राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे - कलम ४६ ते ५१

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


अनुसूचित जाती , अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन .

४६ . राज्य , जनतेतील दुर्बल घटक , आणि विशेषतः अनुसूचित जाती , अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील , आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून त्यांचे रक्षण करील .

पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य .

४७ . आपल्या जनतेचे पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे या गोष्टी राज्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांपैकी असल्याचे मानील आणि विशेषतः मादक पेये व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील .

कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे .

४८ . आधुनिक व शास्त्रीय रीतीने कृषि व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील आणि विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन करणे व त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे यांकरता उपाययोजना करील .

[ पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे ].

[ ४८ क . राज्य हे , देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील . ]

राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण .

४९ . [ संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलादृष्टया किंवा ऐतिहासिकदृष्टया कुतूहलविषय असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिति , लूट , विद्रुपण , नाश , स्थलांतरण , विल्हेवाट किंवा निर्यात यांपासून संरक्षण करणे , ही राज्याची जबाबदारी असेल .

न्याययंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवणे .

५० . राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याययंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करील .

आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा याचे संवर्धन .

५१ . राज्य हे , ---

( क ) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी ;

( ख ) राष्ट्राराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखण्यासाठी ;

( ग ) संघटिता जनसमाजांच्या आपसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची आबंधने याबद्दल आदरभावना जोपासण्यासाठी ; आणि

( घ ) आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी , प्रयत्नशील राहील .

मूलभूत कर्तव्ये .

५१ क . ( क ) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;

( ख ) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे ;

( ग ) भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ;

( घ ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ;

( ड ) धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे ;

( च ) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;

( छ ) वने , सरोवरे , नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे , आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;

( ज ) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन , मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;

( झ ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;

( ञ ) राष्ट्र सतत , उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .

[ ( ट ) माता - पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा , यथास्थिति , पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे . ]

ही प्रत्येक भारतीय नागरिकाची कर्तव्ये असतील . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP