अध्याय अडतीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


आतां युद्धास येतील बहुत ॥ ते समरीं जिंकून समस्त ॥ मग वारू घेऊनि त्वरित ॥ जाऊं जननीच्या दर्शना ॥१॥

लहू म्हणे घालोनि पैज ॥ घ्यावें अयोध्येचें राज्य ॥ धरून आणावा रघुराज ॥ वाल्मीकचरणाजवळी पैं ॥२॥

असो वृक्षीं बांधोन श्यामकर्ण ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ अयोध्यापंथ लक्षीत पूर्ण ॥ दोघेजण उभे असती ॥३॥

घायाळ सैन्य उरले किंचित ॥ तें अयोध्येसी गेले धांवत ॥ राघवासी सकळ मात ॥ श्रुत केली तेधवां ॥४॥

दळभारासहित पूर्ण ॥ रणीं आटिला वीर शत्रुघ्न ॥ विप्रबाळक दोघेजण ॥ द्वादश वर्षांचे असती पैं ॥५॥

यज्ञमंडपीं रघुनंदन ॥ बंधूचा समाचार ऐकोन ॥ टाकोनि हातींचे अवदान ॥ भूमीवरी उलंडला ॥६॥

नेत्रीं ढळढळां वाहे नीर ॥ गजबजिले भरत सौमित्र ॥ बिभीषण हनुमंत मित्रपुत्र ॥ हडबडिले तेधवां ॥७॥

म्हणती यज्ञासी जाहलें विघ्न ॥ पडला महावीर शत्रुघ्न ॥ असो सौमित्राप्रति राजीवनयन ॥ काय बोलिला तेधवां ॥८॥

म्हणे शत्रुघ्नाऐसा वीरराणा ॥ ऋषिकिशोरें आटिला रणा ॥ तरी सवें घेऊनि अपार सेना ॥ धांवण्या धावे बंधूच्या ॥९॥

श्रीरामचरणाब्ज नमून ॥ वायुवेगें निघाला लक्ष्मण ॥ सवें चतुरंग सैन्य ॥ अपार तेव्हां निघालें ॥११०॥

चवदा गांवें रुंद थोर ॥ मार्गी ॥ चालिला सेनासागर ॥ वायुवेगें ऊर्मिलावर ॥ रणमंडळासीं पातला ॥११॥

तो सेनापति काळजीत ॥ सौमित्रासी पावला त्वरित ॥ तंव दोघे देखिले अकस्मात ॥ शशी आदित्य ज्यापरी ॥१२॥

श्यामसुंदर दोघेजण ॥ द्वादश वर्षांच्या मूर्ती लहान ॥ हातीं घेऊनि धनुष्य बाण ॥ धीट दोघे विलोकिती ॥१३॥

पहावया बंधूचें मानस ॥ बोलता जाहला वीर कुश ॥ म्हणे सेना पातली विशेष ॥ प्रताप विशेष दिसतसे ॥१४॥

सेनापति क्रोधयमान ॥ चपळ येतसे त्याचा स्यंदन ॥ आतां हा युद्ध करील दारुण ॥ आम्हांसी पुन्हां नाटोपे ॥१५॥

मग बोलिला लहू वीर ॥ तूं पाठिराखा आलासी सत्वर ॥ आतां मज बळ अपार येथोनियां चढियेले ॥१६॥

जैसी साह्य होतां सरस्वती ॥ सकळ कठिनार्थ उमजती ॥ तेवीं आजि निर्वीर करीन क्षिती ॥ तुझ्या बळेंकरूनियां ॥१७॥

तुजसी युद्धीं राहे समोर ॥ ऐसा असेल कोण वीर ॥ जरी स्वयें आला रामचंद्र ॥ तरी तूं त्यासी नाटोपसी ॥१८॥

तोंवरी गर्जे जलार्णव ॥ जों देखिला नाहीं कलशोद्धव ॥ तूं पंचानन हे सर्व ॥ जंबूक तुजवरी पातले ॥१९॥

जरी तम जिंकील सूर्यासी ॥ कीं भूतें गिळितील काळासी ॥ तरी समरांगणी युद्धासी ॥ तुजसी हें पुरतील ॥१२०॥

जरी आकाश बुडेल मृगजळीं ॥ वारा कोंडिजे भूगोळीं ॥ तरीच तुजसी समदळीं ॥ भिडो शकतील बंधुराया ॥२१॥

परी एकें संशयें गोंविलें ॥ जें माझे धनुष्य भंगिलें ॥ असंख्यात युद्ध जाहले ॥ उपवनाजवळी प्रथमचि ॥२२॥

मग सैन्य दळभार ॥ धरा धरा म्हणती किशोर ॥ आतां जातील हे कोठवर ॥ पाहूं नयनीं आम्हीच कीं ॥२३॥

वीर दोघे उभे ठाकूनी ॥ दळभार विलोकिती नयनीं ॥ सैन्य जैसं तृणप्राय करूनी ॥ उभे ठाकती तैसेच ते ॥२४॥

कुश म्हणे ऐसिया समयासी ॥ कोण चाप देईल आम्हांसी ॥ तरी आतां प्रार्थूं सूर्यासी ॥ धनुष्यप्राप्तीकारणें ॥२५॥

मग ते राघवी वीर दोघेजण ॥ एकनिष्ठें मांडिती सूर्यस्तवन ॥ ऊर्ध्व वदनें करून ॥ सूर्यमंडळ विलोकिती ॥२६॥

जयजय तमनाशका सहस्रकिरणा ॥ अंबरचूडामणे सूर्यनारायणा ॥ जीवमिलिंदबंधमोचना ॥ हृदयदळप्रकाशका ॥२७॥

एकचक्र कनकभूषित रथ ॥ सप्तमुख अश्व वेग बहुत ॥ निमिषार्धामाजी अपार पंथ ॥ क्रमोनि जात मनोगती ॥२८॥

आदिपुरुष तूं निर्विकार ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हीं स्वरूपें तुझींच साचार ॥ सर्वप्रकाशका आदित्या ॥२९॥

सकळ रोग दुःख भयहारका ॥ विश्वदीपना विश्वपाळका ॥ त्रिभुवननेत्रप्रकाशका ॥ काळात्मका काळरूपा ॥१३०॥

परिसोनि बाळकांची स्तुती ॥ तत्काळ प्रसन्न जाहला गभस्ती ॥ अक्षय्य धनुष्य क्षितीं ॥ ऊर्ध्वपंथें टाकिले ॥३१॥

सूर्यास साष्टांग नमून ॥ घेतले तेव्हां धनुष्यबाण ॥ म्हणती वाल्मीक गुरु धन्य पूर्ण ॥ सूर्यआराधन दिधलें जेणें ॥३२॥

आम्हांसी सद्गुरुराया अखंड ॥ क्षणें जिंकू हे ब्रह्मांड ॥ लहू म्हणे आजि कोड ॥ पुरवीन यांचे संग्रामीं ॥३३॥

सूर्यदत्त कोदंड घेऊन सत्वर ॥ सरसावला तेव्हां लहू वीर ॥ तों सौमित्राचें दळ समग्र ॥ चतुरंग भार लोटला ॥३४॥

अचुक दोघांचे संधान ॥ वायां न जाय टाकिला बाण ॥ पदाती अश्व रथ वारण ॥ तोडोनि पाडिती एकसरें ॥३५॥

कोणी धनुष्याची ओढी ओढित ॥ तों भुज तोडिती अकस्मात ॥ मणगटें असिलतेसहित ॥तोडोनि पाडिती क्षितीवरी ॥३६॥

शिरांच्या लाखोल्या घालोनी ॥ भूलिंगें पूजिली दोघांजणीं ॥ अशुद्धनदी लोटली वनीं ॥ जाती वाहून कलेवरें ॥३७॥

वीर संहारिले अपार ॥ काळजितास म्हणे सौमित्र ॥ हे दोघे असतां एकत्र ॥ कल्पांतीही नाटोपती ॥३८॥

तरी बहुत कटक घेऊन ॥ ज्येष्ठासी धरी तूं वेष्टून ॥ धाकट्याभोंवते आवरण ॥ मी घालूनि धरितसे ॥३९॥

मग दोन भाग कटक केले ॥ दोघे दोहींकडे फोडिले ॥ चोवीस वेढे घातले ॥ सभोंवते सैन्याचे तेधवां ॥१४०॥

सौमित्रें वेढिला लहू वीर ॥ जैसा तृणें झांकिला वैश्वानर ॥ कीं अजांनी कोंडिला महाव्याघ्र ॥ कीं खगेश्वर सर्पांनी ॥४१॥

परी तो लहू प्रतिज्ञावीर ॥ चापासी लावून सोडी शर ॥ फिरत फिरत चक्राकार ॥ सोडी पूर बाणांचा ॥४२॥

धन्य वाल्मीकाचे दिव्य मंत्र ॥ एका बाणाचे कोटी शर ॥ होऊनि शिरें पाडी समग्र ॥ नवल वीर राघवी ॥४३॥

रघुपतीचा मित्र विशेष ॥ रुधीनामा धांवला राक्षस ॥ तो महाबलिष्ठ गगनास ॥ उडोनि गेला तेधवां ॥४४॥

खालीं अकस्मात उतरूनी ॥ लहूचें चाप सत्वर हिरूनी ॥ अंतरिक्ष गेला उडोनी ॥ फळ घेऊन पक्षी जैसा ॥४५॥

हातींचे हिरून नेले चाप ॥ लहू पाहे तटस्थरूप ॥ तस्करापाठीं लागतां सर्प ॥ खंडी जैसा चरणातें ॥४६॥

व्याळ मूषक धरूं जातां ॥ वणव्यांत सांपडे अवचितां ॥ कीं रिसामागें धांवतां ॥ बोरांटी आंगी अडकली ॥४७॥

निधान साधावया गेला ॥ तों विवशीं पडली येऊन गळां ॥ तैसें लहूस जाहलें ते वेळा ॥ धनुष्य नेतां रुधीने ॥४८॥

असो सीतासुत परम चतुर ॥ जैसा निराळी उडे खगेश्वर ॥ तैसा उडोनियां सत्वर ॥ रुधी राक्षस धरियेला ॥४९॥

हातींचे धनुष्य हिरून घेतलें ॥ असुर झोटी धरिला तये वेळे ॥ गरगरां फिरवूनियां बळे ॥ पृथ्वीवरी आपटिला ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP