श्रीकृष्ण कथामृत - तेरावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( मुनर्मीलन )

तदूरेऽस्ति तदंतिकेऽस्त्यापिच तद् बाह्ये तथाऽभ्यन्तरे
तन्नैजत्यथ चजतीति निगमो जानात्यजानन् परम्
देवेत्थं वचनं विसंगतमिदं बोद्धुं न शक्ता वयम्
जानेऽहं त्विदमेव मे हितकरं मातापिता नः शिवः ॥१॥
रसाळ भाववाणिने अनेक संत गाइले
जना तरून जावया कलींत मार्ग दाविले
हिरे अमोल वाङ्मयी धरी शिरीं सरस्वती
महीपतीस त्या असो मदीय आदरें नती ॥२॥
सुरेख मंदिर शुभ्रशिलांचें
भव्य शिखर जणु हिमालयाचें
तीर्थपतीची पवित्रता वा
गृहरूपें या घेत विसांवा ॥३॥
दिवसा स्पर्धा करी रवीसी
पूर्णचंद्रसा दिसे निशीसीं
प्रसन्नतेसह शांती मंगल
परी सर्वदा राही निश्चल ॥४॥
गृहाकृती ती सुरम्य उज्वल
श्री - कमलासम वैकुंठातिल
ज्या बघतां ये प्रत्यय साचा
क्षुद्रमनाही विशालतेचा ॥५॥
मंद सुगंधित वायु विनयें
गवाक्ष - भागीं संचरुनी ये
सात्विकता वात्सल्य जिव्हाळा
शिकवितसे मग इथुन जगाला ॥६॥
विरक्तमुनिजन - तपोवनासम उपवन हर्म्याभवती
रम्यसुवासी तरुवेली ज्या फलसुमभारें लवती ॥७॥
शोभा तेथिल जीस न तुलना
परी करी हृदया चंचल ना
प्रवेशतां हो याच वनास
मदनहि झाला बाळ निरागस ॥८॥
( नाम धरी प्रद्युम्न मनोहर
सती रुक्मिणी हर्षित निर्भर
शिवप्रसादें अशी हरीची
होत गृहस्थी सफला साची ) ॥९॥
राज हंस शुक मयूर चातक
सुंदर नयनांचे मृग - शावक
रमती होउन मुदित मनातें
बंधन लवहि नसुनी तेथें ॥१०॥
ऋग्वेदी सौंदर्य उषेचे
शांतिपाठ वा उपनिषदांचे
मूर्त होउनी जरि या ठायीं
राहतात तरि कौतुक नाहीं ॥११॥
जगदीशाची जननी ज्यासी
पावन करिते निजसहवासी
अधिक बोलणें नलगे कांहीं
सती देवकी येथें राही ॥१२॥
दर्शन घ्याया प्रिय जननीचें प्रतिदिवशीं वनमाळी
प्रभात समयीं येई घेउन सुमनें निजकर कमलीं ॥१३॥
प्रेमभरें शिर चरणीं ठेवी
उचलुन बसवी जवळी देवी
वात्सल्यानें कुरवाळी मुख
परात्पराचें घेई निजसुख ॥१४॥
शुद्ध दुधाचें पायस हाता
देउन वदली हरीस माता
कथिलें मजसी गर्गमुनीनीं
ग्रहण रवीचें आलें म्हणुनी ॥१५॥
येत्या मासांतिल अंवसेशीं
गिळील राहू रवि - सर्वांशीं
मज वाटे या पर्वासाठी
सरस्वतीच्या जावें कांठीं ॥१६॥
राजर्षी कुरुच्या पुण्याहीं
पावन झाली विशेष भूही
अवतीं भवतीं या भूमीचे
वेल वाढले यदुवंशाचे ॥१७॥
पर्वकाल हा यास्तव साधूं जाउन त्या क्षेत्रातें
थोर थोर जन संत महात्मे सहजीं मिळतिल जेथें ॥१८॥
वदे श्रीहरी अवश्य माते
जाउं कुरुक्षेत्रा पर्वातें
इच्छेची तव कधि न अवज्ञा
ही तो मंगलकारक आज्ञा ॥१९॥
बलरामासह सकलहि यादव
मेळवीत मग सभे रमाधव
विचार आपुला कथिला त्यासी
सर्वहि झाले मुदित मनासी ॥२०॥
चपलगतीच्या अनलस दूता
पाठवुनी ही कळवी वार्ता
प्रियसखये जे पांडव त्यासी
स्वजना विसरत नच हृषिकेशी ॥२१॥
द्वारा नगरीचे संरक्षण
प्रद्युम्नावर दिलें सोपवुन
यादव सेना दिधली संगें
कथिलें सावध असण्या अंगें ॥२२॥
जननी जनका बलरामासह घेउन निजपरिवारा
यात्रेसाठीं निघे दयामय आश्रय धर्माचारा ॥२३॥
प्रवासांतही अमाप वैभव
श्रीशिबिरासी उणें नसे लव
स्वयें द्वारका सचेत झाली
प्रभुसह जणु यात्रेस निघाली ॥२४॥
ग्राम नगर वा असले कानन
स्वागत करिती प्रेमभरें जन
कुणी दूध फल धान्य कुणी रे
कुणी फुलांचें अर्पी गजरे ॥२५॥
मनापासुनी समभावानें
घेतियलें तें गदाग्रजानें
हीन थोर ही निघड न कांहीं
प्रेमें भिल्लहि धरिले हृदयीं ॥२६॥
यास्तव या अग्रणी ग्रामणी
श्रीमान् न्यायी म्हटले जाणी
जनास नेता असा असे जर
कशी विपत्ती करि डोकें वर ॥२७॥
सरस्वतीसी ये परमात्मा स्वजना घेउन संगें
पूर्णचंद्र जणु नक्षत्रासह आकाशीच्या गंगें ॥२८॥
क्षेत्र सुखद तें ब्रह्मावर्त
पावन होतें जें मर्यादित
स र स्व ती नें दृ श द्व ती नें
मनुज जसा का चिज्जडतेनें ॥२९॥
तीर्थ त्या स्थलीं समंत पंचक
पापताप - संताप - विमोचक
क्षत्रिय - हननो - द्वेजित रामें
इथेंच केलें तप निष्कामें ॥३०॥
यास्तव पावन विशेषची तें
तिथें श्रेय निज मिळवाया तें
दूर दूरचे लोक मिळाले
प्रवाह जणु सागरीं रिघाले ॥३१॥
पाण्ड्य अवंती कलिंग केरल
कामरूप अपरान्त नि कोसल
विदर्भ मैथिल मगधनृपादी
यादव पाण्डव कौरव चेदी ॥३२॥
अत्रि अंगिरा अरुंधतीवर भृगु कश्यप मैत्रेय
च्यवनगर्ग शांडिल्य पराशर गौतम मार्कंडेय ॥३३॥
असे पातले तीर्थीं मुनिवर
ब्रह्मज्ञानाचे जणु सागर
आश्रय जैसे यमनियमांचे
दीप्ताग्नीसम तेज जयांचें ॥३४॥
निज अस्तित्वें करिती पावन
भूतल सारें असे संतजन
गृहस्थ आले सहसुत - दारा
येती घेउन वणिज पसारा ॥३५॥
सान थोर नरनारी येती
समावल्या कीं अठरा जाती
क्षेत्र दिसे तें जेवी कानन
शारदकालीं गेले बहरून ॥३६॥
ग्रहतारागण मंडित अंबर
प्रगटित वैभव वा रत्नाकर
जनसंमेलन मधुर दिसेतें
विविधवर्ण जणु इंद्रधनूतें ॥३७॥
कुरुक्षेत्र ते गमे मनोहर गोडगळ्यांतिल गाणें
संवादी स्वर मिळता जेवीं बहुविध आलापानें ॥३८॥
अनेकांत एकत्व बघावें
भेद अभेदामधें समावें
वैषम्या ये समता केवीं
रीत भारतामधें शिकावी ॥३९॥
भव्य उभविलीं शिबिरें कोणी
कुणी मंडपी कुणी वितानीं
कुणी पाहिली छाया तरुची
क्षिती कुणासी नसे उन्हाची ॥४०॥
हत्ती जणु कीं जिवंत डोंगर
चपल - गतीचे घोडे सुंदर
बैल जयांचीं थोर वशिंडें
गाईंच्या शिंगाप्रति गोंडें ॥४१॥
बघण्यापूर्वी सोय अपुली
दुसर्‍यासाठीं झटती सगळीं
साध्य एकची असल्यावरतें
मत्सर लोभा स्थल ना उरतें ॥४२॥
गजबज असुनी बजबज नव्हती कुठेंच त्या समुदायीं
समाधान सकलांही होते ही पूर्वज पुण्याई ॥४३॥
शिबिर हरीचें मधें विराजे
मेरुसम गिरिगणांतरी जे
तेच पांडवां होय विसावा
मधु सोडून का भ्रमर रमावा ॥४४॥
पांचाली सह वसे रुक्मिणी
देवकीस कती सन्मानी
श्वशुर हरीचे उत्सुक चित्तें
हृदयी धरिती निजकन्यांतें ॥४५॥
सखे सोयरे आप्त मिळाले
भेटीनें त्या प्रसन्न झाले
मुनिजन घेउन हरिचें दर्शन
म्हणती आजी कृतार्थ जीवन ॥४६॥
परी स्वस्थता हरिसी नाहीं
जणू विसरले चुकले कांहीं
धुंडिति चंचल नयन कुणातें
उदास मुद्रा मधुनी होते ॥४७॥
देह वसे शिबिरीं परिवारीं मन परि तेथें नव्हतें
भलतें उत्तर दे मग हांसुन सावरण्या पाहत तें ॥४८॥
द्रुपदसुता रुक्मिणी धनंजय
कृष्णवर्तनें करिती विस्मय
वदे सहेतुक मग पांचाली
गोकुळची कां बरें न आली ॥४९॥
मंडळीस त्या बघावयाची
आस असे मज फार दिसांची
तुझ्या मुखें हरि कितितरि वेळां
महिमा ज्यांचा मी ऐकियला ॥५०॥
तदा म्हणे श्रीहरिची जाया
मीही आतुर त्या वंदाया
त्यांतहि केव्हां पाहिन राधा
तुलनेची कीं जिला न बाधा ॥५१॥
भाव भक्तिची जी परिसीमा
संत जियेचा गाती प्रेमा
दिधलें यानी मज आश्वासन
तुज या पर्वीं व्रज जन दाविन ॥५२॥
मीही त्यांची वाट बघत गे प्रिये काल पासोनी
बोलत माधव कधीं भेटती गोपी, व्रजजन, जननी ॥५३॥
तीर्थ - विधीस्तव या पर्वासी
येतिल मत्प्रिय गोकुलवासी
येथवरी मी विश्वासें या
आलों झाले श्रम परि वाया ॥५४॥
प्रिय - भक्तांच्या भेटीवांचुन
काय दुजें मज उरे प्रयोजन
मी त्यांच्यास्तव ते मजसाठीं
अवतरतो या प्रेमापोटीं ॥५५॥
तोंच आतं कुणी सेवक येई
धां न मावे ज्याच्या हृदयीं
हर्ष जयाच्या फुलला वदनीं
विनम्र झाला प्रभुचें चरणीं ॥५६॥
करी त्वरे तो मंगलभाषण
महाराज यदुवंश विभूषण
जवळ गोपगण अगदीं आला
गात मुखानें अपुल्या लीला ॥५७॥
ऐकुन दिधली मौक्तिकमाला गळ्यांतली त्या दासा
वार्ता नच ही सुधा वर्षली तृषितावरतीं सहसा ॥५८॥
पंडुसुताचा हात धरोनी
त्यासह गरुडध्वज वेगानीं
सामोरा ये गोपजनांसी
गगन पुरेना आनंदासी ॥५९॥
गोपाळांसह नंद यशोदा
वृषभानूची तनया राधा
भजनें गाती जन अनुरागें
गाड्या हळुहळु येती मागें ॥६०॥
पिटिती टाळ्या कुणी झल्लरी
टाळ वाजवी कुणी बांसरी
चाळ बांधुनी कोणी नाचे
नामें हरिची गाउन वाचें ॥६१॥
व्रजनाथा हें कुंजविहारी
मुरलीधर मावध गिरिधारी
नंदकिशोरा हे घननीळा
राजिवनयना हरि गोपाळा ॥६२॥
मुक्तकंठ गातात रंगलें चित्त विसरलें भान
समरस अर्जुन ऐकत करूनी सर्वांगाचे कान ॥६३॥
कृष्ण येतसे बघतां नयनीं
गोप गर्जले उ च्च र वा नीं
आज तपस्या फळास आली
हरि भवतीं सर्वही मिळाली ॥६४॥
पूर जसा ये महानद्यांना
उफाळल्या त्यापरी भावना
शब्दफुटेना स्रवती डोळे
काय करूं किति नको न झालें ॥६५॥
सहस्त्र डोळे भरून बघावें
सहस्त्र हातीं कवटाळावें
सहस्त्र वदनीं घोष करावा
लाभ अम्हा हा कुठुन घडावा ॥६६॥
वासव हैहय शेष न आम्ही
प्रभो दिली इंद्रिये निकामी
गोपांच्या ये असे मनासी
रोम रोम नाचती तनूसी ॥६७॥
परमात्मा दे मिठी पदांसी येउन नंदा जवळी
सकंप सद्गद कंपित हाते वृद्ध तया कुरवाळी ॥६८॥
हरि आला हें यशोमतीनें
ऐकियलें परि दिने न नयनें
जलें डंवरूनी गेली दृष्टी
हर्षित झाली जननी कष्टी ॥६९॥
आर्त रवें संबोधुन मातें
हरिने दिधली मिठी गळ्यातें
रामें जणु सरतां वनवास
धन्य धन्य गर्जलें दिवौकस ॥७०॥
मुकुंद भेटे मग राधेसी
मंगल सारे यदाश्रयासी
मोह - तमाचा स्पर्श न जीतें
गंगोत्री जी भक्तिरसातें ॥७१॥
श्रीहरिची जी चिन्मय छाया
मिठी देत तिज दृढ यदुराया
शुभमीलन नच भेद कळावा
कवण राधिका कवण हरी वा ॥७२॥
प्रेमसमाधी पाहुनिया ती मुनिजन हृदयीं धाले
प्रेमाचा या अंशहि मिळतां जीवन सार्थक झालें ॥७३॥
व सु दे वा नें श्री नं दा चा
आदर केला फारचि साचा
दोघांचेही गंहिवरलें मन
किति दिवसांनीं झालें दर्शन ॥७४॥
शिबिरासी वा परिवारा निज
पुरा विसरला अतां अधोक्षज
गो पा ळा स ह वृ क्षा खा लीं
पूर्णपणें रमला वनमाळी ॥७५॥
यदुनाथ न हरि जणु हा आतां
प्रौढवयाची नुरली सत्ता
तत्त्वज्ञानी नच, ना वीर;
व्रजरमणीप्रिय नंदकिशोर ॥७६॥
यशोमतीसी करण्या वंदन
सवें सर्वही सुनांस घेउन
येत देवकी हर्षित चित्तें
विस्मय झाल व्रजललनांतें ॥७७॥
‘ या हरिच्या भार्या ’ हे कळतां यशोमतीच्या हृदयीं
वात्सल्यासह आनंदाचे अपूर्व भरतें येई ॥७८॥
वधू वंदिता, सती यशोदा
प्रेमभरें दे आ शि र्वा दा
“ प्रियबाळे सौभाग्यवती हो
गुणबलशाली सुत तुज लाहो ” ॥७९॥
शिर कुरवाळित अंगावरचें
कुतुकें निरखित वदन हरीचे
पुसे देवकीप्रती यशोदा
बसली होती जवळच राधा ॥८०॥
“ कुणास मिळवी काय पराक्रम
करून वदा हा श्याम तरी मम
थोरपणींच्या याच्या लीला
ऐकूं द्या मज म्हातारीला ” ॥८१॥
हांसुन सांगे सती देवकी
वडिल सून ही पहा भीमकी
विदर्भभूपाची प्रिय कन्या
हरीस इच्छित असे अनन्या ॥८२॥
भावानें परि धरिला आग्रह अर्पाया शिशुपाला
हिनें विनविता हरिलें कृष्णें करुनी घोर रणाला ॥८३॥
कमलमुखी ही दुसरी भामा
रुसवा धरिते कधीं रिकामा
हिचा पिता घे आळ हरीवर
स्वमंतकाचा तूंची तस्कर ॥८४॥
वधिला बंधू मम रत्नास्तव
आरोपें या शंकित यादव
परी प्रसेना वधिलें सिंहें
जांबवतासी रत्न मिळे हें ॥८५॥
कलंक दुःसह होय हरीसी
 रत्न आणिलें तयें प्रयासी
सत्राजित मग पश्चात्तापी
कन्येसह निज, रत्न समर्पी ॥८६॥
जांबवतासह रत्नाकारण
युद्ध करी अपुला व्रजमोहन
तयें तोषुनी बाहुबलाही
जांबवती दिधली दुहिता ही ॥८७॥
कालिंदी ही दिनकर - कन्या गिरिजेसम तप करुनी
भाग्यवती ही पुण्यानें त्या झाली हरिची रमणी ॥८८॥
कोसल - नृप - तनया सत्या ही
वीर्य - शुल्क ठरविली विवाही
सात मत्त बैलांस वेसणुन
वरिली रामासम जिंकुन पण ॥८९॥
ही भद्रा कैकयी तरीही
फारच आहे प्रेमळ हृदयीं
मम नणदेची सुता, पित्यानें
कृष्णा दिधली प्रेम भरानें ॥९०॥
हीहि त्यापरीच मित्रविंदा
स्वयंवरानें वरी मुकुंदा
बंधू दोघे विरोध करिती
कोण टिके परि याचे पुढतीं ॥९१॥
आणिक ही लक्ष्मणा सुलक्षण
आणी हरुनी स्वयंवरांतुन
आहे ही मद्राधिप तनया
पट्टवधू हरिच्या आठहि या ॥९२॥
नरकासुर वधुनी कारेंतुन त्याच्या ज्या सोडविल्या
असती त्या भार्या बहु याच्या सगळ्या येथ न आल्या ॥९३॥
गोविंदाच्या भार्याविषयीं
ऐकुन राधा हर्षित हृदयीं
धन्य तुम्ही वरिलें गोपाळा
लबाड परि गे हा सांभाळा ॥९४॥
सहवासें निज लावुन गोडी
हरि हा सहजीं तयास तोडी
धरा भरवंसा कधी न याचा
नेम न कांहीं या फसव्याचा ॥९५॥
हृदीं बिंबतें प्रतिमा याची
तीच खरी गे विश्वासाची
तिला न लवहि द्यावें अंतर
सुखास मग ना पुरेल सागर ॥९६॥
बाहिरुनी हा भारी छळतो
काम उपजवीं तृप्त न करितो
हृदयांतिल परि याची मूर्ती
इच्छेपूर्वी करीत पूर्ती ॥९७॥
वदे श्रीपती सस्मित “ राधे ! कलह निर्मिसी कायीं
डोळे लावुन बसतां सगळ्या धडगत माझी नाहीं ॥९८॥
सखे राधिके सत्य तुझेंचि
म्हणे रुक्मिणी प्रिया हरीची
धन्य भाग्य झालें तव दर्शन
गाढ दिधलें प्रेमालिंगन ॥९९॥
रमा राधिका भिन्न तरीही
तत्व एकची उभयां ठायी
श्रीहरि या एका तत्त्वाचीं
दोघीही त्या रूपें साचीं ॥१००॥
भक्तीची नु परा मधुरा कीं
शीतलता वा प्रभा शशांकीं
एक चारुता दुजी सुरभिता
कमलाची परि एकचि सत्ता ॥१०१॥
सती यशोदा सकलांनाही
जवळ बसवुनी प्रेमें घेई
वदे देवकी या सर्वांना
बाई कांहीं बोध कराना ॥१०२॥
कुलस्त्रियांनां भूषण तुम्ही आश्रय गृहिणी धर्मा
तुम्हामुळेंची श्रीहरिसी या इतुका आला महिमा ॥१०३॥
जरी गुणाच्या सर्व सुना मम
तेजगुणा ये बोधें अनुपम
पैलू पडतां जशी हिरकणी
चमकतसे कीं अपूर्वतेनीं ॥१०४॥
बरें म्हणाली हसुन यशोदा
बोलत मग बघुनी गोविंदा
प्रसन्न करणें मन भर्त्याचे
रहस्य हेंची xxxx - धर्माचे ॥१०५॥
पतीस मानी दैवत पत्नी
तो तिजलागी सुखवी यत्नी
परस्परीं विश्वास पुरा जर
हर्षसुखा साम्राज्यचि ते घर ॥१०६॥
मान करावा वडिल जनांचा
नम्र असावी सदैव वाचा
मनीं जिव्हाळा साना विषयी
धरितां सकला प्रिय ती होई ॥१०७॥
चित्त आपुल्या वश ठेवावें आवरुनी यत्नानें
भावनांस जपणें दुसर्‍यांच्या अतिशय कोमलतेनें ॥१०८॥
दक्ष असावें गृहकृत्यासी
अल्व न सहावें मलिनपणासी
नच माना हें काम न माझें
आळस लक्षण नच विभवाचें ॥१०९॥
रविकिरणांचें व्हावें स्वागत
गृहांगणीं जे स्वच्छ सुशोभित
धाक असावा दास - जनासी
परि नच येउन संतापासी ॥११०॥
सर्वां आधीं शयन त्यजावे
सकलां वादुन मग जेवावें
कार्य निमित्तें कधी पतीची
करा उपेक्षा लवहि न साची ॥१११॥
हाच पतीसी वश करण्याचा
उपाय आहे एक, सुखाचा
ताइत गंडे जी कुलटा ती
शोधित बसते आत्म - विघाती ॥११२॥
निजपावित्र्या प्राणपणेंही रक्षा नित्य अनन्या
पवित्र जी नच ती नच माता भगिनी पत्नी कन्या ॥११३॥
त्याग धर्म हा संयम भूषण
स्वभाव व्हावा कीं प्रेमळपण
उलट पतीच्या कधिं न असावें
इतर सर्व मग यांत समावे ॥११४॥
तुम्हे घराच्या असा स्वामिनी
आय तसा व्यय घ्यावा स्वमनी
पालन करणें कुलधर्माचें
सन्मानावे पद अतिथीचें ॥११५॥
फार किती तरि कथूं तुम्हासी
सती देवकी पुण्यबळेंसी
तुम्हा लाभल्या अनुकरणातें
आचरणें निज सुखवा त्यातें ॥११६॥
पावन वाणी यशोमतीची
सकल जणींना रिझवी साची
नयन जलानें भिजवित चरणा
भामेनें तिज केलें नमना ॥११७॥
गोकुळजन - समुदायीं लाभे समाधान सर्वांना
सरळ प्रेमळ निर्लोभांचा स्नेह न सुखवी कवणा ॥११८॥
आनंदी प्रियजन सहवासें
चार दिवस गेले क्षण जैसे
पर्व दिवस ये मग अवसेचा
वेध लागलासे ग्रहणाचा ॥११९॥
पर्वविधीस्तव धांदल झाली
सर्वहि तीर्थी सचैल न्हाली
निराहार राहुन जप करिती
दानें देती बहुविध रीतीं ॥१२०॥
गिळीत राहू क्रमें रवीसी
डाग लागला पसरायासी
लोक समाजीं अफवा जैसी
स्पर्शहि नसतो जरीं मुळासी ॥१२१॥
ग्रस्त होतसे बिंब सबंध
प्रकाश अगदीं झाला मंद
तारे हसले हळुच नभासी
क्षुद्र खुले जइं विपत् सतांसी ॥१२२॥
सांज जाहली कशी अवेळीं चाराही नच घेती
घरट्यासी परतली पाखरें दीनरवें किलबिलती ॥१२३॥
बिंब होतसे लाल काळसर
वातावरणहि झालें धूसर
उदास भासे जगतीं सारें
पडलें होतें अगदीं वारें ॥१२४॥
सृष्टीची खिन्नता परी ही
फार वेळ कीं टिकलीं नाहीं
दिसूं लागले हाम्य रवीचें
धैर्य चळे नच कधि सुजनांचे ॥१२५॥
बिंबरवीचें पुनः प्रकाशे
संकट कांहीं नव्हतें जैसे
पाप पळालें या भावानें
लोकांनीं ही केलीं स्नानें ॥१२६॥
यथासांग कर्मे करिती जन
सद्धर्माची ओळख ठेवुन
दाता नच दे उपकारास्तव
घेणाराही अगतिक ना लव ॥१२७॥
यात्रिकांस नच छळती कोणी धर्म दक्षिणेसाठीं
व्यंगांचें निज करून भांडवल कुणि ना भरती पेटी ॥१२८॥
पर्वीं राहुन उभे जलातें
हरिने जपिलें गायत्रीतें
सर्वकाळ राही उपवासी
धन्य वाटले धर्मविधीसी ॥१२९॥
श्रीनंदाच्या हातें वैभव
अपुलें करवी दान रमाधव
नंदाची मग उदारकीर्ति
तृप्तमनानें याचक गाती ॥१३०॥
करी यशोदा शत गोदानें
भूषविलें ज्यां मणि हेमानें
अन्नदान, गणती वस्त्रांची
इंद्रासहि ना करवे साची ॥१३१॥
पर्वकाळ तो अशारितीनें
समाप्त झाला आनंदानें
परस्परांचा निरोप घेउन
लोक निघाले गेहा परतुन ॥१३२॥
गोपगणांच्या हृदयासी परि व्याकुळता ये भारी
धरिती कवळुन निजहृदयासी पुनः पुन्हा गिरिधारी ॥१३३॥
पोचविण्या ये दूरवरी हरि
घेई लोळण नंद पदांवरि
निज शेल्यानें गो प ज नां चे
जयन पुशी, स्रवती निज साचे ॥१३४॥
कसे तरी शेवटीं एकदा
व्रज परते सहनंद यशोदा
वळूनी मागें बघती विह्वल
मार्गा भिजवी नेत्रांतिल जल ॥१३५॥
नवें तेज ये श्रीकृष्णासी
गोपजनांच्या प्रियसहवासीं
सेवन करितां दिव्य रसायन
भरे, ओज उत्साहें जीवन ॥१३६॥
पर्व एक सरलें ग्रहणाचें
वेध लागले परि दुसर्‍याचे
संकट कधिं एकटे न येई
कळप करून जणु असतें तेंही ॥१३७॥
रुचलें न कुरुक्षेत्रा येउनिया लोक जाहले परत
योजी स्वमनीं कांहीं भूमी ती नित्य रक्त - लेप - रत ॥१३८॥

‘ पुनर्मीलन ’ नांवाचा तेरावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
भाद्रपद शके १८७१

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP