आदिप्रकरण - अध्याय दुसरा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


देखे आद्य निवृत्तिसंगम असे कृष्णासरित्सप्तकें
श्रीशैलेश्वर औभलाख्य नृहरी वंदोनियां कौतुकें ।
देख शेषगिरीश वेंकटपती श्रीकांत जेथें वसे
श्रीभूमीसह भूवराह निकटीं विपेंद्र सन्मानसें ॥१॥
कांची व्याघ्रपुरी तशीच निरखी ते काळहस्ती बरी
देखे श्रीअरुणाचलादि विमलें स्थानें यथा भूवरी
पाहे दिव्य चिदंबरेश शिव तो आकाशरुपी पुढें
श्री वृद्धाचल वृद्धलिंग निरखी वंदी पदाब्जे दृढें ॥२॥
तें चोळमंडळ निरीक्षण सर्व केलें । कावेरिकातट शिवालय पुण्यकाळें
श्रीकुंभकोणप्रभृती बहु शर्वलिंगे । मन्नार कृष्णमुख विष्णुपदें अनेगें ॥३॥
रामेश्वरा निरखिलें रघुनाथसेतू । स्नानें करोनि द्विज हा करि पूर्ण हेतू
देखे जनार्दन पुढें मदुराभवानी । मीनाक्षिणी परमसुंदर नाथराणी ॥४॥
श्रीरंगनाथ शिवजंबु शिवापलिंगे । स्थानें विचित्र निरखी हरिचीं अनेगें
गोकर्णतीर्थ अवलोकुनि आदिमाता । कोलापुरी निरखिली जगदीशकांता ॥५॥
देखे अपूर्व करहाटक कृष्णवेणी । श्रीकोयना प्रियसमागम पुण्य़खाणी ।
ते माहुली निरखिली जनमुक्तिदात्री । आला अळंदिस पुन्हा निरखी स्वनेत्रीं ॥६॥
सिद्दोपंती श्रवण करितां हर्षसंयुक्त वेगी
जामातातें दृढतर धरी पोतिशीं सानुरागीं ।
नेला गेहा प्रिय सुहृदजना भेटुनी स्वल्प काळें
जावें वाटे जनकजननीदर्शना हेंचि बांले ॥७॥
सिद्दोपंती स्वदारा कुमरकुमरिकां सिद्ध केले कुटुंबा
संगे या विठ्ठलाच्या निघति सकलही देखिलीं तात अंबा ।
साधूच्या दर्शनाचा अतिशय महिमा तोष तो बोलवेना
वृद्धा संतोष झाला सुत सहवनिता देखतां वर्णवेना ॥८॥
पूजा वृद्धांसि केली मणिधनवसनें भूषणें व्याहियात
सिद्दोपंती स्वताषें वधुवर सदनीं ठेविलें तोषचित्तें
गोदास्नानासे भावें करुनि सुनियमें जायिजे ग्रामवासा
ऐसा उत्साह वाट निज्जहृदयमठी चिंतिलें पंढरीशा ॥९॥
निरोप घेवोनी फिरे गृहासी । झाला पुन्हा सुस्थिर ग्रामवासी ।
कांही दिसा विठ्‍ठलमायबापा । वैकुंठयात्रा घडली अपापा ॥१०॥
दारापती राहति स्वस्थचित्तें। उद्वेग नाही मनिं विठ्ठलातें ।
प्रारब्धयोगें मिळतां स्वकाळीं । ते भोगिजे स्वस्थ मनांतराळीं ॥११॥
कांही असा काळ ययांसि गेला । संसारचिंताचि नसे ज्याला ।
कंठी स्वतोषें भगवंतबुद्धि । पडेचिना जो सहसा उपाधि ॥१२॥
सिद्दोपंती ऐकिले वृत्त ऐसें । संसारी तें चित्त याचें न बैसे ।
गेले तेथे पंत भेटावयातें । जामातासी देखिलें कन्यकेतें ॥१३॥

शिखरिणी.
यदृछालाभें जो परम सहजानंदभन्तें
सदां योगाभ्यासीं हरिगुरुपदीं मानस रते ।
सुखीं चाले नारायण हरि  असी नामलतिका
यथान्यायें कालपक्षण करणें भाव इतुका ॥१४॥
तदा सिद्दोपंती बहुत विध प्रार्थोन उभयां
अळंदीतें आणी वसउनि करी पुण्यनिलया ।
समीपीं ठेवोनी सकळ करि निश्चिंत सहसा
हरीची हे इच्छा म्हणुनि निवसे तुष्टमनसा ॥१५॥
राहे अळंदीस सुखें सुतोषें । सदां करी कीर्तन नामघोषें ।
सत्संग साधूपुरुषां सदांही । यात्राद्वयी पंढरि जात पायी ॥१६॥
कदापि नेघे जनलोक संगे । वीणा करीं एकट जाय आगें ।
गेला तया काळ कितेक ऐसा । मना नये पुत्रविषीं भरोसा ॥१७॥
वैराग्य चित्तीं अनुताप होता । सुटावयाची करि दीर्घ चिंता ।
कांतेसि बोले मजलागि आज्ञा । देईं सखे तूं असशील सुज्ञा ॥१८॥
संन्यास घेईन मनासि वाटे । जाणें नको संसतिघोरवाटे ।
विमुक्तिचित्ते विचरोनि आतां । पावेन मीं ब्रह्मपदा अनंता ॥१९॥
म्हणे रुक्मिणी काय हें प्राणनाथा । न होता कसा पुत्र संन्यास घेतां ।
निषेधोनि वृत्तांत सांगे पित्यासी । असे पूर्ण जामात तुझा उदासी ॥२०॥
असे सर्वदा सावधानेंचि गेहीं । करी भाषणा युक्त जाणोनि तेहि ।
अकस्मात हे व्यग्र कार्यांत होती । तदा पूसतां जा म्हणे भ्रांत चित्तीं ॥२१॥
मिसें तेवढया चालिला शीघ्रकाळें । जसा पक्षिया तूटतां तंतुजाळें ।
तसें वाटलें विठ्ठला हा निघाला । त्वरें नीट काशीस हा विप्र आला ॥२२॥
निरीक्षोनि संन्यासिया ज्ञानपूर्णा । धरी पादपद्में म्हणे तारि दीना ।
महासंसृतीची असे घोर बेडी । त्वरें ज्ञान्शस्त्रे विभू आजि तोडी ॥२३॥
सुवैराग्य देखोनि याचे महतें । तदा दांधला श्रेष्ठ संन्यास यातें ।
यया ज्ञान वैराग्य पूर्वीच होतें । यया मूख्य वेदांत सांगे सदर्थे ॥२४॥
श्रीशारीरक भाष्य तें पढविलें गीता सभाष्यें बरी
श्री वासिष्ठ अहर्निशी गुरुमुखें शोधोनि निष्ठा धरी ।
नानायोगमतें विचित्र निरखा अध्यात्मबोधीं हिता
वेदांतोपनिषद्विचार घडला संतोष दे आयिता ॥२५॥
महाबुद्धिवंतासि स्वल्पांस काळें । बरें ज्ञानविज्ञान चित्तीं उदेलें ।
उदासीन वायू तसा काळ साक्षी । गुरुच्या मना फार संतोषकारी ॥२६॥
म्हणे मानवी हा नव्हे ईश्वराचा । असे अंश कोणीच मद्भाग्य साचा ।
गुरुहोनिही शिष्य संपूर्ण झाला । गुरुच्या मनीं तोषभानू उदेला ॥२७॥
घरीं रुक्मिणी वाटा पाहे पतीची । म्हणे काय झालें मनीं ते विवेची ।
तदां सूचले बोलिलें जा म्हणोनी । दिल्हा कीं दगा प्राणनाथें निदानीं ॥२८॥
महा खेद चित्तीं धरी काळ कंठी । उदासीन हेही घडे कंबुकंठी ।
सदां अंतरी ते पतीलागे चित्ती । जिच्या मानसीं लागली थोर खंती ॥२९॥
सदां नित्य अश्वत्थसेवा करावी । अशी जाहली बुद्धि उत्पन्न जीवी ।
सती शुद्धभावा करी वृक्षसेवा । असी कंठिता कींव ये वासुदेवा ॥३०॥
अकस्मात काशींत याच्या गुरुतें । मनी वाटलें या मठीं विठ्ठलातें ।
सुखें स्थापिजे जायिजे रामलिंगा । पुन्हा येइजे सिविजे देवगंगा ॥३१॥
असें वाटतां नीघता होय वेगीं । पथीं चालतां ये अळंदीस मार्गी ।
अकस्मात आकाशपुष्पाप्रमाणें । विधिनें तया आणिलें हेंचि मानें ॥३२॥
यती वोढिला साच ईच्या तपानें । अकस्मात अश्वत्थनारायणानें ।
जयाची महा दुर्घटा योगमाया । कळेना कधीं वेधया देवराया ॥३३॥
महातेजसंपन्न देखोनि यातें । बहू जाहला तोष चित्तीं सतीतें ।
त्वरें टाकिली वृक्षसेवा सतीनें । नमस्कारिला श्रेष्ठ शुद्धामतीनें ॥३४॥
म्हणे पुत्रवंती घडे शीघ्र बायां । मुखी नीघती वर्ण संतोषदायी ।
इच्या लोटले नेत्रयुग्मांत पाणी । बहू जाहली खिन्न हे करिवाणी ॥३५॥
यती चोज मानी म्हणे हे सुकांता । ममाशीगिरा ऐकतां खेदवंता ।
पुसे हा यती भामिनी शुद्धभावा । ममोक्ती तुला कां घडे खेद जीवा ॥३६॥
असें पूसतां बोलिली त्या यतीतें । असे प्राप्त संन्यास माझ्या पतीतें ।
पुरी काशिकेमाजी संन्यास तेणे । असे घेतला ऐकिलें साच जाणें ॥३७॥
मला पुत्र होतील कैसे कृपाळा । निघे कासया श्रेष्ठवाणी कपाळा ।
असें ऐकतां या यतीतें चपेटा । मना लागला बोल माझा न खोटा ॥३८॥
कधीं या मुखी व्यर्थ वाणी निघेना । न होती इला पुत्र हेही घडेना ।
सती पूसतां लक्षणें सर्व सांगे । यती ऐकती सादरें सानुरागें ॥३९॥
तदां ते घरा नेत संन्यासियासी । कधी श्रेष्ठ हें पात्र आलें पित्यासी ।
सिधोपंत वंदोनि पादद्वयातें । मुनिंद्रासी भिक्षा दिल्ही तोषचित्तें ॥४०॥
तदां बोलतां जाणवे शिष्य माझा । दिल्हा त्यासि संन्यास आम्हीच वोजा ।
पित्याला म्हणे घ्या तुम्ही या सतीला । इला भेटवूं शीग्र यीच्या पतीला ॥४१॥
मला फीरणें प्राप्त झालें यदृच्छा । घडे सर्वही एक तें ईश्वरीच्छा ।
मला पूर्ण रामेश्वरी सेतुयात्रा । पहा प्राप्त झालीच योजूं कलत्रा ॥४२॥
सतीच्या तपें आणिलें साच मातें । यिचे सांकडें सत्य सर्वोत्तमातें ।
पुढें मी उपेक्षा करीं त्याच काळीं । यिचें पुण्य माझ्या तपा कां न जाळी ॥४३॥
तदां वृद्ध मातापिता कन्यकेशी । यतीच्या सवें नीघता काशिकेशीं ।
दिठीं देखिला ते पुरी शंकराची । महाराजधानीच विश्वेश्वराची ॥४४॥
ययां ठेविले अन्य गेहीं समस्तां । मठालागी श्रीपाद आले प्रशस्ता ।
गुरुपाद वंदोनियां शिष्य बोले । कसें शीघ्र येणें घडे अल्पकाळें ॥४५॥
न झाली दिसे पूर्ण संकल्पसिद्धि । पथीं जाहली कोण ऐशी उपाधी ।
कधींही नव्हे सत्यसंकल्पहानी । निघेना कधीं या मुखीं व्यर्थ वाणी ॥४६॥
असें बोलतां शिष्य चैतन्य नामा । गुरुच्या पदी ज्यास अत्यंत प्रेमा ।
तदां पूसती सद्‍गुरु सत्य सांगे । घरीं कोण टाकोनि आलासि मागे ॥४७॥
असे ग्राम कोठें तुझा दक्षणेसि । तुझे कोण होते तया ग्रामवासी ।
कथी साच वृत्तांत सारा अम्हासी । असत्यें महापातकीं तूंचि होसी ॥४८॥
तदां निर्व्यलीकें कथा सर्व सांगे । मला बाणतां पूर्ण वैराग्य आंगें ।
सती टाकिली एकली मातृगृहीं । निरोपा तिच्या घेतला या उपायीं ॥४९॥
असी मीनली गोष्टि सारीच जेव्हां । स्वशिष्यासि आज्ञा करी स्वामि तेव्हां ।
सतीलागिं हाती धरीं जा गृहासी । इला पुत्र उत्पन्न कीजे सुखेंशीं ॥५०॥
ऋतुस्नात कांतेसी देयीं रतीतें । अशा सेवनें तोषवी साच मातें ।
इला पुत्र तीघे तसी एक कन्या । अपत्यासि निर्माण कीजे सुधन्या ॥५१॥
पुन्हां येयिजे राहिजे स्वस्थचित्तें । असें ऐकतां मान्य केलें महंते ।
ह्मणे देह हा वाहिला पादपद्मा । करुं वाक्य तें मुख्य सेवाचि आह्मां ॥५२॥
अह्मीं पाळिजे वाक्य आधीं गुरुचें । ययामाजि तें आमुचें काय वेंचे ।
पुढें काय होणार तुह्मी पहावें । अह्मीं दास्य सांगीतले तें करावें ॥५३॥
गुरु बोलते साच होणार तैसें । घडो आणितो काळ निश्चिंत बैसे ।
करीं वाक्य माझें नको फार बोलुं । नको याविना अन्यपंथेच चालूं ॥५४॥
तदां घेतली रुक्मिणी सासुरीतें । यती चालिला तो पुन्हा ग्रामपंथें ।
अळंदीस येऊन सुस्थीर झाले । यथापूर्व संसार तो पूर्ण चाले ॥५५॥
चैतन्याश्रम हा गृहाश्रम करी हे ऐकिले ब्राह्मणीं
केला त्याग यथा कुळासि सकळी त्या सौहृदांच्या गणीं ।
कोणी दर्शनही कदापि न करी वंदील तैं कोणता
याच्या पाहुनि लोकनिंदितपथा मानी कसा जाणता ? ॥५६॥
झाला कीं उपहास फारचि जनीं भिक्षा मिळेना तदां
पाला भक्षुनि वृक्षसंभव कधीं तोयाशनें एकदां ।
भक्षी वायु कधी कधी करतळीं भिक्षान्न भक्षोनियां
ऐसा द्वादशवर्ष काळ क्रमिला माना न चित्तीं तया ॥५७॥
येतां तो ऋतुकाळ एक दिवशीं वीर्यासी योजी मुनी
तेव्हां गर्भ अमोरघेत उदया आला निवृत्तमणी ।
श्रीज्ञानेश्वर देव हा उपजला  खाणींत हीरा जसा
वैदूर्यासम दिव्यकांति धरिता सोपान झाला तसा ॥५८॥
मुक्तायी नवमौक्तिकोपम असे तीघांहुनी धाकुटी
चौघें माणवकें विचित्रपरिचीं हे दीसती गोमटीं ।
नामे ही अतिचित्र ठेविति यया आकाशवाणी जसी
सांगे त्याचपरी मुनींद्र परिसा अत्यादरें सौरसीं ॥५९॥
जैसा देवकि देवगर्भ घडला आला कुशीं ज्यापरीं
कौसल्येप्रति जेंवि राम उदरा आला स्वयें श्रीहरी ।
स्तंभी तो प्रकटे जसा नरहरी तैसेचि हेही पहा
मायाधीश्वरव्यक्ति पावति जना घेवोनि देहा महा ॥६०॥
॥ इति श्रीयोगी निरंजनमाधवविरचित ज्ञानदेवविजये
जन्मचरित्रकथन नाम द्वितीय अध्याय: ॥ श्रीरामकृष्ण ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP