श्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( मथुरारक्षण )

सकलसुखवरिष्ठं संस्तुतं वेदसंघैः
अचरचरपदार्थे व्योमवद् व्याप्तदेहं
विनतजनदयालुं भक्तकल्पद्रुमं तं
चरणनिहितभालं चंद्रमौलिं नमामि ॥१॥
वाटा मोडुन सूक्ष्म दुस्तर जयीं सन्मार्ग संथापिले
अद्वैता चढवून साज अणिलें सौंदर्य भक्तीमुळें
ज्यांचें वाङ्मय लाळवीत अमृता दीनास जें माउली
संतश्रेष्ठ असे सदैव नमितों प्रेमादरें पाउलीं ॥२॥
वदे गर्गमुनि वसुदेवासी
“ पाठिव पुत्रां गुरूसदनासी
रत्न जरी मूळचें प्रकाशी
संस्कारें द्युति विशेष त्यासी ॥३॥
काश्यपगोत्री मुनि सांदिपने
योग्य गुरू तो मम दृष्टींनीं
शांत गतस्पृह शुची तपस्वी
दासी ज्याची विद्यादेवी ॥४॥
अवंतीस तो वसे कुलपती
त्यास करावी सादर विनती ”
कुलगुरूचें हें उचित बोलणें
वंद्य मानिलें कृष्ण - पित्यानें ॥५॥
त्वरें जाहली सर्व सिद्धता
गुरूकुलांत पाठविण्याकरितां
याता देवकिनें प्रेमानीं
आशीर्वचिलें सुतशिर हुंगुनि ॥६॥
गुरू जगताचे रामकृष्ण ते अतिविनीत वेषांनीं
समित्पाणि होऊन पातले जेथ गुरू सांदिपनी ॥७॥
स्वर्गामधला देवगुरूचा
आश्रम केवीं असेल साचा
तें जरि नाहीं ठाउक कवणा
याहुन त्या परि विशेषता ना ॥८॥
कल्पतरूंचें उपवन तेथें
असेल पुरवित मनोरथांतें
परी येथची नवलाई ही
वासनास मुळिं उद्भव नाहीं ॥९॥
संतहृदय जें परदुःखांनीं
क्षणांत पाझरतें कळवळुनी
तेंच आश्रमाप्रत या भूषण
तेथ चंद्रकांता जरि मान ॥१०॥
सकलहि विश्वाची सुंदरता
वसे येथ शिकण्या सात्विकता
मंत्रपूत आहुति - गंधानें
पवित्रतेचें चढतें लेणें ॥११॥
वेदघोष गंभीर तेथ नित भरवी वातावरण
तेज विलक्षण देत तया कीं निष्कलंक आचरण ॥१२॥
उंच तरू भिडले स्वर्लोका
मुनिकीर्तीचे जिने जसे कां
विविध फुलांचा फुले ताट्या
बहर जणूं आला सद्भावा ॥१३॥
सरस्वतीच्या प्रसन्न गालीं
आनंदानें जी खळि पडली
तेंच सरोवर येथ मनोहर
जलांत पावें स्मित रूपांतर ॥१४॥
पशुपक्षी उपवनांत रमले
जन्मजात निज वैर विसरले
सत्संगाचा वसंत अभिनव
प्रेमलतेसी फुलवी पल्लव ॥१५॥
छात्र नवागत शुकवचनांनीं
पाठ विसरले घेति जाणुनी
मयूर नृत्यें रिझती वृत्ती
दुजी उपाधी रंजक नव्हती ॥१६॥
शीततेस शांतसा विसांवा
वनांत त्या सर्वदा असावा
अंधारा परि लवहि ना ठाय
पाप वसे सद्हृदयीं काय ॥१७॥
श्रुतिस्मृती उपनिषदें आगम रमती विद्या सकला
जेथ तया आश्रमीं हरी ये भजण्या गुरूपद - कमला ॥१८॥
ब्रह्मपूर्ण जें सगुण गोजिरें
शिष्यभाव तें धरी आदरें
आचार्यासी तईं वाटलें
विद्येचें तप फळास आलें ॥१९॥
दोघांचेंही करूनी स्वागत
आश्रमनियमा कथिले त्यांप्रत
बलरामासह मग मनमोहन
आरंभीं विद्यार्था - जीवन ॥२०॥
ब्राह्ममूहूर्ती सोडुन शयना
शुचिर्भूत करि ईशस्मरणा
समंत्र देई अर्ध्य रवीतें
रूप आपुलें निरखुन तेथें ॥२१॥
प्रथम करावी बहु गुरुसेवा,
पाठ जवळ बसुनी मग घ्यावा
करितां प्रभू तो वेदाध्ययन
चढे ऋचांना तेज विलक्षण ॥२२॥
यावी कन्या सासुरवासी
बहुदिवसांनीं मातृगृहासी
मग ती हर्षित दिसते जेवीं
तशी ऋचा हरिमुखीं दिसावीं ॥२३॥
फलमूलांचें भोजन वाही स्वशिरीं समिधा काष्ठें
प्रेमळ निर्मळ पाहुन वर्तन मुनिवर मनिं संतुष्टे ॥२४॥
आज्ञा गुरूची जणूं पायरी
यशोमंदिराप्रत नेणारी
मानुन तत्पर करीत पालन
कधींच पुसलें नाहीं कारण ॥२५॥
गुरूवचनावर भाव धरावा
जीवाचा जणुं अमोल ठेवा
अनन्यचित्तें ऐकत जाण
सर्वांगांचे करुनी कान ॥२६॥
गुरूपत्नीची कृष्णावरती
विशेष वत्सल जडली प्रीती
पुत्रप्रेमा तिचा भुकेला
हरिसहवासीं तृप्त जहाला ॥२७॥
आश्रमवासी इतर बटूंना
हृदयविसांवा म्हणजे कान्हा
सुदामदेवा वाटतसे तर
श्रीहरि माझा प्राण बहिश्चर ॥२८॥
पान्हवती ना धेनू हरिविण हरिण न मृदु तृण खाती
फार काय फुलतीं न फुलेंही, जीवन त्यां श्रीमूर्तीं ॥२९॥
स्वच्छ दर्पणीं बिंब पडावें
रत्नासी निज तेज चढावें
शशीप्रती पूर्णिमा मिळावी
हरीस आल्या विद्या तेंवी ॥३०॥
परमेशाच्या ज्ञानीं साची
शास्त्रें कां भर पडावयाची
उलट हरीच्या रसनामात्रें
तदा उजळली सकलहि शास्त्र ॥३१॥
कुंभोद्भव मुनि महासागरा
श्रुतिशास्त्रांचा तसा पसारा
आत्मसात केला लीलेनें
तेथ अल्पकाळांत हरीनें ॥३२॥
अंगांसह वेदां चामासी
षट्सप्ताहीं षट्शास्त्रासी
चौदा दिन चौदा विद्यांना
प्रहर एक प्रत्येक कलांना ॥३३॥
शस्त्रास्त्रें दिन शिकला कांहीं
एक वर्ष गुरूसदनीं राही
थोरांचे पथ जन अनुसरती
म्हणुन वागला प्रभु या रीती ॥३४॥
काय अन्यथा कारण आहे हरिसी विद्याध्ययनीं
ज्यास शोधितां कुंठित झाले बुद्धि, श्रुति, मन, वाणी ॥३५॥
समाप्त होतां विद्याध्ययन
प्रेमें वंदुन गुरूचे चरण
वदत हरी बहु विनम्र भावीं
“  काय दक्षिणा मी अर्पावी ? ॥३६॥
जरि मम तनुमनधनसर्वस्वा
धनी असां आपण गुरूदेवा
अपांपतीही असुनी सागर
सरिज्जलाचा घे उपहार ” ॥३७॥
वसुदेवात्मज हृदयीं धरूनी
प्रेमभरें वदले सांदिपनी
“ काय दक्षिणा आणिकघ्यावी
श्रीहरिगुरू ही दिधली पदवी ॥३८॥
यांत सर्वही मला मिळालें
अतां न कांहीं हवें निराळें
ईशाचा अवतार तुझ्यासम
शिष्य जाहला हें भूषण मम ॥३९॥
सच्छिष्यानें विद्या घेतां तीच दक्षिणा गुरूसी
पुरेपूर ती लाभे मजला, हे सखया हृषिकेशी ” ॥४०॥
हरी निरोपा घेत ऐकतां
त्वरें तेथ आली गुरूमाता
वदत असे ती करुणवत्सला,
“ खरेंच कां हरि घरीं निघाला ॥४१॥
कैशी गति होईल तुझ्याविण
उदास दुःसह गमेल जीवन
तुझ्याकडे बघतां स्नेहाळा
पुत्रशोक मम पार विराला ॥४२॥
आतां करुं मी काय ? ” वदोनी
माय ढाळिते नयनीं पाणी
“ पुत्राहुन ही अधिकचि होता
लळा लागला तव मम चित्ता ” ॥४३॥
म्हणत हरी ठेवुन शिर चरणीं
“ शोक न लवही करणें जननी
तुम्हां उभयतांच्या सेवेची
संधी मज ही दिधली साची ॥४४॥
मृतपुत्रा तव परत आणितों, माते, मी तुजपाशीं
हीच दक्षिणा सादर माझी समजा गुरूचरणांसी ” ॥४५॥
गिळिला मणि सर्पे उगळावा
भूगत - निधि सहसा गंवसावा
स्फुरे विसरलेला जणुं मंत्र
आणी हरि सागर - गत - पुत्र ॥४६॥
‘ विजयी भव, ’ नमिता आचार्ये
‘ चिरंजीवी हो, ’ कवळुन आर्यें
‘ विसर न आम्हां, सख्या श्रीहरी ’
गद्गदकंठें म्हटलें इतरीं ॥४७॥
रामकृष्ण जों वनराजीतें
लीन न तों निरखित होते ते
विरहाश्रूंनीं त्या सकलांचे
मचुळ होत लव वारि तळ्याचें ॥४८॥
पूर्ण करून विद्यासंपादन
हलधर तेवीं श्रीमधुसूदन
परतुन ये कळतां मथुरेचे
जन झाले बहु हर्षित साचे ॥४९॥
शिंग, तुतार्‍या, झांज, खंजिरी, वाजवीत हर्षानें
सामोरे येती जन गर्जत, उधळित गुलाल, सुमनें ॥५०॥
पुढतीं शृगारित शुभ गजवर
ज्यांच्या रंगित सोंडा सुंदर
करिताती ध्वनि सुवर्ण घंटा
रत्नमालिका रुळती कंठां ॥५१॥
औक्षण केलें सुवासिनींनीं
शीला रक्षक या अभिमानी
तारक पालक हरी स्वभावें
वंदन करिती पुरजन भावें ॥५२॥
विद्येनें संपन्न मुकुंद
वसुदेवा दे अति आनंद
सकलकलायुत बघुन शशीतें
सागरास जणुं यावें भरतें ॥५३॥
जननी - जनकां गर्ग - मुनीतें
वंदी माधव लववुन माथे
गुरुजन करिती सहर्ष कौतुक
प्रश्न कुशलते पुसुनि अनेक ॥५४॥
स्वस्थ जरा होउन कंसारी बोधितसे अधिकारी,
“ न्याय कोष सेना यावरती पुरवां दृष्टी सारी ॥५५॥
नृपासनासी ये स्थिरता ती
याच तिहींच्या शक्तीवरती
असतां यासह मंत्राचें बळ
राज्यासी भय नुरे एक तिळ ॥५६॥
खलपाशांतुन सुटका झाली
सत्ता अपुल्या घरांत आली
येवढेंच ना सुखवी जनता
टिके शांतता जरी सुबत्ता ॥५७॥
अवश्य जें कां प्रथम कराया
तें टाळुन मग पुढचें वायां
पाया अजुनी भरला नाहीं
कळसास्तव घ्या उजळा कायीं ॥५८॥
यास्तव सावधता बहु व्हावी
हयगय लवही कुठें नसावी ”
अशी रीत लावुन राज्यासी
बनवियलें आदर्श तयासी ॥५९॥
उसनें घेण्या जामाताचें मर्दुनिया कृष्णास
मथुरेवरती येत चालुनी जरासंध मगधेश ॥६०॥
सवें घेउनी अगणित सेना
रथी, पदाती, अश्वगजांना
सुसज्ज सकलहि शस्त्रास्त्रांनीं
कुवासना जणुं मदकांमानीं ॥६१॥
वादळांत सांपडतां नौका
लाटांचा वर बसे तडाखा
सेनाघात तसे वरचेवर
कंससासरा करि मथुरेवर ॥६२॥
सूडबुद्धिनें भरला साचा
रणोत्साह उन्मत्त तयाचा
विषें माखलेली तरवार
तशीच ती तद्वृत्ति भयंकर ॥६३॥
रागाचे सोडित सुस्कारे
जरासंध गर्जत हाणा रे
जसा कढतशा धूमा ओकित
अग्निमुखी गडगडतो पर्वत ॥६४॥
रामकृष्णही सुसज्ज झाले येतां तें परचक्र
रक्षणकरिता हरि असल्यावर होत न रोमहि वक्र ॥६५॥
दोन दिव्यरथ हरिसेवेस्तव
अवतरले मणिभूषित अभिनव
ध्वज गरुडांकित एकावरतीं
चढे तयावरतीं श्रीमूर्ति ॥६६॥
नीलशरीरीं सुवर्णवसनें
मेघ खुले जणुं कोमलकिरणें
शार्ङ्गशरासन शोभत हातां
पाठीवरतीं लटके भाता ॥६७॥
होउन वीरश्री - संचार
उग्रपणा लव नसे मुखावर
सुवर्ण कितिही जरी तापले
तप्त - लोहासम कधिं कां दिसलें ॥६८॥
तालतरूंचें चित्र तयावर
राम बसे हल - मुसल - गदाधर
अबद्धमंत्रें भैरव खवळे
तसें उग्रपण धारण केलें ॥६९॥
बघुन तया समारांत कोपला जरासंध निजचित्तीं
धांवत येउन म्हणत हरीसी, “ धनु धरिसी कां हातीं ॥७०॥
पिळतां अधरा दूध निघावें
त्या तुजसह कां मी झुंजावें
घरीं मुलींसीं खेळत बस, जा
मजपुढतीं नच दावी गमजा ॥७१॥
कपट करोनी अपुला मामा
वधिलासी तूं स्वकरें अधमा
क्षणहि न थांबावें मजपुढतीं
जीवाची जर असली प्रीती ” ॥७२॥
वदे हरी उपहासुन त्यातें
“ बाणरहित तव दिसती भाते
करी, न बोलत, बल असतां मा
खणखणतो बघ कुंभ रिकामा ” ॥७२३॥
सहन न झालें वच असुरा तें
खवळुन चावी निज अधरातें
रागानें शतशत फेकी शर
सेनाही करि बर्ष हरीवर ॥७४॥
शूल, परिघ, तोमर, खङ्गांची
छुरिका बहुमुख - शिलीमुखांची
भीड जाहली एकच सहसा
श्याम दिसे मेघावृत - रविसा ॥७५॥
परि नच टिकला शोक पळावर मथुरानरनारींचा
झांकतील किति गवती काड्या प्रखर भाग वह्नीचा ॥७६॥
विफल जाहली सकलहि शस्त्रें, शब्द अनुभवापुढतीं
अपूर्व विक्रम बघुन चरकला जरासंध निजचित्तीं ॥७७॥
श्रीकृष्णाचा एकच बाण
शतशस्त्रांसी निवटी जाण
रिपु रुधिराची वाहे सरिता
शव - कर चरणा ये जलचरता ॥७८॥
चंडमेघसम योद्धे भिडती
गर्जत पुढती सरती फिरती
शस्त्रें खटकुन चमके चपला
रुधिर न जणुं जलवर्ष जहाला ॥७९॥
घायाळांचे ते चीत्कार
वीरांचे हुंकार भयंकर
गर्ज घोर हो एकच साचा
तये तडकला घुमट नभाचा ॥८०॥
प्रेतांचा खच पडे चहुंकडे
फिरूं लागली नभीं गिधाडें
तुंबळ झालें रण यापरि तें
हर्ष वाटला विजयश्रीतें ॥८१॥
रणदेवी मग वरी हरीसी अर्पुनिया जयमाला
मथुराजनकृत जयघोषानें व्योम भाग दुमदुमला ॥८२॥
हतबल मगधाधिप निजपाशीं
आवळुनी बलराम तयासी
सजला वधण्या मुसलाघाते
तोंच हरी आवरी तया तें ॥८३॥
“ अतांच याचा वध न करावा ”
राम वदे उपहासुन “ वावा,
अवध्य वधितां अघ जें जोडें
वध्य सोडितां तेंच, न थोडें ” ॥८४॥
परि न मानिलें श्रीहरिनें तें
सोडुन दिधलें जरासुतातें
राजनीति - कुशलांचे हेतू
उघड न वदतां येति परंतू ॥८५॥
जया अवकळा विशेष आली
असुर असा मुख घालुन खालीं
परते पावुन घोर निराशा
जळत सर्पसा अक्करमाशा ॥८६॥
त्वरित जमवुनी खलजन सेना पुनरपि करित चढाई
ठेंच लागली तरिही मूर्खा येत नसे चतुराई ॥८७॥
गिरिशिखरावर कितिही वेळां
मेघ वादळासह आदळला
तरि लागत त्यासीच रडावें
मगधपतीचें तसेंच व्हावें ॥८८॥
घेई अपयश वारंवार
करावया हलका भूभार
तदीय हे उपकार म्हणावे
अधमांतहि चांगलें बघावें ॥८९॥
भारतभूच्या दुर्दैवासी
जन्म जाहला जिच्या कुशीसी
अशी कुबुद्धी सुचली त्यातें
साह्या विनवी परकीयातें ॥९०॥
कालयवन नामा नृप बर्बर
क्रूर कुटिल बळ ज्याचें दुर्धर
देउं करून त्या अर्धा वांटा
सेनेसह बोलवी करंटा ॥९१॥
गुप्तचरांनीं सकलवृत्त हें निवेदिलें कृष्णासी
विचार पडला बलरामातें भय उपजे मथुरेसी ॥९२॥
रोगासह जरि अपथ्य होतें
भिववी ना तें रसवैद्यातें
तेवीं श्रीहरिच्या चित्ताची
शांती स्थिरता लव न ढळेची ॥९३॥
वदे सांवळा निज जनकातें
“ उचित असे त्यजणें मथुरेतें
कालयवन तो देउन वेढा
अपणास्तव यां करील पीडा ॥९४॥
आजवरी जे छल युद्धाचे
शिणले तेणें जन मथुरेचे
ताण अधिक कीं सोसेल ना यां
रणभू - पालट हवा कराया ॥९५॥
अपरदिशेसी सिंधुतटावर
रचावया मी कथिलेसें पुर
त्वष्ट्यानें सहजीं ह्या वेळीं
असेल रचला समाप्त केली ॥९६॥
म्हणुन सकल यादवांस घेउन तुम्ही त्वरित जा तिकडे
इकडे मी या यवनमदाचे सहज करिन शत तुकडे ” ॥९७॥
एकटाच सोडणें हरीचें
मानवलें नच कुणासही तें
कुणी तरी वंचुन हृदयासी
जपेल कां देहास विशेषीं ॥९८॥
परी हरीनें चतुरवचानें
राजकारणी व्यवहारानें
समजविलें त्यां हृद्गत अपुलें
मथुरेंतुन मग सर्व निघाले ॥९९॥
पश्चिमसागरतटीं मनोहर
बघती यादव विशाल नव पुर
दशयोजन विस्तार जयाचा
विष्णुलोक ये भूवर साचा ॥१००॥
इंद्रगर्वपरिहार करी हरि
भय सरलें मग कनकगिरी वरि -
आले कीं सागरोदरांतुन
उन्नत भवनें तशी विलक्षण ॥१०१॥
शैल रैवतक करी पहारा
ज्या रवि दे कांचनकरभारा
कड दुसरी सागर संरक्षी
पिता जसा शिशु घेउन कुक्षीं ॥१०२॥
भव्य तटांच्या गोपुरवेशी पुररक्षण करिताती
पूर्णजलानें अथांग विस्तृत खंदक वेढा देती ॥१०३॥
प्रमदवनें, आराम, उपवनें,
बहरा आलीं सुफलें, सुमनें,
द्राक्षें, दाडिम, रसाल पेरू
मधुलिंबें, बदरी, रुचि चारु ॥१०४॥
फणस, गरे ज्यांतिल मधुकोमल
मृदुहृदयाचे उन्नत नारळ
काजुफळें सुंदर तरि विनयी
केळीं, पोफळ, जांभुळ, पपई ॥१०५॥
सुवर्णचंपक, हिरवा चांफा,
मोगरिचा शशिसुंदर वाफा,
पाटल, जाई, जुई, मालती,
केतकी न धरि भुजगीं प्रीती ॥१०६॥
श्यामल हिरवें वन तुळशीचें
पावन करिते भाग दिशांचे
कुंदकळ्यांचे गुच्छ हांसती
पारिजात, निशिगंध, शेवती ॥१०७॥
भरुनी ओंजळ मृदु सुमनांनीं स्वागत करिती प्रेमें
वाटे येथचि नित्य रमावें सोडुन सर्वहि कामें ॥१०८॥
चंद्रशिलानीं वा स्फटिकांनीं
रचिली सदनें शुभ्र हिमानीं
रजतगृहें, कांहीं कनकांची
शोभा केवीं वदूं तयांची ॥१०९॥
प्रवाळ, मरकत, पद्मराग मणि,
पुष्कराज, वैडूर्य, शिलांतुनि
इंद्रनील, हीरक, गजदंतें
भाग गृहांचे घडले होते ॥११०॥
असे मंदिरा थोर अगाशी
चंद्र - करें धवळिती जियेसी
सभोंवताली डुलतें उपवन
तेथ सुखाचें परिमल सेवन ॥१११॥
विहार करण्या जलीं दीर्घिका
कलह्म्सा जी रुचे भावुका
निशांत उज्ज्वल अवरोधास्तव
विनय न सोडी अनिल जिथें लव ॥११२॥
मंगल चित्रें प्रवेशदारीं कोरियलीं रत्नांनीं
पडदे सुंदर मौक्तिक - मंडित रुळती खिडक्यांवरूनी ॥११३॥
अखंड यौवन कीं सुरयुवती
पुष्पवाटिका ऐशा भंवतीं
प्रसन्न भासे हर्म्य तयासी
पति प्रियेच्या जणुं करपाशीं ॥११४॥
कुंज लतांचे करिती शीतल
भास्करतेजा दाहक उज्ज्वल
रमणीचे स्मितहास्या पाहुन
संताप न कां जाई वितळुन ॥११५॥
धारायंत्रें सहस्रलोचन
करिती सुरभितजलाभिषिंचन
थुइथुइ नर्तन जलबिंदूंचें
विलसित अवखळ रम्य शिशूंचें ॥११६॥
सरोवरीं कलरव हंसांचा
सुगंध तेवीं अरविंदांचा
जळ निर्मळ सुंदरा - आकृती
मन विसरे निज चंचलवृत्ती ॥११७॥
नियमबद्ध रचना नगरीची रेखिव सर्वहि होती
विचित्रता सारखेपणासह मिरवे धरुनी हातीं ॥११८॥
सुरेख, सम, विस्तृत, ऋजु वीथी
सुजनगतीची जणुं कीं साथी
अशोक - चंपक - बकुळ - रसालीं
शीतल छत्रें जीवन धरिलीं ॥११९॥
बहुविध वस्तूंनीं भरलेल्या
पण्यावीथिका गजबजलेल्या
देशदेशच्या कुशलपणाचें
सार्थक होई इथेंच साचें ॥१२०॥
बहुमोलाची सुंदर वस्त्रें
सूक्ष्म रेशमी मृदुल विचित्रें
दागदागिने नवरत्नांचे
गुजरींतुन जणुं वैभव नाचे ॥१२१॥
क्रीडोद्यानें सुरचित जैसीं नंदनवनिचा गाभा
चौक मनोहर विशाल तेथें वाढविती पुरशोभा ॥१२३॥
द्वारेचें या यथार्थ वर्णन
करण्यासी दुर्बल मम आनन
इच्छेमधुनी भगवतांचें
प्रगट जाहलें रूप जियेचें ॥१२४॥
रमले यादव वैभवशाली
राजराजपद मानुन खालीं
सुखां न्यूनता नव्हती कांहीं
गण सिद्धींचा राबत राही ॥१२५॥
मथुरेसी वसले श्रीमूर्ती
कालयवन तो मगधप्रेरित
ससैन्य ये पुरपुर विध्वंसित ॥१२६॥
जवळ अजुन जंव सैन्य न आले
एकटेच भगवान निघाले
खुले कस्तुरी चिह्न ललाटी
वनमाला शुभ रुळते कंठीं ॥१२७॥
सुवेषमंडित पीतांबरधृत हास्यवदन सुखकंद
एकलाच ये सन्मुख यवना लीलानट गोविंद ॥१२८॥
श्यामलं कोमल सुंदर मूर्ती
बघुन शंकला खळ निज चित्तीं,
हाच काय तों कंस - निबर्हण
कमल करी कां तरुचें छेदन ॥१२९॥
पुष्पाहुन ही कोमल काया
हात न उचले वार कराया
मगधेश्वर हो म्हणुन पराजित
शौर्य वसे याजवळ न किंचित ॥१३०॥
मनमोहक सुंदरता याची
होइल भूषा मम कोषाची
धरूं यास, खलनिजकटिकवळी
“ शस्त्र न एकहि याचे जवळीं ” ॥१३१॥
श्रीमूर्ती परि चपल - गती ती
गंवसे कां तरि खलजन - हातीं
पाठलाग करि यवन सुवेगें
सहचर सकलहि पडले मागें ॥१३२॥
कालयवन करि यत्न विशेषीं धरण्या पंकजनयना
नीचोत्थित अपवाद जसा कां पाठीं लागत सुजना ॥१३३॥
चढण बिकट बहु गिरिवरची ती
दाट लता - तरु वाट न देती
शील तरे विपदांस तसा हरि
रक्ताळुन तो यवन शिणे परि ॥१३४॥
सांपडला करि असे गमावें
तोंच जनार्दन दे हुलकावे
भरुनी आले पाय खलाचे
धाप शिणविते भाग उराचे ॥१३५॥
घाम ओघळे सकल शरीरीं
सहसा वळुनी बघत मुरारी
अंतीं खल दे शिव्या मुखानें
चिडती नीचचि पराभवानें ॥१३६॥
करकर दांतीं अधरां चावित
‘ थांब, पळपुट्या ’ हरिवर गर्जत
करि धडपड बळपणास लावुन
तरि न करीं गवसे मनमोहन ॥१३७॥
बघतां बघतां श्रीहरि अंतीं गुहेंत एक्या शिरला
लपला आपण मुचकुंदासी पांघरुनी निज शेला ॥१३८॥
नृप हा इक्ष्वाकूंचा वंशज
मांधात्याचा विजयी आत्मज
अमरास्तव निवटुनी दानवा
दीर्घ - काल घे येथ विसांवा ॥१३९॥
लाथ हाणितां यवन मदांध
मुचकुंदा समजून मुकुंद
जागृत पाही जइं निजदृष्टी
राख जाहला खल तिन चिमटी ॥१४०॥
शाप बांधले निरागसांचे
असूं पेटले पतिव्रतांचे
आज उद्यां परि अवश्य येतें
पापाचें कटू फल उदयातें ॥१४१॥
चकित करित भूपास अंतरीं
प्रगटे यदुकुलदीप पुढारी
उमज पडत ना मुचकुंदाप्रत
स्वप्न दिसे वा आहे जागृत ॥१४२॥
‘ भूलोकीं वा सुरलोकीं मी अतलीं अवतरलों कीं ’
गोंधळुनी नृप अनिमिष नयनीं वरिवरि हरिस विलोकीं ॥१४३॥
कोण यक्ष गंधर्व, म्हणे नृप
“ फळास अथवा आलें मत्तप
असामान्य रमणीय रूप हें
मानव - सुर असुरांतिल नोहे ॥१४४॥
दीप्त तेज रविचें आह्लादक
व्हावें त्यापरि दिसतें कौतुक
विष अथवा श्रम यांच्यावांचुन
झरें अमृत तव मधुहास्यांतुन ॥१४५॥
गतचंचलताश्रीची कांती
तुझें पदनखीं समावली ती
चरण - तलाच्या स्पर्शानें तव
गमे रम्यता उषेस अभिनव ॥१४६॥
भगवन् तव दर्शनसौभाग्यें
कृतार्थ झालीं ममबहिरंगें
अंतर पावन व्हाया श्रवणीं
पडो गिरा मधु विनवी चरणीं ॥१४७॥
वदुन असे शिर नमवुन ठेला आदरभरितमनानें
मधुसूदन निजवदनकरानें स्पर्शित त्या प्रेमानें ॥१४८॥
स्रवे मधुरतम गिरा हरीची
हो पुलकित तनु मुचकुंदाची
शयनोत्थित यद्दर्शन व्हावें
आस वाहिली तुझिया जीवें ॥१४९॥
तोच असे मी वसुदेवात्मज
जनन घडे मृदुकिरणकुलीं मज. ”
भाषण या परि करितां देवें
आनंद न न्रुपहृदीं समावें ॥१५०॥
आठहि सात्त्विक भाव उदेले
गमे सुकृतगण फळास आले
पदीं ठेवुनी शिर विनयानें
अपार केलें स्तवन नृपानें ॥१५१॥
“ रसना न वदो तव नामाविण
तव पदयुगुलीं सतत रमो मन
प्रेम विपुल दे दुजे नको मज ”
प्रसन्न झाला मनीं अधोक्षज ॥१५२॥
“ तथास्तु भूपा मिळेल तुजशी अनपायिनी सुभक्ती
मत्सायुज्या येशिल अंतीं, ” बोलत करुणामूर्ती ॥१५४॥
नमुन पुनः श्रीजगदीशासी
येत सरळ नृप हिमालयासी
यवनचमूचे करुं निर्दालन
परते पुरनपि पदनतपावन ॥१५५॥
यमाकरीं यवनां सोंपवुनी
निघे द्वारके यदुकुलतरणी
तोंच जरासुत अयुत चमृसह
हरीस रोधी आस अजर अह ॥१५६॥
मगध नृपाचें आयु न सरलें
म्हणुन तयासीं समर न केलें
गिरीवरी हरिसह संकर्षण
चढे नाम ज्या असे प्रवर्षण ॥१५७॥
शिखरें उंचचि भिडलीं गगना
टोक दिसेना मोडुन माना
पाताळाच्या पाउल वाटा
दर्‍या अशा ये बघतां कांटा ॥१५८॥
कडे खडे तुटलेले भीषण
वीर उभे जणुं छाती काढुन
घळी उतरत्या झरे तयांतुन
लपाछपीचे करिती नर्तन ॥१५९॥
उग्र, उबट ये वास, पांखरें गोड काढिती सूर
भुर्‍या निळ्या टेकड्या पसरल्या क्षितिजावरती दूर ॥१६०॥
रान निबिड बहु हिरवें निळसर
शिरूं न धजती सूर्याचे कर
वनदेवीच्या पदराखालीं
अंधारा अभयता मिळाली ॥१६१॥
हिंस्र पशूंना भर दिवसांही
स्वैर फिराया अडचण नाहीं
गुरगुर नित कधिं गर्ज भयंकर
कंपित व्हावें धीरांचे उर ॥१६२॥
निबिडवनीं त्या हरि गवसेना
शोधुन सारी दमली सेना
म्हणुन लाविला वणवा मूर्खीं
तेच जळाले तयांत शेखीं ॥१६३॥
“ जळे सैन्य तरि जळो, न खंत,
मम शत्रूचा झाला अंत ”
समाधान हें जरासुतातें
लिखित विधीचें हांसत होतें ॥१६४॥
अग्नीसी सामर्थ्य जयाच्या बळें तया श्रीरंगा
स्पर्शहि करण्या ज्वाला केवीं शकेल, बुध हो, सांगा ॥१६५॥
सराम हरि ये द्वारानगरीं
सुखावली मग पुरी अंतरीं
सुंदरते तेज निराळें
जसें कांतसुख - सेवित - बालें ॥१६६॥
शासन होतें वसुदेवाचें
तरी मुकुंदीं लक्ष पुरीचें
श्वशुरवचासी असते तत्पर
कुलजेचें परि चित्त पतीवर ॥१६७॥
व्यापी त्रिभुवन यदुकुलकीर्ति
त्रिविक्रमाची जणूं पदकांति
विधिभवनीं मुनि नारद गाई
द्वारेसम पुर दुसरें नाहीं ॥१६८॥
विशाल उत्सुक अबोधसुंदर
वेढितसे तिजसी रत्नाकर
निज कोषांतिल हीरकमोती
उधळी तिजवर निर्मळराती ॥१६९॥
जगदीश्वर हरि सहवासें जी झाली यथार्थनामा
राजकारणें खेळविते ती यादव सभा सुधर्मा ॥१७०॥
यादव - विक्रम रक्षित - सागर
हतबल झाले जलपाटच्चर
यवन, हूण, शक, बर्बर, यांना
भरतभूकडे बघवतसे ना ॥१७१॥
शास्त्र - कला - व्यापार - मिषांनीं
वैभव नांदे तेथ सुखानीं
रामकृष्ण हे शशिसूर्यासम
अशांततेचा वितळविती तम ॥१७२॥
कमलासन - परिषद्गत रेवत
आनर्ताधिप यश तें ऐकत
ब्रह्मवचें तो द्वारवतीसी
ये उजवाया निजकन्येसी ॥१७३॥
भूपें निज तनया अनुरागीं
मृगनयना रेवती शुभांगी
बलरामासी अर्पण केली
उभयकुला जी ललाम झाली ॥१७४॥
थाटांत लग्न झालेम अतृप्त कोणी न याचकांमधुनी
वैभव बघुन गमावें वाहतसे येथ साच कामधुनी ॥१७५॥

‘ मथुरारक्षण ’ नांवाचा नववा सर्ग संपूर्ण

लेखनकाल :-
चैत्र शके १८७०

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP