नृसिंहाख्यान - अध्याय ३ रा.

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, हिरण्यकशिपूनें, आपण अजिंक्य, अजरा भर, प्रतिपक्षशून्य आणि अद्वितीय प्रभु व्हावें असें मनांत आणिलें; आणि त्यासाठी मंदरपर्वताच्या दरीमध्यें वाहू वर करुन, आकाशाकडे दृष्टि ठेवून आणि एका पायाच्या अंगठ्यावर उभें राहून अतिभयंकर तप केलें ॥१॥॥२॥

ज्या वेळीं प्रलयकाळचा सूर्य जसा शोभतो, त्याप्रमाणें जठांच्या कांतींनें तो शोभूं लागला. याप्रमाणें तो तप करुं लागला असतां, पूर्वी गुप्तरीतीनें भूमी वर संचार करीत असलेले देव फिरुन आपापल्या स्थानांवर गेले ॥३॥

नंतर त्याच्या मस्तकांतून धुरासह निघालेला तपोमय अग्नि सर्वत्र पसरुन त्यायोगें, खाली, वरती व मध्ये असलेले सर्व लोक संतप्त झाले ॥४॥

आणि नद्या व समुद्र क्षुब्ध होऊन गेले, द्वीपें व पर्वत ह्यांसह भूमि कांपूं लागली, महासह नक्षत्रे गळून पडूं लागली आणि दशदिशा प्रज्वलित होऊं लागल्या ॥५॥

नंतर त्या अग्नांने तप्त झालेले देव स्वर्गाचा त्याग करुन ब्रह्मलोकीं गेली आणि ब्रह्मदेवाला विनंति करुन म्हणाले, - हे ‘ जगत्पते, हे देवाधिदेवा, दैत्यश्रेष्ठ हिरण्यकशिपूच्या तपानें संतप्त झाल्यामुळें आम्ही स्वर्गावर राहण्यास समर्थ नाही. यास्तव हे महात्म्या सर्वाधिपते, तुझी पूजा करणार्‍या लोकांचा जोंपर्यंत नाश झाला नाहीं, तोंपर्यंत जर तुला वाटत असेल तर त्याचें तूं निवारण कर ॥६॥॥७॥

हे जगदीशा, दुश्चर तप करणार्‍या त्या हिरण्यकशिपूचा संकल्प तुह्मांला ठाऊक नाहीं काय ? नसेल तर आम्ही निवेदन करितों तो श्रवण करावा ॥८॥

हे ईश्वरा, त्यानें असें ठरविलें आहे कीं, " तप व योग ह्यांच्या एकनिष्ठ आचरणानें चराचर विश्व उत्पन्न करुन ब्रह्मदेव ज्याप्रमाणें सर्वस्थानापेक्षां श्रेष्ठ अशा आपल्या सत्यलोकरुप स्थानावर बसला आहे, त्याप्रमाणे तप व योग ह्यांच्या वृद्धिंगत होणार्‍या तेजांच्या योगानें तें स्थान आपणहि प्राप्त करुन घेऊं. कारण, काल नित्य आहे व आत्माहि अमर आहे. ॥९॥॥१०॥

तपोबलाच्या योगानें पूर्वीपेक्षां हें जगत् मी अगदी निराळ्या प्रकारचें करीन; ( ह्नणजे ब्रह्मचर्यव्रतादिक पुण्यकर्मे करणारांस नरकादि दुःखेंच भोगावयास लावीन व विषयासक्त असून पापकर्मे करणारांस स्वर्गसुखांचा उपभोग घ्यावयास लावीन, आणि स्वर्ग हें असुरांचे स्थान आणि नरक हें देवांचे स्थान असें करीन ) अवतारकल्पाच्या अंती कालानें नाश पावणारी वैष्णवादि इतर स्थानें मला काय करावयाची आहेत ? ॥११॥

असो. हे त्रैलोक्याधिपते, ह्याप्रमाणें तुझे स्थान हरण करण्याविषयीं त्याचा निश्चय झालेला आम्ही श्रवण केला आहे; आणि हें मोठें तप तरी तो त्यासाठीच करीत बसला आहे. यास्तव त्याविषयी आतां जें योग्य असेल तें तूं स्वतः कर ॥१२॥

हे ब्रह्मदेवा, तूं ज्या स्थानावर विराजमान झाला आहेस, त्या स्थानाचा अधिकार म्हणजे द्विज व गाई यांची उत्पत्ति करणें व त्यांना सुख व ऐश्वर्य देऊन त्यांचें क्षेम आणि उत्कर्ष करणें हाच होये ॥१३॥

हे धर्मराजा, याप्रमाणे भगवान् ब्रह्मदेवाची देवांनी प्रार्थना केली असतां, भृगु, दक्ष इत्यादि प्रजाधिपतीनी वेष्टिलेला तो ब्रह्मदेव, हिरण्यकशिपूच्या आश्रमास गेला ॥१४॥

पण तेथें त्याला हिरण्यकशिपु प्रथम दिसला नाही. त्याचें शरीर वारुळें, गवत व वेळूंची बेटें यांनी आच्छादून गेलें होतें, व त्यांतील मेद, त्वचा, मांस आणि रक्त, ही मुंग्यानी खाऊन टाकिली होतीं ॥१५॥

थोडया वेळानें मेघांनी आच्दादित झालेल्या सूर्याप्रमाणें वारुळादिकांनीं आच्छादिलेल्या व तपाच्या योगानें लोकांना त्रास देणार्‍या त्या हिरण्यकशिपूला त्यानें पाहिले. त्या वेळी त्याची ती एकंदर स्थिति पाहून ब्रह्मदेव विस्मित झाला, आणि हंसतहंसत त्याला उद्देशून बोलूं लागला ॥१६॥

ब्रह्मदेव म्हणाला, - हे कश्यपपुत्रा हिरण्यकशिपो, तुझें कल्याण असो. तपाच्या योगानें तूं कृतार्थ झाला आहेस. मी तुला वर देण्याकरितां येथें प्राप्त झालों आहें, तरी तूं मजपासून इच्छित वर मागून घे ॥१७॥

हें तुझें मोठें अद्भुत धैर्य मी पहात आहे. अरे, दनमक्षिकांनी तुझा देह भक्षण केला असून तुझे प्राण केवळ अस्थींचा आश्रय करुन राहिले आहेत ॥१८॥

असें तप पूर्वीच्या ऋषीनी कधींच केले नाही, व पुढेंहि कोणी करणार नाहीत. उदकसुद्धां प्राशन न करणारा कोणता पुरुष देवांची शंभरवर्षेपर्यत प्राणाचें धारण करील ? ॥१९॥

हे दितिपुत्रा, मोठा मनोनिग्रह करणार्‍या पुरुषांना करण्यास दुष्कर असा निश्चय करुन तपोनिष्ट झालेल्या तूं खरोखर मजवरहि विजय मिळविला आहेस ॥२०॥

यास्तव हे असुरश्रेष्ठा, तुझे सर्व मनोरथ मी परिपूर्ण करितों; कारण, तूं मर्त्य आहेस; आणि मी अमर आहे. तेव्हां माझें जें दर्शन तुला झालें आहे तें निष्फळ होणार नाहीं ॥२१॥

नारद म्हणाला; - हे धर्मराजा, असें भाषण करुन ब्रह्मदेवानें अमोघ सामर्थ्यानें युक्त अशा आपल्या कमंडलूंतील जलानें, मुंग्यांनी भक्षण केलेल्या हिरण्यकशिपूच्या त्या देहावर प्रोक्षण केलें ॥२२॥

तें प्रोक्षण होतांच तो हिरण्यकशिपु मानसिक शक्ति, इंद्रिय शक्ति व शारीरिक शक्ति, ह्यांनी युक्त होऊन सर्व अवयवांनी संपन्न, वज्रासारखा दृढशरीरी, तरुण व तापलेल्या सुवर्णासारखा तेजस्वी झाला; व जसा काष्ठापासून अग्नि प्रगट होतो. त्याप्रमाणें वेळूंनी आच्छादिलेल्या वारुळांतून तो निघाला ॥२३॥

तेव्हां समोर आकाशामध्यें असलेला ब्रह्मदेव त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहतांच तो आनंदित झाला; आणि त्यानें त्याला भूमीवर साष्टांग नमस्कार घातला ॥२४॥

नंतर तो उठून उभा राहिला. त्याच्या नेत्रांमध्ये हर्षामुळे आनंदाश्रु आले व शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितींत हात जोडून नम्रपणें ब्रह्मदेवाकडे पहात तो गद्गद वाणीने ब्रह्मदेवाची स्तुति करुं लागला ॥२५॥

हिरण्यकशिपु म्हणाला, - कल्पाच्या अंतीं, काळानें निर्माण केलेल्या प्रकृतिगुणरुप निबिड अंधः कारानें व्याप्त झालेलें हें जग, ज्या स्वयंप्रकाश ईश्वरानें आपल्या प्रकाशानें प्रकाशित केलें; आणि जो त्रिगुणात्मक अशा आपल्या स्वरुपानें ह्या विश्वाची उत्पत्ति, स्थिति व लय करितो, त्या रज, सत्त्व व तम ह्यांना आश्रयभूत असलेल्या महात्म्या परमेश्वराला माझा नमस्कार असो ॥२६॥॥२७॥

जो सर्वांचा आदि असून सर्वत्र बीजभूत कारण आहे, ज्ञान आणि विज्ञान हच ज्याचें स्वरुप आहे, व ज्याला प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धि ह्यांच्या कार्यांमुळें व्यक्त आकार प्राप्त होतो, त्या तुला नमस्कार असो ॥२८॥

हे विधात्या, तूंच सूत्रात्मक मुख्य प्राणांच्या योगानें स्थावरजंगमात्मक विश्वाचे नियमन करीत असल्यामुळें प्रजांचा व चित्त, चेतना, मन आणि इंद्रियें ह्यांचाहि स्वामी आहेस. तसाच तूं महत्तस्वरुप असल्यामुळें आकाशादि भूतें, शब्दादि विषय आणि तत्संबंधी वासना, ह्यांचा उत्पादक आहेस ॥२९॥

होता, अध्वर्यू, इत्यादिक चार ऋत्विजांनी युक्त अशा यज्ञकर्माचें प्रतिपादन करणार्‍या तीन वेदांच्या रुपानें तूंच अग्निष्टोमादि सात यज्ञांचा विस्तार करितोस. तूं प्राण्यांचा आत्मा आणि अंतर्यामी असून काळानें व देशानें अमर्यादि असा अनादि, अखंड व सर्वज्ञ आहेस ॥३०॥

नित्य जागृत असा तूंच काळरुपी होऊन त्या काळाचा लवादिक अवय यांनी लोकाचें आयुष्य क्षीण करितोस, परंतु वस्तुतः तूं ज्ञानरुप अपरिच्छिन्न परमेश्वर आणि जन्मशून्य असल्यामुळें निर्विकार आहेस. जीवलोक, कर्मवश असल्यामुळे त्याला जन्मादि विकार घडतात; परंतु तूं त्या जीवलोकाचा नियंता असल्यामुळें त्याच्या जीवनाचेहि कारण तूंच आहेस ॥३१॥

हे देवा, स्थावर अथवा जंगम असें कोणतेंहि कारण अथवा कार्य तुझ्याहून निराळें नाही. हे विधात्या, विद्या आणि कला ह्या सर्व तुझ्याच तनु आहेत. हिरण्यरुप ब्रह्मांड तुझ्या गर्भामध्यें असून तूं त्रिगुणात्मक मायेहून निराळा ब्रह्मरुप आहेस ॥३२॥

हे सर्वव्यापका, हें व्यक्त ब्रह्मांड म्हणजेच तुझें स्थूल शरीर होय. त्याच्या योगानें तूं इंद्रियें, प्राण व मन ह्यांच्या विषयांचा उपभोग घेतोस. आपल्या स्वरुपी स्थित असूनच तूं हा उपभोग घेत असल्यामुळें तूं उपाधिशून्य, ब्रह्मरुप व पुराणपुरुष असा आहेस ॥३३॥

हे अनंत आपल्या अव्यक्तरुपानें हें सर्व जग ज्यानें व्यापून टाकिलें आहे आणि ज्या ऐश्वर्य, विद्या व माया ह्यांनी युक्त असल्यामुळें अचिंत्य आहे, त्या तुला नमस्कार असो ॥३४॥

हे वर दोत्तमा, जर मला पाहिजे असलेले वर देत असलास, तर हे प्रभो, तूं उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यु प्राप्त होऊं नये ॥३५॥

त्याचप्रमाणे घराच्या आंत अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्रीं, तूं उत्पन्न केलेल्या प्राण्यांकडून किंवा दुसर्‍या कोणत्याहि प्राण्यांपासून, भूमीवर अथवा आकाशामध्यें, मनुष्य, मृग, असुर, देव, महानाग, आणि आणखीहि ज्या कांही सचेतन किंवा अचेतन वस्तु असतील त्यांपासून मला मृत्यु प्राप्त होऊं नये. तसेच ज्याप्रमाणें तुझा महिमा आहे त्याप्रमाणें माझा होऊन मला युद्धामध्यें कोणीहि प्रतिपक्षि नसावा. सर्व प्राण्यांचा अधिपति मी एकटाच असावें; आणि तप व योग ह्यांच्या योगानें प्रभावशाली अशा लोकाचें जें अणिमादि ऐश्वर्य जें कधीहि नाश पावत नाहीं, तें मला प्राप्त व्हावे. असे वर तूं मला दे ॥३६॥॥३७॥

तिसरा अध्याय समाप्त ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP