मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|लघुभागवत| अध्याय ९ वा लघुभागवत मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा उपसंहार रुक्मिणीहरणगीत सावित्रीगीत सीतागीत लघुभागवत - अध्याय ९ वा लघुभागवत हे एक उपपुराण आहे. Tags : laghubhagavatmarathipuranपुराणमराठीलघुभागवत अध्याय ९ वा Translation - भाषांतर आतां कृष्णाचें बालचरित्र । ऐका तुह्मी परम पवित्र ।ज्याच्या योगें तुमचे श्रोत्र । पावन होतील निर्धारें ॥१॥लेंकुरें मारावीं ऐशी । सूचना रुचली कंसासी ।मग नेमिली पूतना राक्षसी । त्या कार्यासी तत्काळ ॥२॥ती जाऊनि प्रतिसदनीं । तान्हुलें बाळ देखोनी ।आया मोहूनि मधुर वचनीं । घात करी बाळांचा ॥३॥सुंदर वेषें विवशी । पूतना आली गोकुळाशी।कोणासी नुरे संशय मानसीं । देखुनि सौदर्य तियेचें ॥४॥नंदसदनीं रुदनस्वर । ऐकूनि आली तेथ सत्वर।ह्मणे बालक मनोहर । कैसें तुझी रडवितां ॥५॥तेव्हां नव्हता नंद सदनीं । यशोदेसी घातली मोहिनी ।बाळ घॆऊनि लाविलें स्तनीं । विष भरलें ज्यामाजी ॥६॥कृष्ण सर्वज्ञ परमेश्वर । त्यासी ठावें कपट साचार ।जो वस्तुमात्रासी आधार । विष बाधा त्या कैंची ॥७॥तेणें शोषून पूर्ण विष । रक्ताचाही केला नाश ।पूतना झाली मृत्युवश । थोर नवल सकलांसी ॥८॥करुं इच्छिती पराची हानी । तेचि स्वयें मरती निदानीं ।ये विषयीं संशय कोणी । धरुं नये अंतरीं ॥९॥कृष्णलीला अपार । आणि लोकोत्तर चमत्कार ।वर्णू जातां ग्रंथविस्तार । होईल भय वाटतें ॥१०॥तथापि कांहीं आवश्यक । सांगतो मनोरंजक ।तुम्हांसी होईल कौतुक । प्रतिज्ञेचें वचन हें ॥११॥एकदां कृष्णासी मांडीवरी । घेऊनि बैसे यशोदा नारी ।तंव तेणें जडत्व शरीरीं । पर्वतप्राय आणिलें ॥१२॥एकदां दह्यांचे थोर हांडे । जे उचलूं न शकती मल्ल गाढे ।ते उचलूनी भलतीकडे । सहज कृष्णें ठेविले ॥१३॥कृष्णासी वधावया धाडी कंस । तृणावर्त नामें राक्षस ।कृष्णें केला त्याचा नाश । क्षणामाजी सहजचि ॥१४॥एकदां कृष्णें भक्षिली मृत्तिका । यशोदा ह्मणे उघडीं मुखा ।आंत इंद्रादि चतुर्दश लोकां । यशोदेनें देखिलें ॥१५॥कृष्णाचीं सदा गार्हाणीं । यशोदेसी सांगती गौळणी ।चोरुनि खातो दहिं दुध लोणी । करणी याची अचाट ॥१६॥गोदोहना आधीं वासरें । सोडूनि पळतो दूर त्वरें ।हरले आमुचे उपाय सारे । हा नावरे कोणासी ॥१७॥घरोघरीं करितो खोडी । तान्ह्या बाळांसी चिमटे काढी ।दुभत्याचीं गाडगीं फोडी । किती चहाडी सांगावी ॥१८॥चोरुनि मारितो खडे । सवेंचि जाऊनि दूर दडे । शोधूनि पहावें चहूंकडे । तरी न सांपडे कोणासी ॥१९॥ऐसा हा कृष्ण दांडगा । सार्या मुलुखाचा भांडगा ।कितीही बोला परी कोडगा । स्वभाव याचा निर्लज्ज ॥२०॥ऐकूनि कृष्णाची निंदा । क्रोधें बोले त्यासी यशोदा ।कागाळी आणिसी सदा । किती ह्मणूनि ऐकावें ॥२१॥येरु म्हणे सर्वस्व खोटें । उघडीं देखूनि कपाटें। मार्जार उलथी दह्यांचे लोटे । आळ घेती मजवरी ॥२२॥लपविती माझा चेंडू । सकळ मज पाहती कोडूं ।मग कां नको त्यांसीं भांडूं । तूंचि सांग हे माते ॥२३॥आधीं काढूनि आपण खोडी । उलट माझी करिती चहाडी ।मज त्रास देती घडिघडी । म्हणूनि खडे मारितों ॥२४॥उगाचि लाविती मज बोल । ऐकूनि हांसल्या गौळणी सकल ।विनोदें चुरुनि त्याचे गाल । म्हणती बाळ शाहणें ॥२५॥कृष्णाग्रज बलिराम । उभयीं बंधुप्रेम उत्तम । खेळ खेळती मनोरम । गोपांसहित सर्वदा ॥२६॥मुरली पांवे घेउनी । मुलें क्रीडती नित्य वनीं ।अद्भुत वर्तलें एके दिनीं । वत्सें धेनू चारितां ॥२७॥कृष्णासी मारावया गुप्त । वत्सरुपें दैत्य अवचित ।आला, देखूनि नेत्रसंकेत । कृष्ण करी रामातें ॥२८॥बलिराम थोर पराक्रमी । धरुनि दैत्य फेंकिला व्योमीं ।भूमीसी पडतां जैसा कृमी । पादतळीं चिरडिला ॥२९॥एकदां धेनु पीतां उदक । बकरुपें आला दैत्य एक ।कृष्णें धरुनि त्याचें मुख । मध्यभागीं विदारिलें ॥३०॥पुनरपि एक निशाचर । होऊनि आला अजगर ।त्याचें मुखीं गोपकुमर । कृष्णासहित अटकले ॥३१॥तेव्हां कृष्णें निजशरीर । वाढविलें भयंकर ।त्या योगें तत्काळ अजगर । मेला श्वास कोंडुनी ॥३२॥ऐसे गोपाळ कांतारीं । धेनु चारितां यमुनातीरीं।क्रीडा करिति नानापरी । वर्णू येथ तें किती ॥३३॥एकमेकांची शिदोरी । एकवटूनि मुलें सारीं ।सप्रेम भक्षिती दोन प्रहरीं । भेदभाव विसरुनी ॥३४॥प्रत्यहीं सायंकाळपर्यंत । वनीं गोपाळ समस्त ।धांवत हंसत खेळत । क्रीडा करिती आनंदें ॥३५॥बहु पराक्रमी रामकृष्ण । राक्षसांपासूनि गोपरक्षण ।केलें त्यांनी, हें वर्तमान । कळतां चकित जन झाले ॥३६॥श्रीकृष्णाची अद्भुत शक्ती । वर्णावया प्रत्यक्ष सरस्वती ।तीही असमर्थ मग मी किती । मंदमति मानव ॥३७॥श्रीकृष्ण प्रभु एके दिनीं । गाई चारितां वृंदावनीं ।इतर गोपाल प्यावया पाणी । यमुनातीरीं पातले ॥३८॥त्या यमुना नदीच्या डोहीं । कालिया नामें एक अही ।वसतसे म्हणूनि जलप्रवाहीं । विष भरलें सर्वत्र ॥३९॥तेंचि उदक गोपाळ । प्राशन करितांचि सकळ ।मरण पावले तत्काळ । देखूनि कृष्ण घाबरे ॥४०॥उतरुनि त्यांचें विष । त्यांसी जीवंत करी हृषीकेश ।परी तेथूनि पुढें कोणी क्लेश । भोगूं नये यासाठीं ॥४१॥त्या सर्पासी कोठें दूर । घालवूं ऐसा करुनि विचार ।कळंबवृक्षीं यशोदाकुमर । चढोनि उडी घे डोहीं ॥४२॥तेव्हां उंच उसळे जळ । त्या गर्जने सरिसा व्याळ ।देई विळखा सबळ । कृष्णदेहासी आवेशें ॥४३॥हें देखोनि सर्व गोपाळ । घाबरोनि झाले व्याकुळ ।हंबरती धेनु सकळ । उतावीळ धांवती ॥४४॥अस्तासी गेला दिनमणी । तरी गोप गाई येती ना सदनीं ।म्हणूनि सर्वांसि चिंता मनीं । गौळणी वनीं धांवल्या ॥४५॥तैसेचि धांवले गोप । कृष्णदेहीं पाहिला सर्प ।सर्वांसी भयें सुटला कंप । नेणती प्रताप कृष्णाचा ॥४६॥कृष्णाचे सारेचि स्रेही । परी बुडी घेऊनि डोहीं । कृष्णासी सोडवूं ऐसा नाहीं । पराक्रम कोणासी ॥४७॥येतां कठिण अवसर । आप्तेष्ट सर्व पळती दूर । ऐसा अनुभव पूर्वापार । जगीं सर्वत्र येतसे ॥४८॥त्यापरी यमुनातटीं । गोकुळवासी जनांची दाटी ।मुखें करिती वटवटी । कोणीं पुढें जाईना ॥४९॥सकळांचे भरंवसे । जाणावयाचेनि उद्देशें ।कौतुक केलें हृषीकेशें । पुढील चोज आइका ॥५०॥कृष्णाचा नेणूनि आवांका । सर्पे दिधला तदंगीं विळखा ।देणें देऊनि एक तडाखा । कालिया दूर फेंकिला ॥५१॥पुनरपि सर्प धांवूनि आला । घालावया कृष्णासि घाला ।परी येरुने उलट मर्दिला । पादतळीं तुडवुनी ॥५२॥कालियाच्या फडेवरी । अपार नाचे श्रीहरी । तेव्हां सर्वाग भरलें रुधिरीं । तया कालिया सर्पाचें ॥५३॥ऐसा सर्प होऊनि घायाळ । तेथूनि काढी दूर पळ ।निर्विष केलें यमुनाजळ । श्रीकृष्णानें तेधवां ॥५४॥ऐसें कालिया-मर्दन । करिता झाला मधुसूदन ।गोपगोपी सकळ जन । आनंदले त्या समयीं ॥५५॥थोर सामर्थ्य कृष्णाअंगीं । प्रकटलें आणिक प्रसंगीं ।इंद्र ताठला गर्वे स्वर्गी । चरित्र पुढें तें परिसा ॥५६॥पर्जन्यवृष्टि एके काळीं । झाली नाहीं गोकुळीं ।म्हणूनि नंदादि गोपमंडळी । यज्ञ करुं बोलिले ॥५७॥केलिया पर्जन्ययज्ञ । इंद्र होईल प्रसन्न ।तेणे सर्वत्र वृष्टी पूर्ण। निश्चित होईल गोकुळीं ॥५८॥तेव्हां कृष्ण म्हणे तो पुरंदर । आपणापासूनि आहे दूर ।गोवर्धन गिरी निकट फार । त्यासी नैवेद्य अर्पावा ॥५९॥हें श्रीकृष्णाचें वचन । ऐकूनि, सर्वासी समाधान । झाले, परी हा अपमान । होय असह्य इंद्रासी ॥६०॥बहुत कोपें पुरंदर । मोकळे सोडी जलधर । पर्जन्यवृष्टीचा कहर । केला सर्वत्र गोकुळीं ॥६१॥मुसलप्राय पर्जन्यधारा । पडूं लागल्या प्रचंड गारा ।भयंकर तुफान वारा । कडकडाट विजांचा ॥६२॥तडाग वापी नदी नाले । सर्व गोकुल जलमय झालें ।शुष्क स्थळ नाहीं उरलें । आश्रयासी कोठेंही ॥६३॥तुडुंब भरलीं घरें दारें । मरों लागलीं गुरें वासरें ।सचिंत होय गोकुळ सारें । काय करावें सुचेना ॥६४॥हें इंद्राचें कपट । ओळखूनि यदुश्रेष्ठ । युक्ति योजी अचाट । प्राप्त संकट टळावया ॥६५॥गोवर्धन पर्व समूळीं । उचलूनि धरिला करांगुळीं ।मग आश्रयासी त्याचे तळीं । गोपगोपी राहिले ॥६६॥गाई वासरें समस्त । पर्वतातळीं सुरक्षित ।राहिलीं, तेव्हां पुरुहूत । अत्यंत लज्जित जाहला ॥६७॥पूर्ण सात दिवसपर्यंत । करांगुळीं धरुनि पर्वत ।कृष्ण उभा देखूनि सतत । आश्चर्य वाटलें सर्वासी ॥६८॥ऐसें कृष्णाचें बळवैभव । देखूनि इंद्राचा गर्व ।तत्काळ उतरला सर्व । गेलें गौरव तयाचें ॥६९॥ऐसे अनेक चमत्कार । करीत एक गौळीकुमर ।कंसासी हा समाचार । कर्णोपकर्णी पावला ॥७०॥परी जयापासूनि निजवात । तो देवकीचा आठवा सुत ।हें वृत्त नव्हतें विदित । तिलमात्रही कंसातें ॥७१॥परी नारद लावूं गेला कळी । म्हणे कंसा काय भूमंडळीं ।चाललें याची तुज मुळीं । वार्ताचि नाहीं वाटतें ॥७२॥अगा गोकुळीं नंदसदनीं । वसुदेवाचे पुत्र दोनी ।बलिराम कृष्ण यदुकुलमणी । पराक्रमी अत्यंत ॥७३॥मारिले त्यानीं राक्षस किती । नाहीं याची कोणा गणती ।ऐसें असतां तूं स्वस्थ, चित्तीं । अद्यापि अससी नवल हें ॥७४॥हे कोण असती हें अणुमात्र । तूं नेणसी, हें दिसे विचित्र ।तरी ऐक कंसा हे दोघे पुत्र । वसुदेवाचे जाण पां ॥७५॥कृष्ण उपजल्याक्षणीं । वसुदेवें नंदसदनीं ।गोकुळीं त्यासी नेउनी । सुरक्षित ठेविला ॥७६॥देवकीचा आठवा कुमर । जो तुझा करणार संहार ।तोचि हा जाण निर्धार । शत्रु तुझा दैत्येंद्रा ॥७७॥कंस आधींच महादुष्ट । ऐकतां वसुदेवाचें कपट।वह्रि जैसा घेई पेट । घृतबिंदु सिंचितां ॥७८॥तैसा क्रोधानळें संतप्त । कंस होऊनि अत्यंत ।म्हणे येचि क्षणीं करीन अंत । वसुदेवाचा निश्चयें ॥७९॥तेव्हां नारद वदे त्यासी । येणें होय अकीर्ति तुजसी ।म्हणूनि करीं तूं गोष्ट ऐसी । बंदिस्थ त्यांतें करावें ॥८०॥याहूनि नको विशेष । इतुक्यानें चुके सर्व त्रास ।त्यापरी ठेवी बंदींत कंस । देवकी आणि वसुदेव ॥८१॥नारदाचा उद्देश केवळ। कंसासी घडतां पाप पुष्कळ ।दुष्कर्माचें त्यासी फळ। भोगणें पडेल सत्वरीं ॥८२॥कृष्णाचा करावया घात । कंस योजी उपाय बहुत ।मुष्टिक चाणूर दैत्य गुप्त । त्या कार्यासी नेमिले ॥८३॥मग गोकुळीं धाडिला अक्रूर । आणावया वसुदेवकुमर ।धनुर्यागाचा समारंभ थोर । निमित्त मात्र करुनि ॥८४॥अक्रूर सच्छील सज्जन । तथापि राजाचें वचन ।पाळावया गोकुळीं गमन । निरुपायें करीतसे ॥८५॥परी अक्रूर इच्छी अंतरीं । या निमित्तें एकवार तरी ।नयनीं पाहीन गोजिरी । सांवळी मूर्ति श्रीहरीची ॥८६॥अक्रूरासी देखूनि गोकुळीं । आनंदली नंदादि मंडळी ।स्वागत करुनि सकळीं । सन्मानिला बहुमानें ॥८७॥कंसाज्ञा केली नंदासि विदित । आणि कंसाचा गुप्त हेत ।श्रीकृष्णासी अक्रूर साद्यन्त । एकीकडे जाणवि ॥८८॥कंसाज्ञेपरी सानंद । उभय पुत्र घेऊनि नंद ।मथुरेसी जावया सिध्द । झाला राजोपचारेंसीं ॥८९॥भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध । गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥९०॥याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।प्राप्त होईल विद्या धन । ऐसें वरदान व्यासाचें ॥९१॥इति श्रीलघुभागवते नवमोऽध्याय: ॥॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : January 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP