अध्याय बारावा - श्लोक १५१ ते १७८

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


नक्षत्रांत जैसा चंद्र ॥ तैसा मध्यें भरत साचार ॥ रात्रंदिवस रामचरित्र ॥ भरत सांगे समस्तांतें ॥५१॥

किंवा मानससरोवरीं ॥ बैसती राजहंसाच्या हारी ॥ भरतास भोंवतें तेचिपरी ॥ वेष्टूनियां बैसले ॥५२॥

श्रीधर म्हणे श्रोतयां समस्तां ॥ चित्त द्यावें पुढील श्र्लोकार्था ॥ रघुनाथ चित्रकुटीं असतां ॥ काय कथा वर्तली ॥५३॥

कवीची शब्दरत्नमांदुस ॥ उघडितां पंडित पावती संतोष ॥ इतर कुबुद्धि मतिमंदास ॥ रत्नपरीक्षा नकळे हो ॥५४॥

असो चित्रकूटीं असतां रघुनंदन ॥ मिळोनि बहिर्मूख ब्राह्मण ॥ म्हणती रामा तूं जाईं येथून आम्हांसी विघ्नें तुझेनि ॥५५॥

तुझी स्त्री परम सुंदर ॥ न्यावया जपती बहुत असुर ॥ वाल्मीकभविष्य साचार ॥ ऐसेंचि असे जाण पां ॥५६॥

वनींहूनि वार्ता उठली साचार ॥ त्रिशिरा दूषण आणि खर ॥ दळभारेंसीं येथे येणार ॥ तुजकरितां रघुवीरा ॥५७॥

म्हणोनि सांगतों तुजसी ॥ येथोनि जाईं निश्र्चयेसीं ॥ नाहींतरी आम्हीं स्वाश्रमासी ॥ त्यजोनि जाऊं निर्धारें ॥५८॥

श्रीराम म्हणे ब्राह्मणांलागुनी ॥ तुम्हीं निश्र्चिंत असावें अंतःकरणीं ॥ काळही फोडीन समरंगणीं ॥ राक्षसांतें गणी कोण ॥५९॥

परम अविश्र्वासी ब्राह्मण ॥ म्हणती विघ्नें येती दारुण ॥ हा आपले स्त्रीस रक्षील जाण ॥ कीं आम्हांसी रक्षील ॥१६०॥

हा त्यांसीं न पुरे समरंगणीं ॥ चारी बाण जाती सरूनि ॥ याच्या बोलाचा विश्र्वास धरूनि कदां येथें न राहावें ॥६१॥

मग सकळीं करूनि एकविचार ॥ रात्रीचे उठोनियां समग्र ॥ कुटुंबें घेऊनि सत्वर ॥ गेले विप्र पळोनियां ॥६२॥

उपरी प्रातःकाळीं उठोन ॥ श्रीराम पाहे ऋषिजन ॥ तंव ते रात्रींच गेले पळोन ॥ राजीवनयन काय करी ॥६३॥

एक वाल्मीक उरला पूर्ण ॥ तो महाराज तपोधन ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ त्रिकालज्ञान जयासी ॥६४॥

वायुसंगें उडे तृण ॥ परी अचळ न सोडी स्थान ॥ किंवा रणमंडळ सोडून ॥ रणशूर कदा पळेना ॥६५॥

तैसा वाल्मीक उरला जाण ॥ तेणें आधींच कथिलें रामायण ॥ इतर बहिर्मूख ब्राह्मण ॥ श्रीराम निधान नोळखती ॥६६॥

प्रत्यया न येतां रघुवीर ॥ आचार तितका अनाचार ॥ कर्म तोच भ्रम थोर ॥ पिशाच नर तेचि पैं ॥६७॥

तणें केलें वेदपठण ॥ करतलामलक शास्त्रें प्रमाण ॥ परी तें मद्यपीयाचें भाषण ॥ राघवा शरण न जातां ॥६८॥

जैसी मुग्धा बत्तीसलक्षणीं ॥ परम सौंदर्य लावण्यखाणी ॥ परी मन नाहीं पतिभजनीं ॥ तरी तें सर्वही वृथा गेलें ॥६९॥

खरपृष्ठीस चंदन देख ॥ परी तो नेणें सुवाससुख । षड्रसीं फिरवी जे दर्वी पाक ॥ रसस्वाद नेणें ती ॥१७०॥

कृपा न करितां सीतावर ॥ कासया व्यर्थ तत्त्वविचार ॥ त्याचें ज्ञान नव्हे साचार ॥ जैसे कीर अनुवादती ॥७१॥

तेणें केले तीर्थाटण ॥ होय चौसष्ट कळाप्रवीण ॥ तेणें केलें जरी कीर्तन ॥ तें जाण गायन गौरियाचें ॥७२॥

असो रघुपतीस सांडोनि विप्र ॥ पळोन गेले समग्र ॥ जदद्वंद्य रघुवीर ॥ त्याचें स्वरूप नेणोनियां ॥७३॥

असो आतां बहु भाषण ॥ श्रीराम चित्रकुट त्यागोन ॥ वाल्मीकऋषीस नमून ॥ दंडकारण्या चालिला ॥७४॥

श्रीरामविजय ग्रंथ प्रचंड ॥ येथें संपलें अयोध्याकांड ॥ आतां अरण्यकांड इक्षुदंड ॥ अति अपूर्व सुरस पुढें ॥७५॥

रामविजय ग्रंथ क्षीरसागर ॥ दृष्टांतरत्नें निघती अपार ॥ संत श्रोते निर्जर ॥ अंगीकरोत सर्वदा ॥७६॥

ब्रह्मानंदा रविकुलभूषणा ॥ श्रीधरवरदा सीताजीवना ॥ पुढें अरण्यकांडरचना ॥ बोलवीं आतां येथोनि ॥७७॥

स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ द्वादशोध्याय गोड हा ॥१७८॥

॥ अध्याय ॥ १२ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP