भगवंत - ऑक्टोबर २३

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही , त्याला कमी पडणे शक्यच नाही . जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे . आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही . जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला , त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहात नाही . ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा , त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला , तो खात्रीने सुखी बनला ; कारण त्याची देहबुद्धी पळून जाते , म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे , की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे . आळवताना आपल्या डोळ्यांत पाणी आले की भगवंताच्या डोळ्यांत पाणी येते .

भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही . परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही . दुसरा मार्ग विचाराचा आहे . नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत . भगवंताने सर्वांवर कृपा करावी , त्याने सर्वांचे कल्याण करावे , त्याचे प्रेम सर्वांना यावे , असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे . सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते . पण आपण असे पाहातो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहात नाहीत . नामस्मरणाला बसल्यानंतरसुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात , याचा सर्वांना अनुभव आहे ना ? तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही . आता तिसरा मार्ग म्हणजे नाम . नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल . ते नाम तुम्ही सर्वांनी निःशंकपणे घ्या . त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका . ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका . तुम्ही नाम घ्यायला लागा , भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय रहाणार नाही . अगदी सतत निश्चयाने नाम घ्या . जिथे नाम तिथे माझा राम आहे , हा माझा विश्वास तुम्ही बाळगा . दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहाणार्‍या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील . भगवंताचे नाम ही ठिणगी आहे . ती फुलवली तर सबंध जग भरुन जाईल एवढी मोठी होऊ शकते . ही नामाची ठिणगी आपण सतत जागृत ठेवू या . जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला आणि दैन्यपणा संपला . ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या , आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा .

N/A

References : N/A
Last Updated : October 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP