केशवस्वामी - श्लोक संग्रह १०

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

साधू पदे परम निष्फळ भक्ति रंगे । वंदुनिया स्वपद लोपक शोकभंगे ॥

जे डुल्लती अचळ अद्वय प्रीति योगें । ते मी सखे करीन संत सभोग्य भोगे ॥४५१॥

निजहित करणानें नाशिलें कारणासी । सकळ काणपात्रीं बांधिलें चित्सुखासी ॥

ह्मणवुनि करणें हे पावली शांति जाणा । करणीयविण डोळा देखीला रामराणा ॥५२॥

दाऊनी रामकरणी करणासि मारी । मारुनि भेदजनना मरणा निवारी ॥

संपूर्ण आज मजला स्वपदीच थारा । त्यावीण सर्व लटिकें बरवे विचारा ॥५३॥

कवळुनि हरिचिद्‌घन सांवळा । उडविला मनकश्मलकावळा ॥

ह्मणउनी अति पावन मी जनीं । निजपदीं दिधलें स्थळ सज्जनीं ॥५४॥

कंठास कंठ मिळुनी क्षण एक झाला । आनंदता उभयता सकळे जनाला ॥

तो सांग तारव नये धरणी धराला । तो केवि हा वदवतो मज मानवाला ॥५५॥

गुरुपद रजमानथा वंदिलें पूर्ण जेणें । क्षण लव पळ होता होइजे ब्रह्मतेणें ॥

भवभय विषयाचा शब्द तेथे न साहे । सहजचि मग तेथें श्री सदानंद राहे ॥५६॥

चिन्मात्र बोधें परिपूर्ण व्हावें । माझ्य मुखे म्या जम विसरावे ॥

ऐसे मनी आर्थ अपार होते । ते पूर्ण केले अवघे अनंते ॥५७॥

सर्वात्मातो अंतरी राम पाहू । चिष्कामाचे धाम होवूनि राहू ॥

ऐशी अह्मा लाधली प्राप्ति पाहीं । गेली माया देह झालेचि नाहीं ॥५८॥

भूती भूत नातासि पाहोनि डोळा । भूताचि पदें वंदिती वेळोवेळा ॥

श्रुती वंततो ते श्रुतातीत होती । महद्भूत ऐसे श्रुती त्यासि गाती ॥५९॥

सदा सच्चिदानंद डोही बुडाला । स्वबोधे नसे नाम रुपासि आला॥

जगत्पावन देह कर्मे तयाची । मुखे वर्णिता प्राप्ति सच्चित्सुखाची ॥४६०॥

कळेना तपे जे व्रते आकळेना । परातीत पै साधनीवी वळेना ॥

महद्रूप ते दाविले पूर्णमाते । कसे वीसरावे तया सज्जनाते ॥४६१॥

अज्ञान काळी भव सत्य नाहीं । विज्ञान काळी भव सत्य नाहीं ॥

अखंड ऐसा भव सत्य नाहीं । हा साधुचा केवळ बोध पाहीं ॥६२॥

यथार्थ हा माइक बोध पाहीं । यथार्थ हा मोक्ष कदापि नाहीं ॥

यथार्थ हा केवळ बोदह ज्यासी । यथार्थ हा मोक्ष अखंड त्यासी ॥६३॥

त्रिकाळ जो ज्ञान जळी बुडाला । त्रिकाळ तो आत्म कळे निवाला ॥

त्रिकाळ जो केवळ ब्रह्म झाला । त्रिकाळ नाहीं भव सत्य त्याला ॥६४॥

साधूविना आणिक देव नाहीं । सिद्धांतिचा निर्णय हाचि पाहीं ॥

यथार्थ ते केवळ बोधराशी । त्याची पदे वांछिति स्वर्ववासी ॥६५॥

स्वये आपले सौख्य जो पूर्ण घेतो । स्वये आपले सौख्य जो पूर्ण होतो ॥

स्वये आपले सौख्य सर्वासि देतो । मला भासतो देव आंगे चिरेतो ॥६६॥

मोहो जयाला उरला असेना । देहो जयाला उरला असेना ॥

संदेह झाला उतरला असेना । दिसे तरी तो उरला असेना ॥६७॥

जिवा शिवा जेथ निरास झाला । हा बोध ज्याच्या हृदयासि आला ॥

त्याहूनि बापा तव थोर नाहीं । असे तसा तो निजरुप पाहीं ॥६८॥

असा दत्त तो नित्य निर्धूत पाहीं । जयाना मना रुप कांहींच नाहीं ॥

असंगी सदा सर्वसंगी निसंगी । महाराज तो पूर्ण निर्वाण योगी ॥६९॥

सखा दत्त तो स्वामि तो ब्रह्मचारी । जगी नांद तो नातळे बूद्धि नारी ॥

अवीकारतो नित्यसाकार झाला । दिसे तोतरी नाहि आकार त्याला ॥४७०॥

घटा भंग झाला मठी भंग झाला । तही सर्वदा भंग नाहीं नभाला ॥

असे जाणती रुप जीवेश्वराचे । तनू नासल्या काय नासेल त्याचे ॥४७१॥

तनू भासता भास मिथ्या तनूचा । तनू नासता नाश मिथ्या तनूचा ॥

असा निर्णयो बाणला ज्या तनूचा । स्वये तो मनू विन्मनू त्या मनूचा ॥७२॥

स्वये शुद्ध तोरे स्वये बुद्ध तोरे । महासिद्ध सिद्धाहुनि सिद्ध तोरे ॥

निजानंद योगे निजानंद तोरे । पदातीत भोगी सदा नंदजोरे ॥७३॥

पदी मग्न होउनिया पूर्ण साचे । करी सर्वदा रुप जोरे पदाचे ॥

महाशुद्ध तो शुद्ध तो पूर्ण पाहीं । तया सारिखा बुद्धकोणीच नाहीं ॥७४॥

गुरु लक्षिती भक्षिती देहभावा । सदा साधिती दुर्गतीच्या स्वभावा ॥

मनाती तजे भोगिती स्वात्मभावा । विरे वानिता चित्त त्याच्या स्वभावा ॥७५॥

भावे बुडालो गुरुच्या कुळी जो । बोधे निमालो स्थितिच्या मुळी जो ॥

जिताचि मेला निज निष्फळी तो । निर्वाणयोगी गुरुमंडली तो ॥७६॥

गुरुअद्वयानंद जाणोनि याहो । सदा मूकले भेद संगासि याहो ॥

नसे सद्‌गुरुवीण ज्या रिक्त ठावो । मते माझिया तो गुरुमुख्य पाहो ॥७७॥

पंचांग हे कल्पित ज्यासि झाले । दशांग त्याचे सहजे निमाले ॥

त्रयांगहे त्यासि समूळ नाहीं । विनांगते वर्तति मुक्त पाही ॥७८॥

निष्कामता पूर्ण जयासि ओळे । ज्याचे जिवी बोध अखंड खेळे ॥

साधू कुळी तो निजभानु पाही । त्यावेगळा ज्यानकि नाथ नाहीं ॥७९॥

सांडूनि माया गुणवैभवाते । जे छेदिती पूर्ण भवोद्भवाते ॥

आराधिती शास्त्र मुखेंभवाते । ते नेणती याभव संभवाते ॥४८०॥

निजानंद जो पूर्ण विज्ञान डोही । जया डोहिचा अन्यथा भास देही ॥

तया डोहि द्या जीव कल्पीत वासी । असें जाणती ते निजानंद राशी ॥४८१॥

मनातीत जो नातळे का मनारे । मनातीत त्याला नुरे कल्पनारे ॥

मनातीत तो मीनला चिद्‌घनारे । मनातीत जो पूर्ण योगी मनारे ॥८२॥

मनातीत योगी करीतेचि कर्म । मनातीत योगी करीतोचि धर्म ॥

मनातीत ज्याचे अतीगुह्य वर्म । मनातीत तोरे स्वये पूर्णब्रह्म ॥८३॥

नमस्कारहा नित्य त्यातें करावा । अती आदरे संग त्याचा धरावा ॥

जया मानसी श्रीहरी क्षेत्रवासी । भजावेत या सर्वदा योगियासी ॥८४॥

करुनि तो कर्म नव्हेचि कर्मी । अकर्म योगिचि नव्हे अकर्मी ॥

स्वयेमहत्सौख्य समुद्र झाला । श्रुती ह्मणे आत्म पदासि आला ॥८५॥

क्षरीचिया अक्षर पूर्णपाहे । तो अक्षराचे निजसौख्य लाहे ॥

यथार्थ पै अक्षर तोचि आहे । क्षराक्षरातीत निवांत राहे ॥८६॥

शब्दासवे मौन्य कदा न मोडे । विलोकिता भेद समस्त मोडे ॥

ऐसी दया पूर्ण जयासि जोडे । आत्माचि तो नेणति लोक वेडे ॥८७॥

दरिद्रे जर्‍ही व्यापिले योगि यासी । तरी नाठवे दैन्य वार्ता तयासी ॥

सुखात्मा हरी अंतरी जोडलासे । सुषुप्तापरी दृश्य त्याते नभासे ॥८८॥

सत्संगती पूर्ण फळासि आली । त्दृत्पंकजी शांति दया रिघाली ॥

परोपरी भेद दशा निमाली । सच्चित्सुखाचि द्धन प्राप्ति झाली ॥८९॥

सत्संगति आत्मसुखासि घेती । तेणे सुखे पूर्ण निवांत होती ॥

क्षमा दया त्यासि कळेच नाकी । त्याची दशा सर्व शेवि पिनाकी ॥४९०॥

संसाराचे भान बोधी बुडाले । गेली माया चित्त चिन्मात्र झाले ॥

ऐसे केले सद्गुरु आदि नाथे । जेथे तेथे भेटतो मीच माते ॥४९१॥

संकल्पाची मूळ माया निमाली । संसाराची शांति तत्काळ झाली ॥

गेला मोहो देह स्वामी दिसेना । ब्रह्मानंदी भेद वार्ता असेना ॥९२॥

सत्संगति शांति कपाट सेवा । त्दृत्पंकी वेदन दीप ठेवा ॥

तेणे गुणे सर्व असार साधे । अप्राप्त हा मंगळ मोक्ष लाधे ॥९३॥

सोडूनिया गर्व अगर्व भावा । सर्वत्र हा सर्व सखा करावा ॥

तेणे गुणे सर्व अभाव भावे । अव्यक्त चिन्मात्र मनी ठसावे ॥९४॥

सांडूनिया काम क्रियेसि पाणी । स्मरा तुझी चिन्मय चक्रपाणी ॥

पाणी चढे बोध निधीस तेणे । नेदी उरो मीपण पूर्ण तेणे ॥९५॥

सत्संगति शास्त्र विचार द्वारा । येवूनिया सत्व समुद्र पारा ॥

सेवी सखा चिन्मय शेष शायी । तो आमुचा केवळ सांप्रदायी ॥९६॥

साधू दया होय जयासि पाहीं । संसार वार्ताचि तयासि नाहीं ॥

पावे सदा सर्वगता अभेदा । नेणे कदा मोह भदाव रोधा ॥९७॥

सेवी निजानंद घन त्रिकाळी । पडेचिना घोर विकार जाळी ॥

जाळी तयाच्या भजनेत्रि तापा । क्षरीचया अक्षर होय बापा ॥९८॥

सुख घना अमना हरिनागरा । निज मनी धरुनि भवसागरा ॥

यतिवरी अमरी तरी जे खरे । गुज असे कथिले करुणाकरे ॥९९॥

सन्मात्र काशी घडली जयासी । संसार नाहीं उरला तयासी ॥

आनंद राशी परि पूर्ण झाले । तारावया ते मजलागि आले ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP