माहेरची आठवण
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
चंद्राच्या गालावरी
देव लावी गालबोट;
मिरवितें आई,
माझ्या गालीं तुझे ओठ. १
जडली हिरकणी
सोन्याच्या ग कोंदणी;
मोला झाली दुणी
आई, तुझी ग करणी ! २
सासू सासर्याचं
घर दिरा-नणंदांच;
पृथ्वीच्या मोलाच गं
लेणं दिलं भ्रताराचं. ३
मायेची माझ्या माय,
जोडिली तूं ग जोडी;
सुरीं सूर लावूं,
लाविली तूं ग गोडी. ४
सूर-सूरीं, झालं
संसाराचं गोड गीत;
मायेची माझ्या माय,
तुवां लाविली ग रीत. ५
फळा आली भाळीं
तीट मायेच्या हाताची
भरलं घर माय,
किलबिल पांखरांची. ६
भरलं घर माय,
अंगण झालं थोड;
दुडुदुडू धावे
लेकराचं खेळघोडं ७
राज्यगादीवरी
काढीं तुझ्या आठवणी;
फळां आली माय,
मायेची आठवणी. ८
उचकी लागे माय,
कांही केल्यानं राहीना;
काढीशी आठवणी ?
सुखी माय, तुझी मैना. ९
N/A
कवी - भा. रा. तांबे
ओवी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - २५ फेब्रुवारी १९३५
Last Updated : October 11, 2012

TOP