कहाणी ललितापंचमीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण होता. त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणींच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदानीं त्यांचं काय होतं नव्हतं तें सगळं हिरावून घेतलं. मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जातां जातां एका नगरांत आलीं. दोन प्रहराची वेळ झाली आहे. वाट चालतां चालतां दोघं दमून गेले आहेत, दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांचीं तोंडं सुकून गेलीं आहेत, असे ते दोघेजण त्या नगरींत आले. इतक्यांत एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरितां घरांतून बाहेर आला. ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं. आपल्या घरात बोलावून नेलं. जेवूं घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनीं आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरीं ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवूं लागला. मुलंहि तिथं राहून वेद पढूं लागलीं. असं करतां करतां पुष्कळ दिवस झाले.

पुढं काय झालं ? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करूं लागला. शिष्यांनीं गुरुजींना विचारलं, हें आपण काय करतां ? तेव्हां गुरुजी म्हणाले, हें उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यांत द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते, इच्छित हेतु प्राप्त होतात. हें त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ति त्यांनीं व्रत केलं. तशी त्यांना लवकर विद्या आली. दोघामुलांची लग्न झालीं. पुढं ते आपल्या नगरींत आले, श्रीमंत झाले. सुखासमाधानानं कीर्ति मिळवून राहूं लागले. याप्रमाणें कांही दिवस गेले.

पुढं काय चमत्कार झाला ? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षी आपला ललितापंचमीचं व्रत करी. त्यामुळं त्याची संपत्ति कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. त्यानं देवीला राग आला. त्यामुळं त्याला दरिद्र आलं. पुढं तीं नवराबायको थोरल्या भावाकडे राहायला गेलीं. एके दिवशीं वडील भावाची बायको दिराला कांहीं बोलली, त्यामुळं ह्याला राग आला. मोठा पश्चात्ताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, मी उपांगललितेचं व्रत टाकलं. त्याचं मला हें फळ आलं. हा अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाहीं. मी आतां देवीला प्रसन्न करीन तेव्हांच घरीं येईन ! असं बोलून निघून गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला, परंतु शोध कांहीं लागला नाहीं. पुढं हा हिंडतां हिंडतां एका नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, ह्या गावाचं नांव काय ? कोणता राजा इथं रहातो ? उतरायला जागा कुठं मिळेल ? ते म्हणाले, ह्या गांवाचं नांव उपांग आहे. इथं राजाहि उपांगच आहे. इथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गांवांतून आलों, तिकडेच आम्हांला जायचं आहे. तुम्हालाहि यायचं असेल तर चला ! मग तो त्या नगरांत गेला, धर्मशाळेंत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्यभावानं तिला शरण गेला. रात्री देवळांतच निजला. देवीनं स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला, राजाकडे जा. माझ्या पूजेच्या करंड्याचं झांकण माग, त्याची नेहमीं पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील. इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला. दुसरे दिवशीं तो राजाकडे गेला. देवीचा दृष्टांत सांगितला. पूजेचं झांकण मागितलं. राजानं तें दिलं. ब्राह्मण तें घेऊन आपल्या गांवीं आला. घरीं नेऊन त्याची पूजा करूं लागला. ललितादेवीचं व्रत करू लागला, तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीस गेले. पुढं देवीच्या आशीर्वादानं त्याला मुलगी झाली. तिचं नांव ललिता ठेवलं. दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली. सोबतिणींबरोबर खेळायला जाऊं लागली. पुढं काय चमत्कार झाला ? एके दिवशीं मुलीनं तें झांकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यांत एका ब्राह्मणाचं प्रेत वहात आलं. तिनं त्याच्यावर झांकणानं पाणी उडवलं. तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं, तिनं तें पाहिलं. आपल्याला हा पति असावा असं तिला वाटलं. आपला हेतु त्यास कळविला. तेव्हा त्यानं तिला विचारलं, ही गोष्ट घडेल कशी ? तशी ती म्हणाली, मी तुम्हांला घरीं जेवायला बोलावतें. जेवायच्या वेळेस आपोषणी हातांत घ्या आणि अडून बसा, म्हणजे बाबा तुम्हांला विचारतील, भटजी-भटजी आपोषणी कां घेत नाही ? तेव्हां तुम्हीं सांगा कीं, आपली कन्या मला द्याल तर जेवतों नाही तर असाच उठतो ! म्हणजे ते देतील. त्याप्रमाणं तिनं त्याला जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसूं लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवण झालं. चांगला मुहुर्त पाहून लग्न लावलं. नवरानवरींची बोळवण केली. घरीं जातेवेळेस देवाचं प्रसादाचं झांकण घेऊन गेली, त्यामुळं बापाच्या घरांतलं सगळं द्रव्य गेलं. दरिद्र आलं. तो फार गरीब झाला, तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झांकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाहीं तिनं तो रोष मनांत ठेवला. एके दिवशीं आई मुलीचे घरीं जाऊ लागली. जातांना वाटेत जांवई भेटला, सासूनं त्याला ठार मारलं. झांकण घेऊन घरी गेली.

इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरीं गेला. बायकोला झालेली हकीकत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सर्व हकीकत सासूला समजली, तशी ती जांवयाच्या घरीं आली. पटपटां पायां पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चात्ताप झाला अशा कर्मामुळे तिला गरिबी आली. तिचा नवरा नेहमीं आश्चर्य करूं लागला की वारंवार असं कां होतं ? ह्याचं कारण कांहीं केल्या त्याच्या लक्षांत येईना; म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, तूं ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्या योगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर, देवाची पूजा कर, म्हणजे तुझं कल्याण होईल ! त्यानं तसा वागण्याचा निश्चय केला. घरीं आला. व्रत करूं लागला. काळें करून दळीद्र गेलं. तो श्रीमंत झाला. त्याचे मनांतले इष्ट हेतु पूर्ण झाले, तसे तुमचे आमचे होवोत. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP