नृसिंहाख्यान - अध्याय ५ वा

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, भगवान् शुक्राचार्याला असुरांनी आपला पुरोहित केले होतें, आणि शंड आणि अमर्क नांवांचे त्याचे दोन पुत्र दैत्यराज हिरण्यकशिपूच्या गृहाजवळ रहात होते ॥१॥

राजानें आपला पुत्र प्रल्हाद नीतिशास्त्रामध्यें निपुण असतांहि तो अज्ञानी आहे असें समजून शंडामर्कांकडे पाठविला असतां, त्यांनी पढविण्यास योग्य असे राजनीति आदिकरुन विषय इतर असुरबालकांबरोबर त्यालाहि पढविले ॥२॥

गुरुगृही गुरुनें जें दंडनीतिशास्त्र त्याला सांगितलें, तें प्रल्हादानें श्रवण केलें व पठणहि केलें; परंतु, ‘ हा मी आणि हा दुसरा ’ अशाप्रकारचा जो मिथ्याभिमान तोच त्या नीतिशास्त्राचा आश्रय असल्यामुळें, त्याला तें मनापासून चांगलें वाटलें नाही ॥३॥

ह्याप्रमाणें चाललें असतां, हे पंडुपुत्रा धर्मराजा, एके दिवशी दैत्यराज हिरण्यकशिपूनें आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन ‘ बाळा तुला काय चांगले वाटते तें सांग ’ असें विचारलें ॥४॥

प्रल्हाद म्हणाला, - हे दैत्यश्रेष्ठा, मी व माझें, या मिथ्याभिमानामुळें मनांत सर्वदा अत्यंत उद्विग्र झालेल्या प्राण्यांनी अंधकूपाप्रमाणें मोहकारक व आपल्या अधः पाताला कारण, अशा गृहाचा त्याग करावा, आणि वनामध्ये जाऊन श्रीहरीला भजावें, हें मला चांगलें वाटतें ॥५॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, आपला शत्रू जो विष्णू त्याविषयी निष्ठायुक्त असें आपल्या पुत्राचें भाषण श्रवण करुन हिरण्यकशिपूला हंसूं आलें; आणि तो म्हणाला, अहो, शत्रुपक्षीय लोक मुलाचा बुद्धिभेद करुन टाकितात ॥६॥

तरी हे शंडामर्कहो, विविध वेष धारण करुन गुप्तरीतीने संचार करणारे विष्णुपक्षपाती ब्राह्मण ह्याचा बुद्धिभेद जेणेंकरुन करणार नाहींत, अशा चांगल्या बंदोबस्तानें तुम्हीं आपल्या घरी ह्या बालकाचें शिक्षण करावें ॥७॥

नंतर हिरण्यकशिपूनें त्यांच्या घरी प्रल्हादाला पोंचविलें असतां पुरोहितांनी त्याला हांक मारुन त्याची प्रशंसा केली; आणि मृदुभाषणपूर्वक सामोपचारानें ते त्याच्याशी बोलूं लागले ॥८॥

ते म्हणाले, - बाळा प्रल्हाद, तुझें कल्याण असो. जें आम्ही आतां तुला विचारणार आहो, तें तूं खरें सांग; खोटें सांगूं नको. अरे, इतर मुलांहून अगदी विपरीत अशी ही बुद्धि तुला कोठून उत्पन्न झाली बरें ? ॥९॥

हे कुलनन्दना प्रल्हादा, दुसर्‍यांनी तुझ्या बुद्धीचा भेद केला, कीं आपोआपच तो झाला ? आम्ही तुझे गुरु असून हें समजून घेण्याची आमची इच्छा आहे, तरी हा प्रकार तूं आम्हांला सांग ॥१०॥

प्रल्हाद म्हणाला, - ‘ मी व दुसरा ’ असा मिथ्या अभिमान ज्याच्या मायेनें केलेला असून त्या मायेनें बुद्धीला मोह पडलेल्या तुम्हांसारख्या पुरुषांच्या ठिकाणींच तो दृष्टीस पडतो; त्या भगवंतालाच नमस्कार असो ॥११॥

तो भगवान् जेव्हां पुरुषांना अनूकूळ होतो, तेव्हां ‘ हा वेगळा व मी वेगळा ’ अशी मिथ्या संसारविषयक अविवेकी बुद्धि नष्ट होत्ये ॥१२॥

वास्तविक पाहूं गेलें असतां, ह्या परमात्म्याचेंच अविवेकी लोक, ‘ हा मी आहे व हा परकी आहे ’ असें निरुपण करितात. त्या परमात्म्याची लीला दुर्धट असून त्याला जाणण्याच्या कामी ब्रह्मादिक देवसुद्धां वेडे होऊन जातात, तो हा परमात्माच माझ्या बुद्धीचा भेद करीत आहे ॥!३॥

अहो गुरुजी, ज्याप्रमाणें लोहचुंबकाजवळ लोखंड आपण होऊन भ्रमण करुं लागतें, त्याप्रमाणें चक्रपाणी श्रीहरीच्या समीप माझें चित्त दैवयोगानें जाऊन तेथें त्याला बुद्धिभेद होतो ॥१४॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, त्या ब्राह्मणाला असें बोलून तो महाबुद्धिमान् प्रल्हाद स्तब्ध राहिला असतां तो अविवेकी राजसेवक ब्राह्मण कुद्ध झाला व त्याची निर्भर्त्सना करुन म्हणाला ॥१५॥

अरे ! हा आम्हांला अपयश देणारा पोर आहे, ह्यास्तव एक छडी आणा. ह्या दुर्बुद्धी कुलांगाराला सामदानादि चार उपायांमधील चवथा उपाय जो दंड तोच योग्य आहे ॥१६॥

अहो, काय सांगावें ! दैत्यरुप चंदनवृक्षाच्या वनांत हा कंटकवृक्षच उपजला असून दैत्यरुप चंदनवृक्षाची मुळें तोडून टाकण्यास तयार असलेल्या विष्णुरुप कुर्‍हाडीचा हा पोरटा म्हणजे दांडाच झाला आहे ॥१७॥

असो. ह्याप्रमाणें दरडावणीसारख्या नानाप्रकारच्या उपायांनी त्या प्रल्हादास भय दाखवून त्या ब्राह्मणानें त्याला धर्म, अर्थ व काम ह्यांचे प्रतिपादन करणारें शास्त्र पढविलें ॥१८॥

नंतर शिकण्यास योग्य असे जे समदानादिक चार उपाय ते ह्याला समजले असें जाणून गुरुनें त्यास मातेकडून अभ्यंगस्त्रान घालविलें; आणि तिलकादिकांनी अलंकृत करुन ते त्याला हिरण्यकशिपूकडे दाखवायास घेऊन गेले ॥१९॥

तेथें प्रल्हाद पित्याच्या पायां पडला असतां हिरण्यकशिपूनें त्याला आशीर्वाद दिला; आणि त्याचें अभिनंदन करुन बाहूंनी पुष्कळ वेळपर्यंत त्याला आलिंगान दिलें. त्या असुर श्रेष्ठ हिरण्यकशिपूला पुत्राला पाहून परमानंद झाला ॥२०॥

हे युधिष्ठिरा, प्रसन्नमुख अशा त्या प्रल्हादाला हिरण्यकशिपूनें अंकावर घेऊन त्याच्या मस्तकाचें अवघ्राण केले आणि प्रेमाच्या अश्रुबिदूंनीं त्याला सिंचन करीत तो त्याच्याशीं बोलूं लागला ॥२१॥

हिरण्यकशिपु म्हणाला, - बाळा प्रल्हादा, तुला दीर्घायुष्य असो. तो पुढें म्हणाला, बाळा प्रल्हादा, ह्या वेळपर्यंत गुरुपासून जें तूं शिकलास त्यांपैकी तुला चांगले येत असेल तें म्हण पाहूं ? ॥२२॥

प्रल्हाद म्हणाला, - ‘ हे ताता, विष्णूचे कीर्तन, श्रवण, स्मरण, पादसेवन, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण ह्या नऊ लक्षणांनी युक्त अशी भगवान् विष्णूच्या ठिकाणी पुरुषानें अर्पण केलेली भक्ति ज्याच्या योगानें साक्षात् उत्पन्न होत्ये, तेंच उत्तम अध्ययन असें मी समजतों " ॥२३॥॥२४॥

पुत्राचें असें हें भाषण श्रवण करतांच हिरण्यकशिपूचे ओंठ क्रोधानें स्फुरण पावूं लागले आणि तो गुरुपुत्राला म्हणाला ॥२५॥

हे अधम ब्राह्मणा, हें तूं काय केलेंस ? हे दुर्मते, माझ्या प्रतिपक्षाचा आश्रय करणारा तूं दुष्टानें मला न जुमानितां ज्याच्यामध्यें कांही अर्थ नाही, असे हें काही तरी ह्याला शिकवले आहेस ॥२६॥

असो. मित्रत्वानें वागत असूनहि तुझें आचरण आमच्या विरुद्ध झालें हें काही मोठें असंभवनीय नाही. कारण ज्यांची मैत्री कपटयुक्त असते असे तुमच्यासारखे कपटवेष धारण करुन संचार करणारे दुर्जन ह्या लोकामध्यें आहेतच; पण जसा पातकी लोकांना नरकभोगानंतरहि सुद्धां रोगाचा उद्भव होतो, तसा वरकरणी सज्जनाप्रमाणें वागणार्‍या त्या दुर्जनांच्या अंतर्यामीं असलेला द्वेषहि कालांतरानें दृष्टोत्पत्तीस येतो ॥२७॥

गुरुपुत्र म्हणाला, - हे इंद्रशत्रो, हा तुझा पुत्र जें सांगत आहे, तें त्याला मी पढविलें नाही; व दुसर्‍याहि कोणी पढविलें नाही. तर ही ह्याची स्वाभाविक उपजत बुद्धि आहे. तरी हे राजा, आपला क्रोध आवरुन धर, आमच्यावर भलताच दोषारोप करुं नकोस ॥२८॥

नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें गुरुपुत्रानें प्रत्युत्तर दिलें असतां हिरण्यकशिपु आपल्या पुत्राला म्हणाला, - ‘ हे अभद्रा, गुरुपासून जर हि दुष्ट बुद्धि तुला प्राप्त झाली नाहीं, तर ती कोठून प्राप्त झाली ? " ॥२९॥

अशाप्रकारें हें पित्याचें भाषण ऐकून प्रल्हादानें उत्तर दिलें, ज्यांची गृहसौख्याविषयींच निरंतर चिता चाललेली असत्ये, इंद्रियांच्या योगानें जे संसारामध्यें प्रवेश करुन वारंवार विषयांचें सेवन करीत असतात, अशा पुरुषांची बुद्धि दुसर्‍यांच्या उपदेशानें आपण होऊन अथवा परस्परांच्या संभाषणानेंहि श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त होत नाहीं ॥३०॥

ज्यांच्या अंतः करणांत विषयवासना भरल्यां आहेत, व जे बाह्य विषयांनाच पुरुषार्थ मानतात, ते स्वस्वरुपांतच पुरुषार्थ आहे असें मानणार्‍याचें उद्दिष्टस्थान जो विष्णु, त्याला जाणत नाहीत. बाह्य विषयांच्या ठिकाणी परमार्थबुद्धि धारण करणार्‍यांनाच गुरु असें समजण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळें जसे आंधळ्याच्या मागून जाणारे आंधळे, मार्ग न जाणतां खाडयामधें पडतात, त्याप्रमाणें ईश्वराच्या वेदवाणीरुप दावणींत ते काम्यकर्माच्या योगानें बद्ध होतात ॥३१॥

हे तात, ज्यांचा विषयसंबंधी अभिमान अगदी नष्ट झाला आहे, त्या अत्यंत पूज्य पुरुषांच्या चरणरजांनीं स्त्रान करण्याची आवड जोंपर्यंत ह्यांनीं धरिली नाहीं, तोंपर्यंत श्रतिवचनांनी उत्पन्न झालेली ह्यांची बुद्धि देखील भगवंताच्या चरणीं रत होत नाहीं ॥३२॥

इतकें बोलून प्रल्हाद स्वस्थ बसला असतां विवेकशून्य अंतः करणार्‍या त्या हिरण्यकशिपूनें त्याला क्रोधानें आपल्या मांडीवरुन भूमीवर लोटून दिलें ॥३३॥

असहिष्णुता व क्रोध ह्यांनीं व्याप्त झाल्यामुळें त्याचे नेत्र आरक्त झाले व तो म्हणाला, - ‘ हे राक्षसहो, याला येथून लवकर बाहेर काढा आणि याचा वध करा. हा वधासच योग्य आहे ॥३४॥

हे राक्षसहो, मित्रांना टाकून हा अधम पुत्र ज्याअर्थी चुलत्याचा घात करणार्‍या अशा त्या विष्णूच्या चरणांचे एकाद्या दासाप्रमाणें पूजन करितो, त्याअर्थी माझ्या भ्रात्याचा घात करणारा विष्णु तो हाच आहे ॥३५॥

अहो ! ज्यानें पांच वर्षांचा असतांना त्याग करण्यास कठीण अशा आपल्या मातापितरांच्या स्नेहाचा त्याग केला तो हा कृतघ्न, विष्णूंचे तरी काय हित करणार आहे ? ॥३६॥

हे राक्षसहो, जस्सें औषध परिणामी हितकारक असतें; त्याप्रमाणें एकादा परकीसुद्धां जर आपला हितकारक असेल तर तो आपला आप्तच समजला पाहिजे, पण आरैसपुत्र जर आपलें अहित करणारा असेल, तर त्याला रोगाप्रमाणें आपला शत्रु समजलें पाहिजे. फार काय, आपल्या शरीराचा एकादा अवयव जर आपलें हित करणारा नसेल तर तो तोडून टाकावा; कारण, तेवढ्याचा त्याग केला असतां बाकीचे शरीर सुखानें वाचतें ॥३७॥

यास्तव भोजन, शयन, आसन, इत्यादि कोणत्याहि मार्गानें विषप्रयोग वगैरे करुन ही ह्यांचा वध करा. कारण विषयासक्त झालेलें इंद्रिय जसें मुनीला शत्रुवत् असतें, त्याप्रमाणें पुत्रवेष धारण करणारा हा पोरहि माझा शत्रूच आहे ॥३८॥

राजाची अशी आज्ञा होताच, तीक्ष्ण दाढांचे, भयंकर मुखांचे आणि लाल केंस व दाढीमिशा असलेले असे ते राक्षस हातांमध्ये शूळ घेऊन भयंकर गर्जना करीत ‘ तोडा, मारा ’ असें म्हणत, स्वस्थ बसलेल्या त्या प्रल्हादाच्या मर्मस्थानीं प्रहार करुं लागले ॥३९॥॥४०॥

परंतु दैवहीन पुरुषाचे जसे मोठमोठेहि उद्योग व्यर्थ जातात, त्याप्रमाणें प्रल्हादाच्या शरीरावर त्या राक्षसानी केलेले प्रहार निष्फळ झाले. कारण त्यानें आपलें मन निर्विकार, निर्विषय, निरतिशय ऐश्वर्यांनी युक्त आणि शस्त्रादिकांचाहि नियंता, अशा परमेश्वराच्या ठिकाणीं लाविलें ॥४१॥

हे युधिष्ठिरा, ह्याप्रमाणें त्या प्रल्हादाला मारण्याविषयीचा प्रयत्न निष्फळ झाला असें पाहून हिरण्यकशिपूला फारच भीति उत्पन्न झालोई, व त्यानें अत्यंत आग्रहपूर्वक त्याच्या वधाविषयी आणखी उपाय योजिले ॥४२॥

त्यानें त्याला दिग्गजांच्या पायांखालीं तुडविलें, मोठमोठया सर्पांकडून दंश करविले, त्याच्या मागें कृत्या लाविली, पर्वतशिखरांवरुन त्याला खाली लोटून दिलें, नानाप्रकारच्या मार्गांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. खाडयामध्यें घालून त्याला पुरिलें, विषप्रयोग केला, उपाशीं ठेविलें, कडक थंडीवार्‍यामध्यें व अग्नीमध्यें टाकिलें, पाण्यामध्यें बुडविलें आणि त्याच्या अंगावर पर्वतहि फेंकले; पण या सर्वहि उपायांनी जेव्हां त्या निष्पाप पुत्राला मारण्यास तो असुर समर्थ झाला नाहीं, व त्याचा वध करण्यास जेव्हां त्याला आणखी कांहींच उपाय सुचेनासा झाला, तेव्हा तो अत्यंत चिंताग्रस्त होऊन मनामध्यें म्हणाला ॥४३॥॥४४॥

अहो, मी याला निष्ठुर कटुशब्दांनी पुष्कळ टाकून बोललों, नानाप्रकारे त्याचा छल करुन अभिचारांदि निंद्य कर्मांनीं याचा वध करण्याचा यत्न केला; परंतु त्यांपासूनहि हा आपल्या सामर्थ्यानें मुक्त झाला ॥४५॥

हा बालक असून माझ्या समीप उभा असतांहि ह्याच्या चित्ताला माझी भीति मुळीच वाटत नाही. तेव्हा शुनःशेपाप्रमाणें हाहि माझें शत्रुत्व विसरणार नाही ॥४६॥

ह्याचा प्रभाव अपरिमित दिसतो. ह्याला कोणापासूनहि भय दिसत नाही. हा अमर दिसतो. यावरुन ह्याच्याच विरोधामुळें मला मृत्यु प्राप्त होईल असें वाटतें ! नाहींपेक्षां मी निः संशय अमरच आहे. ॥४७॥

अशा प्रकारच्या चिंतनानें हिरण्यकशिपु किंचित् निस्तेज होऊन शून्यांतः करण नें खाली मान घालून बसला असतां शुक्राचार्याचे पुत्र शंडामर्क त्याजवळ आले आणि म्हणाले ॥४८॥

हे प्रभो, केवळ भ्रुकुटींच्या चलनानें ज्यांतील सर्व लोकपाल भयभीत झाले आहेत असें हें त्रैलोक्य ज्याअर्थी तूं एकटयानें जिंकिलें आहेस त्याअर्थी तुला चिंतास्पद होण्याचें कारण मुळीच नाही. आतां ह्या प्रल्हादाचा तुजविषयी शत्रूप्रमाणे पक्षपातपणा व प्रभाव दिसतो, पण त्याचे भय मानण्याचें मुळींच कारण नाही ॥४९॥

तथापि हे असुरश्रेष्ठा, शुक्राचार्य गुरु तपश्चर्या पुरी करुन माघारे येईपर्यंत, हा प्रल्हाद भयभीत होऊन पळून न जाईल अशारीतीनें तूं याला वरुणपाशांनी बद्ध करुन ठेव. कारण, वय जाईल अशारीतीनें तूं याला वरुणपाशांनी बद्ध करुन ठेव. कारण, वय जाईल त्या मानानें थोर पुरुषाची बुद्धि बदलून चांगली होत्ये ॥५०॥

ह्याप्रमाणें गुरुपुत्रानें दिलेल्या मसलतीचा, ठीक आहे, असें म्हणून अंगीकार करुन हिरण्यकशिपु त्याला म्हणाला, - ‘ गुरुपुत्रहो, गृहस्थाश्रमी राजाजे जे धर्म आहेत तेच तुम्ही आतां ह्याला शिकवावे ॥५१॥

हे धर्मराजा, नंतर त्या शंडामर्कांनी विनययुक्त आणि नम्र अशा प्रल्हादाला अनुक्रमानें धर्म, अर्थ व काम हेच पुरुषार्थ निरंतर पढविले ॥५२॥

परंतु गुरुंनी आपल्याला यथासांग शिकविलेले जे धर्म, अर्थ व काम, ते त्याला चांगले वाटले नाहीत. कारण, हें शिक्षण रागद्वेषादि द्वंद्वांमुळें विषयांवर आसक्त होणार्‍या पुरुषांनी मात्र चांगलें म्हणून वर्णिले आहे ॥५३॥

असो. एका वेळी तो गुरु कांही गृहकर्मासाठी दूर गेला असतां, मुलांना खेळण्याची संधी सांपडली. त्या वेळी समवयस्क मुलानी त्या प्रल्हादाला खेळण्याकरितां हाक मारिली ॥५४॥

तेव्हां त्यांची स्थिति ओळखून त्या महाज्ञानी प्रल्हादानें मधूर वाणीने त्यांनांच आपल्याजवळ बोलाविलें आणि हंसतहंसत प्रेमानें तो त्यांच्याशी बोलूं लागला ॥५५॥

हे धर्मराजा, ते बालक असल्यामुळें रागद्वेषादि द्वंद्वांनी विषयासक्त झालेल्या पुरुषांच्या उपदेशांनी व आचरणांनीं त्यांची बुद्धि दूषित झाली नव्हती. प्रल्हादाविषयीं त्यांना आदर वाटत असे, व त्यामुळे त्याचें भाषण ऐकतांच त्या सर्वांनी आपल्या खेळण्याचा त्याग केला व आपले अंतः करण आणि दृष्टि त्याच्याकडे लावून ते त्याच्या सभोंवतीं बसले. तेव्हां दयाळू व लोकहितकारी असा तो महाभगवद्भक्त असुर प्रल्हाद त्या असुर बालांना उपदेश करुं लागला ॥५६॥॥५७॥

पांचवा अध्याय समाप्त ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP