आस

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


करि मुक्त विहंगम हा रमणी !

रहावया मज प्रिये, मनोहर

कनकाचा घडविलास पंजर

छतास बिलगे मोत्यांचा सर

या सलत शृंखला तरि चरणीं !

करि मुक्त विहंगम हा रमणी !

तुझ्या कराचा विळखा पडता

तव वृक्षाच्या उबेत दडता

गमे जिण्याची क्षण सार्थकता

परि अंतरि करि आक्रोश कुणी

करि मुक्त विहंगम हा रमणी

नकोस पसरूं मोहक बाहू

मृदुल बंध हे कुठवर साहू

नभ-नाविक मी कुठवर राहू

या आकुंचित जगि गुदमरुनी

करि मुक्त विहंगम हा रमणी !

जावे गगनी आणिक गावे

मेघांच्या जलधीत नहावे

हिरव्या तरुराजीत रहावे

ही आस सदा अंतःकरणी

करि मुक्त विहंगम हा रमणी !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३४


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP