करुणाष्टकें - अष्टक ४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेव्वा करावी । सदा प्रीति लागो तुझे गुण गातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥१॥
तुझें रूपडें लोचनीं म्यां पहावें । तुझे गूण गातां मनेंशी रमावें । उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघूनाय० ॥२॥
मनीं वासना भक्ति तूझी करावी । कृपाळूपणें राघवें पूरवावी । वसावें मदीयांतरीं नाम घेतां । रघूनाय०॥३॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा । उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनाय०॥४॥
नको द्रव्य दारा नको येरझारा । नको मानसीं ज्ञान-गर्वें फुगारा । सगूणीं मला लविं रे भक्तिपंथा । रघूनाय०॥५॥
भवें तापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्व चिंता हरावी । मला संकटीं सोडवावें समर्था । रघूनाय०॥६॥
मनीं कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । नको संशयो तोडि संसारवेथा । रघूनाय०॥७॥
समर्थापुढें काय मागों कळेना । दुराशा मनीं बैसली हे ढळेना । फुटे संशयी नीरसी सर्व चिंता । रघूनाय०॥८॥
ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें । सुटे ब्रीद आम्हांसि सोडोनि जातां । रघूनाय०॥९॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP