कथामृत - अध्याय पहिला

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । सर्वाधीशा नमोस्तुते ॥१॥
श्रीकुलदेवतायै नमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । श्रीनर्मदादेव्यै नमः । गंगामाते नमोस्तुते ॥२॥
श्रीअक्कलकोट-निवासी । परब्रह्म श्रीस्वामींसी । शतावधि प्रणिपातांसी । करित असे दास हा ॥३॥
लावोनि भक्तिचे निरांजन । सत्प्रेमाची पुष्पे वाहुन । प्रार्थना हा धूप जाळुन । चरणकमलां पूजितो ॥४॥
सद्‌गुरुंचे ध्यान धरुन । दिव्य स्वरुपा करि वंदन । याचितो मी देइगा ज्ञान । अखंड नाम स्मरणाचे ॥५॥   
श्रीस्वामींचे दिव्य चरित्र । वर्णावया कोण पात्र । काया-वाचा-मने अपात्र । मी तो असे सर्वथा ॥६॥
परंतु इच्छा एक महान । गावी स्वामींची कथा गहन । गाता ऐकता पातके जाण । भस्म होतील सर्वही ॥७॥
पर्वत मुंगिने उचलावा । समुद्र टिटविने आटवावा । वेद अप्रबुद्धे म्हणावा । कैसे असे शक्य हे ॥८॥
विचार येतां कापरे भरते । लेखणी ती गळोनि पडते । चरित्र कैसे माझिया हाते । होईल देवा संपूर्ण ॥९॥
मिळाला वाटे मला शाप । गतजन्मीं मी करिता पाप । हरावया तो शापताप । चरित्र गावे स्वामींचे ॥१०॥
कृपेविना तुझ्या देवा । कैसा हेतू साध्य व्हावा । चरित्र-ग्रंथ गोड व्हावा । यास्तव द्यावे वरदान ॥११॥
चरित्र-सागर उल्लंघाया । सामर्थ्य द्यावे स्वामिराया । लोटांगणे घालुनी पायां । प्रार्थितो मी तुम्हासी ॥१२॥
जन्मोजन्मीं आपुले नाते । जडो ऐसे मज वाटते । यास्तव पदरज मस्तकाते । लावितो मी सदैव ॥१३॥
शब्दस्फूर्ती, कल्पनास्फूर्ती-। देउनीं करणे ग्रंथपूर्ती । मनीं धरियली तुझी मूर्ती । विलंब आता न करावा ॥१४॥
मातापितयांसी वंदितो । पूर्वजांचे स्मरण करितो । आशीर्वाद असो म्हणतो । पुण्यकर्मा साधावया ॥१५॥
नमितो श्रीसद‌गुरुचरणां । निवारावे सर्व विघ्ना । श्रीस्वामींचे गुणगायना । सत्स्फूर्ती द्या मजलागी ॥१६॥
शनिदेवादी नवग्रहांसी । शरण जाउनी प्रार्थितो त्यांसी । साह्य द्यावे या समयासी । ग्रथंलेखन करावया ॥१७॥
रामानंद मज लाभले । पाश्चात्त्यविद्याविभूषित भले । अध्यात्ममागीं श्रेष्ठ ठरले । स्वामी कृपा अपूर्व ॥१८॥
तेतों असती माझे गुरु । संसारसागरींचे तारु । अथवा गमती कल्पतरु । सदैव माझे मनास ॥१९॥
रामानंद अति प्रेमळ । शिष्योन्नतीची त्यां तळमळ । मार्गदर्शना वेळोवेळ । निज शिष्यांप्रति करिताती ॥२०॥
परम पावन ते गुरुचरण । करोनिया मस्तकी धारण । प्रार्थितो मी कर जोडुन । द्यावे सद्‌यश ग्रंथासी ॥२१॥
आता प्रार्थना श्रोतियांसी । भक्त, बांधव, सज्जनांसी । सावचित्त व्हा परिसायासी । पावन चरित्र स्वामींचे ॥२२॥
जन्ममृत्युच्या अतीत । स्वामी स्वयंभू हो निश्चित । प्रकट झाले अकस्मात । अक्कलकोटीं वृक्षातळीं ॥२३॥
मूर्ति अत्यंत तेजस्वी । बघतां वाटे जणु गभस्ती । मानवरुपे महीवरती । दर्शन द्याया अवतरले ॥२४॥
ऐका, ऐका श्रोतेजन । स्वामी असती तरी कोण । पूर्वकथेचे झालिया ज्ञान । हर्ष पावाल मानसीं ॥२५॥
गुरुचरित्रीं नृसिंहसरस्वती । परमपूज्य ते दत्तमूर्ती । गाणगापुराहुनी शैल्यपर्वती । जाण्याप्रती निघाले ॥२६॥
शैल्यपर्वताचे परिसरांत । येतां रम्य कर्दलीवनांत । विचार करुनी मानसांत । गुप्त वनीं जाहले ॥२७॥
वनिची शोभा वर्णवे न । पक्षिगायनें हरपे भान । अमृत निर्झर कड्यांवरुन । उड्या टाकोने धावती ॥२८॥
छाया दाटली अरण्यांत । हरिणशावके क्रीडा करित । पसरुनी पिसारे रत्नखचित ! मयूर नाचती हर्षाने ॥२९॥
इंद्रधनूतिल रंगांनी । लज्जित व्हावे आपुल्या मनीं । ऐशी फुलपांखरे ती वनीं । विहरत होती सर्वत्र ॥३०॥
पुष्पलतांनी वृक्ष भरले । मधु चाखितां भ्रमर रमले । कोकिळगायन वनीं चाले । वनश्री ऐशी रमणीय ॥३१॥
लहानमोठे जलाशय । दिसती जणू स्फटिकमय । वनदेवींची दर्पणसोय । केली गमे जगदीशे ॥३२॥
निळे, हिरवे मनोहर । पर्वत असती सभोवार । रत्नराशी रचिल्या थोर । कुबेरानी जणू की ॥३३॥
भेदूनि गगना वृक्ष जाती । वार्‍यासंगे ते डोलती । नाना फुले गंध उधळती । सुगंधित झाले वन सारे ॥३४॥
काय आणिक किति वर्णावे । सुरांगनांनीही भुलावे । स्वर्ग सोडुनी इथे यावे । ऐशी वनश्री अपूर्व ॥३५॥
बहुत वर्षे जाहल्यावरी । अवचित घटना घडली खरी । मनोहर अशा त्या कांतावरीं । रम्य प्रभाती एकदा ॥३६॥
गाती प्रभाती अति सुस्वर । विहंग बैसोनिया तरुवर । अवचित येई तिथे वनचर । थोर परशूस घेउनीं ॥३७॥
वृक्ष वल्लरी वेष्टीत भला । बघुनी नर तो आनंन्दला । शाखोपशाखा तोडण्या सजला । कुठार घेउनी चढला वरी ॥३८॥
शाखा तोडिता फार थकला । करिचा परशू गळोनि पडला । तळिचे वारुळा भेदोनि गेला । खोल अंतर्भागि तो ॥३९॥
अहाहा घडले नवल थोर । अंतरीं प्रगटे ध्वनि ॐकार । ऐकता घाबरे तो वनचर । उतरे खाली त्वरेने ॥४०॥
बघोनि मुनिची ध्यानस्थ मूर्ती । घाव मांडीवरती । पाहोनी बसे पाचावरती-। धारण रडू लागला-॥४१॥
आता ऋषी हे शापितील । क्रोधाग्नीने जाळितील । नेत्र आक्रांदिता लाल-। झाले लोळे धरनीवरी ॥४२॥
हाय मी पातक केले घोर । घायाळ केला मुनी थोर । घोर नरकीं मी जाणार । करु आता कैसे तरी ॥४३॥
यमदूत नरकीं लोटितील । आसुडे मज फोडितील । तिथे येउनी सोडवील । ऐसा समर्थ कोण असे ॥४४॥
काय माझी ही कर्मदशा । इथे नेमका आलो कसा । रडू लागला तो ढसढसा । कोण मातें रक्षील कीं ॥४५॥
थरथर कापे भिल्लकाया । क्षमा करावी पामरा या । वाचवा मज हो मुनिवर्या । दग्ध मातें न करावे ॥४६॥
भिल्ल रडे तो धायधाय ! तोंचि इकडे जाहले काय । स्वामी उघडुनी नेत्रद्वय । प्रसन्न वदने विलोकिती ॥४७॥
भिल्ल धरी प्रभुचे पाय । क्षमा असावी चुकलो माय । वाणी प्रगटे अमूतमय । न भ्यावे तूं मजलागी ॥४८॥
अभय मिळता हर्ष झाला । कवटाळिले प्रभुपदांला । कर जोडुनी तयां वदला । उद्धरावे मजलागी ॥४९॥
स्वामी तयाचे मस्तकावर । ठेवुनी आपुला पवित्र कर । वदती तया रे भिल्लवर । चिंता आता न करि गा ॥५०॥
न करि कुणाचा घातपात । चौर्यकर्मी नसावे रत । द्रव्य असावे कष्टार्जित । आजन्म ऐसे वागावे ॥५१॥
मिळता तया आशीर्वाद । झाला पामर तो सद्‍गद । अश्रूंनी न्हाणिले ते श्रीपद । वदे झालो कृतार्थ मी ॥५२॥
ऐशी लाभावी कृतार्थता । सकल लोकांसी सर्वथा । यास्तव भजणे स्वामिनाथा । मनोभार्वे अहर्निश ॥५३॥
इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥५४॥
॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 11, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP