मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
अठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८७३-७४
"तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो."
श्री नाशिकहून निघाले ते सरळ इंदूरला गेले. तेथून काशीला आले. काशीहून पुढे थेट अयोध्येस गेले व नंरत नैमिषारण्यात गेले, तेथे जवळ जवळ दहा एक महिने राहिले व मग गोंदवल्यास परत आले. गोंदवल्यास श्रींना भेटण्यासाठी श्री वासुदेव बळवंत फडके गोंदवल्यास आले. इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा उठाव करणार्‍यांमध्ये श्री. फडके अग्रगण्य होते. श्रीदत्त हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांची पूजा केल्यावाचून ते अन्नग्रहण करीत नसत. दत्ताच्या नामाचा रोज पाच हजार जप करीत व नंतर ध्यान लावून बसत. श्री माणिकप्रभू, श्री काळबुवा या संतपुरुषांची त्यांनी दर्शने घेतली होती. परंतु त्यापैकी कोणीही इंग्रजसरकारविरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या विचाराला दुजोरा दिला नाही. श्रीअक्कलकोट स्वामींकडे जाऊन त्यांनी नमस्कार केला. आपली तलवार त्यांच्यापुढे ठेवली व ते दूर जाऊन बसले. स्वामींनी आपल्या हातात तलवार द्यावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु स्वामींनी सेवेकर्‍याला बोलावून ती तलवार जवळच्या एका झाडावर ठेवण्यास सांगितली. स्वामी काही बोलेनात तेव्हा फडके नाराज होऊन तलवार घेऊन तेथून निघून गेले. पुढे त्यांना काही चैन पडेना म्हणून गोंदवल्यास आले संध्याकाळच्या वेळी श्री शेतामध्ये उभे होते, वरवरचे बोलणे होऊन श्री त्यांना घरी घेऊन आले. मंडळींची निजानिज झाल्यावर श्रींनी रात्रभर श्री. फडके यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या त्यांची समजूत पटेना. दोघेही समवयस्क असल्याने श्रींनी त्यांना प्रेमाने वागविले व जीव तोडून उपदेश केला. निघताना श्री. फडके म्हणाले, "मी तयारी केली आहे, तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो. मला तुम्ही मदत करा " त्यावर श्री म्हणाले, "छे छे ! मी रामदास आणि तुम्ही शिवाजीही होऊ शकणार नाही, सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नाही, आपली शक्ति फुकट दवडू नका, तुम्ही दत्ताची उपासना करीत रहा, म्हणजे तुमच्या कार्याला जास्त जोर येईल. अनुकूल काल यायला जरा अवकाश आहे " श्रींचे हे बोलणे ऐकून वासूदेव बळवंत फडके फार चिडले आणि "आहा रे साधू !" म्हणून श्रींच्या पुढे हात ओवाळले आणि तडक पुण्यास चालते झाले. थोडयाच दिवसांत त्यांनी बंडाचे निशाण उभारले. जिकडे-तिकडे नाव गाजवून टाकले. सन १८७९ च्या जुलै महिन्यात सरकारने त्यांना विश्र्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला. श्रींना हे कळलयावर श्री म्हणाले, "अरेरे ! आपल्या पैकी चांगल्या माणसाचा घात झाला. भगवंताने यापुढे त्यांचे फार हाल करू नयेत. चार वर्षांनी एडनच्या तुरुंगात त्यांचे निधन झाले.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP