नववा स्कंध - अध्याय १

’ श्रीमद्‍भागवतमहापुराणम्’ ग्रंथात ज्ञान, वैराग्य व भक्ति यांनी युक्त निवृत्तीमार्ग प्रतिपादन केलेला आहे, अशा या श्रीमद्‍भागवताचे भक्तिने श्रवण, पठन आणि निदिध्यासन करणारा मनुष्य खात्रीने वैकुंठलोकाला प्राप्त होतो.


भगवन ! सर्व मन्वंतरे आणि त्यांत अनंत शक्तिशाली भगवंतांनी केलेल्या चरित्रांचे आपण केलेले वर्णन मी ऐकले . ॥१॥

मागील कल्पाच्या शेवटी द्रविड देशाचा राजा राजर्षी सत्यव्रताने भगवंतांची सेवा करुन ज्ञान प्राप्त करुन घेतले आणि तोच या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला . आपण त्याचे व इक्ष्वाकू इत्यादी त्याच्या राजे झालेल्यां पुत्रांचे सुद्वा वर्णन केलेत . ॥२॥३॥

ब्रह्यन ! आता आपण त्यांचे वंश आणि त्यांच्या वंशातील राजांची चरित्रे वेगवेगळी वर्णन करा . महाभाग ! हे ऐकण्याची आम्हांला नेहमीच उत्सुकता असते . ॥४॥

वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या , सध्याच्या आणि पुढे होणार्‍या सर्व पवित्रकीर्ती पुरुषाच्यां पराक्रमाचे वर्णन करा ॥५॥

सूत म्हणतात - वेद जाणणार्‍या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने जेव्हा हा प्रश्न विचारला , तेव्हा धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान श्रीशुकदेव म्हणाले . ॥६॥

श्रीशुकदेव म्हणाले - परीक्षित ! मनुवंशाचे वर्णन तू थोडक्यात ऐक . शेकडो वर्षामध्येसुध्दा त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करता येणार नाही . ॥७॥

जे परम -पुरुष परमात्मा लहान -मोठ्या सर्व प्राण्याचें आत्मा आहेत , प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते . त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हते . ॥८॥

महाराज ! त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमलकळी प्रगट झाली . त्यातच चतुर्मुख ब्रह्यदेवांचा आविर्भाव झाला . ॥९॥

ब्रह्यदेवांच्या मनापासून मरीची झाले आणि त्यांचे पुत्र कश्यप . त्यांना दक्षकन्या अदितीपासून विवस्वान (सूर्य ) हा पुत्र झाला . ॥१०॥

विवस्वानाच्या संज्ञा नामक पत्नीपासून श्राद्वदेव मनूचा जन्म झाला . परीक्षिता ! संयमी राजा श्राद्वदेवाला श्रद्वेपासून दहा पुत्र झाले . इक्ष्वाकू , नृग , शर्याती , दिष्ट , धृष्ट , करुष , नरिष्यंत , पृषध्र , नभग आणि कवी अशी त्यांची नावे होती .॥११॥१२॥

वैवस्वत मनूला पुत्र नव्हता . म्हणून त्यावेळी समर्थ भगवान वसिष्ठांनी संतान -प्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरुण देवतेचा यज्ञ करविला होता . ॥१३॥

फक्त दूध पिऊन राहणार्‍या वैवस्वत मनूची धर्मपत्नी श्रद्वेने , होत्याकडे जाऊन "मला कन्या व्हावी " अशी यज्ञाच्या आरंभी प्रार्थना केली . ॥१४॥

तेव्हा अध्वर्यूच्या प्रेरणेने ’होता ’ बनलेल्या ब्राह्यणाने , श्रद्वेने जे सांगितले होते , त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषट्काराचा उच्चार करीत कन्या व्हावी , यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिली . ॥१५ ॥

’ होत्याने ’ अशा प्रकारे विपरीत कर्म केल्यामुळे इला नावाची कन्या झाली . तिला पाहून मनूला वाईट वाटले आणि तो गुरु वसिष्ठांना म्हणाला . ॥१६॥

" भगवन ! आपण मन्त्रवेत्ते आहात . आपले कर्म असे विपरीत फल देणारे कसे झाले ? अहो , हे फार वाईट झाले . वैदिक मंत्रांचे असे विपरीत फळ असता कामा नये . ॥१७॥

आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे . आपण जितेंद्रिय सुद्वा आहात . त्याचबरोबर तपश्चर्येने निष्पाप झालेले आहात . देवांनी असत्य बोलावे , त्याप्रमाणे आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला ?" ॥१८॥

आमचे वृद्व प्रपितामह महर्षी वसिष्ठांनी त्याचे हे म्हणणे ऐकून ओळखले की , होत्याने विपरीत संकल्प केला . म्हणून ते वैवस्वत मनूला म्हणाले . ॥१९॥

" राजन ! तुझ्या होत्याच्या विपरीत संकल्पानेच आमचा संकल्प योग्य रीतीने पुरा झाली नाही . तरीसुद्वा माझ्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन ." ॥२०॥

परीक्षता ! परम यशस्वी महर्षी वसिष्ठांनी असा निश्चय करुन त्या इला नावाच्या कन्येलाच पुरुष बनविण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली .॥२१॥

सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींनी संतुष्ट होऊन त्यांना मागितलेला वर दिला . त्यामुळे ती कन्याच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र झाली . ॥२२॥

महाराज ! सुद्युम्न एकदा शिकार करण्यासाठी सिंधुदेशाच्या घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांसह वनामध्ये गेला . ॥२३॥

वीर सुद्युम्न कवच अंगावर घालून आणि हातात सुंदर धनुष्य तसेच एक अत्यंत अद्वुत बाण घेऊन हरिणांचा पाठलाग करीत उत्तर दिशेकडे पुष्कळ लांब गेला . ॥२४॥

शेवटी सुद्युम्न मेरुपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात गेला . त्या वनात भगवान शंकर पार्वतीसह विहार करीत असतात . ॥२५॥

हे राजा ! त्यात प्रवेश करताच वीरवर सुद्युम्नाला आपण स्त्री झालो असून घोडाच घोडी झाली आहे , असे दिसले . ॥२६॥

त्याचबरोबर त्याचा सर्व सेवकवर्गसुद्वा स्वत :ला स्त्रीरुपात पाहून उदासपणे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला ॥२७॥

परीक्षिताने विचारले -

भगवन ! त्या जागी असा विचित्र प्रकार कसा झाला ? ती जागा अशी कोणी केली ? आपण आमच्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे . कारण आम्हांला अतिशय कुतूहल आहे . ॥२८॥

श्रीशुक म्हणाले -

एके दिवशी भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करीत वनामध्ये गेले . ॥२९॥

त्यावेळी अंबिकादेवीचे वस्त्र थोडेसे घसरले होते . ऋषीन अचानक आल्याचे पाहून ती अत्यंत लज्जित झाली . ताबडतोब भगवान शंकरांच्या मांडीवरुन उठून तिने वस्त्र सावरले . ॥३०॥

ऋषीसुद्वा गौरी -शंकर यावेळी विहार करीत आहेत , असे पाहून तिथून मागे फिरुन नर -नारायणांच्या आश्रमाकडे निघून गेले . ॥३१॥

त्याचवेळी भगवान शंकर आपल्या प्रियेला प्रसन्न करण्यासाठी म्हणाले की , "माझ्याखेरीज जो कोणी पुरुष या स्थानात प्रवेश करील , तो स्त्री होईल ." ॥३२॥

तेव्हापासून पुरुष त्या स्थानामध्ये प्रवेश करीत नाहीत . आता सुद्युम्न स्त्री झाला होता . म्हणून तो स्त्रिया झालेल्या आपल्या सेवकांसह एका वनातून दुसर्‍या वनात , याप्रमाणे फिरु लागला . ॥३३॥

त्याचवेळी भगवान बुधाने आपल्या आश्रमाजवळच अनेक स्त्रियांसह एक सुंदर स्त्री विहार करीत असलेली पाहून ती आपल्याला प्राप्त व्हावी , अशी इच्छा केली . ॥३४॥

चंद्रकुमार बुध आपला पती व्हावा , असे त्या स्त्रीलासुद्वा वाटले . त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झाला . ॥३५॥

अशा प्रकारे मनुपुत्र राजा सुद्युम्न स्त्री झाला . आम्ही असे ऐकले आहे की , त्याने या अवस्थेत आपले कुलपुरोहित वसिष्ठांचे स्मरण केले . ॥३६॥

सुद्युम्नाची ही दशा पाहून दयाळू वसिष्ठांना खूप वाईट वाटले . त्यांनी सुद्युम्नाला पुन्हा पुरुष बनविण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली . ॥३७॥

भगवान शंकर वसिष्ठांना प्रसन्न झाले . परीक्षिता ! त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करीत व आपली वाणीही सत्य राखीतच असे म्हटले . ॥३८॥

" वसिष्ठा ! तुमचा हा यजमान एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री राहील . या व्यवस्थेनुसार सुद्युम्नाने खुशाल पृथ्वीचे पालन करावे . " ॥३९॥

वसिष्ठांच्या अनुग्रहाने या व्यवस्थेनुसार , इच्छित पुरुषत्व मिळवून सुद्युम्न पृथ्वीचे पालन करु लागला . परंतु प्रजा त्याचा मान राखीत नसे . ॥४०॥

उत्कल , गय आणि विमल असे त्याला तीन पुत्र झाले . परिक्षिता ! ते सर्वजण दक्षिणेकडील राजे झाले . ॥४१॥

पुष्कळ दिवसानंतर वृद्वावस्था प्राप्त झाल्यावर प्रतिष्ठान नगरीचा अधिपती सुद्युम्न याने आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिले आणि स्वत : तपर्श्च्या करण्यासाठी तो वनात निघून गेला . ॥४२॥

अध्याय पहिला समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : June 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP