८॥
समुद्रामध्यें भेटला तो अतीतू । म्हणे रे अरे अ रे अरे कोण रे तूं । हनूमंत घाली नमस्कार त्याला । मनामाजिं तो थोर संतुष्ट जाला ॥९॥
मुनी तो त्रिकूटाचळीं शुद्धि सांगे । किराणें उडे तो कपी वीर मागें । अकल्पीत लंकापुरी कांचनारी । पुढें देखिली सौख्यदाती मनाची ॥१०॥
गुढ्या गोपुरें देउळें तीं अपारें । हुडे कोठ जाळांधरें थोरथोरें । सुवर्णाचळामाजिं तें तेज फांके । तया पाहतां कीरणीं दृष्टि झांके ॥११॥
कपाटें लोहोअर्गळ पंथ मोठे । बळी बैसले थोर आश्चर्य वाटे । बहूसाल वाद्यें उडाडां धडाडं । खुसीहाल आवाज होती भडाडां ॥१२॥
पुढें पाहतां जावया रीग नाहीं । न सूचे मनीं मानसीं यत्न कांहीं । पुढें भीम तो अंतराळें उडाला । लघूरूप लंकेत होऊनि गेला ॥१३॥
गृहा गोपुरांचा बहू दाट खोटा । सदा सर्वदा वाहती सर्व वाटा । बिदी हाट बाजार कुंचे दुकानें । सदा मस्त ते हस्ति जाती गुमानें ॥१४॥
सिलेभार सज्जीत ते राउतांचे । बरें फार संगीत होती विरांचे । दिसेना तयांलगिं झुंजार कोणी । बळें जिंकिले पीडिले लोक तीन्ही ॥१५॥
बहू सज्ज तें राज्य लंकापुरीचें । पुरीमाजिं ते सैन्य मोठया बळाचें । उफाळेंचि जाती भुजा फूर्फुरीती । तयां देखतां देव ते थर्थरीती ॥१६॥
त्रिकूटाचळीं ख्याति केली भीमानें । लघूरूप तो हिंडताहे धिरानें । गृहेम गोपुरें पाहिल्या धर्मशाळा । अकस्मात त्या देखिल्या बंदिशाळा ॥१७॥
हिनासारिखें देव ते दीन झाले । नसे शक्ति ना युक्ति पोटीं गळाले । भयामीत ते कांपती दीनवाणे । बहू गांजिलें दु:ख तें कोण जाणे ॥१८॥
सुरांकारणें कोप भीमासि आला । मनामाजिं आवेश तो थर्थरीला । रुपें भर्भरील तमें गर्गरीला । प्रसंगीं तये मारुती गुप्त जाला ॥१९॥
मनमाजिं आवांकिलें सर्व कांहीं । सिता सांडिली तूळणा त्यासि नाहीं । बहू मातले गर्व मोठया बळाचा । तया झोडिता दास मी राघवाचा ॥२०॥
त्रिकूटाचळीं ख्याति केली भीमानें । पुढें पत्रिका धाडिली ब्रह्मयानें । तिये वाचितम वाचितं राम हांसे । क्रिडाकौतुकें अंतरामाजिं तोषे ॥२१॥
नटे नाटकू त्रीकुटामाजिं कैसा । महा कांड सुंदर्य जाला तमासा । देहे आपुलें सर्वही गुप्त केलें । प्रसंगीं तयें पुच्छ तें वाढवीलें ॥२२॥
बहू व्यापिला वेढिली सर्व लंका । कितेकां मनीं वाटली थोर शंका । गृहांतूनि अंतर्गृहीं पुच्छ घाली । बहू पाडिता फोडितां हांक जाली ॥२३॥
बळें लांगुलें रूधिल्या सर्व वाटा । बहू तुंबला लोक तो दाट खेटा । तयाभोंवतें पुच्छ बांधोनि भारें । नभीं पोकळीं माजिं नेटें उभारें  ॥२४॥
बहू भार ते स्वारे मध्येंचि खंडी । महामस्त । महामस्त ते हस्ति नेटें उलंटी । गुरें शाकटें राक्षसालगिं पाडी । पदीं पुच्च बांधोनि पाडी पछाडी ॥२५॥
पडों लागले दैत्य नेटें बदादां । कितीएक ते दीर्घदेहीं भदादां । बळाची दळें पाडिलीं पुच्छमारें । दिसेना परी गर्जतो भूभुकारें ॥२६॥
धरी पंथ कोणासही जाउं देना । पुरीमाजिं पापी कदा येऊं देना । चुली पेटल्या वन्हि तेथें विदारी । बळी धांवती त्यांसि तेथेंचि मारी ॥२७॥
गळे पाय बांधी किती हात बांधे । पुरीमाजिं हांकेस ते हांक सांधे । महावीर चौताळले तें धरेना । बळें वावरे पुच्छ तें आदरेना ॥२८॥
जना ओढितां पाडितां आपटीतां । समस्तां जनांलगिं पाडूनि जातां । पशूराक्षसीं सर्वही हांक केली । कितीएक तीं चिर्डचिर्डोनि मेलीं ॥२९॥
कितीएक तीं राक्षसें हाकलीती । कितीएक तीं राक्षरे वोंबलीती । कितीएक तीं थोर जाली रुदंती । कितीएक तीं राक्षसें चर्फडीसी ॥३०॥
असंभाव्य तें पुच्छ झाडी उलंडी । कडाफोदि होतांचि येतांचि झोडी । पुरीमाजिं सर्वांसही आट केला । विरें वीर राक्षेस सर्वै बुडाला ॥३१॥
नसे अन्नपानी मुखामाजिं घाणी । कितीएक ते जाहले दैन्यवाणी । पुरीमांजि नानापरी घोळ केला । पुढें अस्तमानासि तो दीन गेला ॥३२॥
उदासें घरें मंदिरें थोरथोरें । महापुच्छ तें वावरे अंधकारें । भुजंगापरी सर्व वेंटाळिताहे । विरें वीर चाकाटला सर्व पाहे ॥३३॥
मुलां लेंकुरांमाजिं तें खेळताहे । निजेल्यांमधें पुच्छ तें लोळताहे । कुमारीकुमारां गळां हार घाली । भयाभीत अंत:पुरीं हांक जाली ॥३४॥
त्रिकूटाचळीं सर्व ऊदंड आले । भयाभीत ते सर्वही लोक जाले । कळेना बरें सर्व कीं काय आहे । करी तें महामार त्याचा न साहे ॥३५॥
अकस्मात तें काय होतें कळेना । वळेना कदा आकळेना । सभेमाजिं रायापुढें हांक गेली । अहो पाहतां काय लंका बुडाली ॥३६॥
उगा लोळसा घोळ मोठा करितो । करारूनि बांधोनि सर्वां धरीतो । बहूतापरी सांगती रावणाला । बहूतां जणांता घरीं कोंड जाला ॥३७॥
नव्हे जी नव्हे सर्व सामान्य मातू । महाघोर हा थोरला पुच्छकेतू । सभामंडपीं कोप रायासि आला । म्हने सांगती त्यामस मारून घाला ॥३८॥
तयां मारितां पुच्च तेथेंचि आलें । सभामंडपामाजिं नेटें निघालें । दिवे पाडिले दीवटे आपटीले । अकस्मात हीलाल हीरोनि नेले ॥३९॥
मुखें बोलती दीप रे दीप आणा । दिवे आणितां मूकती दैत्य प्राणां । असंभाव्य त्या दीवढया दीप थावे । बळें लागवेगें समूदाय धांवे ॥४०॥
पुन्हां मागुती दीप घेऊनि आले । बळें धांवतां पुच्छमारें विझाले । तया लांगेलें रुंधिलीं सर्व दारें । कपी वीर तो वावरे अंधकारें ॥४१॥
सभांमंडपीं गुद्‍गुल्या तो करीतो । मुखें नासिकें कर्ण छेदून नेतो । बळें गाल सर्वांग हीं बर्बडीतो । चिरें फाडितो ओढितो गुर्गुरीतो ॥४२॥
बळचे महावीर तेथें मिळाले । परी अंधकारेंचि कांही न चाले । किती लोटिले कूटिले चूर केले । भयाभीत कोणास कोणी न बोले ॥४३॥
कपी वीर तो थोर लाहान होतो । धरीतां बळें हात मोडोनि जातो । बुक्या मारितो पांपरीं वज्रथापा । असंभाव्य तो कोपला राव कोपा ॥४४॥
म्हणे वीर हो काय रे काय जालें । कळेना मुखें बोलती काय आलें । भयासूर तें गुर्गुरीतें कळेना । करूं काय आम्हांसि तें आकळेना ॥४५॥
कपी वीर रायाकडे शीघ्र गेला । बळें थाप मारून मूगूट नेला । बरें ठोंसरे मारिले रावणाला । म्हणे मारितों रे तुझ्या आखयाला ॥४६॥
चिरें सुंदरें फाडिलीं रावणाचीं । करी भूषणें चूर मुक्ताफळाचीं । कपीनें सभा सर्वही नग्न केली । त्रिकूटाचळीं ख्याति ऊदंड जाली ॥४७॥
हाहाकार जाला सभेमाजिं मोठा । बळें मारुती मारिताहे चपेटा । सभामंडपीं फार आकांत झाला । कपीनें पुढें मोकळा मार्ग केला ॥४८॥
लपाला कपी पुच्छ ओढूनि नेलें । लघू मश्यकाचे परी रूप केलें । असंभाव्य त्या दीवटया चंद्रज्योती । असंख्यात राक्षेस धांवूनि येती ॥४९॥
सभामंडपामाजिं धांवोनि आले । तेणें नागवे लोक लज्जीत जाले । महावीर मागें पुढे हात देती । कपीनें बहूसाल केली फजीती ॥५०॥
सभामंडपीं वस्त्र कोठें दिसेना । भूतांसारिखे नागवे लोक नाना । चिरें आणिलीं नेसले स्वस्थ जाले । मनामाजिं लज्जीत कोणी न बोले  ॥५१॥
कपीवीर तेथूनि वेगें उडाला । अशोकावनामाजिं वृक्षीं दडाला । अधोमूख तो जानकीलगिं पाहे । कपी राममुद्रा पुढें टाकिताहे ॥५२॥
सितेनें पुढें मुद्रिक ओळखीली । बहूतांपरी शब्दकारुण्य बोली । पुढें मारुती भेटला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ॥५३॥
क्षुधाक्रांत मी जाहलों फार माते । तनू चालतां चांचरी सर्व जाते । बहूतांपरी बोलिला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ॥५४॥
अशोकीं बहू लागले वृक्ष नाना । पहातां असंख्यात संख्या असेना । नव्हाटें जुनाटें वनें दाट थाटे । वनें मोडिता जाहला कड्‍कडाटें ॥५५॥
फळें भक्षिलीं सर्व नान परींचीं । बहू स्वाद वर्णू कळाकूसरीचीं । कपीवीर तो तृप्त जाला निवाला । पुढें वृक्ष मोडावया सिद्ध जाला ॥५६॥
तरू मोडिले पाडिले ऊपटीले । किती झोडिले झाडिले चूर केले । गिरीसारिखे ढीग सांडूनि टाकी । तयाला असंभाव्य राक्षेस हांकी ॥५७॥
वनें मोडितां मोडितां हांक जाली । कितीएक ते दैत्यमांदी मिळाली । गलोला कमाना करीं भिंडमाळा । बळें हांकितां नाद गेला भुगोळा ॥५८॥
बहूतां बळाचे बहू लोक आले । कितीएक ते धिंग मोठे मिळाले । वनें वेढिलीं धांवले काळ जैसा । सेभुतां खेचरां थोर कल्पांत भासे ॥५९॥
कपी वीर चौताळला वेग केला । कितीएक राक्षेस भंगोनि गेला । त्रिकूटाचळीं रावणा जाणवीलें । वनीं वानरें थोर अद्भूत केलें ॥६०॥
बळें धांविला कूमरू रावणाचा । सदा अक्षयी वीर मोठया बळाचा । असंभाव्य राक्षेस धांवोनि आले । कपीलगिं मारावया सिद्ध जाले ॥६१॥
बळें आगळा आखया लक्ष भेदी । चुकावी कपीवीर लागोंच नेदी । बहू लागले मारितां भग्न जाले । कितीएक ते दैत्य पोटीं गलले ॥६२॥
पहा हो कपी धीट मोठा पळेना । सदा सर्वदा लक्ष याचें चळेना । पुन्हां मागुते वीर ते सिद्ध जाले । कितीएक ते पाश घेऊनि आले ॥६३॥
मुखें बोलती मर्कटा बैसलेंसी । समारंगणामाजिं युद्धा न येसी । कपीवीर तो गर्जला भूभुकारें । समारंगणीं चालिला घोर  मोरें ॥६४॥
रिपू झोडिले पाडिले वृक्षघातें । भुमीं लोळती दैत्य होऊनि प्रेतें । पुढें देखिलें जंबुमाळ्या कुटीला । बळें आखया आपटीला पिटीला ॥६५॥
पळाले कळी फूटली राक्षसांचो । पुढें हांक गेली तया आखयाची । त्रिकूटाचळी शोकआरंभ जाला । प्रितीचा बहु आखया तो निमाला ॥६६॥
पुरीमाजिं अंत:पुरीं घोष जाले । सुखानंद मंदोनि गेले विझाले । बहू दु:ख जालेंच मंदोदरीला । तिनें कूमरालगिं आकांत केला ॥६७॥
पुसे रावणू काय रे काय जालें । तुम्हांलगिं मारावया कोण आलें । कपी एकला बैसला तो पळेना । चळेना ढळेना कदा आकळेना ॥६८॥
तया टाकितां पाश मोठाचि होतो । लघूरूप होऊनि नीवूनि जातो । कदाहा पडेना कदा सांपडेना । तेणें मारिली दैत्य ऊदडं सेन ॥६९॥
विधीलगिं बोलविलें रवणानें । कठीणोत्तरीं गांजिलें दुर्जनानें । म्हणे जारे रे आणि वेगें कपीला । तया नाणितां शीघ्र ताडीन तूला ॥७०॥
विरंची पुढें घातला चालवीला । असंभाव्य तो लोकमेळा मिळाला । वनामाजिं येतां नमस्कार घाली । तया मारुतीची बहू स्तूति केली ॥७१॥
बहूतांपरी कीर्तीचें येश घ्यावें । दयाळा कपी ये घडी शांत व्हावें । न होतां मला मारिती ब्राह्मणाला । बहूसाल कल्याण व्हावें तुम्हांला ॥७२॥
कपीवीर तो थोर कोपें कडाडी । करी गर्जना मेघ जैसा गडाडी । परी सांकडीमाजिं कांहीं न चाले । मिळाले कपलिगिं घेऊनि आले ॥७३॥
अरे मर्कटा थोर अन्याय केला । म्हणे रावणू मारितो शीघ्र तूला । तुझा मृत्यु कोठें खरें सांग आतां । मुढा कष्मळा मारितों जात जातां ॥७४॥
म्हणे मारुती काळ मारू शकेना । कृपाळूपणें तोषला रामराणा । न वाटे खरें सांगतोआं रावणाला । म्हणे वानरूलांगुलीं अग्नि घाला ॥७५॥
म्हणे रावणू पाहतां काय आतां । चिरे आणवा सांगताहे समस्तां । असंभाव्य ते वीर धांवोनि गेले । त्रिकूटाचळीं लोक ते नग्न केले ॥७६॥
पुढें पुच्छ ओढोनि गुंडाळिताती । सिमा सांडिली वीर गुंडाळिताती । तया वेढितां तें असंभाव्य लांबे । विरें वीर त्या लांगुलालागिं झोंबे ॥७७॥
कितीएक तीं आणिलीं आज्य तेलें । कितीएक तीं मोगरेलें फूलेलें । महापुच्छ तें सर्वही भीजवीलें । पहा हो कपी बापुडें व्यर्थ मेलें ॥७८॥
तय लवितं वन्हि तेथें न लागे । बळें फुंकितां तो विरे वीरु भागे । तया देखतां रावणू शीघ्र आला । बळें फुंकितां फुंकितां तो गळाला ॥७९॥
पुढें रावणू थोर कोपें कडाडी । बळें फुंअळतां जाळ नेटें धडाडी । जळालीं मुखें भस्मल्या खांड मीशा । बहूसाल लंबीत होत्या विशेषा ॥८०॥
बळें चेतला वन्हि नेटें तडाडी । कडाडीत ज्वाला दडाडी धडाडी । कपीवीर तो वाड जाला उडाला । पुढें जाळिता जाहला त्रीकुटाला ॥८१॥
गृहां गोपुरांमाजिं तें पुच्छ घाली । त्रिकूटाचळीं आगि नेटें निवाली । बिदी हाट चौबार कुंचे । बळें बोंबली नागवा लोक नाचे ॥८२॥
बहूतांपरींची बहू हांक जाली । पळा रे पळा रे पळा आगि आली । गुरें वासुरें शिंगरे लेंकुरें तीं । शुनीं मार्जरें तैं खरें येसरें तीं ॥८३॥
किती शेरडें मेंढरें तीं अचाटें । जळालीं किती राक्षसें कल्कलाटें । किती शाकटेम कुंजरें दिव्य घोडे । महीमंडळीं त्यांसि नाहींत जोडे ॥८४॥
बहूतांपरींची बहू रम्य यानें । बहूसाल छत्रें विचित्रें निशाणें । बहूतांपरींच्या बहूसाल शाळा । जळाल्या विवीधा विचित्रा विशाला ॥८५॥
बळें लोक तेथें बळें पुच्छ घाली । बहूतां विरांची बहू शांति जाली । महपुच्छ तें जाळ बंबाळ जाला । बहू साक्षपें वन्हि तो चेतवीला ॥८६॥
पळले भयासूर ते दूरि थावे । कपीवीर लांगूल घेऊनि धांवे । बहू भोंवताहे बहू धांवताहे । उठे वन्हिचें चक्र लांगूल पाहे ॥८७॥
फिरे गर्गराटें कपी चक्र जैसा । विधी शक्र अव्यग्र पाहे तमासा । बिरां खेचरां भूचरां अंत जाला । त्रिकूटाचळा थोर कल्पांत आला ॥८८॥
बहूसाल दारूमधें पुच्छ घाली । उसाळे नभामाजिं दारू निघाली । तडाडी थडाडी दडाडी धडाडी । शशी सूर्य नक्षत्रमाळा कडाडी ॥८९॥
बहू धूम्र तेणें कदाही दिसेना । बहूसाल वढाणि ते सोसवेना । बहू घोष तो शब्द कानीं पडेना । कपी रोषला झाडतांही झडेना ॥९०॥
पुढें धूत्रत्यागी धगागीत आगी । महावन्हि कोपोंचि जाला विभागी । त्रिकूटाचळू कांचेनाचा तखाकी । सतेजीक तेजें झकाकी लखाकी ॥९१॥
महावज्र लांगूल कल्लोळ जाला । परी पाहंता रोम नाहीं जळाला । गदादीत काया समुद्रांत घाली । निवाला कपी पुच्छज्वाला विझाली ॥९२॥
समुद्रीं शुचिष्मतं होऊनि आला । नमस्कार घाली तये जानकीला । म्हणे जानकी एकला तूं विदेशी । कपी रे बहूतांपरी कष्टलाशी ॥९३॥
म्हणे मारुती धन्य हे दीस आले । तुम्हां देखतां सर्वही कष्ट गेले । प्रभू वाट पाहील तो रामराजा । निरूपाचि मो शीघ्र जाईन काजा ॥९४॥
सिते मारुती योग वीयोग जाला । बहूसाल नेत्रोदकीं पूर आला । म्हणे मारुती लोभ आतां असावा । सुरांचा बळें राम येतो कुडावा ॥९५॥
कपी मागुती मागुती वाट पाहे । उदासीन जातां गळां दाटताहे । विवेकें जिवामाजिं तो धीर केल । पुढें मारुती शीघ्र सिंधू उडाला ॥९६॥
कपीलगिं सांगे सिताशुद्धि जाली । मुखें ऐकतां मंडळीं ते निवाली । समस्तं जनांलगिं आनंद जाला । कपी मारुती रामभेटी निघाला ॥९७॥
दळेशीं बळें राहिला रामराजा । कपी रीस ते वीर वेष्टीत फौजा । स्फुरद्रूप ऊभारिला दिव्य बाहो । रघूनायकें देखिला भीमदेहो ॥९८॥
कपी लागवेगें मुखें बोलताहे । अशोकीं जगन्माय कल्याण आहे । पुढें मारुती तो नमस्कार घाली । मनोवृत्ति ते राघवाची निघाली ॥९९॥
समस्तांसि देखोनि आनंद जाला । सित शुद्धि घेऊनियां रुद्र आला । बहूतां बहू सांगती एकमेकां । सिता शोधितां सौख्य जालें अनेकां ॥१००॥
सभामंडपीं राम सन्मूख पाहे । उभा दास साकल्य तो सांगताहे । महत्कृत्य व्हावें जनीं येश यावें । प्रभूसी समस्तांसि कल्याण व्हवें ॥१०१॥

॥ श्रीसुंदरकांड श्लोकसंख्या ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP