मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर|

खडर्याची लढाई - १

पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो.


दैन्य दिवस आज सरले । सवाई माधवराव प्रतापि कलियुगांत अवतरले ॥ध्रुपद॥
भूभार सर्व हराया । युगायुगी अवतार धरी हरी दानव संहाराया ॥
कलियुगीं धर्म ताराया । ब्राह्मणवंशी जन्म घेतला रिपु निर्मूळ कराया ॥
सुकितीं मागें उराया । सौख्य दिले सर्वास अहरे सवाई माधवराया ॥
॥(चाल)॥ धन्य धन्य नानाचें शहाणपण । बृहस्पति ते बनले आपण । गर्भीं प्रभुचें पाहुनि रोपण तेव्हांच केला दुर्घट हा पण । आरंभिले मग रक्षण शिंपण । सरदारांचे घालुन कुंपण ॥ आपल्या अंगी ठेवून निरूपण । हरिपंतांना करुनि रवाना ॥(चाल)॥ दादासाहेब मागें वळविले । लगट करुनि फौजांनी मिळविले ॥ आपुल्या राज्यापार पळविले । कांही दिवस दुःखांत आळविले ॥ इतर कारणी भले लोळविले । लोहोलंगर पायांत खिळविले ॥ ठेवून गडावर चणे दलविले । बंदिवान तेथेंच खपविले ॥चाल)॥ बंड तोतया सहज मोडिला । एक एक त्याचा मंत्री फोडिला ॥ जमाव ठायिचे ठायी तोडिला । अडचण जागी मुख्य कोंडिला ॥ शहराबाहेर नेऊन झोडिला । जो नानांनी पैसा जोडिला । तोच प्रसंगी हुजूर ओढिला ॥ लागेल तितके द्रव्य पुरविले ॥(चाल)॥ तळेगावावर इंग्रज हरला । इष्टुर साहेब रणीच विरला ॥ उरला इंग्रज घांट उतरला । सरमजाम गलबतांत भरला ॥ रातोरात मुंबईत शिरला । सवेंच गाडर पुढेच सरला ॥ शिकस्त खाऊन तोही फिरला । फिरुन पुण्याकडे कधी पाहीना ॥(चाल)॥ अशी रिपूची मस्ती जिरविली । शुद्ध बुद्ध पहा त्याची हरली ॥ कारभार्‍यांनी पाठ पुरविली । पुण्यामध्ये अमदानी करविली ॥ पुरंदराहुन स्वारी फिरविली । पर्वतीस मग मुंज ठरविली । गजराची भिक्षावळ मिरविली । कालूकरे वाजंत्री वाजती ॥चाल)॥ लग्नचिटया देशावर लिहिल्या । ब्राह्मणांस पालख्याश्व वहिल्या ॥ पाठविल्या बोलाऊं पहिल्या । पठाण मोंगलसहित सहिल्या ॥ छत्रपति रोहिले रोहिल्या । भोसल्यांच्या मौजा पाहिल्या ॥ आणिक किती नांवनिशा राहिल्या । कवीश्वराची नजर पुरेना ॥(चाल)॥ आरशाचे मंडप सजविले । चित्रें काढून चौक उजविले ॥ थयथयांत जन सर्व रिझविले । गुलाब आणि अत्तरें भिजविले ॥ शिष्ट शिष्ट शेवटीं पुजविले । रुपये होन मोहोरांनीं बुजविले ॥ श्रीमंत कार्यार्थ देह झिजविले ॥ यशस्वी झाली सकल मंडळी ॥(चाल)॥ सत्राशें सातांत बदामी । हल्लयाखाली केली रिकामी । एक एक मोहोरे नामी नामी । फार उडाले रणसंग्रामीं ॥ बाजीपंत अण्णा ते कामीं हरीपंत तात्याचे लगामीं । परशुरामपंत त्या मुक्कामीं ॥ स्वामी सेवक बहुत जपले ॥(चाल)॥ गलीमास कांही नव्हते भेऊन । पराक्रमानें किल्ला घेऊन ॥ अलिबक्षावर निशाण ठेवून । पुण्यास नानासहित येऊन । श्रीमंतांनी वाडयामध्यें नेऊन । पंचामृती आनंदे जेऊन ॥ बहुमानांची वस्त्रें देऊन । बोळविलें तयाला ॥(चाल)॥ सत्राशें तेरावें वरीस ॥ अवघड गेलें पहिल्या परीस ॥ करनाटकच्या पहा स्वारीस । टोपीकर मोंगल पडले भरीस ॥ तरी तो टिपू येइना हारीस । त्यावर तात्या गेले परीस ॥ आणुन टिपू खूब जेरीस । साधुनी मतलब हरिपंतांनी ॥(चाल पहिली)॥ नंतर मागें फिरले । दरकुच येऊन पुण्यास प्रभुचे चरण मस्तकीं धरिले ॥ दैन्य दिवस आज सरले०॥१॥


केवढें भाग्य रायाचें । चहुंकडे सेवक यशस्वी होती हें पुण्य त्या पायांचें ॥ करितां स्मरण जयाचें । कांहीं तरी व्हावा लाभ असें बलवत्तर नाम जयाचें ॥ प्रधानपद मूळ याचें । सत्राशें चवदांत मिळालें वजीरपद बाच्छायाचें ॥(चाल)॥ मुगुटमणी ते पाटिलबावा । कोठवर त्यांचा प्रताप गावा ॥ दर्शनमात्रे तापच जावा । नवस नवसितां फळास यावा ॥ हरहमेशा शत्रुशि दावा । माहित सगळा मराठी कावा ॥ हुशार फौजा लढाई लावा । जिंकुन हिंदुस्थान परतले ॥(चाल)॥ चवडा वर्षे बहुत भागले । म्हणून शिरस्ते पाहून मागले ॥ तरतुदीस कारभारी लागले । उंच उंच पोषाग चांगले ॥ देऊन फार मर्जीनें वागले । भेटीसमयीं जंबूर डागले ॥ मग तोफांचे बार शिलगले । सूर्यबिंब अगदींच झांकले ॥(चाल)॥ राव जेव्हां नालकींत बसले । कृष्ण तेव्हां ते जनास दिसले । अर्जुन पाटिलबावा भोसले । पायपोस पदरानें पुसले ॥ चरणीं मिठी माराया घुसले । कर प्रभुनीं बगलेंत खुपसले ॥ इमानी चाकर नाहींत
असले । धन्य धनी आणि अनिवार पतंग । पळस फुलाचा नाहीं प्रसंग ॥ मस्त चालती ॥(चाल)॥ गुलास सोदे बुडवुनि पाजी । पंतप्रधान राखुन राजी ॥ लष्कर दुनय, करून ताजी । शके विष्णुपरदाजी । शरीर वानवडीस ठेवुनी ॥(चाल)॥ सवाचार महिन्यांचें अन्तर । हरिपंत तात्या गेले नंतर ॥ तेथें न चाले तंतर मंतर । वर्तमान हें एक अधिकोत्तर ॥ कांहीं न करिती नाना उत्तर । दिलगीर मजीं सुकलें अंतर ॥ हिरे हरपले राहिले फ्त्तर । तरी तो पुरुष बहुत धिराचा ॥(चाल)॥ दौलतीचे आज खांबच खचले । लाल होते ते कोठेंच पचले  ॥ शिपायांचे काय चुडेच पिचले । परंतु नाना नाहीं कचले ॥ कडोविकडीचे विचार सुचले । कलमज्यारीचे घटाव मचले ॥ मोगंलावार मोचें रचले । जिकडे तिकडे झाली तयारी ॥(चाला)॥ पुकार पडला  पृथ्वीवरती सैन्यसमुद्रा आली भरती ॥ आगाऊ खर्ची मोहरा सुतीं । रात्रंदिवस श्रम नाना करती ॥ कशी ही मोहिम होईल पुरती । राव निघाले सुदिनमुहूर्तीं ॥ लिंबलोण उतरितात गरती । इडापिडा काढून टाकिती ॥(चाल)॥ गारपिराच्या मग रोखांना । तमाम रिघला फरासखाना ॥ उजव्या बाजूस जामदारखाना । डावेकडे तो जवेरखाना । देवढीबराबर सराफखाना । चकचकीत खुभ सिलेखाना । मध्यें रायाचा तालिमखाना  खाळ खळ खळ जेजिमा वाजती ॥(चाल)॥ वाडयाबाहेर जिन्नसखाना । बाजाराच्या पुढें पिलखाणा ॥ दिला बिनीवर तोफखाना । मोठमोठया पल्ल्याच्या जरवा ॥(चाल पहिली)॥ चोहोंकडे लोक पसरले । नित्य नवे गणतीस लागती एकांडे देशावरले ॥ दैन्य दिवस आज सरले०॥२॥

बहुत शिंदे जमले । शिलेपोस पलटणें लाविती पठाण जरिचे समले ॥ रणपंडित ते गमले । भले भले पंजाबी ज्वान दक्षिणेंत येउन रमले । ज्यांपुढें शत्रु दमले । त्यांणीं शतावधि कोस स्वामिकार्यास्तव लवकर क्रमिले ॥(चाल)॥ आधींच दौलतराव निघाले । काय दैवाचे शिकंदर ताले ॥ फौज सभोंवतीं जमून चाले । खांद्यावरती घेऊन भाले ॥ सर्व लढाया तयार झाले । जिवबादादा गर्जत आले ॥ हासनभाई उज्जनीवाले । महाराजांचे केवळ कलिज ॥(चाल)॥ बाळोबास तर काळिज नाहीं । धीट रणामध्यें उभाच राही ॥ धोंडिबास जगदंबा साही । जय करण्याची चिंता वाही । सदाशिव मल्हार कांहीं ॥ मागें पुढें तिळमात्र न पाही । देवजी गवळी रिपूस बाही ॥ रणांगणाचा समय साधिती ॥(चाल)॥ निसंग नारायणराव बक्षी । हटकुन मारी उडता पक्षी ॥ बंदुकीला कटपटयास नक्षी । फत्ते होई तों गोड न भक्षी ॥ रायाची पाटिला महत्त्व रक्षी । नित्य कल्लयाण धन्यांचे लक्षी । पिढीजाद शिंद्याचे पक्षीं । केवळ अंतरंग जिवांचे ॥(चाल)॥ मेरूसाहेब कठिण फिरंगी । कलाकुशलता ज्याचे अंगी ॥ सामायन किळकाटा जंगी । मुकीरसाहेब भले बहुरंगी ॥ हपिसर पदरीं चंगीभंगी । जीनसाहेबाची समशेर नंगी । दुर्जन साहेब झटे प्रसंगी । झर झर झर बुरुज  बांधुनी ॥(चाल)॥ शाहामतखा सरदार किराणी । बाच्छायजादे थेट इराणी ॥ किती काबूल खदार दुराणी । मुजफरखाची टोळी खोराणी ॥ कडकडीत सिंगरूपची राणी । तारीफ करती गोष्ट पुराणी ॥ इतरांची ठेविना शिराणी । पंचविशीमध्यें ज्वान पलटणी ॥(चाल)॥ येथून सरली शिंदेशाई । होळकराची आली अवाई ॥ तुकोजी बाबांना गुरमाई । आधींच बळ स्वार शिपाई । वारगळ बरोबर फणशे जावाई ॥ लांबहांते बुळे वाघ सवाई । वाघमारे कुळ धनगरभाई ॥ खेरीज ब्राह्मण नागो जिवाजी ॥(चाल)॥
शिवाय होळकर खासे खासे । काशीबाजी तर हुंगुन फांसे । लढाईचे आणून नकाशे । स्वस्थपणें करतात तमाशे ॥ बापुसाहेबांना येती उमासे । मल्हारजींनी देउन दिलासे ॥ जा जा म्हणती लोक बगासे । जंहामर्द तरवारकरांचे ॥(चाल)॥ हरजी विठूजी आनंदराव । स्वतां धनी यशवंतराव ॥ संताजीचें प्रसिद्ध नांव । आबाजीचा तिखट स्वभाव । दूर नेला साधितात डाव ॥ विचारी मतकर माधवराव । भागवतांनी सोडुन गांव ॥ ताबडतोब निघाले ॥(चाल)॥ महाशूर पटवर्धन सारे । ठाइं ठाइं त्यांचे फार पसारे ॥ चिंतामणराव शूर कसारे । केवळ एकांगी वीर जसारे ॥ परशुराम रामचंद्र असारे । चहुंकडे ज्याचा पूर्ण ठसारे ॥ अप्पासाहेब तोही तसारे । थरथर ज्याला शूर कांपती ॥(चाल)॥ रास्ते आनंदराव दादा । पानशांची बहु मर्यादा ॥ विंचुरकरामधिं गांडु एखादा । राजाबहाद्दर पुरुय जवादा । चौपट खर्च दुप्पट आदा ॥ पुरंधर्‍यांची कदीम इरादा । तत्पर पेठे मोगलवादा ॥ ओढेकरही येऊन भेटले ॥(चाल पहिली)॥ वामोरकर सांवरले आंबेकर आणि बारामतीकर प्रसंगास अनुसरले ॥ दैन्य दिवस आज सरले ॥३॥
खास पतक नानाचें । निवडक माणुस त्यांत पुरातन सूचक संधानाचें ॥ पद देऊनि मानाचें । खुप करुनि बाबास काम मग सांगुन सुलतानाचें ॥ बळ विशेष यवनांचें । हें ऐकुनी लोकांनीं सोडिलें पाणी शीरसदनाचें ॥(चाल)॥ आपा बळवंतराव सुबुद्ध बिनिवाले पुरुषार्थी प्रबुद्ध ॥ पवारांत मर्दाने शुद्धा । वाढविति भापकर विरुद्ध ॥ केवढयांना शुष्कवत युद्ध । काढिती हांडे रणीं अशुद्ध ॥ धायगुडे निर्बाणी कुबुद्ध । शेखमिरा फौजेंत मिसळले ॥(चाल)॥ पराक्रमी हिमतीचे दरेकर । तसेच जाधव बुरुजवाडीकर ॥ अमीरसिंग जाधव माळेगावंकर । सुजाण गोपाळराव तळेगांवकर ॥ जानराव नाईक नठ निंबाळकर । शेकर सोयरे बाळो वडाळकर ॥ करारी डफळे अनंतपुरकर । आढोळ्याचे लोक इमानी ॥(चाल)॥ कामरगांवकर मग बोलवले । प्रतिनिधीला किती गौरविले । हर्ष वाहले पुढें सरसावले ॥ रणनवरे दरकुच धांवले । समाधान राऊत पावले । बन्या बापु जसे नवरे मिरविले । शहर पुणें रक्षणार्थ ठेविले ॥ माधवराव रामचंद्र कानडे ॥(चाल)॥ सरमजामी सरदार संपले । शिलेदार मागें नाहीं लपले ॥ धाराशिवकर लेले खपले । जमेत सुद्धां ते आपापले ॥ गोट गणतिला तमाम जपले । सानपदोर्गे निगडे टपले ॥ खुळे वाघ आणि बाबर सुपले । भगत बडे डोबाले दिपले ॥ जाधव काळे माळशिकारे ॥(चाल)॥ बाजीराव गोविंद बर्वे । लाड शिरोळे धायबर सुर्वे ॥ दाभाडयाचा हात न धरवे । भगवंतसिंग बैसे बेपर्वे । वझरकराचा लौकिक मिरवे । खंडाळ्याचे पोषाग हिरवे ॥ नलगे भोयेत सुंदर सर्व । सखाराम हरी बाबुराव ते ॥(चाल)॥ कडकडीत हुजुरात हुजुरची । वीस सहस्त्र जूट पदरची ॥ राउत घोडा बंदुक बरची । केवळ आगच उतरे बरची ॥ एक एक पागा अमोल घरची । दाद न देती देशांतरची ॥ काय कथा त्या भागानगरची । रणांगणी काळास जिंकिती ॥(चाल)॥ दिघे फडतरे बाबरकाठे । तळापीर मानसिंग खलाटे । मारिती पुढें समोर सपाटे । निलाम कवडे झाले खपाटे ॥ देवकांत्याचे फार हाकाटे । मुळे गांवढे करिती गल्हाटे ॥ जगतापाचे महतर भोयटे । भले मुर्तुजा महात थडयाचे ॥(चाल)॥ गणेश गंगाधर थोरात । निळकंठ रामचंद्र भरात ॥ आयतुळे मान्य सकळ शूरांत । बेहरे मांजरे योग्य वीरांत ॥ राघी बापुजी रणघोरांत । येसोजी हरी सैन्य पुरांत ॥ दारकोजीबाबा निंबाळकरांत । वरिश्रींत तो धुंद सग्याबा ॥(चाल)॥ कृष्णसिंग हैबतसिंग तारे । तसेच लक्ष्मणसिंग बारे ॥ दावलबावा महात सारे । मिळाले भापकर ते परभारे ॥ मैराळजी पायगुडे विचारे । इंदापुरकर नव्हत बिचारे । गणेश विठ्ठल वाघमारे ॥ बिडकर खुर्देकर आटीचे ॥(चाल)॥ राठोड श्रमाचे ॥ टिळे कपाळी रामनामाचे । बिनीबरोबर ते नेमाचे ॥ श्रीमंतस्मरणें काळ क्रमाचे । जसे दूत सांबाचे प्रतापी ॥(चाल पहिली)॥ प्रपंच वैद्य विसरले । चिलख बखूतर शिलेटोप मल्हारराव पांघरले ॥ दैन्य दिवस आज ते सरले० ॥४॥

लष्कर सगळें गुर्के । जरीपटक्याभोंताले घालिती गरर मानकरी गर्के ॥ सुंदर गोरे भुके । घोरपडे पाटणकर महाडिक खानवीलकर शिर्के ॥ मुंगी मध्ये ना फिर्के । चव्हाण मोहिते गुजर घाडगे निंबाळकर दे चर्के ॥(चाल)॥ पुढे पसरले रिसालदार । भुसा मुत्रीम नामदार ॥ सय्यद अहमद जमादार । अमीर आबास नव्हे नादार ॥ शाहामिरखां ते डौलदार । इतक्यांवर ते हुकूमदार ॥ राघोपंत ते दौलतदार । तसे काशिबा बल्लाळ रानडे ॥(चाल)॥ गोरा मुसावास अमोल । मुसानारद तो समतोल ॥ विनायकपंताचा बांधुनि आबा काळे गुणीच डोल ॥ टोपकराचे बोलती बोल । पायदळांचा बांधुनि गोल ॥ तंबुर ताशे वाजती ढोल । उठावल्या बैरखा निशाणें ॥(चाल)॥ संस्थानी याविरहित राजे । सेनासाहेब किताब साजे ॥ राघोजीबाबा नांव विराजे । बाणांचा भडीमार माजे ॥ सरखेलांचा लौकिक गाजे । समशेर बहादर गरीब नवाजे ॥ अकलकोटी लोक ताजे । दुर्जनसिंग रजपूत हडोदी ॥(चाल)॥ दक्षण उत्तर पश्चिम भागीं । पसरून तोफा जागोजागी । तमाम गारदी त्याचे मागी । स्वार सैन्य त्यामागें झगागी ॥ जरीपटका तो दुरून धगागी । कोणीच नव्हता त्यांत अभागी ॥ त्वरित बक्षिस पावे बिदागी । जासून सांडणीस्वार धांवती ॥(चाल)॥ काय पलटणच्या फैरा झडती । पर्जन्यापरि गोळ्या पडती ॥ शिरकमळें कुंदुकवत्‍ उडती । छिन्न भिन्न किती होऊन रडती ॥ कितीक पाण्याविण तडफडती । कितीक प्रेतामधीच दडती ॥ वीर विरांशी निसंग भिडती । सतीसारखे विडे उचलिती ॥(चाल)॥ पाउल पाउल पुढें सरकती । घाव चुकावून शूर थडकती -॥ सुपुत, वाघापरी गुरकती । हत्यार लाऊन मागें मुरकती ॥ खुणेनें शत्रुवर्म तरकती । मोंगल बच्चे मागें सरकती ॥ जिवबादादा मनीं चरकती । अररररर शाबास बापांनो ॥(चाल)॥ सुटती तोफा धुंद दणादण गुंगत गोळे येती छणाछण ॥ सों सों करिती बाण सणासण । खालेल घोडे उडती झणाझण । एकच गदीं झाली धुराची ॥(चाल)॥ थोर मांडली रणधुमाळी । अगदींच बसली मग कांठाळी ॥ फौज पसरली रानोमाळीं । लाखो लाख तरवार झळाली ॥ होळकराची फिरती पाळी । जिवबांची मर्दुमकी निराळी ॥ मोंगलाची केली टवाळी । सबळ पुण्य श्रीमंत प्रभूचें ॥(चाल)॥ अठरा घटका लाही फुटली । तोफ ह्जारों हजार सुटली ॥ मिरजकरांची मंडळी झटली । भाउबरोबर निसंग तुटली ॥ मोंगल सेना मागें हटली ॥ त्यासमयीं कैकांची उपटली ॥ पेंढार्‍यांनीं दौलत लुटली । गबर झाले एका दिसांत ॥(चाल)॥ शके सत्राशें सोळा भरतां । आनंद संवत्सरही सरतां । दहा दिवस शिमग्याचे उरतां । वद्य पंचमी सुवेळ ठरतां ॥ तीन प्रहरांचा अंमल फिरतां । मोगलांशी प्रसंग करितां ॥ पळाले मोंगल धीर न धरतां । चंद्रउदयी खडर्यात कोंडिले ॥(चाल पहिली)॥ गढींत खासे शिरले । मराठे मोंगल पठाण पुर्भे इतर घरोघर भरले ॥ दैन्य दिवस हे आज सरले ॥५॥

बहुत खराबी जहाली । मोहोर्‍यावरची फौज सैनिकांसहित रस्ते नाहली ॥ त्यांत उन्हाची काहाली । रुपयांचे दिड शेर पाणी अशी कठीण वेळा वाहली ॥ ती सर्व जनांनीं पाहिली । जिवबादादा परशुरामपंतांची दिसंदिस बहाली ॥(चाल)॥ निजाम अल्लीखान नव्हे सामान्य । बाच्छाई सुलतानांत मान्य ॥ जुनाट पुरुषांत राजमान्य । अपार पदरीं मण धनधान्य ॥ कोण बरोबरी करील अन्य । दैव धन्याचें मुळीं प्राधान्य ॥ तशांत झाले अनुकूल दैन्य । नाहीं तर घेते खबर पुण्याची ॥(चाल)॥ जेव्हां मारिती यवन मुसंडी । तेव्हांच होई ती फौज दुखंडी ॥ साठ सहस्त्र पठाण बुंडी । तिनशें तोफा थोर अखंडी ॥ पंचरशी आणि बिडी लोखंडी । तयार दारु तिनशे खंडी ॥ असें असुनियां दबली लंडी । धरून मश्रुल्मुलूख आणिला ॥(चाल)॥ संकटीं मोंगल अति पडियेला । देश होता तो तोडीस नेला ॥ तो तेहतीस लक्षांचा गेला । तीन कोटींचा करार केला ॥ पण नानांशी सिद्धीस नेला । फिरली मोंगलाचा ढपेला ॥ नक्षत्रापरी आला तजेला । त्यामध्यें माधव चंद्र उदेला ॥(चाल)॥ स्वारी नव्हे स्वयंवर झालें । श्रीमंतांस ऐश्वर्य मिळालें ॥ अपेश अटकेपार पळालें । यादव सैन्य हरीभोंतालें ॥ तसेंच लष्कर पुण्यास आलें । पहावया जन सर्व निघाले ॥ दर्शन होतां शरीर निवालें । घरोघरीं आनंद माइना ॥(चाल)॥ पाहुन पूर्वापार शिरस्ते । भवानी पेठेपासुनी रस्ते ॥ दीपोत्सव शोभती दुरस्ते । शृंगारून गज तुरंग बस्ते ॥ शहरामाजी पदार्थ सस्ते । पहिलवान आणि जेठी मस्ते । खुराक त्यांना बदाम पिस्ते ॥ सदा धुंद जिलीबींत चालती ॥(चाल)॥ भांड भाट भालदार भवय्ये । सुस्वर गाती धाडी गवय्ये ॥ शिरापुरीचे सदा खवय्ये । मिठाई देती नित्य हलवय्ये ॥ लोक सभोंवती लढवय्ये । नानासारिखे वीर संगवय्ये ॥ बलाढय शत्रू पराभवय्ये । धनी रावराजेंद्र कन्हय्ये ॥(चाल)॥ लगी बाण बोथाटया दाट । बिनाइटयाचा खळखळाट ॥ अंबार्‍यांचा मागें थाट । त्यामागें हुजुरात अचाट ॥ सत्तर हत्ती पुढें जुनाट । मधून फुटेना मुंगीस वाट ॥ झुगारिल्या जरी दुरूनी ताट । तरी तें खालीं कधीं पडेना ॥(चाल)॥ सत्राशें सत्रामधि स्वारी । राक्षस संवत्सरी स्वनगरीं ॥ उलटुनि आली घरिं माघारीं । संवत्‍  वैशाखाची बहारी ॥ शुद्ध त्रयोदशी शुक्रवारीं । दहा घटका रात्रिच्या सुमारीं । गुढया उभारून राजद्वारीं । गृहप्रवेश केला प्रभुनीं ॥(चाल)॥ न्याहाल केलें सरदारांना । दिला चौघडा मिरजकरांना ॥ खेरीज जहागिर विंचुरकरांना । कडीं कंठया देऊन शूरांना ॥ गौरवुनीं वीरांना । निरोप दिले मग अमीरांना ॥ गेले कृष्णा भीमातिरांना । कुटुंबसुद्धां स्वस्थ नांदती ॥(चाल)॥ गंगु हैबती शाईर मोठे । कवनीं ज्यांच्या बंद बनोटे ॥ महादेवाचे सवाई सोटे । गुणी राजाचे शब्द शिधोटे । जसे गोडिला घिवर चिरोटे ॥ सतर कवीश्वर केवळ गोटे । अर्थप्रास लावितात खोटे ॥ पगडया फिरवुन डौल मिरविती ॥(चाल पहिली)॥ कैक प्रसंगीं हरले । बिनडाकिल दागिने अमोलिक प्रभाकराचे ठरले ॥ दैन्य दिवस आज सरले ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP