मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|
भीष्मप्रतिज्ञा

भीष्मप्रतिज्ञा

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
मारिले ते वीर माव करि करी । मृषा ते वैखरी केली जगीं ॥१॥
पण केला होता न धरीं शस्त्रासी । भीष्म तो तयासी स्मरणवंत ॥२॥
महामारी धरी अर्जुन वीरासी । नये सावरासी कांहीं केल्या ॥३॥
अश्व ते मारिले रथ ते सारिले । घाय वरी केले वीर पार्था ॥४॥
पार्थाचें शरीर पुष्प पळसाचा । ऐसा वर्ण त्याचा जाणोनियां ॥५॥
सावध तो नाहीं वीर रणांगणीं । विचारिलें मनीं जगन्नाथें ॥६॥
नाहीं पळ एक सावध हा वीर । बाणांचे ते भार भीष्म टाकी ॥७॥
देखोनि निदान प्रतोद ठेवून । प्रथित हो रथचक्र होतें ॥८॥
घेऊनियां करीं उठे लागवेगें । धांवतां निजांगें देखियेलें ॥९॥
कसे पितांबर सुटला तो करें । सांवरून वरें धांवतसें ॥१०॥
भीष्म म्हणे देवा माझी सत्य केली । प्रतिज्ञा हरली आपुली हो ॥११॥
जरी तुझे चित्तीं असे तें मारणें । कवण तो रक्षण करील माझें ॥१२॥
येऊनि लवकरी बैसे रथावरी । खड्‌ग तुझ्या करीं देत आहें ॥१३॥
ऐकतां हा बोल झाला लज्जामान । दिलें तें टाकून चक्र हातें ॥१४॥
जयजयकार झाला रणी तो भीष्माचा । पण केला साचा देवराया ॥१५॥
नामा म्हणे ऐसी भक्ताची हो चाड । आपण लबाड झालें देव ॥१६॥
२.
करितां तें युद्ध नव दिवस झालें । संकट पडलें पांडवांसी ॥१॥
एक वेळ ऐसी केली मात भारी । नेम दिवस सारी एक बाकी ॥२॥
संग्रामीं पांडव करितां विचार । चिंतातूर फार देखोनियां ॥३॥
तेव्हां कृष्ण म्हणे चला अवघे जन । भीष्मा लागोन विचारासी ॥४॥
कृष्ण परमात्मा धर्मराजासहित । भीष्म शिबिरांत जाते झाले ॥५॥
करूनि वंदन पितामहालागीं । बोलती ते वेगीं कैसी परी ॥६॥
नेम दिवस दाहा त्या माजी ते नव । झाले ते स्वभावें कांहीं नव्हे ॥७॥
जयाचिया कांक्षा धरूनि तें मनीं । आलों समरांगणीं हेचि ठावें ॥८॥
तुजसीं झुंजतां नये यश आम्हां । तुझी ते महिमा अगाध हो ॥९॥
भार्गव राम बळी युद्धीं जिंकवेना । तया तोषवेना युद्ध बळें ॥१०॥
ऐसी यासी कैसें मारावें तें रणीं । न करितां हो येक्षणीं जय कैसा ॥११॥
याचि हो विचारें आलों तुझ्या घरीं । सांगें जय नरा प्राप्ति घडे ॥१२॥
ऐकोनियां बोला मनीं आनंदला । भीष्म महा भला काय बोले ॥१३॥
जोंवरी जीवंत तोंवरी जयवंत । आहे हें निश्चित कळों आलें ॥१४॥
परंतु पुसतां विचार मजला । तरी ऐका बोला सांगिजतो ॥१५॥
तुमची हो दळीं शिखंडी नामक । राजा नपूंसक पुरुष आहे ॥१६॥
तया करा पुढें मागून अर्जुन । बाणांचें संधान करावें कीं ॥१७॥
माझी ते प्रतिज्ञा षंढावरी शस्त्र । न धरीं तें अस्त्र प्राण गेल्या ॥१८॥
ऐसी युक्ति करा रणीं मग मारा । यश येईल घरा आपेआप ॥१९॥
ऐकोनी विचार आले निजस्थाना । नामदेवीं जाणा विचार केला ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP